Tag Archive for: साधना

अभीप्सा म्हणजे जीवाने उच्चतर गोष्टींसाठी केलेला धावा होय; जे काही उच्चतर किंवा ईश्वरी चेतनेशी संबंधित आहे, त्यासाठी किंवा ईश्वरासाठी केलेला धावा होय, त्याला दिलेली हाक आहे.

*

अभीप्सा ही वासनेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याच्या निकडीची भावना आणि ईश्वराप्रत व ईश्वरप्राप्तीची शांत, स्थिर इच्छा असली पाहिजे, आस असली पाहिजे.

*

साधकाने योगमार्ग चालणे सुरु केल्यानंतर, आरंभीआरंभी व पुढेही दीर्घ काळपर्यंत त्याला अनुभव किती वेगाने येतील, अनुभवाची व्यापकता किती असेल, त्यांची तीव्रता किती असेल, अनुभवाच्या फलांची ताकद किती असेल हे सारे मूलतः साधकाच्या अभीप्सेवर आणि त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर अवलंबून असते.

वस्तूंच्या बाह्यवर्ती रूपांमध्ये व त्यांच्या आकर्षणात बुडालेल्या अहंप्रधान जाणिवेतून बाहेर पडून, एका उच्च अवस्थेच्या दिशेने मानवी आत्म्याचे वळणे की ज्या अवस्थेत मग विश्वरूप आणि विश्वातीत असलेले तत्त्व व्यक्तिरूपी साच्यात उतरून, व्यक्तिरूप साच्याचे परिवर्तन घडवू शकते, ती प्रक्रिया म्हणजे योगाप्रक्रिया होय. म्हणून या सिद्धीचा पहिला निर्णायक घटक असतो तो म्हणजे, आत्म्याला अंतर्मुख करणाऱ्या शक्तीची, आत्माभिमुखतेची तीव्रता.

साधकाच्या हृदयातील अभीप्सेचा जोर, त्याची इच्छाशक्ती, मनाची एकाग्रता, त्याच्या प्रयत्नांची चिकाटी आणि शक्तीचे उपयोजन करण्याचा त्याचा निर्धार ह्या गोष्टी म्हणजे ती तीव्रता दर्शविणारे मापदंड असतात….

….ईश्वरप्राप्तीचा हा उत्साह आणि ईश्वरप्राप्तीसाठी हृदयाची तळमळ, व्याकुळता ह्या गोष्टी साधकाचा अहंकार नष्ट करतात आणि त्याचा क्षुद्र, मर्यादित असा जो साचा असतो त्याच्या मर्यादा मोडून काढतात. आणि ज्याच्या भेटीसाठी तो तळमळत होता त्याच्या परिपूर्ण व व्यापक स्वागतासाठी जागा करून देतात. आणि त्यामुळे वैयक्तिक आत्मा व प्रकृती ही कितीही मोठी, कितीही उच्च असली तरी, ज्याचे स्वागत करावयाचे ते ईश्वरीतत्त्व हे विश्वरूप असल्याने अधिक व्यापक असते, आणि ते विश्वातीत असल्याने वैयक्तिक आत्म्याच्या अतीत असते.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 56), (CWSA 29 : 60-61), (CWSA 23 : 58)

चैत्य पुरुषाचे जागृत होणे आणि तो पुढे येणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. चैत्य पुरुषाचे जागृत होणे म्हणजे मागे असलेल्या चैत्याची जाणीवपूर्वक कृती…

जेव्हा तो पुढे येतो तेव्हा तो मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अधिराज्य गाजवतो आणि त्यांच्या सर्व हालचालींचे चैत्यीकरण करतो. विशेषत: अभीप्सा बाळगून व कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, नि:शेषत्वाने श्रीमाताजींकडे पूर्णपणे वळल्याने आणि त्यांना समर्पित झाल्याने चैत्यपुरुष पुढे येतो. परंतु कधीकधी ‘आधार’ (मन, प्राण आणि शरीर) जर सक्षम झालेला असेल तर, अशावेळी तो स्वत:हूनच पुढे येतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 354-355)

जेव्हा चैत्य पुरुष पुढे येतो तेव्हा, व्यक्तीला, साध्यासुध्या उत्स्फूर्त अशा आत्मदानासहित चैत्य पुरुषाची जाणीव होते आणि मन, प्राण व शरीर यांच्यावरील त्याच्या चढत्या-वाढत्या थेट नियंत्रणाचा व्यक्तीला अनुभव येतो; हे नियंत्रण निव्वळ झाकलेल्या किंवा अर्ध-झाकलेल्या प्रभावातून आलेले नसते, तर ते थेट नियंत्रण असते.

विशेषत: जेव्हा चैत्य विवेक येतो तेव्हा विचार, भावनिक आंदोलनं, प्राणिक आवेग, शारीरिक सवयी एकाएकी उजळून निघतात आणि तेथे काहीच धूम्राच्छादित, झाकोळलेले, तिमिरात्मक असे शिल्लक रहात नाही; चुकीच्या हिंदोळ्यांऐवजी योग्य स्पंदने त्यांची जागा घेतात. हा चैत्य विवेक दुर्लभ आणि दुर्मिळ असतो.

*

केंद्रवर्ती प्रेम, भक्ती, समर्पण, सर्वस्वदान, आध्यात्मिक दृष्ट्या योग्य काय व अयोग्य काय हे नेहमीच स्वच्छपणे पाहणारी आणि आपोआपच अयोग्य गोष्टींना नकार देणारी आंतरिक दृष्टी ही चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.

तसेच, समग्र आत्मनिवेदनाची प्रक्रिया आणि एखाद्या व्यक्तीने स्वत:मधील सर्वाचे श्रीमाताजींच्या प्रति केलेले समर्पण ही देखील चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 352), (CWSA 30 : 356)

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली आस यांद्वारे ! आणि सर्वांवर कळस म्हणजे, प्रगतीसाठीचा संकल्प आणि आत्मशुद्धीकरण यांद्वारे हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

ज्यांच्यामध्ये प्रगतीची इच्छा तीव्र असते आणि जेव्हा ते ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळवितात तेव्हा, आपोआप त्यांच्यामधील चैत्य अग्नी प्रदिप्त होतो. एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, ते सारे जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये फेकून दिले तर, हा अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे.

कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो. जेव्हा प्रकृतीमध्ये असे काही असते की, जे प्रगत होण्यापासून रोखत असते; ते जर व्यक्तीने त्या अग्नीमध्ये फेकून दिले, तर ते जळू लागते आणि ती ज्वाला अधिकाधिक मोठी होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

एखाद्या व्यक्तीला चैत्य पुरुषाचा शोध घ्यावयाचा असेल, तर त्या व्यक्तीला चैत्य पुरुषाच्या अस्तित्वाविषयी दृढ विश्वास व श्रद्धा असणे, अपेक्षित आहे. व्यक्ती त्याविषयी जागरुक व्हावयास हवी आणि चैत्य पुरुषाने आपले जीवन हाती घेऊन, आपल्या कृतींना दिशादर्शन करणे हाती घ्यावे ह्यासाठी, व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे. व्यक्तीने प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ घेऊन, त्याला आपले मार्गदर्शक बनविले पाहिजे. व्यक्ती चैत्य पुरुषाला अधिकाधिक आत्मनिवेदन करत गेली, त्याचे मार्गदर्शन अधिकाधिक घेत राहिली तर, व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वाच्या विविध गतिविधींविषयी जागरुक होते.

*

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे, त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 302) आणि (CWM 16 : 399)

जर का कोणी ईश्वरावर प्रेम करेल तर हळूहळू, या प्रेमाच्या प्रयत्नातून ती व्यक्ती अधिकाधिक ईश्वरसदृश होऊ लागते. आणि नंतर ती त्या दिव्य प्रेमाशीच एकरूप होते तेव्हा, तिला दिव्य प्रेम काय असते ह्याची जाण येते.
*
समग्र जीवन ईश्वराभिमुख झालेले, ईश्वराप्रत समर्पित झालेले, ईश्वराच्या सेवेमध्ये रममाण झालेले असणे म्हणजेच कणाकणाने, क्रमश: ईश्वराची अभिव्यक्ती होत जाणे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 106)

वस्तुत: खरंतर जी एकमेव शोकात्म गोष्ट आहे आणि तरीही ज्याची मनुष्याला खंत वाटत नाही, ती गोष्ट म्हणजे स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये त्याला आलेले अपयश ! स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये पूर्णतया त्याचे मार्गदर्शन न लाभणे, हीच खरोखर एकमेव शोकात्म गोष्ट आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन जगल्याशिवाय मरण पावणे, हे खरेखुरे अपयश आहे.

आणि खरे महाकाव्य, खरे वैभव जर कोणते असेल तर, ते म्हणजे स्वत:मधील ईश्वराचा शोध घेणे आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन व्यतीत करणे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 277)

प्रश्न : “आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये, असे काहीतरी असते की जे कळत-नकळतपणे, नेहमीच ईश्वराची आस बाळगत असते, म्हणून तो ईश्वर हाच आपले एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे.” असे येथे म्हटले आहे. आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये आस बाळगून असणारी ही गोष्ट कोणती?

श्रीमाताजी : तो आपल्या अस्तित्वाचा एक भाग असतो, परंतु तो प्रत्येकाच्या बाबतीत सारखाच नसतो. तो प्रत्येक व्यक्तीमधील असा एक घटक असतो की, जो उपजतपणे चैत्याच्या प्रभावासाठी खुला असतो. प्रत्येकामध्ये नेहमीच असा एक घटक असतो – काहीकाही वेळा चैत्य खरोखरच खूप झाकलेले असते, आपण त्याविषयी अजिबात जागृत नसतो – आपल्यातील तो घटक मात्र चैत्याकडे वळलेला असतो आणि त्याचा प्रभाव स्वीकारत असतो. हा घटक, आपली बाह्य जाणीव आणि चैत्य जाणीव यांच्यामधील मध्यस्थ असतो.

हा घटक प्रत्येकाच्या बाबतीत एकच असतो असे नाही तर, प्रत्येक व्यक्तिगणिक तो भिन्न असतो. व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये असा एक घटक असतो की, ज्याच्या माध्यमातून ती व्यक्ती चैत्याला स्पर्श करू शकते आणि त्या माध्यमातून ती चैत्य प्रभाव स्वीकारू शकते. ते व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीनुसार ही गोष्ट वेगवेगळी असते, परंतु प्रत्येकामध्ये असा एक घटक असतोच असतो.

तुम्हाला असे सुद्धा जाणवू शकते की, काही ठरावीक गोष्टी अशा असतात की, ज्या तुम्हाला एकदम पुढे रेटतात, तुमचे उन्नयन करण्यास त्या मदत करतात, कोणत्या तरी अधिक महान अशा एखाद्या गोष्टीकडचा दरवाजा त्या जणू उघडून देतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात, पण ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. व्यक्तीमधील तो एक असा घटक असतो की, जो इतर घटकांपेक्षा अधिक उत्सुक असतो. त्या घटकाला अधिक हुरुप असतो.

येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ही अशी एक ‘उत्साहवर्धक क्षमता’ असते की जी, व्यक्तीला तिच्या कमीअधिक जडतेमधून बाहेर काढते आणि ज्यामुळे ती व्यक्ती प्रभावित झाली होती त्या गोष्टीमध्ये कमीअधिक प्रमाणात पूर्णपणे झोकून देण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, कलाकाराला त्याची कला किंवा शास्त्रज्ञाला त्याचे विज्ञान जसे प्रवृत्त करते त्याप्रमाणे…. आणि साधारणत:, जी व्यक्ती काही निर्मिती करते, काही घडवते तिच्यामध्ये हे अशा प्रकारचे खुलेपण असते, एका असामान्य क्षमतेसाठी ती व्यक्ती खुली असते, ज्यामुळे तिच्यामध्ये एक हुरुप येतो. जेव्हा अशी निर्मितीक्षमता सक्रिय होते तेव्हा व्यक्तीमधील कोणतीतरी एक गोष्ट जागृत होते आणि त्यामुळे ज्या गोष्टीची निर्मिती चालू आहे त्यामध्ये, त्या व्यक्तीचे समग्र व्यक्तित्वच सहभागी होते. ही झाली पहिली गोष्ट.

आणि असे काही जण असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे दडून असलेले जे आश्चर्य आहे असे त्यांना वाटते त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत कृपा किंवा सार्वभौम सौंदर्य जाणवते अशा लोकांमध्ये त्या ईश्वराप्रत एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असते.

मला अशी काही माणसं माहीत आहेत की, ज्यांना काही ज्ञान नव्हते, म्हणजे ते काही फार शिकलेले होते असेही नाही, त्यांची मनं ही अगदीच सर्वसाधारण म्हणता येतील अशी होती परंतु त्यांच्याकडे ही आत्मीयतेची, कृतज्ञतेची भावना होती, त्या भावनेमुळेच ते सर्व काही द्यायला तयार असत, त्या भावनेपोटीच त्यांना समज येत असे आणि ते कृतज्ञ असत. अशा व्यक्तींबाबत, अगदी नेहमी, सातत्याने हा चैत्य संपर्क होत असे.. ते जेवढ्या प्रमाणात सक्षम असत, जेवढ्या प्रमाणात सजग असत – अगदी खूप सजग असेसुद्धा नाही, थोडे जरी सजग असत तेवढ्या प्रमाणात त्यांचे उन्नयन झाल्यासारखे, त्यांना कोणीतरी उचलून घेतल्याचे, त्यांना साहाय्य मिळाल्याचे जाणवत असे.

‘उत्साहवर्धक क्षमता’ आणि ‘कृतज्ञतेची भावना’ ह्या दोन गोष्टी व्यक्तींची तयारी करून घेत असतात. ही किंवा ती गोष्ट घेऊन व्यक्ती जन्माला येते आणि थोडेसे जरी कष्ट घेतले तर ती गोष्ट हळूहळू वृद्धिंगत होते, विकसित होत जाते. म्हणजे, तुम्हाला तुमच्या क्षुद्र आणि त्रासदायक अशा अहंकारातून बाहेर काढते अशी तुमच्यामधील उत्साहवर्धक क्षमता ही एक गोष्ट किंवा दुसरी गोष्ट म्हणजे, अशी उदारहृदयी कृतज्ञता, की ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षुद्र अशा अहंकारातून बाहेर पडून, कृतज्ञतेने समर्पित होऊ पाहता अशी कृतज्ञतेची उदारता!

स्वत:च्या चैत्य पुरुषामध्ये वसलेल्या ईश्वराच्या संपर्कात येण्यासाठीच्या या अतिशय शक्तिशाली तरफा आहेत. ह्या गोष्टी चैत्य पुरुषाशी जोडणारा एक खात्रीशीर धागा म्हणून काम करतात.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 417-19)

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 399)

प्रश्न : चैत्य व्यक्तिमत्त्वाचा विकास व्यक्तीने कसा घडवावा?

श्रीमाताजी : अनेकानेक जीवनानुभवामधून चैत्य व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते, ते वृद्धिंगत होत असते, विकसित होत असते आणि अंतत: ते एक परिपूर्ण, जागृत आणि मुक्त अस्तित्व बनते. असंख्य जन्मांमधून ही विकासाची प्रक्रिया अथकपणे चालू असते आणि जर व्यक्तीला त्याची जाणीव नसेल तर, ती याचमुळे असत नाही कारण की, व्यक्ती स्वत:च्या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत नसते. – चैत्य अस्तित्वाविषयी जागृत असणे हा अटळ असा आरंभबिंदू असतो.

अंतरंगात वळणे आणि एकाग्र होणे यातून व्यक्तीने स्वत:च्या चैत्य अस्तित्वाच्या जागृत संपर्कात यावयास हवे. चैत्य अस्तित्वाचा प्रभाव नेहमीच बाह्यवर्ती अस्तित्वावर पडत असतो, परंतु हा प्रभाव बहुधा नेहमीच गूढ असतो, तो दिसत नाही, त्याचे आकलन होत नाही, जाणवत नाही; जाणवलाच तर तो अगदी खरोखर अपवादात्मक परिस्थितीत जाणवतो.

हा संपर्क आणि त्याचे साहाय्य बळकट करण्यासाठी आणि शक्य झाल्यास, जागृत चैत्य व्यक्तिमत्त्वाच्या विकसनासाठी, व्यक्तीने एकाग्रतेच्या वेळी लक्ष तिकडे वळविले पाहिजे, त्याला जाणून घेण्याची, संवेद्य करण्याची आस बाळगली पाहिजे; त्याचा प्रभाव स्वीकारण्यासाठी स्वत:ला खुले केले पाहिजे आणि जेव्हा कधी त्याच्यापासून कोणते संकेत, संदेश मिळतील तेव्हा प्रत्येक वेळी ते संदेश अगदी काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पाळण्याबाबत खूप काळजी घेतली पाहिजे.

थोर अभीप्सा बाळगत जीवन जगणे, आंतरिकरित्या शांत बनण्याची, आणि शक्य तितक्या वेळी नेहमीच तसे शांत राहण्याची काळजी घेणे, व्यक्ती ज्या कोणत्या कृती करते त्या प्रत्येक कृतीबाबत परिपूर्ण प्रामाणिकता जोपासणे – या चैत्य पुरुषाच्या अभिवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 221-222)