Posts

समर्पण – ०५

दिव्य शक्तीने सर्वाचा स्वीकार करावा आणि त्यात परिवर्तन घडवून आणावे म्हणून, तुमचे म्हणून जे काही आहे ते सर्व आणि तुम्ही स्वतः यांना, ईश्वराला समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण.
*
जेव्हा समग्र अस्तित्वच ईश्वराच्या प्रकाशाकडे आणि प्रभावाकडे वळते आणि हातचे काहीही राखून न ठेवता, सारे काही त्या ईश्वरावर सोपविते, तेव्हा त्याला खरेखुरे समर्पण आणि प्रामाणिकता म्हणतात.
*
समर्पण, म्हणजे आपल्याला अज्ञात असलेल्या ईश्वरी इच्छेचा संपूर्ण आणि उत्फूर्त स्वीकार.

(CWSA 29 : 67), (Mother You Said So), (Conversation with a Disciple)

समर्पण – ०४

तुमच्या आत्म्याचे जे जे काही आहे ते ते सारे ईश्वराला, ज्याचे तुम्ही एक भाग आहात अशा महत्तर चेतनेला देऊ करणे, हे समर्पणामध्ये अभिप्रेत आहे. समर्पण तुम्हाला क्षीण करणार नाही तर त्यामुळे वृद्धी होईल; ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाची कोणतीही घट करणार नाही, काहीही दुर्बल करणार नाही किंवा तुमचे व्यक्तित्व नष्टही करणार नाही; तर समर्पण तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवेल, वृद्धिंगत करेल. दानाच्या सगळ्या आनंदासहित असलेले मुक्त समस्त दान हे समर्पणामध्ये अभिप्रेत असते; त्यामध्ये त्यागाची भावना नसते. आपण काही त्याग करत आहोत अशी थोडीशीही भावना तुमच्या मनात असेल तर मग ते काही समर्पण नव्हे. त्याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी हातचे राखून ठेवू पाहत आहात किंवा तुम्ही काहीतरी कुरकूर करत, कष्टाने आणि सायासाने देण्याचा प्रयत्न करत आहात; त्यामध्ये भेट देण्याचा कोणताच आनंद नाही; एव्हढेच काय पण तुम्ही काहीतरी देत आहात ही भावनादेखील त्यामध्ये असत नाही.

तुम्ही जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्या अस्तित्वाने संकोचून, दबून, अवघडून अशी करत असता तेव्हा ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात, हे निश्चित जाणा. खरे समर्पण तुम्हाला व्यापक करते, ते तुमची क्षमता वाढविते; तुम्हाला स्व-प्रयत्नाद्वारे कधीच प्राप्त करून घेता आले नसते एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्पण तुमच्या गुणवत्तेमध्ये आणि संख्यात्मकतेमध्ये भर घालत असते. गुणात्मकतेतील आणि संख्यात्मकतेतील हे मोठे प्रमाण, तुम्ही समर्पणापूर्वी जे काही मिळवू शकला असता त्याच्यापेक्षा अगदी भिन्न असते. तुमचा एका नवीन जगामध्येच प्रवेश होतो, अशा एका व्यापकतेमध्ये प्रवेश होतो की, जर तुम्ही समर्पण केले नसते तर त्या व्यापकतेमध्ये तुमचा कधीच प्रवेश होऊ शकला नसता.

एखादा पाण्याचा थेंब सागरामध्ये पडला आणि तेथेसुद्धा जर त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले, तर तो केवळ पाण्याचा एक लहानसा थेंब म्हणूनच शिल्लक राहील, अधिक काहीच बनणार नाही आणि परिणामत: त्या लहानशा थेंबाचा सभोवताली असलेल्या प्रचंडतेपुढे टिकाव लागणार नाही, कारण त्याने समर्पण केलेले नव्हते. परंतु, तेच समर्पणामुळे, तो त्या सागराशी एकजीव होतो आणि मग तो त्या संपूर्ण सागराच्या अथांगतेशी, त्याच्या शक्तीशी, त्याच्या प्रकृतीशी जोडला जातो आणि त्यात सहभागी होतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 114-115)

समर्पण – ०३

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा कोणताही आग्रह न धरता, त्या साऱ्यांची जागा ‘ईश्वरी सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे सर्वत्र घेता यावी म्हणून, त्याला सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण!

– श्रीअरविंद
(CWSA 29: 67)

समर्पण – ०२

…प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, हे कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

समर्पण – ०१

आपल्या जीवनाची सारी जबाबदारी ईश्वराच्या हाती सोपविण्याचा निर्णय म्हणजे समर्पण (Surrender). या निर्णयाव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट शक्य नाही. जर तुम्ही समर्पण केले नाहीत तर योगाचा प्रश्नच उद्भवत नाही. समर्पणानंतर सारे काही स्वाभाविकपणेच येते कारण योगाची प्रक्रियाच मुळी समर्पणाबरोबर सुरू होते. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून किंवा भक्तीच्या माध्यमातून समर्पित होऊ शकता. केवळ ईश्वरच सत्य आहे ही एक दृढ अंतःप्रेरणा तुमच्यामध्ये असू शकते आणि ईश्वराखेरीज माझे काहीच चालणार नाही, अशी एक प्रकाशमय धारणा तुमच्यामध्ये असू शकते. किंवा मग आनंदी होण्याचा केवळ हाच एक मार्ग आहे, हीच एक दिशा आहे अशी उत्स्फूर्त भावना असू शकते; किंवा मग आपण केवळ ईश्वराचेच असावे अशी दृढ आंतरात्मिक इच्छा असू शकते. ”मी माझा नाही,” असे तुम्ही म्हणता आणि आपल्या अस्तित्वाची जबाबदारी तुम्ही ‘सत्या’वर सोपविता.

मग येते आत्मार्पण (Self-offering) : तुम्ही म्हणता की, “मी एक चांगल्या आणि वाईट साऱ्या गुणांनी बनलेला, अंधाऱ्या आणि प्रकाशपूर्ण गुणांनी बनलेला असा प्राणी आहे; मी जसा आहे तसा मी स्वतःला समर्पित करत आहे; माझ्या चढउतारांसहित, माझ्या परस्परविरोधी प्रेरणा आणि प्रवृत्तींनिशी माझा स्वीकार कर आणि तुला जे करावेसे वाटते ते माझ्याबाबतीत कर.” आणि मग जो पहिल्या प्रथम निर्णय घेतला होता त्या केंद्रवर्ती आंतरात्मिक इच्छेभोवती तुमच्या साऱ्या अस्तित्वाचे एकीकरण व्हायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीमधील अडथळा निर्माण करणारे सारे घटक एकेक करून हाती घ्यायला हवेत आणि त्यांचे केंद्रवर्ती अस्तित्वाभोवती एकीकरण करावयास हवे. तुम्ही एका उत्स्फूर्त प्रेरणेने स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करू शकता; पण अशा प्रकारे एकीकरण घडून आल्याखेरीज तुम्ही प्रभावीरित्या समर्पण करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 126)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १२

हठयोग

 

योगशास्त्रानुसार, संपूर्ण जडभौतिक देह आणि त्याची सर्व कार्य, तसेच सगळी मज्जासंस्था यांना व्यापून असणाऱ्या प्राणांच्या पाच प्रकारच्या हालचाली असतात. हठयोगी श्वसनाची बाह्य प्रक्रिया थांबवितो आणि एक प्रकारे ती किल्ली, प्राणाच्या या पाच शक्तींवर नियंत्रण निर्माण करण्याचा मार्ग खुला करते. हठयोगी या प्राणाच्या आंतरिक क्रिया संवेदनपूर्वक जाणू लागतो. तसेच तो स्वतःच्या संपूर्ण शारीरिक जीवनाविषयी आणि कृतींविषयी मानसिकदृष्ट्या देखील जागरूक होतो. तो आपला प्राण आपल्या शरीराच्या सर्व नाड्यांमधून किंवा नाडी-प्रवाहांमधून फिरवू शकतो. नाडीसंस्थेची जी सहा चक्रे अथवा स्नायुग्रंथिमय केंद्रे आहेत, त्यांच्या कार्याविषयी तो जागृत होतो आणि त्यांचे सद्यस्थितीत जे मर्यादित, सवयीनुसार, यांत्रिक कार्य चाललेले असते; त्या प्रत्येकाचे कार्य या मर्यादांच्या पलीकडे जावे म्हणून, ती केंद्रे तो खुली करू शकतो. थोडक्यात सांगावयाचे तर, हठयोगी शरीरातील प्राणावर पूर्ण हुकमत चालवू शकतो; सूक्ष्मतम नाडीगत प्राणावर तसेच स्थूलतम शारीर अवयवातील प्राणावर तो सारखीच हुकमत चालवू शकतो…

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 535)

योगाचे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. Read more

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा. सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर, ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, जेव्हा तुमच्या मनासारखे घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही.

तुम्हाला हे कळत नाही, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला मग तेव्हा समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारा उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका. तो आशेचा किरण दाखवितो, सांत्वनपर संदेश आणतो….
…अशी कोणतीच निशा नाही की, जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते.
*
उगवणारी प्रत्येक उषा ही प्रगतीच्या नव्या शक्यता दृष्टिपथात आणते.
*
भूतलावर अवतरणाऱ्या नूतन उष:प्रभेप्रत स्वत:स खुले करा, तुमच्यासमोर एक तेजोमय पथ उलगडेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 44 & 15 : 74, 97)

मार्ग लांबचा आहे पण आत्म-समर्पणामुळे तो जवळचा होतो. मार्ग खडतर आहे पण पूर्ण विश्वासामुळे तो सोपा होतो..

– श्रीमाताजी
(CWM 14 : 108)