Posts

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)