आत्मसाक्षात्कार – ०६
बरेचदा असे आढळून येते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण केवळ असे एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी ऐक्य साधून राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही.
व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढू शकते. मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते; ‘ईश्वरी कृपे’द्वारे व्यक्तीला ज्या कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आलेले असते ती परिस्थिती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.
अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो आकर्षक नक्कीच आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ते म्हणतात, “झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल!” त्यांना हे असे वाटते याचे कारण त्या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.
ज्या ध्यानामध्ये एकाएकी तुमचे अनुसंधान साधले जाते ते ध्यान सर्वोत्तम असते. अशावेळी एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याव्यतिरिक्त तुम्ही काही करूच शकत नाही, इतकी त्या क्षणी ध्यानाला बसण्याची अनिवार्य निकड तुम्हाला जाणवत असते. आणि त्यासाठी अरण्यामध्ये एकांतवासात जाण्याची गरज नसते; जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.
मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा थोडा टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वरा’ला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!
– श्रीमाताजी (CWM 03 : 276)






