Tag Archive for: विजय

आत्मसाक्षात्कार – ०६

बरेचदा असे आढळून येते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण केवळ असे एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी ऐक्य साधून राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही.

व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढू शकते. मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते; ‘ईश्वरी कृपे’द्वारे व्यक्तीला ज्या कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आलेले असते ती परिस्थिती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो आकर्षक नक्कीच आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ते म्हणतात, “झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल!” त्यांना हे असे वाटते याचे कारण त्या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

ज्या ध्यानामध्ये एकाएकी तुमचे अनुसंधान साधले जाते ते ध्यान सर्वोत्तम असते. अशावेळी एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याव्यतिरिक्त तुम्ही काही करूच शकत नाही, इतकी त्या क्षणी ध्यानाला बसण्याची अनिवार्य निकड तुम्हाला जाणवत असते. आणि त्यासाठी अरण्यामध्ये एकांतवासात जाण्याची गरज नसते; जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा थोडा टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वरा’ला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

तुम्ही जितके दुःखीकष्टी असाल आणि जितके शोक-विलाप करत राहाल तितके तुम्ही माझ्यापासून दूर होत जाता. ‘ईश्वर’ हा दुःखी नाही आणि ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर सर्व प्रकारच्या भावनिक कमकुवतपणाला आणि सर्व दुःखांना तुम्ही तुमच्यापासून दूर केले पाहिजे.

*

शोक करू नका. एकच लढाई पुन्हापुन्हा अनेक वेळा जिंकावी लागते, विशेषतः ती लढाई जेव्हा विरोधी शक्तींच्या विरोधात लढली जात असते तेव्हा ती पुन्हापुन्हा जिंकावी लागते. आणि म्हणूनच व्यक्तीने संयम बाळगत स्वतःला सुसज्ज ठेवलेच पाहिजे आणि अंतिम विजयाबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 16 : 171], [CWM 16 : 184]

सर्वसाधारण एक तत्त्व म्हणून आणि नित्य विशिष्ट उपयोगामध्येदेखील, आपल्याकडून ज्या श्रद्धेची अपेक्षा आहे ती श्रद्धा सरते शेवटी समग्र अस्तित्वाने स्वतःच्या सर्व घटकांनिशी, ‘देवा’च्या उपस्थितीस आणि देवाच्या मार्गदर्शनास व त्याच्या ‘शक्ती’स दिलेल्या एका विशाल, उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या व नित्य शुद्धतर, पूर्णतर आणि अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या सहमतीमध्ये परिणत होते. मनुष्याला स्वतःबद्दल, त्याच्या स्वतःच्या कल्पनांबद्दल, त्याच्या शक्तींबद्दल एक श्रद्धा प्रदान करण्यात आली आहे; जेणेकरून तो स्वतः कार्य करेल, निर्मिती करेल, आणि उच्चतर गोष्टींप्रत उन्नत होईल आणि अंततः त्याचे सारे सामर्थ्य हे जणू आत्मवेदीमधील सुयोग्य समिधा बनेल. आपल्यामध्ये असलेल्या स्वतःच्या आध्यात्मिक इच्छेवर आणि ऊर्जेवर तसेच ऐक्य, स्वातंत्र्य आणि पूर्णत्वाच्या दिशेने आपण ज्या शक्तीच्या आधारे यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकतो त्या आपल्या शक्तीवर आपली दृढ व बळकट श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ‘दिव्य शक्ती’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही आणि आपण तिच्या उपस्थितीने भारले जात नाही तोपर्यंत म्हणजे, दिव्य शक्तीवरील श्रद्धेच्या उदयापूर्वी तरी अनिवार्यपणे आपण आपल्यामध्ये असलेल्या आध्यात्मिक इच्छेवर, ऊर्जेवर व शक्तीवर दृढ व बळकट श्रद्धा बाळगली पाहिजे किंवा किमान तिची जोड तरी त्या दिव्य शक्तीला दिली पाहिजे.

‘शास्त्र’ असे सांगते की, निर्बल व्यक्तींना आत्मविजय संपादन करता येत नाही. ”नायमात्मा बलहीनेन लभ्यः।” पांगळा करणारा स्वतःमधील सर्व अविश्वास, सिद्धीच्या सामर्थ्याविषयीच्या सर्व शंका म्हणजे षंढत्वाला दिलेली संमतीच असते, ती दौर्बल्याची कल्पना असते आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमत्तेला दिलेला तो नकार असतो, अशा अविश्वासाला हतोत्साहित (discouraged) केलेच पाहिजे. आत्ताची सद्यकालीन अक्षमता, अगदी तिचा दबाव कितीही जास्त भासला तरी, ती श्रद्धेची केवळ एक कसोटी आहे; एखादी तात्पुरती अडचण आणि त्यावर मात करण्यासाठी असलेली अक्षमतेची भावना या गोष्टी पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने निरर्थक असतात; कारण आपल्या अस्तित्वामध्ये आधीपासूनच सुप्त रूपाने असलेल्या पूर्णत्वाचे विकसन हे त्याचे उद्दिष्ट असते; कारण मनुष्य स्वतःमध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये, दिव्य जीवनाचे बीज बाळगून असतो; त्याच्या प्रयत्नामध्येच यशाची शक्यता अंतर्भूत असते, गृहीत असते आणि त्याचा विजयही एक प्रकारे निश्चित असतो कारण त्या पाठीमागे सर्वसामर्थ्यशाली शक्तीची हाक आणि तिचे मार्गदर्शन असते. परंतु त्याचवेळी स्वतःवर असलेल्या या श्रद्धेला राजसिक अहंकाराच्या सर्व स्पर्धांपासून आणि आध्यात्मिक गर्वापासून विशुद्ध केलेच पाहिजे.

साधकाने ही संकल्पना शक्य तेवढी मनात बाळगली पाहिजे की, व्यक्तीचे सामर्थ्य हे तिचे स्वतःचे (अहंभावात्मक) सामर्थ्य नसते तर, ते वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य असते आणि त्या शक्तीचा कोणताही अहंभावात्मक वापर हा मर्यादेचे कारण ठरतो आणि अंततः तो अडथळा बनतो. आपल्या अभीप्सेच्या पाठीमागे असणाऱ्या वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य अमर्याद असते आणि जेव्हा तिला योग्य रितीने आवाहन केले जाते तेव्हा तिचे ते सामर्थ्य आपल्यामध्ये ओतण्यात आणि आपल्यामध्ये सद्यस्थितीत असलेले किंवा भविष्यात येऊ शकतील असे अडथळे आणि अक्षमता दूर करण्यामध्ये, ती अपयशी ठरू शकत नाही. कारण आपल्या संघर्षाचा कालावधी आणि वेळा या प्रथमतः साधनरूपाने आणि अंशतः आपल्या श्रद्धासामर्थ्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असल्या तरीसुद्धा अंततः ‘ईश्वरा’च्या, एकमेवाद्वितीय अशा त्या ‘योगस्वामी’च्या, म्हणजे सारे काही चातुर्याने निर्धारित करणाऱ्या गुप्त ‘आत्म्या’च्या हाती असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 779-780)

साधनेची मुळाक्षरे – २०

(श्रीमाताजी येथे भक्तिभावातून होणाऱ्या प्रगतीविषयी सांगत आहेत.)

भक्तीची भावना अंतःकरणात असेल तर अशा व्यक्तीला अडथळे, अडचणी यांच्या धक्क्यांची देखील तमा वाटत नाही. ते तुमचे काय वाईट करू शकणार? …व्यक्ती त्याची गणतीच करत नाही. इतकेच नव्हे, कधीकधी तर ती त्यावर हसतेसुद्धा. अधिक वेळ लागला तर त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? अधिक वेळ लागला तर तेवढाच अधिक वेळ तुम्हाला अभीप्सेचा, आत्म-निवेदनाचा, आत्म-दानाचा आनंद मिळेल.

कारण तोच एकमेव खराखुरा आनंद असतो. आणि जेव्हा त्यामध्ये काहीतरी अहंभावात्मक आड येते तेव्हा तो आनंद मावळतो कारण तेथे एक प्रकारची मागणी असते – व्यक्ती त्याला गरज असे संबोधते – ती मागणी या आत्म-निवेदनात मिसळते. अन्यथा हा आनंद कधीच मावळत नसतो.

हा आनंद ही अशी गोष्ट असते की, जी व्यक्तीला सर्वप्रथम प्राप्त होते आणि सर्वात शेवटी उमगते. आणि हा आनंद हीच विजयाची खूण असते.

जोपर्यंत तुम्ही स्थिर, शांत, प्रकाशमान, अविचल अशा आनंदामध्ये सदासर्वकाळ नसता, तोवर तुम्हाला स्वतःचे शुद्धीकरण करण्यासाठी परिश्रम करावे लागणार, असा याचा अर्थ आहे, कधीकधी पुष्कळच परिश्रम करावे लागतात. पण ही त्याचीच खूण असते.

विभक्ततेच्या भावनेतूनच वेदना, दुःख, यातना, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता येतात. निःशेष आत्म-दान, ‘स्व’ला विसरून केलेल्या आत्म-निवेदनानेच दुःखभोग नाहीसे होतात आणि त्यांची जागा असा आनंद घेतो की जो कशानेच झाकला जाऊ शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396)

साधनेची मुळाक्षरे – १८

सर्वसाधारण एक तत्त्व म्हणून आणि नित्य विशिष्ट उपयोगामध्येदेखील, आपल्याकडून ज्या श्रद्धेची अपेक्षा आहे ती श्रद्धा सरते शेवटी समग्र अस्तित्वाने स्वतःच्या सर्व घटकांनिशी, ‘देवा’च्या उपस्थितीस आणि देवाच्या मार्गदर्शनास व त्याच्या ‘शक्ती’स दिलेल्या एका विशाल, उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या व नित्य शुद्धतर, पूर्णतर आणि अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या सहमतीमध्ये परिणत होते. मनुष्याला स्वतःबद्दल, त्याच्या स्वतःच्या कल्पनांबद्दल, त्याच्या शक्तींबद्दल एक श्रद्धा प्रदान करण्यात आली आहे; जेणेकरून तो स्वतः कार्य करेल, निर्मिती करेल, आणि उच्चतर गोष्टींप्रत उन्नत होईल आणि अंततः त्याचे सारे सामर्थ्य हे जणू आत्मवेदीमधील सुयोग्य समिधा बनेल. आपल्यामध्ये असलेल्या स्वतःच्या आध्यात्मिक इच्छेवर आणि ऊर्जेवर तसेच ऐक्य, स्वातंत्र्य आणि पूर्णत्वाच्या दिशेने आपण ज्या शक्तीच्या आधारे यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकतो त्या आपल्या शक्तीवर आपली दृढ व बळकट श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ‘दिव्य शक्ती’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही आणि आपण तिच्या उपस्थितीने भारले जात नाही तोपर्यंत म्हणजे, दिव्य शक्तीवरील श्रद्धेच्या उदयापूर्वी तरी अनिवार्यपणे आपण आपल्यामध्ये असलेल्या आध्यात्मिक इच्छेवर, ऊर्जेवर व शक्तीवर दृढ व बळकट श्रद्धा बाळगली पाहिजे किंवा किमान तिची जोड तरी त्या दिव्य शक्तीला दिली पाहिजे.

‘शास्त्र’ असे सांगते की, निर्बल व्यक्तींना आत्मविजय संपादन करता येत नाही. ”नायमात्मा बलहीनेन लभ्यः।” पांगळा करणारा स्वतःमधील सर्व अविश्वास, सिद्धीच्या सामर्थ्याविषयीच्या सर्व शंका म्हणजे षंढत्वाला दिलेली संमतीच असते, ती दौर्बल्याची कल्पना असते आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमत्तेला दिलेला तो नकार असतो, अशा अविश्वासाला हतोत्साहित (discouraged) केलेच पाहिजे. आत्ताची सद्यकालीन अक्षमता, अगदी तिचा दबाव कितीही जास्त भासला तरी, ती श्रद्धेची केवळ एक कसोटी आहे; एखादी तात्पुरती अडचण आणि त्यावर मात करण्यासाठी असलेली अक्षमतेची भावना या गोष्टी पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने निरर्थक असतात; कारण आपल्या अस्तित्वामध्ये आधीपासूनच सुप्त रूपाने असलेल्या पूर्णत्वाचे विकसन हे त्याचे उद्दिष्ट असते; कारण मनुष्य स्वतःमध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये, दिव्य जीवनाचे बीज बाळगून असतो; त्याच्या प्रयत्नामध्येच यशाची शक्यता अंतर्भूत असते, गृहीत असते आणि त्याचा विजयही एक प्रकारे निश्चित असतो कारण त्या पाठीमागे सर्वसामर्थ्यशाली शक्तीची हाक आणि तिचे मार्गदर्शन असते. परंतु त्याचवेळी स्वतःवर असलेल्या या श्रद्धेला राजसिक अहंकाराच्या सर्व स्पर्धांपासून आणि आध्यात्मिक गर्वापासून विशुद्ध केलेच पाहिजे.

साधकाने ही संकल्पना शक्य तेवढी मनात बाळगली पाहिजे की, व्यक्तीचे सामर्थ्य हे तिचे स्वतःचे (अहंभावात्मक) सामर्थ्य नसते तर, ते वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य असते आणि त्या शक्तीचा कोणताही अहंभावात्मक वापर हा मर्यादेचे कारण ठरतो आणि अंततः तो अडथळा बनतो. आपल्या अभीप्सेच्या पाठीमागे असणाऱ्या वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य अमर्याद असते आणि जेव्हा तिला योग्य रितीने आवाहन केले जाते तेव्हा तिचे ते सामर्थ्य आपल्यामध्ये ओतण्यात आणि आपल्यामध्ये सद्यस्थितीत असलेले किंवा भविष्यात येऊ शकतील असे अडथळे आणि अक्षमता दूर करण्यामध्ये, ती अपयशी ठरू शकत नाही. कारण आपल्या संघर्षाचा कालावधी आणि वेळा या प्रथमतः साधनरूपाने आणि अंशतः आपल्या श्रद्धासामर्थ्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असल्या तरीसुद्धा अंततः ‘ईश्वरा’च्या, एकमेवाद्वितीय अशा त्या ‘योगस्वामी’च्या, म्हणजे सारे काही चातुर्याने निर्धारित करणाऱ्या गुप्त ‘आत्म्या’च्या हाती असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 779-780)