Tag Archive for: मिथ्यत्व

 

(मुलांचे नैतिक शिक्षण आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असणारी संधी याविषयीचे विचार आपण कालच्या भागात लक्षात घेतले.)

मुलामध्ये जर काही दुर्गण असतील, त्याला वाईट सवयी लागलेल्या असतील, त्याच्यावर कुसंस्कार झालेले असतील – मग ते मनाचे असोत किंवा शरीराचे असोत – तरीही तो कोणीतरी गुन्हेगार आहे अशा पद्धतीने त्याला कठोरपणाने वागणूक देता कामा नये; तर संयम, नकार आणि सद्गुणांची स्थापना करणे या राजयोगाच्या पद्धतीनुसार दुर्गुणांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्या दुर्गणांचा विचार त्याने पाप किंवा अपराध म्हणून करता कामा नये तर, बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराची ती लक्षणं आहेत आणि दृढ संकल्पाद्वारे व सातत्यपूर्ण प्रयत्नाने त्यामध्ये बदल होऊ शकतो, असा विचार करण्यास त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. मनामध्ये जेव्हाजेव्हा मिथ्यत्वाचा (falsehood) उद्भव होतो तेव्हा त्यास नकार देण्यासाठी आणि सत्याद्वारे त्याची जागा घेण्यासाठी प्रत्येक मुलाला प्रोत्साहित केले पाहिजे; भीतीची जागा धैर्याने, स्वार्थीपणाची जागा त्यागाने आणि वैरभावाची जागा प्रेमाने घेण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या गुणांची अजून पुरेशी घडण झालेली नाही त्यांचा दोष म्हणून अव्हेर केला जाता कामा नये, याबाबत बरीच काळजी घेतली गेली पाहिजे.

बऱ्याचदा काही मुलांच्या अंगी एक प्रकारचा व्रात्यपणा आणि बेपर्वार्ई आढळून येते. पण तो व्रात्यपणा नसतो, तर त्यांच्या अंगी असलेले सामर्थ्य, महानता आणि उदात्तता ओसंडून वाहत असते; आणि दिसताना तो व्रात्यपणा असल्यासारखे दिसते. त्यांच्यातील या वृत्तीचे खच्चीकरण करता कामा नये, तर तिचे शुद्धीकरण केले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 391-392)

 

ज्यांच्यापाशी प्रामाणिकपणा आणि तळमळ असते अशा व्यक्तींचा ईश्वर नेहमीच पाठीराखा असतो.

*

तुम्हाला जेव्हा खात्रीपूर्वक असे वाटते की, तुम्ही पूर्णतया प्रामाणिकपणा प्राप्त करून घेतला आहे तेव्हा, निश्चितपणे असे समजा की, तुम्ही मिथ्यत्वामध्ये बुडालेला आहात.

*

जे मुळात अतिशय प्रामाणिक आहेत त्यांनाच, ते पूर्णपणे प्रामाणिक नाहीत याची जाण असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 66, 69, 69)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा (central sincerity) असणे ही एकच आवश्यक अट असते. ‘संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा’चा अर्थ दुसऱ्या शब्दांत सांगायचा झाला तर, केवळ परमसत्या‌चा निरपवाद आग्रह धरणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे, असा होतो.

अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, व्यक्तीमध्ये समजा कधी मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर, लगेचच तिला एकप्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी त्या मिथ्यत्वाचे कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सजग खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, खोटेपणाबरोबर, मिथ्यत्वाबरोबर तुमचा प्राण जी तडजोड करत आहे ती काढून टाकली पाहिजे. आणि त्याच्यावर साधे सरळ आंतरात्मिक सत्य कोरून ठेवण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. म्हणजे मग त्या प्राणामध्ये शिरकाव करण्यास कोणालाच वाव मिळणार नाही. तुमच्या प्राणामधील जो भाग अशा प्रकारच्या तडजोडी करत आहे त्या भागावर हा धडा पक्का कोरून ठेवता आला तर, (तुमच्या हातून घडलेल्या) या चुकीच्या गोष्टीमधूनही निश्चितपणे काहीतरी चांगले निष्पन्न होईल.

तुमच्या प्राणिक अस्तित्वाच्या दरवाजावर श्रीमाताजींची पुढील सूचना चिकटवून ठेवा — “येथून पुढे, या दरवाजाच्या आतमध्ये खोटेपणाला, मिथ्यत्वाला प्रवेश नाही.” आणि ती सूचना काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे ना, हे पाहण्यासाठी दरवाजावर एका पहारेकऱ्याची नेमणूक करा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 104-105)