माझा एक मित्र होता, त्याला रात्रीच्या वेळी झोपेत स्वतःच्या प्राणिक देहामधून बाहेर जायची सवय होती. त्याने मला एकदा तक्रारवजा सुरात सांगितले की अशा वेळी त्याला नेहमीच एका ढाण्या वाघाशी सामना करावा लागत असे आणि त्यामुळे मग त्याची ती सारी रात्र बेचैनीत जात असे. मी त्याला त्याची सगळी भीती काढून टाकायला सांगितली. आणि “सरळ त्या श्वापदाकडे चालत जा आणि त्याच्या चेहऱ्याकडे एकटक रोखून बघत राहा,” असे सांगितले, अर्थातच “आवश्यकता पडली तर मदतीसाठी धावा कर”, असेही सांगितले. त्याने तसे केले आणि अहो आश्चर्य! त्या वाघाचे रूपांतर अचानक एका अगदी किरकोळ अशा मांजरामध्ये झाले.
एखाद्या प्राणिक अस्तित्वाच्या डोळ्यांमध्ये डोळे मिसळून निर्भयपणे एकटक पाहत राहण्याचा काय जादुई परिणाम घडून येतो, त्याची तुम्हाला कल्पना नाहीये. अगदी या पृथ्वीवर, प्राणिक शक्तींचा अवतार असे ज्यांना म्हणता येईल, ज्याला आपण सहसा प्राणी असे म्हणतो, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने हाताळाल तर, तुम्हाला अगदी सहजी प्रभुत्व मिळण्याची खात्री बाळगता येईल. तुम्ही तीळमात्रही न डगमगता, न घाबरता जर प्रत्यक्ष एखाद्या वाघाच्या डोळ्याला डोळा भिडवून थेटपणे पाहू शकलात तर, तो वाघसुद्धा तुमच्यापासून पळ काढेल. यत्किंचितही न घाबरता जर तुम्ही सापानी रोखलेल्या नजरेला नजर भिडवू शकलात तर, तो साप तुम्हाला कधीच चावू शकणार नाही. पण जर का पाय लटलट कापत असतील आणि केवळ नजर एकटक खिळलेली असेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमच्यामध्ये अजिबात अस्वस्थता असता कामा नये. तुम्हाला भीती वाटावी म्हणून, तो आपला फणा उभारून, तुम्हाला आकर्षित करत राहतो तेव्हा, तुम्ही अगदी शांत आणि एकाग्र असले पाहिजे.
मानवाच्या डोळ्यांमध्ये असलेल्या प्रकाशाविषयी प्राणी सतर्क असतात आणि हा प्रकाश जर माणसं योग्य रीतीने प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये टाकू शकली तर, प्राण्यांना तो प्रकाश सहन करणे अशक्य होते. माणसांच्या नजरेमध्ये एक शक्ती सामावलेली असते; माणसाची नजर जर स्थिर आणि निर्भय असेल तर, त्या शक्तीमुळे प्राणी निष्प्रभ होतात. सारांशरूपाने सांगावयाचे तर, दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या अशा की, कधीही, अगदी कधीही घाबरता कामा नये आणि तुमची ताकद शंभर पटीने अधिक वाढावी म्हणून सर्व परिस्थितीमध्ये योग्य त्या मदतीसाठी ईश्वराचा धावा केला पाहिजे.
- श्रीमाताजी (CWM 03:166)







