Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)

साधना, योग आणि रूपांतरण – ७९

साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ?

श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची आस असलेल्या) लोकांबाबत नेहमीच असे घडत असते. बाह्य प्रकृती, तिचे स्वरूप आणि तिच्या सवयी या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीने गुंतून पडता कामा नये अशा काहीतरी पूर्णपणे तिरस्करणीय गोष्टी आहेत, असे समजून ते त्या गोष्टी नाकारतात. त्यांच्या सर्व ऊर्जा, चेतनेच्या सर्व शक्ती (बाह्यवर्ती प्रकृतीमधून) काढून घेतात आणि उच्चतेप्रत वळवितात. आणि त्यांना हे जर पुरेशा पूर्णत्वाने साध्य करता आले तर सहसा ते कायमसाठी स्वतःच्या देहाचा त्याग करतात.

परंतु अशा उदाहरणांमध्ये, पुष्कळ वेळा असे आढळते की, ही गोष्ट ते आंशिकरितीनेच करतात आणि जेव्हा ते त्यांच्या ध्यानामधून, त्यांच्या निदिध्यासनामधून किंवा त्यांच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतात तेव्हा ते बहुधा इतरांपेक्षाही अधिक वाईट ठरतात कारण त्यांनी त्यांच्या बाह्यवर्ती प्रकृतीवर (परिवर्तनाचे) कोणतेही परिश्रम न घेता तिला आहे त्याच परिस्थितीत बाजूला सारलेले असते.

अगदी सामान्य माणसांच्या बाबतीत सुद्धा असे आढळते की, जर त्यांच्यातील दोष, दुर्गुण अगदी ठळकपणे नजरेत भरत असतील तर, जीवनामध्ये त्यामुळे फार त्रास होऊ नये म्हणून, ती माणसं त्या दोषांमध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्यांच्यावर थोडे का होईना पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. (आणि या मुमुक्षू मंडळींच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) व्यक्तीने आपले शरीर आणि आपली बाह्यवर्ती चेतना ही पूर्णपणे सोडली पाहिजे आणि संपूर्णपणे ”आध्यात्मिक उंची”प्रत स्वतःला नेले पाहिजे, हाच योग्य दृष्टिकोन आहे, अशी ज्यांची समजूत असते अशी माणसं शरीराला आणि बाह्यवर्ती प्रकृतीला एखादा जुना कपडा असावा त्याप्रमाणे टाकून देतात आणि त्यामध्ये सुधारणा करत नाहीत आणि मग जेव्हा तो कपडा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो वापरण्याजोगा राहिलेला नसतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु परिवर्तन घडवावे अशी तुमच्यापाशी जर प्रामाणिक इच्छा असेल तरच आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य होते.

तुमच्यापाशी परिवर्तन करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मग मात्र त्याचे खूप साहाय्य होते कारण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्यातून तुम्हाला मिळते, परिवर्तनासाठी आवश्यक असा आधार त्यातून तुम्हाला मिळतो. परंतु तुम्हाला परिवर्तन करण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 348-349)