पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. जोपर्यंत व्यक्तीची पुरेशी तयारी झालेली नसते तोपर्यंत त्याची आंतरिक दालनं उघडण्यास विलंब लागतो.
जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुम्हाला जर निश्चलता जाणवत असेल आणि आंतरिक प्रकाश चमकून जात असेल तसेच, आंतरिक ऊर्मी इतकी अधिक वृद्धिंगत होऊ लागली असेल की त्यामुळे तुमची बाह्य गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होऊ लागली असेल आणि प्राणिक अडचणींमधील जोर कमी होऊ लागला असेल तर, तीच स्वयमेव एक महान प्रगती असते.
योगमार्गाचा प्रवास हा खूप दीर्घ असतो आणि प्रचंड प्रतिकाराच्या विरोधात लढा देऊन, त्या मार्गावरील इंचइंच भूमी जिंकावी लागते. आणि त्यासाठी साधकाकडे धीर आणि एक-लक्ष्यी चिकाटी असणे आवश्यक असते. तसेच, कितीही अडचणी आल्या, विलंब झाला किंवा वरकरणी अपयश येताना दिसले तरीही, त्या सगळ्यामधूनही दृढ राहू शकेल अशी श्रद्धा साधकामध्ये असणे आवश्यक असते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 110)






