Tag Archive for: निराशा

नैराश्यापासून सुटका – २१

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक निराशेच्या कोणत्याही लहरीला तुमच्यामध्ये शिरकाव करू देऊ नका आणि खिन्न मनोदशेला तर अजिबातच थारा देऊ नका. बाह्य व्यक्तिमत्त्वाबाबत बोलायचे झाले तर, केवळ तुमच्यामध्येच नव्हे, तर प्रत्येकामध्येच, हाताळण्यास अतिशय अवघड असा एक पशु नेहमी दडलेला असतो. त्याला धीराने आणि शांत व प्रसन्न चिकाटीनेच हाताळले पाहिजे. त्याच्या प्रतिकाराने कधीच निराश होऊ नका, कारण त्यामुळे तो हळवा व उद्विग्न होतो आणि हाताळायला अधिकच अवघड होऊन बसतो; अन्यथा तो हतोत्साहित होतो. (तेव्हा निराश न होता) त्याला स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिलासा द्या, त्याच्यावर तुमच्या अविचलतेचे दडपण येईल असे पाहा आणि मग एक दिवस तो ‘ईश्वरी कृपे‌’प्रत पूर्णपणे खुला झाला असल्याचे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – २०

 

साधक : मनामध्ये (स्वत:शीच) चालू असणारी अखंड बडबड कशी थांबवावी?

श्रीमाताजी : यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे शक्य तितके कमी बोला. दुसरी अट अशी की, तुम्ही ज्या क्षणी जी गोष्ट करत असता त्या क्षणी फक्त त्याच गोष्टीचा विचार करा. तुम्ही पूर्वी काय केले आहे किंवा यापुढे काय करायचे आहे याचा विचार करत बसू नका. जे होऊन गेले आहे त्याचा खेद करू नका किंवा भविष्यात काय घडेल याची चिंता करत बसू नका. तुमच्यातील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि जाणीवपूर्वक आशावादी बना.

– श्रीमाताजी (CWM 12 : 141)

*

निराशाजनक विचारांना तुम्ही थारा देऊ नका. तसे विचार मनात आलेच तर, ते विचार ‘तुमचे‌’ नाहीत तर, त्या बाहेरून आलेल्या सूचना आहेत, या दृष्टीने त्यांच्याकडे पाहा. शक्य तेवढे अविचल (quiet) राहा आणि ‘श्रीमाताजींच्या शक्ती‌’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 186)

नैराश्यापासून सुटका – १६

 

प्राणाच्या असमाधानावर एकच उपाय असतो. प्राण म्हणजेच तुम्ही आहात, असे समजायचे नाही; हाच तो उपाय. जडत्वाबद्दलच्या विचारांमध्ये व्यग्र राहायचे नाही, तर ऊर्ध्वमुख व्हायचे तसेच ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शक्ती‌’ने प्राणामध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांना आवाहन करायचे; हा जडत्वावरील उपाय आहे.

*

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याची विकृत अढी असे करतो. प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध ओरडत राहतो आणि ईश्वर, जीवन व इतर सारेजण ‘मला छळत आहेत’ असा आरोप तो करत राहतो. पण बहुतेक वेळा दुःख-संकटे येतात आणि ती टिकून राहतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या भागापासून तुम्ही स्वत:ची पूर्णपणे सुटका करून घेतलीच पाहिजे.

*

प्राण जर अविचल राहिला आणि त्याने मनाला गोष्टींकडे योग्य रितीने पाहू दिले तर ही निराशा येणारच नाही, हे स्वाभाविक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139-140, 178, 186-187)

नैराश्यापासून सुटका – ०९

माणसे ईश्वराभिमुख होत नाहीत आणि त्यामुळे ती स्वत:हूनच दु:ख आणि वेदना यांची अप्रत्यक्षरित्या निवड करत असतात. एवढेच नव्हे तर, प्राणिक चेतनेमध्येच (vital consciousness) असे काहीतरी असते की, जीवनामध्ये जर दुःखसंकटे नसतील तर तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. शरीराला दु:खभोगाचे भय असते, तिटकारा असतो; पण ‘प्राण’ मात्र त्याला जीवनरूपी लीलेचाच एक भाग म्हणून स्वीकारतो.
*
प्राण जीवन-नाट्याचा आनंद घेत असतो, दु:खसंकटांमध्ये देखील तो मजा घेत असतो. त्याच्या दृष्टीने नैराश्याचे क्षण म्हणजे विकृती नसते तर, जीवनलीलेचाच तो एक भाग आहे असे म्हणून तो त्यांचा स्वीकार करत असतो. अर्थात प्राणामध्ये देखील बंडखोरीची वृत्ती असते आणि त्यामध्ये तो मजा घेत असतो. ज्या भागाला दु:खभोग नकोसे असतात आणि ज्याला त्यापासून सुटका करून घेणे आवडते ती ‘शारीरिक चेतना’ (physical consciousness) असते; पण प्राण मात्र पुन्हा पुन्हा तिला रेटत राहतो आणि त्यामुळे शारीरिक चेतनेची (दु:खभोगापासून) सुटका होऊ शकत नाही. बंडखोरी असो की निराशेला कवटाळणे असो, दोन्ही बाबींना जबाबदार असतो तो राजसिक-तामसिक प्राणिक अहंकार (rajaso-tamasic vital ego)! रजोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे बंडखोरी असते व तमोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे नैराश्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 178, 178)

नैराश्यापासून सुटका – ०८

 

निराशा कोणत्या ना कोणत्यातरी निमित्ताने येते; पण वास्तविक ती कोणत्या एखाद्या विशिष्ट कारणामुळे नव्हे तर, स्वतःच्या मर्जीनुसार येत असते. निराशा प्रत्येकामध्ये अशा रितीनेच कार्य करत असते.
*
कण्हणे-विव्हळणे, रुदन करणे, किंबहुना व्यथावेदना आणि सर्व प्रकारचे दु:खभोग, यांमध्ये जो सुख घेतो तो ‘आत्मा’ नसतो, तर तो ‘प्राण’ किंवा त्याच्यातील एखादा भाग असतो.
*
कोणत्याही प्रकारचे नैराश्य वाईटच, कारण त्यामुळे चेतना निम्नस्तरावर येते, त्यामुळे ऊर्जा खर्च होते आणि मनुष्य विरोधी शक्तींच्या अंमलाखाली येतो.
*
नैराश्य मग ते कसेही आणि कोठूनही आलेले असले तरी, त्याबाबतीत एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे ते नैराश्य बाहेर फेकून दिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 183, 178, 183, 186)

नैराश्यापासून सुटका – ०७

(नैराश्य कोणत्या कारणांनी येऊ शकते यासंबंधी श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे सांगत आहेत.)

सहसा निराशेच्या लाटा या सामान्य ‘प्रकृती’मधून येतात. जेव्हा कोणतेच कारण नसते तेव्हा मन निराशेसाठी आंतरिक किंवा बाह्य असे एखादे निमित्त शोधून काढते. निराशेचे कारण न कळण्याचे हे एक कारण असू शकते.

दुसरे असेही एक कारण असू शकते की, कर्माची किंवा साधनेची जी वाटचाल चालू आहे, तिचे अनुसरण करण्याची जिवामधील (being) एखाद्या भागाची उमेद नाहीशी झालेली असू शकते किंवा तो भाग त्या वाटचालीचे अनुसरण करण्यास अनिच्छुक असू शकतो किंवा तो श्रान्तक्लान्त झालेला असू शकतो.

तो जर प्राणिक अस्तित्वामधील (vital being) एखादा भाग असेल तर, आपले पितळ उघडे पडू नये म्हणून किंवा ते कारण दूर होऊ नये म्हणून तो स्वतःला दडवून ठेवू शकतो. तो जर शारीरिक अस्तित्वामधील एखादा भाग असेल तर तो नुसताच मंद आणि अंधुक, स्वतःला व्यक्त करण्यास अक्षम असणारा असा असू शकतो.

आणि शेवटचे एक कारण म्हणजे ती निराशा अवचेतन (subconscient) भागामधून आलेली असू शकते. विनाकारण नैराश्य दाटून येणे, हेही निराशेच्या अनेकविध कारणांपैकी एक कारण असू शकते. व्यक्तीने स्वतःच स्वतःचे निरीक्षण करून, नक्की काय कारण आहे ते शोधले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 185)

नैराश्यापासून सुटका – ०२

तुम्ही कधीच एकाकी नसता, हे कधीही विसरू नका. ‘ईश्वर’ तुमच्या सोबत असून तो तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे. ‘तो’ असा सोबती आहे की जो कधीच साथसंगत सोडत नाही; ‘तो’ असा मित्र आहे, ज्याचे प्रेम तुम्हाला सामर्थ्यवान बनविते आणि समाधान देते. तुम्हाला जितका जास्त एकाकीपणा जाणवेल, तेवढे तुम्ही त्या ईश्वराच्या तेजोमय उपस्थितीची जाणीव होण्यासाठी अधिक तयार व्हाल. श्रद्धा बाळगा, ‘तो’ तुमच्यासाठी सारेकाही करेल.
*
जेव्हा परिस्थिती वाईटाहून अधिक वाईट होत आहे असे वाटते, तत्क्षणी, आपण श्रद्धेची परमोच्च कृती केली पाहिजे आणि ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला कधीच अंतर देणार नाही, हे आपण जाणून असले पाहिजे. अरूणोदयापूर्वीच्या घटिका या नेहमीच सर्वाधिक अंधकारमय असतात. स्वातंत्र्य जवळ येण्यापूर्वीची गुलामी ही सर्वात जास्त वेदनादायी असते. परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये आशेची चिरंतन ज्योत तेवत असते आणि ती निराशेला जागाच ठेवत नाही.

– श्रीमाताजी (CWM 14 : 09), (CWM 15 : 177)

जीवन जगण्याचे शास्त्र – १४

तुमच्यामधील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा करता येईल तेवढा जास्तीतजास्त प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.
*
आपण नेहमीच योग्य ती गोष्ट करू या म्हणजे मग आपण नेहमीच शांत आणि आनंदी राहू शकू.
*
खरोखरच, विशुद्ध आणि निरपेक्ष प्रेमाएवढी दुसरी कोणतीच गोष्ट अधिक आनंददायी नसते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 141), (CWM 14 : 180), (CWM 16 : 172)

श्रीमाताजी आणि समीपता – १४

तुम्हाला जर सदोदित श्रीमाताजींच्या संपर्कात राहायचे असेल तर निराशेमधून, औदासिन्यातून आणि त्यामधून ज्या मानसिक कल्पना तुम्ही करत राहता, त्यातून तुम्ही तुमची सुटका करून घेतली पाहिजे. त्यापेक्षा अन्य कोणतीच गोष्ट मार्गामध्ये इतका अडथळा निर्माण करणारी असत नाही.
*
कोणालाही दुसऱ्याविषयी किंवा दुसऱ्या गोष्टीबाबत मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही; कारण सर्वांना श्रीमाताजी व श्रीअरविंदांचा जो संपर्क लाभतो त्याव्यतिरिक्त, त्या दोघांशी संपर्क साधण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून एक कारण असते, ते अन्य कोणाकडेच नसते.
*
तुम्ही जर ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेच्या संपर्कात राहिलात तर तो संपर्कच तुम्हाला सर्व खऱ्या अभीप्सांच्या पूर्ततेप्रत आणि सर्व आवश्यक त्या साक्षात्कारांप्रत घेऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 459, 459, 457)

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)