Tag Archive for: तपस्या

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग हा एक प्रयत्न असतो, ती तपस्या असते. व्यक्ती जेव्हा अतीव प्रामाणिकपणाने उच्चतर शक्तीच्या कार्याप्रत स्वतःचे समर्पण करते; ते समर्पण सतत जागते ठेवते आणि ते परिपूर्ण करत राहते तेव्हाच मग योगाचे तपस्यापण (म्हणजे त्यातील खडतरता) संपुष्टात येते.

योग म्हणजे सुसंगती नसलेली, तर्कहीन अशी काही एक कविकल्पना नाही किंवा योग म्हणजे निव्वळ चमत्कारही नाही. योगाचे स्वतःचे असे काही नियम असतात, काही अटी असतात आणि असे असताना, (स्वत: काहीही प्रयत्न न करता) कोणत्यातरी एखाद्या जबरदस्त चमत्काराद्वारे ईश्वरानेच सारे काही घडवून आणावे अशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा कशी काय करू शकता, हेच मला समजत नाही.

‘पूर्णयोग’ निर्धोक आहे असे मी कधीही म्हटलेले नाही, कोणताच योग निर्धोक नसतो. मानवी जीवनातील कोणत्याही महान उद्यमामध्ये असतात त्याप्रमाणेच, प्रत्येक योगमार्गाचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही धोके असतात. मात्र व्यक्तीमध्ये केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा असेल तर त्या धोक्यांमधून सहीसलामत पार पडता येते. (केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा) या दोन आवश्यक अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 81, 43)

सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक

आमच्या AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

 

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २१

व्यक्ती ईश्वराप्रति जर विश्वासाने आणि खात्रीपूर्वक स्वत:स अर्पण करेल तर ईश्वराकडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल. तिची आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, (आंतरिक व बाह्य चेतना यामधील तसेच कनिष्ठ चेतना व उच्चतर चेतना यामधील) पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मार्पण जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य व मार्गदर्शन मिळत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क व त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची लुडबुड कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. तेव्हा मग त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता उरणार नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 69)

साधना, योग आणि रूपांतरण – ०२

‘साधना’ म्हणजे योगाचा सराव करणे, योगाभ्यास करणे.

साधनेचे परिणाम साध्य करण्यासाठीच्या आणि कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवण्यासाठीच्या संकल्पावर एकाग्रता करणे म्हणजे ‘तपस्या’.

‘ईश्वरा’ची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे, त्याच्याप्रति आत्मसमर्पण करणे, त्याच्याप्रति अभीप्सा बाळगणे, त्याची प्रार्थना आणि नामस्मरण करणे या सर्व गोष्टींचा समवेश ‘आराधने’मध्ये होतो.

चेतना अंतरंगात एकाग्र करणे, चिंतन-मनन करणे, समाधी अवस्थेत शिरणे म्हणजे ‘ध्यान’.

“ध्यान, तपस्या आणि आराधना’’ ही सर्व साधनेची विविध अंग आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 215)

‘योगा’चे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. तपस्येचा मार्ग खडतर असतो. तेथे तुम्ही पूर्णत: स्वत:वर अवलंबून असता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताकदीनिशी सुरुवात करता. तेथे तुम्ही जे उन्नत होता, जे काही साध्य करून घेता, ते सारे तुमच्या शक्तीच्या प्रमाणात असते. पण तेथे नेहमीच पतन होण्याचा धोका असतो. आणि एकदा का तुमचे पतन झाले तर, तुम्ही खोलवर दरीतच फेकले जाता, तुमच्या चिंधड्या होतात आणि मग त्यावर कोणताच उपाय नसतो.

दुसरा मार्ग ‘समर्पणाचा’, हा सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे. पण या मार्गाबाबत पाश्चात्त्य लोकांना अडचण जाणवते. त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला बाधा येईल अशा कोणत्याही गोष्टीला घाबरायला आणि त्या टाळायला त्यांना शिकविण्यात आलेले असते. जणू त्यांच्या आईच्या दुधातूनच त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव पाजण्यात आलेली असते. आणि समर्पणात तर हे सर्व काही सोडून देणे अभिप्रेत असते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, रामकृष्ण (परमहंस) म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही एकतर ‘माकडाच्या पिल्लाचा’, अन्यथा, ‘मांजराच्या पिल्लाचा’ मार्ग अवलंबू शकता. माकडिणीचे पिल्लू आईने आपल्याला बरोबर घेऊन जावे यासाठी तिला पकडून ठेवते, त्याने तिला घट्ट पकडलेच पाहिजे; नाहीतर त्याची पकड ढिली होऊन ते खाली पडेल. दुसऱ्या बाजूला, मांजराचे पिल्लू! ते त्याच्या आईला धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला पकडलेले असते; त्यामुळे त्याला कसलेच भय नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला स्वत:ला काहीच करावे लागत नाही. आईने त्याला धरून ठेवावे म्हणून त्याने फक्त ‘मा’ ‘मा’ असा आकांत करायचा असतो.

तुम्ही जर हा समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर ‘योगसाधने’ला प्रारंभच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार शक्यता असू शकते पण ‘ईश्वरा’सोबत वागत असताना मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही.

तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच तुमचा ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 04-05]

ईश्वरी कृपा – २८

व्यक्ती परिश्रम करण्यासाठी आणि तपस्येसाठी जर तयार नसेल, तसेच तिचे मनावर व प्राणावर जर नियंत्रण नसेल तर, अशी व्यक्ती मोठ्या आध्यात्मिक लाभाची अपेक्षा बाळगू शकणार नाही – कारण मन व प्राण स्वतःची सत्ता दीर्घकाळ टिकून राहावी म्हणून, तसेच त्यांना त्यांच्या आवडीनिवडी लादता याव्यात म्हणून विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार; आणि आत्म्याची व चैतन्याची खुली माध्यमे आणि आज्ञाधारक साधने बनण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर येईल तेव्हा, तो दिवस दूर लोटण्यासाठी म्हणून मन व प्राण विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार. ‘ईश्वरी कृपा’ कधीकधी गैरवाजवी किंवा वरकरणी गैरवाजवी परिणामदेखील घडवून आणते पण व्यक्ती हक्क म्हणून किंवा अधिकार म्हणून ‘ईश्वरी कृपे’ची मागणी करू शकत नाही, कारण जर तसे झाले तर मग ती ‘ईश्वरी कृपा’ असणार नाही. व्यक्तीने केवळ उच्चरवात हाक देण्याचा अवकाश की, लगेच त्याला प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असा दावा व्यक्ती करू शकत नाही, हे तुम्ही पाहिले आहे. आणि तसेच माझ्या हेही पाहण्यात आले, ‘ईश्वरी कृपे’ने हस्तक्षेप करण्यापूर्वी नकळतपणे खरंच खूप दीर्घकाळ तयारी चाललेली असते, हे माझ्या नेहमीच लक्षात आले आहे; आणि तो हस्तक्षेप झाल्यानंतरही, जे काही प्राप्त झाले आहे ते सांभाळून ठेवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी व्यक्तीला – इतर बाबींबाबत करावे लागते तसे याबाबतीतही – जोपर्यंत पूर्ण सिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत, पुष्कळ काम करावे लागते. अर्थातच त्यानंतर परिश्रम संपुष्टात येतात आणि मग व्यक्तीला खात्रीशीरपणे ती गोष्ट प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळे या ना त्या प्रकारची तपस्या ही आवश्यकच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 173)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

मानसिक परिपूर्णत्व – ११

 

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया आधीपासून चांगल्या रीतीने सुरु झालेली असतानाही, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ईश्वरी अस्तित्व आणि ईश्वरी शक्ती सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते आणि त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते. काही जण असेही असतात की, जे हा अनुभव येण्याच्या आधीच श्रद्धेच्या आधारे ही भूमिका घेतात. आणि जर व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा खूप बळकट असेल तर, या गोष्टी त्या अनुभवाप्रत व्यक्तीला घेऊन जातात. परंतु सर्वच जण अगदी सुरुवातीपासून अशी भूमिका घेऊ शकत नाहीत आणि कधीकधी तर हे धोकादायकसुद्धा ठरू शकते; कारण ईश्वर आहे असे समजून, त्यांनी स्वतःला एखाद्या चुकीच्या शक्तीच्या हाती, सोपवून देण्याची शक्यता असते. पण बहुतेकांच्या बाबतीत तरी, त्यांनी तपस्येच्या माध्यमातूनच समर्पणामध्ये वृद्धिंगत होणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे शरीर घडविणे हा असेल. तसेच हालचालींमध्ये चपळ व लवचीक, कृतींमध्ये सामर्थ्यसंपन्न आणि आरोग्य व इंद्रियांच्या कार्याबाबत सुदृढ असे शरीर घडविणे हा असेल. हे सर्व साध्य करून घेण्यासाठी काही विशिष्ट सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठी त्या सवयींचा साहाय्यक म्हणून उपयोग करून घेणे सामान्यतः योग्य ठरेल. कारण नियमित आखीव कार्यक्रमाच्या चौकटीत आपले शरीर अधिक सुगमतेने कार्य करू शकते. Read more

तपस्या म्हणजे आत्मपीडन असा सर्वसाधारणपणे एक गैरसमज असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती तपस्येविषयी बोलू लागते तेव्हा आपण तपस्व्याच्या कठोर शिस्तीचा विचार करतो. शारीरिक, प्राणमय, आणि मानसिक जीवनाचे आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तन करण्याचे महाकठीण काम टाळण्यासाठी, असे परिवर्तन अशक्यच आहे असे तो तपस्वी प्रतिपादन करतो. आणि हे जीवन म्हणजे निरर्थक ओझे, एक बंधन आहे किंवा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक प्रगतीस पायबंद घालणारे आहे अशा भावनेने तो निर्दयपणे त्याला दूर लोटतो; निदानपक्षी, जीवन म्हणजे न सुधारता येणारी अशी एक गोष्ट आहे, प्रकृतिधर्मानुसार अथवा परमेश्वरकृपेने मृत्यूच्या माध्यमातून आपली जीवनातून सुटका होईपर्यंत कमी अधिक आनंदाने वाहिलेच पाहिजे असे ते एक ओझे आहे असे तो तपस्वी मानतो. किंवा फारतर, उन्नति करून घेण्याकरता ऐहिक जीवन हे एक क्षेत्र आहे म्हणून त्याचा व्यक्तीने जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे, व पूर्णतेच्या ज्या अवस्थेमध्ये ही जीवनपरीक्षा अनावश्यक ठरून तिचा अंत होईल अशा अवस्थेपर्यंत शक्य तितक्या लवकर जाऊन पोहोचले पाहिजे असे तो तपस्वी मानतो. Read more