Tag Archive for: कर्तव्य

आत्मसाक्षात्कार – २४

(‘अतिमानव होणे म्हणजे काय’, ही संकल्पना श्रीअरविंदांनी येथे सुस्पष्ट करून सांगितली आहे. हा मजकूर दीर्घ असल्याने क्रमश: देत आहोत…)

परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि त्याचसाठी तुम्ही इथे आहात. या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते म्हणजे एकतर तुमची तयारी करून घेणे आहे किंवा तो मार्गावरील आनंद आहे; अन्यथा ते म्हणजे उद्देशापासून स्खलन, ध्येयच्युती आहे. या मार्गाच्या आधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, (परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे) हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे; त्या ध्येयपूर्तीच्या आनंदामध्ये तुमच्या अस्तित्वाची महानता आणि आनंद सामावलेला आहे. तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तो (ईश्वर) देखील या मार्गावर तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत यासाठीच आरोहणाची शक्ती तुम्हाला प्रदान करण्यात आली आहे.

तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच आहे! तुमचे ध्येय काय असावे असे जर तुम्ही विचारत असाल, तर ते ध्येय हेच असावे. तुम्ही जर सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर उपरोक्त गोष्टीइतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत लाभणार नाही. कारण स्वप्नांचा आनंद असो, झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे आनंद खंडित वा मर्यादित असतात. पण उपरोक्त आनंद मात्र तुमच्या समग्र अस्तित्वाचा आनंद असतो. तुम्ही जर असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय आहे, तर ‘ईश्वर’ हेच तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ खंडित वा विपर्यस्त रूपे आहेत. तुम्ही जर ‘सत्य’ शोधू पाहात असाल, तर ते ‘सत्य’ हेच आहे. सातत्याने तेच तुमच्या दृष्टीसमोर असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150)

आध्यात्मिकता २८

“राजकीय, सामाजिक किंवा यांत्रिक पद्धतीने झालेले अत्यंत आमूलाग्र बदलसुद्धा कोणतेही परिवर्तन घडवून आणू शकलेले नाहीत कारण जुनीच दुखणी नव्या रूपात पुन्हा तशीच टिकून राहतात: बाह्य वातावरणाच्या एखाद्या अंगाबाबत काहीसा फरक होतो पण मनुष्य जसा होता तसाच कायम राहतो. तो अजूनही तसाच अज्ञानी मानसिक जीव आहे जो त्याच्या ज्ञानाचा दुरूपयोग करत आहे किंवा ते ज्ञान परिणामकारक रीतीने तो वापरत नाहीये. तो अजूनही अहंकारानेच संचालित होत आहे आणि अजूनही त्याच्यावर प्राणिक इच्छावासनांची, आवेगांची, शरीराच्या गरजांची सत्ता चालते, त्याचा दृष्टिकोन अजूनही तसाच वरवरचा आहे आणि आध्यात्मिक नसलेला (unspiritual) असाच आहे, तो त्याच्या स्वतःच्या आत्मतत्त्वाविषयी आणि त्याला संचालित करणाऱ्या आणि त्याचा उपयोग करून घेणाऱ्या शक्तींविषयी अजूनही अनभिज्ञच आहे…

केवळ आध्यात्मिक परिवर्तनामुळेच म्हणजे, मनुष्याच्या (सद्यकालीन) उथळ मानसिक अस्तित्वाकडून सखोल आध्यात्मिक चेतनेकडे होणाऱ्या उत्क्रांतीमुळेच खरा आणि परिणामकारक फरक घडून येऊ शकेल. स्वतःमधील आध्यात्मिक पुरुषाचा (spiritual being) शोध लावणे हे आध्यात्मिक मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म असते आणि त्याच उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी इतरांना साहाय्य करणे ही मानववंशासाठी त्याने केलेली खरी सेवा असते; जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत एखादी बाह्य मदत ही थोडीफार साहाय्य करू शकते किंवा दिलासा देऊ शकते पण त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. किंवा काही निष्पन्न झालेच तर ते अगदीच अल्प असते.”

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 917-918]

श्रीअरविंदलिखित ‘दिव्य जीवन’ ग्रंथामधील वरील उतारा श्रीमाताजींनी वाचून दाखविला आणि त्यावर एका साधकाने प्रश्न विचारला. त्याला श्रीमाताजी उत्तर देत आहेत. ते आपण उद्यापासून पाहू. (क्रमश:…)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १८

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : नैतिक नियमांचे पालन करून किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने किंवा ध्यानधारणेच्या सरावाने, किंवा विजनवासातील जीवन जगण्याने वा विचाराने व्यक्तीला खराखुरा आनंद प्राप्त होत नाही; तर वासनामुक्तीतूनच खराखुरा आनंद प्राप्त होतो. इच्छावासनांपासून सुटका होणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. कधीकधी तर ह्यासाठी उभे आयुष्य खर्ची पडते. पण खरे सांगायचे तर, जरी विकासाच्या एका ठरावीक टप्प्यावर, अशा प्रकारची साधना पुष्कळ उपयुक्त, किंवा अनिवार्य असली तरी देखील मला हा नकारार्थी मार्ग वाटतो. कारण अगदी सुरुवातीला तुम्ही मोठ्या प्रबळ वासनांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करता, की ज्या अगदी स्पष्ट असतात आणि त्यांचा तुम्हाला प्रचंड त्रास होत असतो आणि त्याबद्दल तुमच्या मनात तीळमात्रही शंका नसते.

नंतर क्रम लागतो तो सूक्ष्म अशा वासनांचा, की ज्या कधीकधी कर्तव्याचे रूप धारण करून समोर येतात, अत्यंत निकडीच्या असल्याप्रमाणे त्या भासतात, कधीकधी तर आंतरिक आदेशाच्या रूपात समोर येतात आणि त्यांचा शोध लागण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी पुष्कळ प्रामाणिकपणा व वेळ देण्याची आवश्यकता असते.

सरतेशेवटी या बाह्य गोष्टींमधून, भावभावना, संवेदना यांच्या विश्वामधून, कल्पनांच्या मानसिक विश्वामधून, भौतिक जगातील पापी वासनांपासून तुमची सुटका झाल्यासारखे तुम्हाला वाटते, पण पुढे गेल्यावर, परत एकदा त्या तुम्हाला आध्यात्मिक विश्वामध्येही आढळतात. तेथे त्या अधिक भयंकर, अधिक सूक्ष्म, अधिक तीक्ष्णभेदक, अधिक अदृश्य आणि सात्विकतेच्या पडद्याआड दडलेल्या असतात की त्यांना वासना म्हणण्यासदेखील कोणी धजावणार नाही.

आणि एखादी व्यक्ती जेव्हा त्यांच्यावरदेखील मात करण्यात यशस्वी होते; त्यांचा शोध लावण्यात, त्यांना दूर करण्यात, त्यांचे निर्मूलन करण्यात यशस्वी होते, तरीदेखील वासनामुक्तीच्या कार्यातील ही केवळ अकरणात्मक बाजूच (Negative Side) पूर्ण झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)