Tag Archive for: आत्मदान

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे (व्यक्तीमध्ये) बदल घडून येतो.

*

अभीप्सेमध्ये शब्दांची आवश्यकता नसते. अभीप्सा शब्दांद्वारे किंवा शब्दांवाचूनही व्यक्त होऊ शकते.

*

अभीप्सा ही विचारांच्या रूपातच असली पाहिजे असे काही गरजेचे नसते. ती आंतरिक भावनेच्या रूपातदेखील असू शकते. मन कामामध्ये गुंतलेले असतानासुद्धा ती टिकून राहू शकते.

*

स्वतःसाठी काही मिळविण्याच्या इच्छेमधून सहसा (दिव्य शक्ती) खेचून घेणे (Pulling) ही प्रक्रिया घडू लागते; पण अभीप्सेमध्ये मात्र, उच्चतर चेतना अवतरित व्हावी आणि तिने आपल्या अस्तित्वाचा ताबा घ्यावा म्हणून, तिच्याप्रत केलेले आत्मदान (self-giving) असते. जेवढी साद उत्कट असते, तेवढे हे आत्मदान अधिक असते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 59-60, 58, 58, 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १९

(आपण मागच्या भागात आंतरिक व बाह्य समर्पण यातील फरक थोडक्यात समजावून घेतला. आज आता आंतरिक समर्पणाविषयी अधिक जाणून घेऊ या.)

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत.

”मला दुसरेतिसरे काहीही नको, केवळ ईश्वरच हवा, असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते… मी ईश्वराला संपूर्णपणे समर्पित होऊ इच्छितो आणि ती माझ्या आत्म्याचीच मागणी असल्याने, इतर काहीही नको, तर फक्त तोच हवा. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी त्याव्यतिरिक्त इतर काहीही मागणार नाही. ज्यामुळे, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग ते कार्य गुप्त असेल अथवा उघड असेल, ते पडद्याआडून असेल किंवा प्रकट असेल, ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. सर्व गोष्टी, मी म्हणतो त्या पद्धतीनेच आणि तेव्हाच घडायला हव्यात असा आग्रह मी धरणार नाही. त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे. मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. त्याची इच्छा प्रमाण मानेन, त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन. कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहीन आणि हा मार्ग कधीही सोडणार नाही. माझे मन शांत होऊ दे व त्या ईश्वराकडे वळू दे आणि त्याने माझे मन त्याच्या प्रकाशाप्रत खुले करू देत; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे, त्याने त्या प्राणाला त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत खुले करू देत. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच आहे. काहीही झाले तरी, मी ही अभीप्सा आणि आत्मदान दृढ ठेवीन आणि ते घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.”

व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण या गोष्टी एकदम एकाच वेळी परिपूर्ण होणे शक्य नसते; मानसिक व प्राणिक गतिविधी त्यांच्या आड येत राहतात. पण व्यक्ती जर वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये वृद्धिंगत होत राहतील. उर्वरित गोष्टी या (ईश्वरी मार्गदर्शनाचे) आज्ञापालन करण्याचा भाग असतात; ईश्वरी मार्गदर्शन जेव्हा स्वतःला आविष्कृत करू लागते तेव्हा, व्यक्तीने स्वतःच्या मानसिक किंवा प्राणिक गतिविधींना त्यामध्ये लुडबूड करू न देता त्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 70-71)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १७

स्वतःला ईश्वराच्या हाती सोपवणे म्हणजे समर्पण. व्यक्तीने तिचे सर्व-स्व ईश्वरास अर्पण करणे; कोणतीही गोष्ट स्वत:ची आहे असे न समजणे; अन्य कोणाच्याही नव्हे तर, फक्त ‘ईश्वरी’ इच्छेचे अनुसरण करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हाच पूर्णयोगाच्या साधनेचा पहिला सिद्धांत आहे. मात्र जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते… समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तोच तर साधनेचा खरा सिद्धांत आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, (रूपांतरणाचे) कार्य पूर्ण होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने करत राहिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67,75-76)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३१

सर्वसाधारणपणे माणसं ज्याला प्रेम असे संबोधतात, ते प्रेम प्राणिक भावना असणारे प्रेम असते; ते प्रेम हे (खरंतर) प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, एक प्रकारच्या अभिलाषेची ती उपजत प्रेरणा असते, तो मालकी भावनेचा आणि एकाधिकाराचा भावावेग असतो. योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीदेखील भेसळ होऊ देता कामा नये. ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे असे प्रेम असता कामा नये. (कारण) ते दिव्य प्रेम नसते.

ईश्वराबद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान (self-giving) असते, त्यामध्ये कोणतीही मागणी नसते. ते शरणभावाने आणि समर्पणाने परिपूर्ण असते. ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही. मत्सर, अभिमान वा राग अशा प्रक्षोभक भावना त्याच्या ठिकाणी आढळत नाहीत, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात.

ईश्वराभिमुख झालेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून ‘दिव्य माता’ खुद्द स्वत:लाच देऊ करते, अगदी मुक्तपणे! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते. दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना परिपूर्णत्व (perfection) आणि परिपूर्तीच्या (fulfillment) दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या कवेमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने तुमच्या अगदी जडभौतिक अंगापर्यंत तुमचा ताबा घ्यावा, अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. येथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!

व्यक्तीने जर खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि ती जर तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असणार नाही. आणि व्यक्तीने जर खरोखरच अशी अभीप्सा बाळगली तर, ती जसजशी अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतशी निश्चितपणे तिला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा-वासना यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग प्रेम ग्रहण करण्याची, धारण करण्याची तुमची जेवढी क्षमता आहे, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे, असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)

जीवन जगण्याचे शास्त्र – १६

तुम्ही जर ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान करू शकत नसाल आणि तिच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल तर, तुम्हाला पूर्णयोग करता येणे शक्यच होणार नाही. तुम्ही जर केवळ मनामध्ये आणि मनाच्या शंकाकुशंका व कल्पना यांच्यामध्येच जीवन जगत असाल तर, तुमच्याबाबतीत पूर्णयोगाची शक्यताच निर्माण होत नाही. त्यासाठी मन शांत करण्याची क्षमता तसेच श्रीमाताजींची शक्ती म्हणजे महत्तर ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे यावर विश्वास ठेवण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रकृतीमध्ये त्या कार्याच्या आड येणारे जे जे काही असते त्यास नकार देत, त्या कार्याला साहाय्यभूत होण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक असते. या गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये पूर्णयोग करण्याची क्षमता आहे याची कसोटी असते.
*
तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा विचार करणे थांबविणे आणि शांती व शक्ती यांना स्वतःहून आविष्कृत होण्यास आणि तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव देणे याचा अर्थ ‘मन स्थिर-शांत करणे’ असा होतो. असे असेल तर ‘अंतरंगामध्ये राहणे’ (living inside) ही गोष्ट आपोआप घडून येईल. मग, त्याच्या बरोबरीने येणारी आंतरिक शांती आणि चेतना म्हणजेच तुम्ही स्वतः आहात असे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल आणि अन्य सर्व गोष्टी बाह्यवर्ती, वरवरच्या, उथळ असल्याचे देखील जाणवू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 27-28)

जीवन जगण्याचे शास्त्र – ११

(आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीला आनंदाचा अनुभव कसा येतो, हे आपण अगोदरच्या भागात पाहिले. श्रीमाताजी पुढे म्हणतात…)

मात्र या आनंदाचा अनुभव मनुष्यमात्रांमध्ये येणे हे काहीसे अधिक कठीण असते. कारण या आनंदाचा बोध घेण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मानसिक आणि प्राणिक रचना आडव्या येतात आणि त्या हे क्षेत्र बिघडवून टाकतात. तेथे त्यांच्यामध्ये असलेला तीव्र अहंकार वस्तुंमध्ये मिसळतो आणि त्यामुळे मनुष्याच्या माध्यमातून या आनंदाशी संपर्क होणे काहीसे अधिक कठीण असते.

वनस्पती आणि प्राण्यांमध्येसुद्धा तुम्हाला या आनंदाची जाणीव होऊ शकते. पण वनस्पतींपेक्षा प्राण्यांमध्ये हा अनुभव घेणे मुळातच काहीसे अधिक कठीण असते. पानाफुलांमध्ये, झाडांमध्ये ही गोष्ट अगदी मनोरम असते. पानेफुले त्यांचा आनंद बोलून दाखवितात, व्यक्त करतात. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व परिचित वस्तुंमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या तुमच्या अवतीभोवतीच्या वस्तुंमध्ये, चेतनेची अशी एक स्थिती असते, की त्यामध्ये प्रत्येक वस्तू जशी, जिथे असते तशी ती त्या स्थितीमध्ये आनंदात असते. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवते की, तुम्ही खऱ्या आनंदाला स्पर्श केला आहे.

आणि ही गोष्ट सापेक्ष नसते. म्हणजे ती गोष्ट इतर कशावरही अवलंबून नसते. हा आनंद बाह्य परिस्थितीवर, कमीअधिक अनुकूल स्थितीवर किंवा अन्य कशावरही अवलंबून नसतो. तर येथे तुम्ही या विश्व-अस्तित्वाच्या मूलकारणाशीच सायुज्य पावलेले असता. आणि असा आनंद जेव्हा तुमच्या अनुभवास येतो तेव्हा तुमच्या शरीरातील पेशी न्‌ पेशी त्या आनंदाने भरून जाते.

ही गोष्ट विचार करून समजावून घेण्याची नाही. येथे तुम्ही तर्क करत नाही, विश्लेषण करत नाही. ही अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये तुम्ही ती अवस्था जगत असता. आणि जेव्हा शरीराला हा अनुभव येत असतो तेव्हा तो अनुभव इतका टवटवीत असतो, तो इतका ताजा, इतका उत्स्फूर्त असतो… तो तुमच्याकडे कधीच पाठ फिरवत नाही. तेथे आत्म-निरीक्षणाची, आत्म-विश्लेषणाची किंवा वस्तुंचे विश्लेषण करत असल्याची कोणतीही जाणीवच शिल्लक राहात नाही.

हे सारे एखाद्या आनंदलहरींच्या गाण्यासारखे असते, परंतु त्यामध्ये कोणताही उथळपणा नसतो, कोणताही आवेग नसतो; सारे काही शांत, अगदी शांत असते. ते अतिशय सूक्ष्मही असते आणि तेवढेच उत्कटदेखील असते. जेव्हा हा आनंदाचा अनुभव येतो तेव्हा जणू अखिल विश्व हे अद्भुत रितीने सुसंवादी असल्यासारखे वाटू लागते. इतकेच काय पण सामान्य मानवी चेतनेला जे कुरूप, असुखद वाटत असते, तेसुद्धा आता अद्भुत वाटू लागते. …हा खरा आनंद, सत्य आनंद, खरा परमानंद असतो. परंतु तो अनुभवण्यासाठी आधी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी मी सांगितले तसे प्रयत्न व्यक्तीने केले पाहिजेत.

परंतु आनंद मिळवणे हा हेतू ठेवून जर ते प्रयत्न केले तर, त्याचे फळ मिळण्यास वेळ लागेल; कारण त्यामध्ये अहंभावात्मक घटकाची भेसळ झालेली असेल. एखादा हेतू मनात ठेवून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर मग ते अर्पण असणार नाही, त्यामध्ये एक अपेक्षा असेल, मागणी असेल आणि मग… त्याचे फळ मिळेल पण त्याला काहीसा अधिक काळ लागेल. परंतु जेव्हा तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, मागणी करत नाही, काही मिळावे अशी अपेक्षा बाळगत नाही, म्हणजे जेव्हा तिथे केवळ आत्म-दान व अभीप्सा असते, जेव्हा तिथे देवाणघेवाण-विरहित एक उत्स्फूर्त आवश्यकता असते, दिव्यता प्राप्त करून घ्यावी अशी निकड जेव्हा तुम्हाला जाणवते, तेव्हा तो आनंद तुम्हाला प्राप्त होतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)

आत्मसाक्षात्कार – १०

(कालच्या भागात आपण स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व म्हणजे काय ते पाहिले. येथे आता श्रीमाताजी शरीराच्या पृथगात्मतेविषयी सांगत आहेत.)

(ईश्वरापासून) विभक्त करणारा अहंकार नाहीसा होण्यासाठी, व्यक्तीला स्वतःचे समग्रतया, पूर्णतया, हातचे काहीही राखून न ठेवता आत्मदान करता आले पाहिजे. आणि असे आत्मदान करण्यासाठी, व्यक्तीची ‘व्यक्ती’ म्हणून घडण झालेली असली पाहिजे. त्यासाठी, ती स्वतंत्र, पृथगात्म (individualized) होणे आवश्यक असते.

तुमचे शरीर जर आत्ता आहे त्याप्रमाणे ताठर, कडक, (rigid) नसते, (आत्ता ते फारच अलवचीक आहे.) समजा, ते तसे नसते आणि (श्रीमाताजी निर्देश करून दाखवितात) तुम्हाला जर अशी सघन त्वचाच नसती तर, काय झाले असते? ज्याप्रमाणे तुम्ही प्राणिक व मानसिक क्षेत्रामध्ये असता (म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नसलेले आणि एकमेकांमध्ये मिसळलेले असे) जर तुम्ही शरीराने असता, म्हणजे प्राणिक व मानसिक क्षेत्रामधील तुमच्या अस्तित्वाचे केवळ प्रतिबिंबच म्हणता येईल असे जर तुम्ही (शरीराने) बाह्यतःदेखील असता तर काय झाले असते? तसे असते तर, तुमची अवस्था एखाद्या जेलीफिशपेक्षासुद्धा वाईट झाली असती. प्रत्येक गोष्टच दुसऱ्या प्रत्येक गोष्टीत मिसळत राहिली असती, विरघळत राहिली असती… आणि मग केवढा मोठा गोंधळ उडाला असता बघा! आणि म्हणून सुरुवातीला असा अगदी जड, कठीण, सघन देहाकार असण्याची आवश्यकता होती.

आता मात्र आपण त्याच्याबद्दल तक्रार करत राहतो. आपण म्हणतो, “हे शरीर किती बद्ध, जखडबंद आहे. किती त्रासदायक आहे हे! ते घडणसुलभ नाही, ते लवचीक नाही. ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी लागणारी तरलता, प्रवाहीपणा त्याच्यामध्ये नाही.”

परंतु शरीर तसेच असणे आवश्यक होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257-258)

आत्मसाक्षात्कार – ०७

(श्रीमाताजी सांगत आहेत की, व्यक्ती ईश्वर-साक्षात्कारासाठी प्रयत्न करू लागली की, आत्मदान करण्याऐवजी सहसा ईश्वरालाच स्वत:कडे ओढू पाहते. आणि त्यामुळेच ती त्यात यशस्वी होत नाही. कारण असे केल्यामुळे व्यक्ती स्वत:च्या अहंमध्येच बंदिस्त होऊन राहते आणि ईश्वर व स्वत:मध्ये एक प्रकारची भिंत उभी करते. यावर उपाय म्हणजे आत्मदान. स्वत:ला शक्य तितके ईश्वराप्रत अर्पण करायला शिका, असे श्रीमाताजींनी सांगितले आहे, त्यावर एका साधकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)

साधक : ‘ईश्वर’च अस्तित्वात आहे आणि व्यक्तीला स्वत:चे असे काही अस्तित्वच नाही, अशी जाणीव बाळगण्याचा प्रयत्न केला तर, तो अहंकारातून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो का?

श्रीमाताजी : म्हणजे व्यक्तीचे अस्तित्वच नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशा रितीने केवळ मनाने विचार करून काही साध्य होईल असे मला वाटत नाही, कारण हा एक प्रकारचा मानसिक प्रयत्न झाला. व्यक्ती अशा प्रकारच्या मानसिक रचना करत राहते आणि त्याद्वारे तिला फारसे काही साध्य होत नाही. अभीप्सेची एक उत्स्फूर्त, उत्कट अशी ज्योत, असे काहीतरी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये अखंड प्रज्वलित असले पाहिजे…

परंतु (ईश्वर-साक्षात्कार) ही गोष्ट जर केवळ डोक्यामध्येच चालू असेल, म्हणजे ती केवळ मानसिक पातळीवरची असेल तर त्यातून फारसे काहीच साध्य होत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 138)

श्रीमाताजी आणि समीपता – ३१

‘ईश्वरी प्रेम’ हे मानवी प्रेमासारखे नसते, तर ते सखोल, विशाल व शांत असते; त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने शांत व विशाल होण्याची आवश्यकता असते.

समर्पित व्हायचे हे ‘साधकाने त्याच्या जीवनाचे संपूर्ण उद्दिष्ट बनविले पाहिजे, त्यामुळे तो ईश्वरी शक्तीचे एक सुपात्र आणि एक साधन बनू शकेल. (मात्र) त्याचे ते पात्र कशाने भरणे आवश्यक आहे याचा निर्णय त्याने दिव्य प्रज्ञेवर आणि दिव्य प्रेमावर सोपविला पाहिजे. अमुक इतक्या कालावधीतच स्वतःची प्रगती झाली पाहिजे, स्वतःचा विकास झाला पाहिजे, विशिष्ट अनुभव अमुक इतक्या कालावधीतच आले पाहिजेत, ठरावीक कालावधीतच साक्षात्कार झाले पाहिजेत असे त्याने मनाने ठरविता कामा नये. त्यासाठी कितीही कालावधी का लागेना, त्याने वाट पाहण्याची, चिकाटी बाळगण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्याचे संपूर्ण जीवन म्हणजे एक प्रकारची अभीप्साच बनविली पाहिजे. आणि केवळ एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे ‘ईश्वराप्रति उन्मुखता’!

मागणी करणे, एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे हे साधनेचे रहस्य नाही, तर आत्मदान करणे हे साधनेचे रहस्य आहे. एखादी व्यक्ती जेवढे जास्त आत्मदान करते, तेवढी तिची ग्रहण करण्याची क्षमता वाढत जाते. परंतु त्यासाठी अधीरता आणि बंडखोरी या गोष्टी समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. आपल्याला काही साध्यच होत नाहीये, कोणाचे साहाय्यच लाभत नाहीये; आपल्याला कोणाचे प्रेमच लाभत नाहीये, आपण श्रीमाताजींपासून दूर चाललो आहोत, जीवनात काही रामच राहिला नाहीये त्यामुळे आता मी देहत्याग करतो किंवा आध्यात्मिक प्रयत्न करणेच सोडून देतो यांसारख्या सर्व सूचनांना त्याने नकार दिला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481-482)

श्रीमाताजी आणि समीपता – १५

माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना ‘ईश्वराभिमुख’ प्रेमामध्ये असता कामा नये; कारण सामान्य प्रेम हे प्रेम नसते, तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, उपजत प्रवृत्ती असते, आणि स्वामित्वाची व वर्चस्व गाजविण्याची ती प्रेरणा असते. हे दिव्य ‘प्रेम’ तर नसतेच, पण इतकेच नव्हे तर ‘योगा’मध्ये या तथाकथित प्रेमाचा अंशभागसुद्धा मिसळलेला असता कामा नये. ईश्वराबद्दलचे खरे प्रेम म्हणजे आत्मदान (self-giving) असते, ते निरपेक्ष असते, ते शरणागती आणि समर्पण यांनी परिपूर्ण असते; ते कोणताही हक्क सांगत नाही, ते कोणत्याही अटी लादत नाही, कोणताही व्यवहार करत नाही; मत्सर, अभिमान किंवा क्रोधाच्या हिंसेमध्येही सहभागी होत नाही कारण या गोष्टी मूलतःच सामान्य प्रेमामध्ये नसतात.

खऱ्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून, ‘दिव्य माता’ स्वतःच तुमची होऊन जाते, अगदी मुक्तपणे! अर्थात हे सारे आंतरिकरित्या घडत असते. तिची उपस्थिती तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये जाणवते; तिची शक्ती तुमचे दिव्य प्रकृतीमध्ये पुनःसृजन करत असल्याचे तुम्हाला जाणवते; ती तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या वृत्ती-प्रवृत्ती हाती घेऊन त्यांना पूर्णत्वप्राप्तीचे आणि कृतार्थतेचे वळण देत असल्याचे तुम्हाला जाणवते; तिचे प्रेम तुम्हाला कवळून घेत आहे आणि आपल्या कडेवर घेऊन ती तुम्हाला ईश्वराच्या दिशेने घेऊन चालली आहे, असे तुम्हाला जाणवू लागते. या गोष्टींचा अनुभव यावा आणि अगदी जडभौतिकापर्यंत तुमचे सर्वांग तिने व्यापून टाकावे अशी आस तुम्ही बाळगली पाहिजे. आणि येथे काळाची किंवा पूर्णतेची कोणतीच मर्यादा असत नाही. एखादी व्यक्ती जर खरोखरच तशी आस बाळगेल आणि तिला ईप्सित ते साध्य होईल तर, तेथे अन्य कोणत्याही गोष्टीसाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही वगैरे गोष्टींना वावच उरणार नाही. व्यक्ती जर खरोखर तशी आस बाळगेल तर तिला ते निश्चितपणे प्राप्त होते, व्यक्तीचे जसजसे शुद्धीकरण होत जाईल आणि तिच्या प्रकृतीमध्ये आवश्यक असणारा बदल जसजसा होत जाईल तसतसे तिला ते अधिकाधिक प्राप्त होते.

कोणत्याही स्वार्थी हक्काच्या आणि इच्छांच्या मागण्यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; तसे ते झाले तर तुम्हाला असे आढळेल की, तुम्ही जेवढे पेलू शकता, आत्मसात करू शकता तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 461)