Tag Archive for: अचेतन

साधना, योग आणि रूपांतरण – ३०५

अचेतनाचे रूपांतरण

(साधना अचेतनापर्यंत [Inconscient] जाऊन पोहोचल्यामुळे साधकांमध्ये सर्वसाधारणपणे एक निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, असे निरीक्षण एकाने नोंदविले आहे, त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

या साधकांच्या आंतरिक जीवनामध्ये अचेतनातून आलेल्या तामसिकतेमुळे एक प्रकारचा अडसर निर्माण झाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नाहीये, हेच तर दुखणे आहे. व्यक्तीने जर योग्य परिस्थिती व योग्य दृष्टिकोन बाळगला, आपल्याला नेमून दिलेल्या कामामध्ये आणि साधनेमध्ये जर रस घेतला तर ही अचडण निवळेल.

योग्य वृत्ती ठेवणे आणि हळूहळू किंवा शक्य असेल तर वेगाने, उच्चतर अभीप्सेचा प्रकाश व्यक्तित्वाच्या अचेतन भागामध्येसुद्धा उतरविणे हा यावरील उपाय आहे; म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी, त्या भागालासुद्धा, योग्य संतुलन कायम ठेवता येईल. आणि मग अशा व्यक्तीला सूर्यप्रकाशित मार्ग (sunlit path) अशक्य वाटणार नाही.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 618)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०४

अचेतनाचे रूपांतरण

(दि. ९ एप्रिल १९४७ रोजी श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला या अडचणी इतक्या तीव्रतेने भेडसावत आहेत त्याचे कारण की योगसाधना आता ‘अचेतना’च्या आधारशिलेपर्यंत येऊन पोहोचली आहे. ही अचेतनता, आत्म्याच्या व ईश्वरी कार्याच्या विजयाला (ज्या विजयाकडे तिची वाटचाल चालली आहे त्या विजयाला) व्यक्तिगत स्तरावर व या जगामध्ये जो प्रतिकार होत असतो, त्या प्रतिकाराचा मूळ आधार आहे.

या अडचणी श्रीअरविंद-आश्रमामध्ये आणि बाहेरच्या जगामध्येसुद्धा आहेत. शंकाकुशंका, हतोत्साह, श्रद्धा कमी होणे किंवा नाहीशी होणे, आदर्शाबाबत असेलला प्राणिक जोम, उत्साह क्षीण होणे, मनाचा उडालेला गोंधळ आणि भवितव्याच्या आशेला बसलेला धक्का ही या अडचणींची सर्वसाधारण अशी लक्षणं आहेत.

बाहेरच्या जगामध्ये तर त्याची यापेक्षाही अधिक वाईट लक्षणं दिसून येत आहेत. उदाहरणार्थ, नैराश्यवादामध्ये झालेली वाढ, कोणत्याच गोष्टीवर विश्वास न ठेवणे, सचोटीमध्ये घट, प्रचंड प्रमाणात होणारा भष्ट्राचार, उच्चतर गोष्टी वगळून, अन्न, पैसा, सुखसोयी, मौजमजा यांमध्येच गुंतून पडणे आणि या जगामध्ये काहीतरी वाईट घडून येणार आहे याबद्दल असलेली एक सार्वत्रिक अपेक्षा, (अशा गोष्टी जगामध्ये दिसून येत आहेत.)

या गोष्टी कितीही भयंकर असल्या तरीही त्या तात्पुरत्या आहेत. आणि या जगामधील उर्जेची कार्यप्रणाली आणि आत्म्याची कार्यप्रणाली ज्यांना ज्ञात आहे अशा व्यक्तींची यासाठी तयारी करून घेण्यात आलेली आहे. हे असे निकृष्टतम घडून येणार हे मला आधी ज्ञात झाले होते, परंतु या गोष्टी म्हणजे उषःकालापूर्वीची रात्र आहे, त्यामुळे मी नाउमेद झालेलो नाही. या अंधकारापाठीमागे कशाची तयारी चालू आहे हे मला माहीत आहे, आणि त्याच्या आगमनाच्या प्रारंभिक काही खुणा मला दिसू लागल्या आहेत, मला त्या जाणवत आहेत. जे ईश्वराचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी त्यांच्या शोधकार्यामध्ये चिकाटी बाळगली पाहिजे, त्यावर दृढ राहिले पाहिजे. कालांतराने हा अंधकार भेदला जाईल, नाहीसा होईल आणि ‘दिव्य प्रकाश’ उदयास येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 619)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०३

अचेतनाचे रूपांतरण

सद्यस्थितीत साधकांना भेडसावणारी गोष्ट म्हणजे परिवर्तनाची सार्वत्रिक अक्षमता! त्याचे कारण असे आहे की, साधना ही आता एक सार्वत्रिक तथ्य या दृष्टीने अचेतनापर्यंत (Inconscient) आलेली आहे. प्रकृतीचा जो भाग अचेतनावर थेटपणे अवलंबून असतो अशा भागामध्ये परिवर्तन करण्याचा आता दबाव आहे, आणि तशी हाक आलेली आहे. म्हणजे दृढमूल झालेल्या सवयी, आपोआप घडणाऱ्या हालचाली, प्रकृतीची यांत्रिक पुनरावृत्ती, जीवनाला दिलेल्या अनैच्छिक, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, या साऱ्या गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक स्थायी, अपरिवर्तनीय भाग असल्यासारख्या दिसतात. समग्र आध्यात्मिक परिवर्तनाची शक्यता निर्माण होण्यापूर्वी या गोष्टींमध्ये परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट शक्य व्हावी म्हणून ‘दिव्य शक्ती’ (व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर, सार्वत्रिक स्तरावर) कार्यरत आहे. आणि हा दबाव त्याचसाठी आहे. कारण इतर स्तरांवर, हे परिवर्तन यापूर्वीच शक्य झालेले आहे. (आणि हे लक्षात ठेवा की या परिवर्तनाचे आश्वासन प्रत्येकाला देण्यात आलेले नाही.)

परंतु अचेतनास प्रकाशाप्रत खुले करणे हे भगीरथ-कार्य आहे; त्या मानाने इतर स्तरांवरील परिवर्तन हे अधिक सोपे होते. आणि अचेतनावरील हे कार्य आत्ताआत्ता कुठे सुरू झाले आहे आणि त्यामुळे वस्तुमात्रांमध्ये किंवा माणसांमध्ये कोणतेही कोणताही बदल दिसून येत नाहीये यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हा बदल घाईने नाही, पण योग्य वेळी (निश्चितपणे) घडून येईल.

अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, जरी अगदी ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरी तो अनुभवसुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 617)

साधना, योग आणि रूपांतरण – २९२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये अश्लील दृष्य दिसत असत, तसेच त्याला साधनेमध्ये कामवासनेच्या विकाराचादेखील बराच अडथळा जाणवत असे. त्याच्या या समस्येवर श्रीअरविंदांनी पत्राद्वारे दिलेले उत्तर…)

अश्लील दृष्य वगैरेच्या बाबतीत सांगायचे तर, ज्यामध्ये अशा प्रकारच्या अनेकानेक विचित्र गोष्टी असतात अशा अवचेतन (subconscient) प्रांतामधूनच या गोष्टी तुमच्या पृष्ठभागावर येत असल्या पाहिजेत. किंवा मग तुमच्या कनिष्ठ प्राणिक चेतनेवर त्या चेतनेशी संबंधित असणाऱ्या वैश्विक प्रकृतीमधील प्रतलावरून अशा प्रकारच्या रचनांचा भडिमार होत असेल. या प्रतलावर घाणेरड्या, अश्लील व कुरुप गोष्टींमध्ये आणि सर्व प्रकारच्या विकृतीमध्ये मजा घेणाऱ्या शक्ती असतात. मात्र कारण कोणतेही असले तरी अशा वेळी साधकाने स्थिर, निर्लिप्त नकार हीच प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे.

*

एखादा साधक जेव्हा लैंगिक वासनात्मक कृतींचे शमन करू लागतो आणि सचेत मनामधून व प्राणामधून त्या कृतीस नकार देऊ लागतो तेव्हा त्या साधकाला कामवासना छळू लागतात. आणि ही एक अगदी सर्वसाधारणपणे आढळून येणारी गोष्ट आहे. (अशा परिस्थितीत) कामवासना ही जेथे मनाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसते अशा अवचेतनामध्ये आश्रय घेते आणि ती स्वप्न-रूपाने पृष्ठभागी येऊन, स्वप्नदोष (वीर्यपतन) घडवून आणते. जोपर्यंत अवचेतन स्वतः शुद्ध होत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडतच राहते.

ही गोष्ट घडू नये यासाठी झोपण्यापूर्वी काम-चक्रावर, जे नाभीच्या खाली असते (sex-centre) त्यावर प्रबळ इच्छाशक्तीचा वापर केल्याने किंवा शक्य झाल्यास, त्यावर सघन असा ‘शक्ती’प्रवाह केंद्रित केल्यामुळे कधीकधी उपयोग होऊ शकतो. यामध्ये लगेचच यश येईल असे नाही, परंतु प्रभावीपणे असे करत राहिल्यास, सुरुवातीला त्या गोष्टीच्या पुनरावृत्तीचे प्रमाण कमी होते आणि सरतेशेवटी ती शमते.

अतिमसालेदार, चमचमीत पदार्थांचे सेवन किंवा लघवी रोखून धरणे यासारख्या गोष्टी स्वप्नदोषांसारख्या गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत ठरतात. अवचेतनाच्या या प्रेरणेमध्ये बरेचदा एक कालबद्धता असते. म्हणजे ही गोष्ट महिन्यातील एका विशिष्ट वेळी किंवा आठवड्याने, पंधरवड्याने, महिन्याने किंवा सहा महिन्याने एकदा अशा ठरावीक कालावधीनंतर घडताना दिसते.

– श्रीअरविंद (SABCL 24 : 1604)

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व प्राण मुक्त होण्यासदेखील साहाय्य होऊ शकते.
*
जेव्हा मन, प्राण व शरीर हे संपूर्णपणे दिव्य होतील आणि त्यांचे अतिमानसिकीकरण (supramentalised) घडून येईल तेव्हा ते ‘परिपूर्ण रूपांतरण’ असेल आणि त्या दिशेने घेऊन जाणारी प्रक्रिया हीच रूपांतरणाची खरी प्रक्रिया होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 598) (CWSA 28 : 297)

*

केवळ मन आणि प्राणानेच नव्हे तर, शरीराने सुद्धा त्याच्या सर्व पेशींसहित दिव्य रूपांतरणाची आस बाळगली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 15 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य व्यक्तित्वातील अशुद्धता तशाच कायम राहण्याची शक्यता असेल ना?

श्रीमाताजी : हो, अर्थातच. केवळ आंतरिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या प्राचीन योगपरंपरा आणि आपला पूर्णयोग यामध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. प्राचीन समजूत अशी होती, आणि काही व्यक्ती भगवद्गीतेचा अर्थ या पद्धतीनेही लावत असत की, ज्याप्रमाणे धुराशिवाय अग्नी नसतो त्याप्रमाणे अज्ञानाशिवाय जीवन नसते. हा सार्वत्रिक अनुभव असतो पण ही काही आपली संकल्पना नाही, हो ना?

आपल्याला अनुभवातून हे माहीत आहे की, आपण जर शारीर-चेतनेपेक्षाही खाली म्हणजे अवचेतनेपर्यंत (subconscient) खाली उतरलो, किंबहुना त्याहूनही खाली म्हणजे अचेतनतेपर्यंत (inconscient) खाली उतरलो तर, आपल्याला आपल्यामध्ये अनुवंशिकतेमधून आलेल्या गोष्टींचे (atavism) मूळ सापडू शकते तसेच आपल्या प्रारंभिक शिक्षणामधून आणि आपण ज्या वातावरणामध्ये जीवन जगत असतो त्यामधून जे काही आलेले असते त्याचे मूळही आपल्याला सापडू शकते. आणि त्यामुळेच व्यक्तीमध्ये, म्हणजे तिच्या बाह्य प्रकृतीमध्ये, एक प्रकारची विशेष वैशिष्ट्यपूर्णता निर्माण होते आणि सर्वसाधारणतः असे समजले जाते की, आपण असेच जन्माला आलेलो आहोत आणि आयुष्यभर आपण असेच राहणार आहोत. परंतु अवचेतनेपर्यंत, अचेतनेपर्यंत खाली उतरून व्यक्ती तेथे जाऊन या घडणीचे मूळ शोधून काढू शकते. आणि जे तयार झाले आहे ते नाहीसे देखील करू शकते. म्हणजे व्यक्ती सामान्य प्रकृतीच्या गतिविधी आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये सचेत आणि जाणीवपूर्वक कृतीने परिवर्तन घडवून आणू शकते आणि अशा रीतीने ती खरोखरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे रूपांतरण घडवून आणू शकते. ही काही सामान्य उपलब्धी नाही, परंतु ती करून घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे, हे असे करता येणे शक्य असते, एवढेच नव्हे, तर असे करण्यात आलेले आहे हे व्यक्ती ठामपणे म्हणू शकते. समग्र रूपांतरणाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असते. परंतु त्यानंतर, मी आधी ज्याचा उल्लेख केला ते पेशींचे रूपांतरण करणे अजूनही बाकी आहे.

अन्नमय पुरुषामध्ये (physical being) पूर्णतः परिवर्तन करणे शक्य आहे परंतु ही गोष्ट आजवर कधीही करण्यात आलेली नाही.

– श्रीमाताजी (CWM 15 : 294-295)