साधना, योग आणि रूपांतरण – १२२

(स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या एका लोकप्रिय नेत्याने, जे गीताप्रणीत योगाचे आचरण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी श्रीअरविंदांना विनंती केली होती की, आपल्याला मार्गदर्शन करावे. राजकीय जीवनाचा मार्ग सोडून नवीन कार्य हाती घ्यावे का असा प्रश्न त्यांनी श्रीअरविंदांना विचारला आहे. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही तुमच्या कार्याची आणि जीवनाची जी दिशा निवडली आहे त्यामध्ये बदल करण्याची कोणतीच गरज नाही. जोपर्यंत ते कार्य म्हणजे तुमचा स्वभावधर्म आहे असे तुम्हाला वाटते किंवा तुमच्या आंतरिक अस्तित्वाने ते कार्य करण्यास तुम्हाला प्रवृत्त केले असेल तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने, ते कार्य म्हणजे तुमचा विहीत धर्म आहे, असे तुम्हाला वाटते तोपर्यंत त्यात बदल करण्याची गरज नाही. हे तीन निकष आहेत. या व्यतिरिक्त गीताप्रणीत योगाने, आचरणाची कोणती एखादी निश्चित दिशा किंवा कर्माचा किंवा जीवनाचा कोणता मार्ग नेमून दिला आहे किंवा कसे ते मला माहीत नाही.

कार्य कोणत्या वृत्तीने वा कोणत्या चेतनेने केले जाते ते सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्याचे बाह्य रूप हे विविध स्वभावधर्मानुरूप बदलू शकते. ‘ईश्वरी शक्ती’ ने आपले कार्य हाती घेतले आहे आणि ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असा सुस्थिर स्वरूपाचा अनुभव व्यक्तीला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असे चालू राहते; त्यानंतर कोणते कार्य करायचे किंवा कोणते कार्य करायचे नाही हे ती ‘शक्ती’च निर्धारित करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 236)

साधना, योग आणि रूपांतरण – १२१

एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे, ती अशी की, तुमचे यश किंवा अपयश हे प्रथम आणि नेहमीच, योग्य दृष्टिकोन आणि खरे आंतरात्मिक व आध्यात्मिक वातावरण बाळगण्यावर, तसेच श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्या माध्यमातून कार्य करण्यास सहमती देण्यावर अवलंबून असते.

मला तुमच्या पत्रांवरून असे लक्षात आले की, तुम्ही त्या शक्तीचा आधार फारच गृहीत धरत आहात आणि पहिला भर स्वतःच्या कल्पना, योजना आणि कामासंबंधीच्या चर्चांवर देता. परंतु या साऱ्या गोष्टी चांगल्या असू देत किंवा वाईट, त्या योग्य असू देत किंवा चुकीच्या, त्या जर ‘सत् – शक्ती’ची साधने नसतील तर त्या असफलच होणार. तुम्ही नेहमी एकाग्र असले पाहिजे, तुमच्या सर्व अडचणींच्या निराकरणासाठी तुम्ही येथून (पाँडिचेरीहून) पाठविल्या जाणाऱ्या शक्तीवर विसंबून राहिले पाहिजे, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे, म्हणजे त्या शक्तीची जागा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला आणि स्वतंत्र प्राणिक इच्छा किंवा आवेगाला घेऊ देता कामा नये.

यशाची ही जी अट आहे ती कधीही न विसरता, तुम्ही तुमचे कार्य करत रहा. स्वतःला त्या कार्यामध्ये किंवा तुमच्या कल्पनांमध्ये किंवा त्यासंबंधीच्या योजनांमध्ये हरवून बसू नका आणि स्वतःस खऱ्या उगमाच्या नित्य संपर्कात ठेवण्यास विसरू नका. अन्य कोणाचाही मानसिक किंवा प्राणिक प्रभाव किंवा सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव किंवा सामान्य मानवी मानसिकता यांना तुमच्या आणि श्रीमाताजींच्या शक्तीच्या व उपस्थितीच्या आड येऊ देऊ नका.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242-243)

साधना, योग आणि रूपांतरण – १२०

ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे म्हणजे ‘योग’. माणसाच्या अंतरंगात आणि बाहेर असणाऱ्या, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ‘ईश्वरा’शी योगी स्वतःचे थेट नाते प्रस्थापित करतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ‘ईश्वरा’चे सामर्थ्य प्रवाहित करण्याची तो एक वाहिनी (channel) बनतो. मग ते शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या भूमिकेद्वारे असेल.

– जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची व्यक्तिगत दलदल सोडून, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, इतरांसाठी जगू लागतो;
– जेव्हा तो सुयोग्य रीतीने आणि प्रेमाने व उत्साहाने कर्म करू लागतो; मात्र परिणामांची चिंता सोडून देतो, तो विजयासाठी उत्सुक नसतो किंवा पराजयाची भीतीही बाळगत नाही;
– जेव्हा तो त्याची सारी कर्मे ‘ईश्वरा’ला अर्पण करतो आणि आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती दिव्यत्वाच्या वेदीवर अर्पण करतो;
– जेव्हा तो भीती व द्वेष, घृणा व किळस, आसक्ती यांपासून मुक्त होतो आणि ‘प्रकृती’च्या शक्तींप्रमाणे, कोणतीही घाईगडबड न करता, अविश्रांतपणे, अपरिहार्यपणे, परिपूर्णपणे कर्म करतो;
– जेव्हा तो, ‘मी म्हणजे देह आहे’, ‘मी म्हणजे हृदय आहे’ किंवा ‘मी म्हणजे मन आहे’ किंवा ‘मी म्हणजे या तिन्हींची गोळाबेरीज आहे’; या विचारांच्या वर उठतो आणि जेव्हा तो स्वतःच्या, खऱ्या ‘स्व’ चा शोध घेतो;
– जेव्हा त्याला स्वतःच्या अमर्त्यतेची आणि मृत्युच्या अ-वास्तवतेची जाण येते;
– जेव्हा त्याला ज्ञानाच्या आगमनाची अनुभूती येते आणि जेव्हा मी स्वतः अकर्ता आहे, आणि ती दिव्य शक्ती माझ्या मनाच्या द्वारे, माझ्या वाणीच्या द्वारे, माझ्या इंद्रियांच्या द्वारे, आणि माझ्या सर्व अवयवांद्वारे अप्रतिहत (unresisted) रीतीने कार्य करत आहे, अशी जाण त्याला येते;
– अशा रीतीने, सर्वांचा ‘स्वामी’, मानवतेचा ‘साहाय्यक’ आणि ‘सखा’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत तो मनुष्य स्वतः जे काही आहे, तो स्वतः जे काही करतो ते आणि त्याच्यापाशी जे काही आहे, अशा सर्व गोष्टींचा, जेव्हा परित्याग करतो तेव्हा मग, तो नित्य त्या ‘ईश्वरा’मध्ये निवास करू लागतो आणि मग अशा तऱ्हेने दुःख, अस्वस्थता किंवा मिथ्या क्षोभ यांची त्याला बाधा होत नाही; तेव्हा तोच ‘योग’ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 11)

साधना, योग आणि रूपांतरण – ११९

(श्री अरविंद एका साधकाला पत्रामध्ये लिहीत आहेत….)

तुम्ही कार्यासाठी (ईश्वरी) ‘शक्ती’चा उपयोग करून घेतलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या ‘शक्ती’चे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब तितकीशी महत्त्वाची नसते; तर ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले गेले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक नसेल आणि प्राणिक असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’चे ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 271)

साधना, योग आणि रूपांतरण – ११८

(पूर्वार्ध – “कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही”, असे श्रीमाताजींनी सांगितले.)

उत्तरार्ध –

तुम्ही (कर्मरूप न बनता) केवळ एक ‘कर्म करणारी व्यक्ती’ असे बनून राहिलात; तसेच जर तुमचे विचारही भरकटत राहिले तर निश्चितपणे असे होईल की, जर तुम्ही कोणत्या नाजूक वस्तू हाताळत असाल तर त्या मोडतील, तुटतील; तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमच्या हातून एखादा पदार्थ करपून जाईल, तुम्ही जर खेळत असाल तर त्यात तुम्ही पराभूत व्हाल. म्हणून कर्म ही एक उत्तम साधना असते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला ती साधना चांगल्या रीतीने करायची असेल तर (कर्म करत असताना स्वत: कर्मरूप होणे) हाच एक मार्ग आहे.

…अगदी सगळ्या गोष्टींबाबत हे असेच असते. कोणतीही गोष्ट जर योग्य प्रकारे केली तर ती योग-साधनेचा भाग बनू शकते. आणि योग्य प्रकारे केली नाही तर अगदी (तुम्ही करत असलेल्या) तपस्येचा देखील काही उपयोग होऊ शकणार नाही आणि परिणामी तुमची प्रगतीसुद्धा होणार नाही. कारण परत तेच! तुम्ही जर तपस्या करत असाल आणि ती करत असताना सदासर्वकाळ स्वत:कडे पाहात असाल आणि स्वत:च्या मनाशी असे विचार करत असाल असाल की, ”माझी प्रगती होत आहे ना? माझे भले होईल ना? मी यशस्वी होईन ना?” तर तेव्हा तो तुमचा अहंकार असतो, तो हळूहळू वाढत जातो आणि सर्व जागा व्यापून टाकतो, मग तो अन्य कशालाच जागा शिल्लक ठेवत नाही. आध्यात्मिक अहंकार हा तर सर्वात वाईट असतो कारण तो त्याच्या स्वत:च्या हीनपणाबद्दल पूर्णपणे बेसावध असतो. ‘मी पूर्णपणे दिव्य नसलो तरी मी खूप श्रेष्ठ आहे,’ अशी त्याची समजूत असते.

…(वर उल्लेख केल्याप्रमाणे, व्यक्ती स्वत: कर्मरूप बनून न जाता, कर्म करणारी आणि ते करताना सातत्याने स्वत:कडेच बघत राहणारी व्यक्ती बनून राहिली आणि) पुन्हापुन्हा स्वत:कडे मागे वळून बघत राहिली, म्हणजेच ती स्वत:ला सूक्ष्म अहंकाराच्या मर्यादांमध्ये कोंडून घेत राहिली तर त्यातून न्यूनगंड, मर्यादा, क्षुद्रपणा, अक्षमता या सर्व गोष्टी निर्माण होतात. व्यक्तीने आपली दारे खुली केली पाहिजेत, स्वत:ला व्यापक केले पाहिजे. आणि त्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, तुम्ही जे काही कर्म करत आहात त्या कर्मावरच लक्ष केंद्रित करणे तुम्हाला जमले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 362-364)

साधना, योग आणि रूपांतरण – ११७

(कर्म हे साधनेचा भाग कसा होऊ शकते हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

व्यक्तीने कर्मामध्ये अधिकाधिक गढून जाण्याचा आणि परिणामतः स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कर्म आपण ‘ईश्वरा’ला अर्पण करत आहोत या भावनेने केले पाहिजे; अगदी निरलसपणे, विपुल प्रमाणात, स्वत:ला पूर्णपणे विसरून, स्वत:मधील सर्व काही देऊ करण्याच्या भावनेने केले पाहिजे. व्यक्तीने स्वत:बद्दल विचार न करता, फक्त करत असलेल्या कर्माचाच विचार केला पाहिजे.

…तुम्हाला जर एखादी गोष्ट उत्तम रीतीने करायची असेल, मग ती कोणतीही का असेना, एखादा खेळ खेळणे, पुस्तक लिहिणे, चित्र काढणे, गायनवादन करणे किंवा अगदी एखादी शर्यत जिंकणे अशी ती कोणतीही गोष्ट असू शकते. ती जर तुम्हाला उत्तम रीतीने करायची असेल तर तुम्ही ती गोष्टच बनले पाहिजे; ते कर्म करताना स्वतःकडे पाहणारी तुमच्यातील ती क्षुद्र व्यक्ती शिल्लक राहता कामा नये. कारण व्यक्ती जर कर्म करताना स्वत:कडे पाहू लागली… तर ती व्यक्ती अजूनही अहंकारामध्ये गुंतलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. व्यक्ती जे कर्म करत आहे ते कर्मच जर ती झाली, तर ती एक मोठी प्रगती ठरते.

कर्म करताना अगदी बारीकसारीक गोष्टींमध्येही व्यक्तीने असे करायला शिकले पाहिजे. एक मजेशीर उदाहरण पाहा : समजा, तुम्हाला एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी ओतायचे असेल; तर तेव्हा तुम्ही एकाग्र होता (एक शिस्त, एक प्रकारचा व्यायाम म्हणून तुम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे.) जोपर्यंत ज्या बाटलीत पाणी भरायचे असते ती बाटली तुम्ही असता, ज्या बाटलीतून पाणी भरायचे ती बाटलीही तुम्ही असता आणि ती पाणी ओतण्याची प्रक्रियाही तुम्हीच असता, जोपर्यंत तुम्ही केवळ तेच असता तोवर सगळे काही नीट चालू असते. पण चुकून तुम्ही एक क्षणभर जरी विचार केलात : ”अरे वा! पाणी न सांडता भरलं जातंय, अरे मला जमतंय की!” त्याच क्षणी पाणी सांडतं. (कारण असा कोणताही विचार येताक्षणी व्यक्ती त्या कर्मापासून विभक्त झालेली असते.) प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी सर्वच गोष्टींमध्ये हे असेच घडते.

आणि म्हणूनच, कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 04 : 362)

साधना, योग आणि रूपांतरण – ११६

तुम्ही सतत मनामध्ये कोणत्या तरी गोष्टींबाबत चिंता करत असता, विचार करत असता की, “हे बरोबर नाही, माझ्यातील किंवा माझ्या कामातील ही गोष्ट चुकीची आहे,” आणि परिणामतः “मी कुचकामी आहे, मी वाईट आहे, माझे काहीच होऊ शकणार नाही.” असा विचार तुम्ही सतत करत राहता आणि त्यातूनच, त्याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला अडचणी येताना दिसतात. उदाहरणार्थ, तुम्ही करत असलेले भरतकाम, तयार करत असता त्या लँपशेड्स इ. गोष्टी खरोखरच नेहमी उत्तम असतात आणि तरीही तुम्ही सतत असाच विचार करत राहता की, “हे काम चांगले झाले नाहीये, ते चुकीचे झाले,” आणि असा विचार करत राहिल्यानेच तुम्ही गोंधळात पडता आणि सारेकाही बिघडते. साहजिकपणेच मग तुम्ही सतत चुका करत राहता; आणि तुम्ही जेव्हा साध्यासरळपणे व आत्मविश्वासाने काम करता तेव्हापेक्षा, जेव्हा तुम्ही काळजी करत असता तेव्हा अधिक चुका करता.

कर्म असो की साधना असो धीमेपणाने वाटचाल करत राहणे अधिक बरे! ‘शक्ती’ला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे आणि तिला तिचे कार्य योग्य रीतीने करता यावे म्हणून, स्वतःला त्रास करून न घेता किंवा पदोपदी सतत अस्वस्थपणे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न उपस्थित न करता, तुम्ही तुमचे कर्म सर्वोत्तम रीतीने केले पाहिजे. तुम्ही जर ते दोष सतत उगाळत राहिला नाहीत तर, जे कोणते दोष असतील ते यथावकाश निघून जातील; कारण सातत्याने त्या दोषांचा विचार करत राहिल्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होत आहे. तसेच, वास्तविक जी कायमच तेथे समानत्वाने असते त्या ‘शक्ती’प्रत खुले होण्याच्या तुमच्या क्षमतेवरील तुमचा विश्वासही डळमळीत होत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहूनच त्या ‘शक्ती’च्या कार्य करण्याच्या मार्गामध्ये अनावश्यक अडथळे निर्माण करत आहात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 284)

साधना, योग आणि रूपांतरण – ११५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला अजून जरी सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका. कोणतेही काम करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे आणि त्याला ते अर्पण करणे आणि ते संपल्यावर (‘ईश्वरा’प्रति) कृतज्ञता व्यक्त करणे हे (तुमच्या) सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा काम करत असताना मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवावे.

…लोकं काम करताना जेव्हा सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते स्मरण त्यांच्या मनाच्या मागे असते. किंवा त्यांच्यामध्ये एकाच वेळी दोन विचारांची किंवा दोन चेतनांची एक क्षमता हळूहळू निर्माण झालेली असते. त्यापैकी एक चेतना पृष्ठभागी राहून कर्म करत असते आणि दुसरी चेतना साक्षी असते व स्मरण ठेवत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग राहिलेला होता. अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआप घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्यासरळ सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही.

कर्म करण्यासाठी महत्तर ‘शक्ती’ला आवाहन करत, अभीप्सा बाळगणे आणि आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की, जिच्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही लोकांना जरी त्यासाठी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयत्नांनीच करण्यापेक्षा, (आपल्या) अंतःस्थित असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’द्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे हे साधनेचे महान रहस्य आहे.

मनाद्वारे केलेले प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही. मात्र, तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या मनाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तसे करणे अध्यात्मामध्ये निपुण असणाऱ्यांना शक्य असते, पण इतरांना मात्र फार कष्टदायक ठरते.

…धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्येच आवश्यक असतात. बलवंतांसाठी सामर्थ्य हे ठीक आहे परंतु अभीप्सा आणि तिला ‘ईश्वरी कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे सर्वस्वी दंतकथा (myths) आहेत, असे नाही; तर या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 214-215)

साधना, योग आणि रूपांतरण – ११४

‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच नेहमी कृती करण्यास तुम्ही शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये.
*
योगसाधनेमुळे चेतना विकसित झाली असेल तर, व्यक्ती अभीप्साही बाळगू शकते आणि त्याच वेळी कामाकडेही लक्ष पुरवू शकते आणि त्याच वेळी इतर अनेक गोष्टीही करू शकते.
*
कामामध्ये व्यग्र असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने कामामध्ये व्यग्र असतानादेखील असतानाच या उपस्थितीची जाणीव आपोआप होऊ लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 254), (CWSA 29 : 256), (CWSA 29 : 258-259)

साधना, योग आणि रूपांतरण – ११३

माणसं सहसा प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती वा यश किंवा पद वा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याचा आनंद मिळावा यासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि त्यामध्ये ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि त्यांची प्रकृती व त्यांचे ‘कर्म’ यांच्या फलस्वरूप असलेल्या सुदैवानुसार किंवा दुर्दैवानुसार यशस्वी होतात किंवा अपयशी ठरतात.

(परंतु) एखादी व्यक्ती जेव्हा योगमार्ग स्वीकारते आणि स्वतःचे जीवन ‘ईश्वरा’र्पण करू इच्छिते तेव्हा प्राणिक अस्तित्वाच्या या सामान्य प्रेरणांना पुरेसा आणि मुक्त वाव मिळेनासा होतो; अशा वेळी त्यांची जागा इतर प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे. प्रामुख्याने आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणांनी त्यांची जागा घेतली पाहिजे, त्यामुळे साधकाला पूर्वीच्याच ऊर्जेनिशी कर्म करणे शक्य होऊ शकते. आता ते कर्म त्याने स्वतःसाठी केलेले नसते, तर ते ‘ईश्वरा’साठी केलेले असते.

सामान्य प्राणिक प्रेरणा किंवा प्राणिक शक्ती ही जर मुक्तपणाने कार्यरत होऊ शकली नाही आणि तरीही इतर कोणत्या गोष्टीने तिची जागा घेतली नाही तर, कदाचित त्यानंतर, कर्मामध्ये लावण्यात आलेला जोर किंवा शक्ती कमी होण्याची शक्यता असते किंवा यशप्राप्तीसाठी लागणारी शक्तीही तेथे शिल्लक न राहण्याची शक्यता असते. प्रामाणिक साधकासाठी ही अडचण तात्कालिकच असू शकते; परंतु त्याने त्याच्या आत्मनिवेदनातील किंवा त्याच्या प्रवृत्तीतील दोष शोधून तो काढून टाकला पाहिजे. तेव्हा मग दिव्य ‘शक्ती’ स्वतःहून अशा साधकाच्या माध्यमातून कार्य करू लागेल आणि तिचे साध्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता व प्राणिक शक्ती यांचा उपयोग करून घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 233)