साधना, योग आणि रूपांतरण – १३२

तुम्हाला न आवडणारे काम तुम्ही केलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे चोचले पुरविण्यासारखे आणि त्याचे तुमच्या प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवनव्यवहारांवर आवडी-निवडीचे प्राबल्य असणे हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे लक्षण असते.

कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगाची खरी प्राणिक आणि आंतरात्मिक अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 248)

साधना, योग आणि रूपांतरण – १३१

कर्म हे ‘पूर्णयोगा’चे एक आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही तुमची वास्तवावरील पकड गमावून बसाल; (तुमची जीवनव्यवहाराशी फारकत होईल.) आणि तुम्ही स्वतःच्याच, व्यक्तिनिष्ठ अशा कोणत्यातरी अनियंत्रित कल्पनांमध्ये वाहवत जाऊन, स्वतःला हरवून बसाल…

भौतिक वास्तवाच्या (जीवनव्यवहारातील) सर्व संबंधांना दूर लोटून आणि (तुमच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाकडे लक्ष न पुरवता) केवळ एकाच म्हणजे व्यक्तिनिष्ठ अस्तित्वामध्येच (आंतरिक जीवनामध्ये) निवृत्त होऊन, तुम्ही चुकीच्या मार्गाला जात आहात आणि तुमची साधना तुम्ही धोक्यात आणत आहात, हे मी तुम्हाला निक्षून सांगतो…

सर्व प्रकारची आसक्ती आणि आत्म-रती या गोष्टी घातक असतात. वस्तुनिष्ठ जीवनातील ‘सत्य’ बाजूला ठेवणे आणि आसक्ती बाळगणे तसेच व्यक्तिनिष्ठ अनुभव व दूरस्थ ‘ध्यानादी’ गोष्टींमध्ये आत्म-रत होणे, या गोष्टी इतर कोणत्याही गोष्टींइतक्याच धोकादायक असतात. अशा चुका करू नका आणि साधनेचा खरा समतोल पुन्हा संपादन करून घ्या. तुम्हाला भौतिक जीवनामध्ये जर अंतरात्मा प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर, केवळ ध्यानाला बसून आणि अमूर्त अनुभव घेऊन तो प्राप्त होणार नाही. भौतिक जीवन व त्यातील कर्मं यामध्ये त्याचा शोध घेतल्यानेच आणि प्रत्यक्षात इथे उपस्थित असलेल्या श्रीमाताजींचे आज्ञापालन केल्याने व कर्म-समर्पण केल्याने, तसेच श्रीमाताजींचे कार्य केल्याने तो तुम्हाला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 248-250)

साधना, योग आणि रूपांतरण – १२९

एक क्षण असा येईल की, जेव्हा तुम्ही कर्ते नसून फक्त एक साधन आहात, हे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका प्रगाढ होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे याबाबत खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल. आणि मग कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणा देते किंवा मार्गदर्शनच करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते आणि तीच ते कर्म घडवते देखील! तेव्हा तुम्हाला तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावत आहेत, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे सचेत आणि आनंदी साधन बनले असल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनले असल्याची जाणीव होईल; या जडभौतिक विश्वामध्ये आपण तिच्या आविष्करणाचे साचे बनलो आहोत अशी जाणीव तुम्हाला होईल. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला तुमच्या अज्ञानजन्य दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट आनंदामध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकारात्मक विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला अ-बाधित ठेवण्याची नेहमीपेक्षाही अधिक आवश्यकता असते. तसेच आत्म-दानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रहदेखील तुम्ही धरता कामा नये. कर्म किंवा त्याचे फळ यासंबंधी कोणतीही आसक्ती तुमच्यामध्ये असता कामा नये, तुम्ही कोणत्याही अटी त्या दिव्य शक्तीवर लादता कामा नयेत. मी त्या दिव्य शक्तीचे साधन बनलो आहे असा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार तुम्हाला असता कामा नये. त्या दिव्य शक्तींचा वापर तुमच्या मनाच्या, प्राणाच्या किंवा शरीराच्या वैयक्तिक समाधानासाठी किंवा वापरासाठी करून, तुमच्या माध्यमाद्वारे कार्यरत असणाऱ्या त्या शक्तींची महानता तुम्ही विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12-13)

साधना, योग आणि रूपांतरण – १२८

तुम्हाला जर ईश्वरी कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता व्हायचे असेल तर, सर्व इच्छा- वासनांपासून आणि स्व-केंद्रित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले एक अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट (ईश्वराची) सेवा करणे, (दिव्य शक्ती) ग्रहण करणे, परिपूर्ण होणे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच असले पाहिजे. तुम्ही दिव्य चेतनेमध्ये अशा रीतीने वृद्धिंगत होत राहिले पाहिजे की, एक दिवस तुमची इच्छा आणि तिचा संकल्प यामध्ये कोणताही भेद शिल्लक राहणार नाही. तिच्या ऊर्मीखेरीज अन्य कोणतीही प्रेरणा तुमच्यामध्ये असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म (तुमच्यामध्ये शिल्लक) असता कामा नये. अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत, आपण स्वतः म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला, सारी कर्मे तिच्यासाठीच करणारा एक देह आणि आत्मा आहोत, असे तुम्ही स्वतःला समजले पाहिजे.

स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या दिव्य शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीवरील भर व त्याचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या (तुमच्या) प्रकृतीमधून तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड असता कामा नये. ‘दिव्य माते’चा संतोष आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून मिळणारा आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12)

साधना, योग आणि रूपांतरण – १२७

कर्मासाठी केलेले कर्म किंवा परतफेडीची, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक फळाची वा मोबदल्याची अपेक्षा न करता, इतरांसाठी केलेले कर्म असा सर्वसाधारणपणे, निरपेक्ष कर्माचा अर्थ होतो. परंतु ‘योगा’मध्ये मात्र ‘ईश्वरा’साठी केलेले इच्छाविरहित कर्म, हे कोणत्याही अटीविना वा मागणीविना एक अर्पण म्हणून केले जाते; केवळ ‘ईश्वरेच्छा’ म्हणूनच केले जाते अथवा ‘ईश्वरा’च्या प्रेमापोटी ते केले जाते, असा त्याचा अर्थ होतो.

*

स्वतःची आंतरिक प्रगती आणि परिपूर्णता यासाठी योगसाधना करणे हेच केवळ तुमचे उद्दिष्ट असता कामा नये तर, ‘ईश्वरा’साठी कार्य करायचे हेदेखील तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 231)

साधना, योग आणि रूपांतरण – १२६

अहंभावामध्ये राहू नये तर ‘ईश्वरा’मध्ये राहून जीवन जगावे; लहानशा, अहंभावयुक्त चेतनेमध्ये राहून नव्हे, तर ‘सर्वात्मक’ आणि ‘सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेमध्ये राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे. सर्व प्रसंगांमध्ये व सर्व जिवांशी पूर्णपणे समत्वाने वागावे; आपले स्वतःबरोबर आणि आपले ‘ईश्वरा’बरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वतःमध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ‘ईश्वरा’ मध्ये पाहावे; आणि ईश्वर सर्वांमध्ये आहे, आपण स्वतःदेखील इतर सर्वांमध्ये आहोत, ही जाणीव बाळगावी. अहंभावात राहून नव्हे, तर ‘ईश्वरा’मध्ये निमग्न राहून कर्म करावे.

आणि येथे पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक प्रमाण डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही कृतीची निवड करायची नाही; तर आपल्या ऊर्ध्वस्थित असणारे असे जे जिवंत सर्वोच्च ‘सत्य’ आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करायची.

दुसरी गोष्ट, आपण आध्यात्मिक चेतनेच्या पायावर पुरेसे सुस्थिर झालो तरीही आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करायची नाही; तर आपल्या अतीत असणाऱ्या ‘ईश्वरी इच्छे’च्या मार्गदर्शनानुसार आणि तिच्या प्रेरणेच्या प्रभावाने आपल्या कृतीला घडू देण्यास आणि विकसित होण्यास मुभा द्यायची.

आणि शेवटी या साधनेचा सर्वश्रेष्ठ परिणाम म्हणजे, आपण स्वतःला उन्नत करून, ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; ज्ञान, शक्ती, चेतना, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; आपली क्रियाशीलता मर्त्य अशा वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नसून, ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकसित होत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करायची. (आपल्यातील) प्रकृतीजन्य मनुष्याला दिव्य ‘आत्म्या’च्या आणि शाश्वत ‘चैतन्या’च्या जाणीवपूर्वक आधीन केल्याने आणि विलीन केल्यानेच ही गोष्ट घडून येते…

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 101)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

साधना, योग आणि रूपांतरण – १२५

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पण-भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला, एखादी व्यक्ती जर कर्म करताना श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट प्रकारच्या एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची तिला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती हे कार्य करत आहे, हे कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, त्या कर्माची प्रारंभिक प्रेरकशक्ती असणारे प्रेम वा भक्ती या साऱ्याच्या पाठीमागे तशीच टिकून राहू शकते; ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि अंधकारानंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उदय पावू शकते.

सर्व साधना ही अशीच असते आणि म्हणूनच या अंधकारमय क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर (ईश्वरविषयक) मूळ उत्कट आस (urge) आपल्या अंतरंगामध्ये तशीच टिकून आहे आणि हे अंधकारमय क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच आपल्याला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242)

साधना, योग आणि रूपांतरण – १५६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘देवा’वर श्रद्धा असणे, ‘देवा’वर भरवसा ठेवणे, ‘दिव्य शक्ती’ला समर्पण व आत्मदान करणे या आवश्यक, अनिवार्य गोष्टी आहेत. पण ‘देवा’वरील भरवसा हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांच्या अधीन होण्याचे, किंवा दुर्बलता, निरुत्साह यासाठीचे निमित्त ठरता कामा नये. ‘दिव्य सत्या’च्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार देत आणि अथक अभीप्सा बाळगत विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे.

‘ईश्वरा’प्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांच्या, कनिष्ठ गती-प्रवृत्तींच्या अधीन होण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराच्या अधीन होण्याचे किंवा ‘ईश्वरा’चे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींच्या अधीन होण्याचे एक कारण, एक निमित्त होता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 87)

साधना, योग आणि रूपांतरण – १२४

(उत्तरार्ध)

आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून भगवद्गीता सातत्याने कर्माचे समर्थन करत आहे. भक्ती आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच कर्ममार्गाचे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. कृष्ण कर्माचा एक अधिक उच्चतर अर्थ लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा कर्मफलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे, असे त्याचे सांगणे आहे. धर्माला अनुसरून आणि योग्य प्रकारे कर्म केल्यास, कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास हरकत नाही, अशा कर्माने ‘ईश्वरा’कडे जाण्याच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा आणि आध्यात्मिक जीवनाचा मार्गही त्याने अवरूद्ध (prevent) होत नाही. या गोष्टींकडे पाहण्याचा भारताचा हा दृष्टिकोन पूर्वापार चालत आलेला आहे.

अर्थातच एक संन्यासवादी ध्येयसुद्धा काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान आहे. मी स्वतःसुद्धा असे म्हणतो की, व्यक्तीला जर एखाद्या तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या एकान्तवासामध्ये राहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकत नाही. हे उघडच आहे की, हावरटपणा, किंवा इतर कोणताही लोभ, किंवा अशा प्रकारची कोणतीही आसक्ती ही गोष्ट व्यक्तीच्या चेतनेमधून त्यागणे जितके आवश्यक असते त्याचप्रकारे संपत्तीची हाव आणि नफेखोरी या गोष्टीदेखील त्याच्या प्रकृतीमधून नाहीशा झाल्या पाहिजेत.

परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा अगदी अनिवार्य आहे किंवा संन्यासमार्ग म्हणजेच आध्यात्मिक मार्ग, असे मी मानत नाही. एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे. तसे नसते तर, भारतामध्ये जनक किंवा विदुरासारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय कृष्णदेखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो कृष्ण वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा अधिपती झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा कुरूक्षेत्रातील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता. महाभारतामध्ये किंवा अन्यत्र, भारतीय धर्मशास्त्रामध्ये आणि भारतीय परंपरेमध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला समान स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासमार्ग हाच तेवढा भारतीय परंपरेतून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्वप्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग युरोपियन किंवा पाश्चात्त्य आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो भारतीय नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 249-250)

साधना, योग आणि रूपांतरण – १२३

(पूर्वार्ध)

व्यापार-उदीम करण्यामध्ये काही गैर आहे, असे मी मानत नाही… तसे जर का मी समजत असतो तर आपला जो साधकवर्ग मुंबईत राहून पूर्व आफ्रिकेत व्यापार करत आहे त्या मंडळींनी त्यांचे व्यापारउदीम आहे तसेच चालू ठेवावेत म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहन कसे देऊ शकलो असतो? तसे असते तर, सारे काही सोडून द्या आणि केवळ आध्यात्मिक प्रगतीकडेच लक्ष पुरवा असे आम्हाला त्यांना सांगावे लागले असते. ‘क्ष’ त्यांचा गिरणी-उद्योग सांभाळता सांभाळता, अध्यात्म-प्रकाशासाठी साधना करत आहेत, याची संगती मग आपण कशी लावू शकतो? त्यांचा तो गिरणी-उद्योग त्यांनी तसाच वाऱ्यावर सोडून द्यावा, चोरापोरांच्या हाती द्यावा आणि ध्यानधारणा करण्यासाठी एखाद्या आश्रमात जाऊन राहावे, असे मला त्यांना सांगावे लागले नसते का? राजकारणावर जशी माझी पकड होती तसा जर मी व्यापारउदिमामध्ये प्रवीण असतो तर, यत्किंचितही नैतिक किंवा आध्यात्मिक पश्चात्ताप न होता, मी व्यापारउदिम केला असता.

एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते. राजकारण हे काही नेहमीच चांगले स्वच्छ असते असे नाही, किंबहुना बरेचदा ते तसे नसतेच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले. युद्धालादेखील आध्यात्मिक कृती म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि काहीजणांना युद्धावर पाठविले. कृष्णाने अर्जुनाला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून प्रोत्साहन दिले. आता, ‘कृष्ण हा आध्यात्मिक नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही प्रतिवाद करणार आहात का?

कृष्ण तर याही पुढे जाऊन असे उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत पोहोचू शकतो. ब्राह्मण, क्षत्रिय यांच्याप्रमाणेच कृष्ण वैश्यधर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. कृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने योगसाधना करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 248-249)