साधना, योग आणि रूपांतरण – १५३

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(भगवद्गीतेमध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या चार प्रकारच्या भक्तांचे उल्लेख आले आहेत. त्यातील ‘अर्थार्थी’ भक्ताच्या भक्तीविषयी एका साधकाने श्रीअरविंदांना काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले उत्तर…)

‘ईश्वरा’कडून काहीतरी मिळावे म्हणूनच केवळ ईश्वराचा शोध घेण्याची धडपड करायची हा लोकांचा दृष्टिकोन उचित नाही; पण अशा लोकांना पूर्णपणे मज्जाव केला तर जगातील बहुतांशी लोकं ईश्वरा’कडे कधीच वळणार नाहीत. लोकांची ईश्वराभिमुख होण्यास किमान सुरूवात तरी व्हावी म्हणून या गोष्टींना मुभा देण्यात आली असावी असे मला वाटतं. त्यांच्या ठिकाणी श्रद्धा असल्यास, त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना मिळू शकेल आणि मग हा मार्ग चांगला आहे, असे त्यांना वाटू लागेल आणि पुढे कधीतरी अचानकपणे एके दिवशी, ‘हे असे करणे बरं नाही’, (काहीतरी मिळावे म्हणून ‘ईश्वरा’कडे वळणे चुकीचे आहे) या विचारापाशी ती लोकं येऊन पोहोचतील. ‘ईश्वरा’भिमुख होण्याचे अधिक चांगले मार्ग आहेत आणि अधिक चांगल्या वृत्तीने ‘ईश्वरा’कडे वळले पाहिजे, हे त्यांना कळेल.

लोकांना जे हवे होते ते त्यांना मिळाले नाही आणि तरीसुद्धा जर ते ‘ईश्वरा’भिमुख झाले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आता त्यांची (ईश्वराभिमुख होण्याची) तयारी होत आहे हे दिसून येते. ज्यांची अजूनपर्यंत तयारी झालेली नाही अशा लोकांसाठीची ती बालवाडी आहे, असे समजून आपण त्याकडे पाहू या. पण अर्थातच हे काही आध्यात्मिक जीवन नव्हे, हा तर केवळ एक अगदी प्राथमिक धार्मिक दृष्टिकोन झाला.

कशाचीही अपेक्षा, मागणी न करता केवळ देत राहणे हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे. तथापि साधक, त्याचे आरोग्य उत्तम राहावे किंवा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या साधनेचा एक भाग म्हणून, ‘ईश्वरी शक्ती’ची मागणी करू शकतो; जेणेकरून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचे शरीर सक्षम होईल, सुयोग्य होईल आणि तो ‘ईश्वरी कार्या’साठी एक सक्षम साधन बनू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 08-09)

साधना, योग आणि रूपांतरण – १५२

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘ईश्वराची उपस्थिती’ जाणवेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी (CWM 16 : 160-161)

साधना, योग आणि रूपांतरण – १५१

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(श्रीअरविंदांच्या छायाचित्राकडे पाहत असताना, आपण जणू प्रत्यक्ष श्रीअरविंदांनाच पाहत आहोत, असे एका साधकाला जाणवले आणि त्याने तसे त्यांना लिहून कळविले आहे. त्याला दिलेल्या उत्तरादाखल श्रीअरविंद लिहितात…)

छायाचित्र हे केवळ काहीतरी व्यक्त करण्याचे माध्यम असते, पण तुमच्यापाशी जर योग्य चेतना असेल, तर जिवंत व्यक्तीमधील काहीतरी तुम्ही त्या छायाचित्रात प्रत्यक्षात उतरवू शकता किंवा ते छायाचित्र ज्या व्यक्तीचे आहे, त्या व्यक्तीची जाणीव ते छायाचित्र पाहून तुम्हाला होऊ शकते आणि त्या छायाचित्राला तुम्ही संपर्काचे माध्यम बनवू शकता. मंदिरामधील मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते, तसेच हे असते.

*

आंतरिक भक्ती महत्त्वाची असते आणि ती नसेल तर बाह्य भक्ती ही केवळ एक कृती आणि उपचार होऊन बसते. परंतु बाह्य भक्ती ही जर साधीसरळ आणि प्रामाणिक असेल तर तिचासुद्धा काही उपयोग असतो, आणि तिचेसुद्धा एक स्थान असते.

*

यांत्रिक किंवा कृत्रिम भक्ती अशी कोणती गोष्टच अस्तित्वात असू शकत नाही. एकतर भक्ती असते किंवा ती नसते. भक्ती ही उत्कट असू शकते किंवा नसू शकते, ती परिपूर्ण किंवा अपूर्ण असू शकते. कधीकधी ती आविष्कृत होते तर कधी अप्रकट असते. परंतु यांत्रिक किंवा कृत्रिम भक्ती या संकल्पनेमध्येच विसंगती आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 363, 355, 355)

साधना, योग आणि रूपांतरण – १५०

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(केवळ प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वरी उपस्थितीची जाणीव, अनुभूती, साक्षात्कार इत्यादी काहीच साध्य होत नाहीये, असे एका साधकाने श्रीअरविंदांना लिहून कळविले आहे. त्यावर त्यांनी दिलेले हे उत्तर…)

…निव्वळ प्रार्थनेद्वारे या गोष्टी लगेचच प्राप्त होतील, असे सहसा घडत नाही. परंतु (तुमच्या अस्तित्वाच्या) गाभ्यामध्ये जर जाज्वल्य श्रद्धा असेल किंवा अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिपूर्ण श्रद्धा असेल तरच तसे घडून येते. परंतु याचा असा अर्थ नाही की, ज्यांची श्रद्धा तितकीशी दृढ नाही, किंवा ज्यांचे समर्पण परिपूर्ण नाही ते तिथवर पोहोचूच शकत नाहीत. परंतु मग सहसा त्यांना सुरुवातीला छोट्या छोट्या पायऱ्या पार कराव्या लागतात; आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कालांतराने तपस्येद्वारे आणि प्रयत्नसातत्याद्वारे त्यांना पुरेसे खुलेपण प्राप्त होते. एवढेच नव्हे तर, डळमळणारी श्रद्धा आणि संथ, आंशिक समर्पण यांचीसुद्धा स्वत:ची म्हणून काहीएक शक्ती असते, त्यांचे स्वत:चे असे काही परिणाम असतात. तसे नसते तर, अगदी मोजक्या लोकांनाच साधना करणे शक्य झाले असते. केंद्रवर्ती श्रद्धा म्हणजे ‘आत्म्या’ वर किंवा मागे असलेल्या ‘केंद्रवर्ती अस्तित्वा’वर श्रद्धा असे मला म्हणायचे आहे. ही अशी श्रद्धा असते की, जेव्हा मन शंका घेते, प्राण खचून जातो, आणि शरीर ढासळू पाहते तेव्हासुद्धा ही श्रद्धा टिकून असते. आणि जेव्हा हा आघात संपतो, तेव्हा ती श्रद्धा पुन्हा उसळून येते आणि पुन्हा एकदा मार्गक्रमण करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 95-96)

साधना, योग आणि रूपांतरण – १४९

पूर्णयोगांतर्गत भक्ती

आपल्यापेक्षा जे महान आहे त्याची केलेली पूजा, आराधना, त्याच्याप्रति केलेले आत्मार्पण हे ‘भक्ती’चे स्वरूप असते. तर त्याच्या सान्निध्याची आणि ऐक्याची आस बाळगणे किंवा तशी भावना असणे हे ‘प्रेमा’चे स्वरूप असते. आत्मदान हे दोन्हीचे लक्षण असते. भक्ती आणि प्रेम या दोन्ही गोष्टी योगमार्गामध्ये आवश्यक असतात आणि दोन्ही गोष्टींना पूर्ण शक्ती तेव्हाच प्राप्त होते जेव्हा एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीला आधार असतो.
*
मला वाटते, ‘प्रेमभक्ती’ म्हणजे अशी भक्ती की जिचा प्रेम हा आधार असतो. पूजाअर्चना, शरणागती, आदरभाव, आज्ञापालन इत्यादी प्रकारची पण प्रेमविरहित अशी भक्ती देखील असू शकते.
*
निःस्वार्थीपणा, आत्मदान, संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास, कोणत्याही मागणीचा व इच्छेचा अभाव, ‘ईश्वरी संकल्पा’प्रति समर्पण, ‘ईश्वरा’वर एकवटलेले प्रेम ही खऱ्या प्रेमाची आणि भक्तीची काही लक्षणं आहेत.
*
भक्ती हा काही अनुभव नाही तर, ती हृदयाची आणि आत्म्याची एक अवस्था आहे. चैत्य पुरुष जागृत आणि अग्रेसर असताना ही अवस्था येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 356, 356, 356, 95)

साधना, योग आणि रूपांतरण – १४८

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : नामजपाबद्दलची माझी जुनीच ऊर्मी पुन्हा एकदा उफाळून आली आहे, त्याबद्दल मला वाईट वाटत आहे. नामजपाचे परिणाम दिसून यावेत म्हणून कदाचित माझे मन त्याचा अतिरेक करत असावे.

श्रीअरविंद : व्यक्तीने जपाचा अर्थ समजून घेतला, आणि त्या अर्थानिशी नामजप केला, तसेच त्या नामजपामधून ज्या ‘देवते’चा बोध होतो त्याविषयीचे एक आकर्षण, तिचे सौंदर्य, तिची शक्ती किंवा तिचे स्वरूप मनामध्ये साठवून जर नामजप केला आणि या गोष्टी चेतनेमध्ये उतरविल्या तर नामजप यशस्वी होतो. हा नामजपाचा ‘मानसिक मार्ग’ झाला. किंवा जर तो नामजप हृदयामधून उदित होत असेल किंवा तो नामजप ज्यामुळे चैतन्यमय होईल अशी भक्तीची भावना किंवा तशी विशिष्ट जाणीव जर व्यक्तीमध्ये निनादत राहिली तर मग तो नामजप यशस्वी होतो, हा नामजपाचा ‘भावनिक मार्ग’ आहे. जप हा सहसा वरील दोनपैकी कोणत्या तरी एका परिस्थितीमध्ये यशस्वी होतो.

जप यशस्वी होण्यासाठी त्याला मनाचा किंवा प्राणाचा आधार द्यावा लागतो किंवा त्याचे पोषण करावे लागते. परंतु जर जपामुळे मन रूक्ष होत असेल आणि प्राण अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये या आधाराचा किंवा पोषणाचा अभाव असतो हे निश्चित समजावे.

अर्थात आणखी एक तिसरा मार्गसुद्धा असतो. आणि तो म्हणजे त्या नामाच्या किंवा मंत्राच्या शक्तीवरच विसंबून राहायचे. परंतु जोवर ती शक्ती व्यक्तीच्या आंतरिक अस्तित्वावर त्या जपाच्या स्पंदनांचा प्रभाव उमटवीत नाही तोवर व्यक्तीने नामजप चालूच ठेवणे आवश्यक असते; असा प्रभाव पडल्यावर, मग कधीतरी अवचित एखाद्या क्षणी व्यक्ती ईश्वरी ‘अस्तित्वा’प्रत किंवा त्याच्या ‘स्पर्शा’प्रत खुली होते. परंतु हे घडून यावे म्हणून जर अट्टहास किंवा धडपड केली जात असेल तर, ज्या प्रभावाला मनाच्या अविचल ग्रहणशीलतेची आवश्यकता असते त्यामध्ये बाधा निर्माण होते. आणि म्हणूनच मनावर अधिक ताण न देता किंवा अतिरिक्त प्रयत्न न करता, मनाच्या अविचलतेवर अधिक भर देण्यास मी सांगत होतो. ग्रहणशीलतेची आवश्यक परिस्थिती मनामध्ये आणि अंतरात्म्यामध्ये विकसित व्हावी म्हणून त्यांना अवधी देणे आवश्यक असते. व्यक्तीला काव्याची किंवा संगीताची जशी स्फूर्ती येते त्याचप्रमाणे ही ग्रहणशीलतादेखील अगदी स्वाभाविक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 328-329)

साधना, योग आणि रूपांतरण – १४७

पूर्णयोगांतर्गत भक्ती

नामोच्चारणामध्ये शक्ती असते पण ते जर हृदयातून आणि अंतःकरणातून आलेले असेल तरच! केवळ मनाद्वारे केलेली पुनरावृत्ती पुरेशी नसते.
*
कोणत्याही देवदेवतेचे नामस्मरण केले तरी त्या नामस्मरणाला प्रतिसाद देणारी ‘शक्ती’ म्हणजे (स्वयं) श्रीमाताजीच असतात. प्रत्येक नामाद्वारे ईश्वराच्या एका विशिष्ट पैलूचा निर्देश होतो आणि ते नाम त्या पैलूपुरतेच मर्यादित असते; श्रीमाताजींची शक्ती मात्र वैश्विक आहे.
*
साहजिकच आहे की, व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये ज्या कोणत्या नामावर लक्ष केंद्रित करते, ते नाम निद्रावस्थेमध्येसुद्धा आपोआप पुनरावृत्त होत राहते. परंतु निद्रावस्थेमध्ये श्रीमाताजींच्या नामाचा धावा करणे हे नामस्मरणच असेल असे नाही. बरेचदा असे होते की, आंतरिक पुरुष अडचणीमध्ये असताना किंवा त्याला तशी निकड जाणवत असेल तर तो श्रीमाताजींना आवाहन करत असतो.
*
श्वासाबरोबर नामस्मरण करण्यास मी फारसे प्रोत्साहन देत नाही कारण मग ते प्राणायामासारखे होते. प्राणायाम ही अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे, परंतु प्राणायाम जर घाईगडबडीने केला गेला तर त्यातून अडथळे निर्माण होऊ शकतात आणि अतिशय टोकाच्या परिस्थितीमध्ये तर त्यामुळे शरीराला आजारपण येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १४६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरा’चे नामस्मरण हे सहसा संरक्षणासाठी, आराधनेसाठी, भक्तीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी, आंतरिक चेतना खुली व्हावी यासाठी आणि भक्तिमार्गाद्वारे ‘ईश्वरा’चा साक्षात्कार व्हावा यासाठी केले जाते.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम!

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तकामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती या योगामध्ये अवलंबल्या जातात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता हृदयामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती जाणवू लागते आणि प्रकृतीमध्ये, स्वभावामध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडू लागते.

मस्तककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326 & 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १४५

पूर्णयोगांतर्गत भक्ती

श्रीअरविंद : प्रेम आणि भक्ती ही चैत्य पुरुषाच्या खुले होण्यावर अवलंबून असते आणि त्यासाठी इच्छावासना नाहीशा होणे आवश्यकच असते. बऱ्याच जणांकडून श्रीमाताजींप्रति आंतरात्मिक प्रेमाऐवजी प्राणिक प्रेम अर्पण करण्यात येते; इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या प्राणिक प्रेमामुळे अधिकच अडथळे निर्माण होतात कारण त्यामध्ये इच्छावासना मिसळलेल्या असतात.

साधक : श्रीमाताजींविषयीची आंतरात्मिक भक्ती, मानसिक भक्ती आणि प्राणिक भक्ती यांचे स्वरूप कसे असते? ते कसे ओळखावे?

श्रीअरविंद : कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेले आत्मदान आणि प्रेम हे ‘आंतरात्मिक भक्ती’चे स्वरूप असते, तर श्रीमाताजींनी मला त्यांचे अंकित करावे आणि मी त्यांची सेवा करावी ही इच्छा हे ‘प्राणिक भक्ती’चे स्वरूप असते. आणि ‘श्रीमाताजी’ जशा आहेत, त्या जे सांगतात आणि त्या जे करतात त्याचा, कोणताही किंतुपरंतु न बाळगता केलेला स्वीकार आणि श्रद्धा हे ‘मानसिक भक्ती’ चे स्वरूप असते. वस्तुतः ही भक्तीची बाह्य लक्षणे आहेत. त्यांचे आंतरिक स्वरूप ओळखता येण्याइतके सुस्पष्ट असते पण त्यांतील भेद शब्दांत मांडायची आवश्यकता नाही.

साधक : ‘पूर्णयोगा’मध्ये मानसिक आणि प्राणिक भक्तीला काही स्थान नाहीये का?

श्रीअरविंद : ती जर खरी भक्ती असेल तर त्या प्रत्येक भक्तीला येथे स्थान आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 475-477)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

साधना, योग आणि रूपांतरण – १४४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : आज संध्याकाळी श्रीमाताजींच्या दर्शनाच्या वेळी त्यांची दृष्टी माझ्यावर पडली आणि मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा दाटून आलेला आढळला. आणि आजवर मी यासाठीच आसुसलेलो होतो असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत मला अन्य कोणतीच इच्छा नाही, असे मला वाटले. मला ‘अहैतुकी भक्ती’ लाभावी, असे आपण वरदान द्यावे. श्रीरामकृष्ण परमहंस असे म्हणत की, ‘भक्तीची इच्छा ही काही इच्छा-वासना म्हणता यायची नाही.’ त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की, मीही अशाच भक्तीची इच्छा बाळगत आहे म्हणजेच, मी काही कोणताही व्यवहार करत नाहीये, कारण भक्ती हा ‘दिव्यत्वा’चा गाभा आहे, त्यामुळे भक्तीसाठी मी केलेली मागणी रास्त आहे ना?

श्रीअरविंद : ‘ईश्वरा’विषयी इच्छा किंवा ‘ईश्वरा’विषयी भक्ती ही एक अशी इच्छा असते की, जी इच्छा व्यक्तीला अन्य सर्व इच्छांपासून मुक्त करते. त्या इच्छेच्या अगदी गाभ्यात शिरून जर आपण पाहिले तर असे आढळते की, ती इच्छा नसते तर ती ‘अभीप्सा’ असते, ती ‘आत्म्याची निकड’ असते, आपल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाचा ती श्वास असते आणि त्यामुळेच तिची गणना इच्छा-वासना यांच्यामध्ये होत नाही.

साधक : श्रीमाताजींविषयी माझ्या मनामध्ये शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?

श्रीअरविंद : विशुद्ध उपासना, आराधना, कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ‘ईश्वरा’विषयी प्रेम बाळगणे याला म्हणतात ‘शुद्ध भक्ती’.

साधक : ती आपल्यामध्ये कोठून आविष्कृत होते?

श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476)