साधना, योग आणि रूपांतरण – २०२

आंतरात्मिक रूपांतरण (psychic transformation) हे दोन रूपांतरणांपैकी पहिले आवश्यतक असणारे रूपांतरण असते. तुमच्यामध्ये जर आंतरात्मिक रूपांतर झाले तर ते दुसऱ्या रूपांतरणास अतिशय साहाय्यक ठरते. हे दुसरे रूपांतरण म्हणजे सामान्य मानवी चेतनेचे उच्चतर आध्यात्मिक चेतनेमध्ये होणारे रूपांतरण. आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation) होण्यापूर्वी आंतरात्मिक रूपांतरण झाले नाही तर व्यक्तीचा प्रवास एकतर संथपणे व कंटाळवाणा होतो, अन्यथा तो उत्कंठावर्धक पण जोखमीचा होण्याची शक्यता असते.
*
अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, ब्रह्माचा अगदी साक्षात्कार जरी झाला तरी तो साक्षात्कार सुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380)

साधना, योग आणि रूपांतरण – २०१

व्यक्ती जर नेहमीच उच्चतर चेतनेमध्ये राहू शकली तर, ते अधिक चांगले असते. परंतु मग व्यक्ती नेहमीच तिथे का राहत नाही? कारण निम्नतर चेतना ही अजूनही प्रकृतीचा भाग आहे आणि ती चेतना तुम्हाला स्वतःच्या दिशेने खाली खेचत राहते. पण समजा निम्नतर चेतनाच रूपांतरित झाली तर, ती एक प्रकारे उच्चतर चेतनेचाच भाग बनते आणि मग खाली खेचण्यासाठी निम्न असे काही शिल्लकच राहात नाही.

मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये उच्चतर चेतना किंवा उच्चतर प्रकृती उतरविणे आणि तिने निम्नतर चेतनेची जागा घेणे म्हणजे ‘रूपांतरण’.

खऱ्या आत्म्याची एक उच्चतर चेतना असते, की जी आध्यात्मिक असते; ती ऊर्ध्वस्थित असते. एखाद्या व्यक्तीने जर त्या चेतनेमध्ये आरोहण केले तर, जेवढा काळ ती व्यक्ती तेथे असते तेवढा काळ ती मुक्त असते. परंतु ती व्यक्ती जर पुन्हा मन, प्राण आणि शरीरामध्ये उतरली किंवा त्यांचा उपयोग करू लागली आणि त्या व्यक्तीने जर जीवनाशी संबंध कायम ठेवला – अर्थात तिला तसे करावेच लागते – तर अशावेळी ती व्यक्ती एकतर खाली म्हणजे (मन, प्राण, शरीरामध्ये) उतरून, सामान्य चेतनेमध्ये राहून जीवन जगू लागते किंवा मग असेही घडू शकते की, ती व्यक्ती आत्मस्थित राहूनच मन, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करू लागते. या अवस्थेतील व्यक्तीला मन, प्राण आणि शरीरादी साधनांच्या अपूर्णतांना सामोरे जावे लागते आणि या साधनांमध्ये सुधारणा घडवून आणावी लागते. आणि ती सुधारणा फक्त ‘रूपांतरणा’द्वारेच घडविणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 422-423)

साधना, योग आणि रूपांतरण – २००

आमचा ‘योग’ हा रूपांतरणाचा ‘योग’ आहे; परंतु हे रूपांतरण म्हणजे समग्र चेतनेचे रूपांतरण असते; समग्र प्रकृतीचे तिच्या पायापासून ते माथ्यापर्यंतचे रूपांतरण असते, तिच्या अगदी गुप्त अशा आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य अशा बाह्यवर्ती वर्तनाच्या प्रत्येक भागाचे रूपांतरण असते. हा काही केवळ नैतिक बदल किंवा धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी संयमदेखील नव्हे, उदात्तीकरण किंवा जीवनाचे व प्राणिक प्रवृत्तींचे दमनही आम्हाला येथे अभिप्रेत नाही. ते काही गौरवीकरण नाही, की कठोर असे नियंत्रण नाही; किंवा भौतिक अस्तित्वालाच नकार देणेही आम्हाला अभिप्रेत नाही. न्यूनतेकडून अधिकतेकडे, कनिष्ठाकडून उच्चतराकडे, पृष्ठवर्ती जाणिवेकडून सखोल चेतनेप्रत होणारा बदल आम्हाला अभिप्रेत आहे. सर्वाधिक महान, उच्चतम, सखोलतम असे संभाव्यकोटीतील रूपांतरण आम्हाला अभिप्रेत आहे. तसेच समग्र अस्तित्वाचे त्याच्या साधनसामग्रीनिशी संपूर्ण परिवर्तन आणि क्रांती अभिप्रेत आहे; अस्तित्वाच्या प्रत्येक तपशीलाचे आजवर प्रत्यक्षीभूत न झालेल्या दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण होणे, हे आम्हाला अभिप्रेत आहे. सद्यस्थितीमध्ये जे गुप्त आणि अर्धजागृत आहे त्याला पुढे आणणे, सद्यस्थितीत आपल्यासाठी जे अतिचेतन (superconscient) आहे त्याबद्दल अधिक सचेत होणे, अवचेतन (subconscient) आणि अधोभौतिक (subphysical) गोष्टींचे प्रदीपन होणे असा याचा अर्थ आहे.

त्यामध्ये खालील बाबी अनुस्यूत आहेत –
१) सद्यस्थितीमध्ये आपल्या प्रकृतीवर मनाचे नियंत्रण असते, त्याची जागा आत्म्याच्या नियंत्रणाने घेणे.
२) प्रकृतीच्या साधनाचे बाह्याकडून, आता अर्ध-आवृतापेक्षा (half-veiled) अधिक उघड झालेल्या आंतरिक मनाकडे हस्तांतरण होणे.
३) बाह्याकडून आंतरिक प्राणाकडे किंवा आंतरिक जीवनाकडे हस्तांतरण होणे, बाह्यवर्ती शारीर चेतनेकडून आंतरिक सूक्ष्म विस्तीर्ण शारीर-चेतनेकडे हस्तांतरण होणे.
४) आपल्याला संचालित करणाऱ्या गुप्त वैश्विक शक्तींशी सद्यस्थितीत जो अप्रत्यक्ष आणि अचेतन किंवा अर्धचेतन संपर्क येतो, त्याची जागा या हस्तांतरणामुळे, थेट आणि चेतनयुक्त संपर्काने घेणे.
५) एका संकुचित, मर्यादित व्यक्तीमधून बाहेर पडून विशाल वैश्विक चेतनेमध्ये प्रवेश करणे.
६) मानसिक प्रकृतीमधून आध्यात्मिक प्रकृतीकडे उन्नत होणे.
७) मनामधील चैतन्याहूनही अधिक पुढे आरोहण करणे, किंवा मनाने अतिमानसिक चैतन्याच्या दिशेने उलगडत जाणे आणि त्या अतिमानसिक चेतनचे मूर्त अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

रूपांतरण पूर्णत्वाला जाण्यापूर्वीच या साऱ्या गोष्टी साध्य होणे आवश्यक असते, इतकेच नव्हे तर त्या सुसंघटित होणे देखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 371)

साधना, योग आणि रूपांतरण – १९९

(नमस्कार, आजची पोस्ट थोडी विस्तृत आहे, पण ‘रूपांतरण’ म्हणजे काय ते नेमकेपणाने समजावे या दृष्टीने ती सलग वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे सलग देत आहोत.)

‘रूपांतरण’ (transformation) याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ म्हणजे प्रकृतीमध्ये थोडेसे परिवर्तन होणे असा नाही. उदाहरणार्थ, संतत्व किंवा नैतिक परिपूर्णत्व किंवा (तांत्रिकांना अवगत असलेल्या) योगसिद्धी किंवा चिन्मय देह असा कोणताच अर्थ मला त्यात अभिप्रेत नाही. मी ‘रूपांतरण’ हा शब्द एका विशिष्ट अर्थाने उपयोगात आणतो. यामध्ये ‘चेतनेमधील आमूलाग्र आणि संपूर्ण परिवर्तन’ अभिप्रेत आहे. हे परिवर्तन एका विशिष्ट प्रकारचे असते. म्हणजे व्यक्तीच्या आध्यात्मिक उत्क्रांतीमध्ये एक भरभक्कम आणि खात्रीशीर पाऊल उचलले जाईल अशी संकल्पना यामध्ये अभिप्रेत आहे. मनोमय पुरुष जेव्हा प्रथमतः प्राणिक आणि भौतिक पशुजगतामध्ये उदयास आला तेव्हा उदयोन्मुख चेतनेची ही जी छोटीशी पण निर्णायक उपलब्धी होती त्याच्यापेक्षा ही प्रगती अधिक महान आणि अधिक उच्चतर अशी असेल, तसेच तिचा आवाका आणि परिपूर्णता ही अधिक विशाल असेल. याहून उणे काहीही घडून आले किंवा किमान त्या पायावर आधारित जर खरा आरंभ झाला नाही, त्याच्या परिपूर्तीच्या दिशेने काही मूलभूत प्रगती झाली नाही, तर माझे उद्दिष्ट पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. मी जीवनाकडून आणि योगाकडून जी अपेक्षा बाळगतो ती कोणत्यातरी संमिश्र आणि अनिर्णायक अशा आंशिक साक्षात्काराने पूर्ण होणार नाही.

साक्षात्काराचा प्रकाश म्हणजे ‘अवतरण’ (Descent) नव्हे. स्वयमेव साक्षात्कारामुळे व्यक्ती समग्रपणे रूपांतरित होईल हे अनिवार्य नाही. त्यामुळे वरच्या स्तरावर कदाचित चेतनेची काही उन्मुखता किंवा उन्नती किंवा विशालता घडून येईल आणि त्यामुळे ‘पुरुषा’मधील कशाचा तरी साक्षात्कार होईल परंतु प्रकृतीच्या भागांमध्ये मात्र कोणतेही आमूलाग्र परिवर्तन घडून येणार नाही. व्यक्तीला चेतनेच्या आध्यात्मिक शिखरावर साक्षात्काराचा थोडाफार प्रकाश लाभलेला असू शकतो पण निम्न स्तरावरील भाग मात्र पूर्वी जसे होते तसेच राहतात. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत.

खरे आणि संपूर्ण रूपांतरण होण्यासाठी आधी, प्रकाशाचे अवतरण हे केवळ मन किंवा त्याच्या एखाद्या भागामध्ये होणे पुरेसे नाही तर ते संपूर्ण व्यक्तित्वामध्ये म्हणजे अगदी शरीराच्या स्तरापर्यंत किंबहुना त्याच्याही खाली होणे आवश्यक असते. मनामध्ये अवतरित झालेला प्रकाश मनाचे किंवा त्याच्या एखाद्या भागाचे या ना त्या प्रकारे परिवर्तन करू शकेल किंवा त्याचे आध्यात्मिकीकरण करू शकेल परंतु त्यामुळे प्राणिक प्रकृतीमध्ये बदल होईलच असे नाही. प्राणामध्ये अवतरित झालेला प्रकाश प्राणिक गतिप्रवृत्तींचे शुद्धीकरण घडवून आणू शकेल आणि त्यांचा विस्तारदेखील करू शकेल किंवा प्राणमय पुरुषाला तो प्रकाश शांत आणि अविचल बनवू शकेल पण तो प्रकाश शरीराला आणि शारीरिक चेतनेला पूर्वीप्रमाणेच ठेवेल किंवा तो प्रकाश शरीराला तशाच जड अवस्थेत ठेवेल किंवा त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडूही शकेल.

आणि केवळ ‘प्रकाशा’चेच अवतरण होणे पुरेसे नसते तर, समग्र उच्चतर चेतनेचे म्हणजे तिची शांती, शक्ती, ज्ञान, प्रेम आणि आनंद या साऱ्याचे अवतरण होणे आवश्यक असते. एवढेच नव्हे तर, हे अवतरण ‘मुक्ती’साठी पुरेसे असेल पण ‘परिपूर्णते’साठी ते पुरेसे नसेल. किंवा आंतरिक अस्तित्वामध्ये महान परिवर्तन घडवून आणण्याइतपत ते पुरेसे असेल देखील, पण बाह्यवर्ती अस्तित्व मात्र तसेच अपरिपूर्ण, वेंधळे, आजारी किंवा काहीही अभिव्यक्त न करणारे असेच राहण्याची शक्यता असते.

अंतिमतः जोवर व्यक्तीचे अतिमानसिकीकरण (supramentalisation) होत नाही तोवर, साधनेच्या माध्यमातून घडून आलेले रूपांतरण हे परिपूर्ण असू शकणार नाही. आंतरात्मिकीकरण (psychisation) हे पुरेसे नाही, ती तर केवळ एक सुरुवात असते. आध्यात्मिकीकरण (spiritualisation) आणि उच्चतर चेतनेचे अवतरण देखील पुरेसे नसते, ती एक मधली अवस्था असते. अंतिम साध्यासाठी अतिमानसिक ‘चेतना’ आणि ‘शक्ती’चे कार्य घडणेच आवश्यक असते. एवढे सगळे साध्य करण्याची आवश्यकता नाही, जेवढे काही प्राप्त झाले तेवढे पुरेसे आहे, असे कदाचित एखाद्या व्यक्तीला वाटू शकते परंतु पृथ्वी-चेतनेला एक ना एक दिवस जी निर्णायक झेप घ्यायची आहे त्यासाठी ते पुरेसे नसते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 398-399)

साधना, योग आणि रूपांतरण – १९८

‘पूर्णयोगा’च्या विशिष्ट आध्यात्मिक संकल्पना आणि आध्यात्मिक तथ्यं अभिव्यक्त करण्यासाठी, ‘अतिमानस’ या शब्दाप्रमाणेच ‘रूपांतरण’ हा शब्द देखील मी स्वतः (विशिष्ट अर्थाने) वापरला आहे. आता लोकं त्या शब्दांचा वापर करू लागले आहेत आणि मी ज्या अर्थाने ते शब्द उपयोगात आणले होते त्याच्याशी अजिबात संबंध नसलेल्या अर्थाने लोकं ते शब्द वापरू लागले आहेत. ‘आत्म्या’च्या ‘प्रभावा’मुळे प्रकृतीचे शुद्धीकरण होणे हा ‘रूपांतरण’ या शब्दाचा अर्थ मला अभिप्रेत नाही. शुद्धीकरण हा आंतरात्मिक परिवर्तनाचा किंवा आंतरात्मिक-आध्यात्मिक परिवर्तनाचा (psycho-spiritual change) केवळ एक भाग असतो, या व्यतिरिक्त या शब्दाला अर्थाच्या इतरही अनेक छटा आहेत. ‘रूपांतरण’ या शब्दाला अनेकदा नैतिक किंवा नीतीविषयक अर्थ दिला जातो; मात्र मला अभिप्रेत असलेल्या हेतुशी त्याचा काहीही संबंध नाही.

‘आध्यात्मिक रूपांतरण’ या शब्दामध्ये मला काहीतरी चैतन्यपूर्ण असा अर्थ अपेक्षित आहे. (यामध्ये जिवाची केवळ मुक्ती किंवा त्या एकमेवाद्वितीय ईश्वराचा साक्षात्कार एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. या गोष्टी कोणत्याही अवतरणाविनासुद्धा साध्य केल्या जाऊ शकतात.) रूपांतरण या शब्दामध्ये, व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागाने, म्हणजे अगदी अवचेतनापर्यंतच्या (subconscient) भागानेसुद्धा स्थिर आणि गतिशील आध्यात्मिक चेतना धारण करणे अभिप्रेत आहे. ही गोष्ट, ‘आत्म्या’च्या प्रभावामुळे केली जाऊ शकत नाही. (कारण) आत्म-प्रभावामुळे मन आणि हृदयाचे शुद्धीकरण, प्रबोधन होऊ शकते आणि प्राणाची निश्चलता देखील प्राप्त होऊ शकते पण चेतना मात्र मूलतः जशी होती तशीच (त्याच अवस्थेत) सोडून दिली जाते. या सर्व भागांमध्ये स्थिर आणि गतिशील ‘दिव्य चेतने’चे अवतरण घडविणे आणि त्या चेतनेद्वारे, सद्यस्थितीतील चेतनेची जागा पूर्णपणे घेतली जाणे, असा ‘रूपांतरणा’चा अर्थ होतो.

ही दिव्य चेतना आपल्या मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये नव्हे तर, त्यांच्या वरच्या बाजूस निर्भेळ आणि अनावृत (unveiled) स्वरूपात आढळते. ही चेतना अवतरित होऊ शकते हा निर्विवादपणे अनेकांच्या अनुभवाचा विषय आहे. आणि माझा अनुभव असा आहे की, तिच्या संपूर्ण अवतरणाखेरीज (मन, प्राण आणि शरीरावरील) आवरण आणि (त्यामधील) भेसळ कोणीही दूर करू शकत नाही, आणि संपूर्ण आध्यात्मिक रूपांतरण प्रत्यक्षात येऊ शकत नाही…

रूपांतरण हे जसे ‘पूर्णयोगा’चे केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे तसे ते इतर योगमार्गांचे केंद्रवर्ती उद्दिष्ट नाही, या मुद्द्याची मी येथे भर घालू इच्छितो. इतर योग, मुक्ती आणि पारलौकिक जीवनाच्या दिशेने वाटचाल करण्याइतपतच शुद्धीकरणाची आणि परिवर्तनाची अपेक्षा बाळगतात. आत्म्याच्या प्रभावामुळे ती गोष्ट निःसंशयपणे साध्य होऊ शकते. आणि जर जीवनापासून आध्यात्मिक पलायनच करायचे असेल तर त्यासाठी, येथील जीवनाचे रूपांतरण घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या, वरून खालपर्यंत, संपूर्ण प्रकृतीमध्ये होणाऱ्या नूतन चेतनेच्या संपूर्ण अवतरणाची अजिबात आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 403-404)

साधना, योग आणि रूपांतरण – १९७

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आजवर आपण साधना आणि योग या भागांचा विचार पूर्ण केला आहे. ‘साधना’ या विभागामध्ये ध्यान, कर्म, भक्ती यांच्याद्वारे साधना कशी केली जाते हे आपण पाहिले. तर ‘योग’ या विभागामध्ये, आपण ‘पूर्णयोग’ म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती इत्यादी गोष्टी जाणून घेतल्या. आता आपण या मालिकेमधील अंतिम विभागाकडे म्हणजे ‘रूपांतरणा’कडे वळत आहोत.

‘रूपांतरण’ हे पूर्णयोगाचे केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे, हे आता एव्हाना आपल्याला माहीत झाले आहे. परंतु रूपांतरण म्हणजे नेमके काय, हे सहसा आपल्याला माहीत नसते. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये योगसाधनेनंतर बदल होतो म्हणजे तिचे रूपांतरण झाले असे सहसा मानले जाते. उदाहरणार्थ, आधी जी व्यक्ती रागीट असते ती दीर्घकालीन साधनेनंतर शांत स्वभावाची होते यालाच रूपांतरण असे समजण्याची गल्लत केली जाते. परंतु स्वभावामध्ये परिवर्तन किंवा व्यक्तित्वामध्ये झालेला छोटामोठा बदल म्हणजे रूपांतरण नव्हे.

रूपांतरणाचा श्रीअरविंदांना अभिप्रेत असणारा अर्थ अधिक गभीर आहे, खोलवरचा आहे. तो अर्थ नेमका काय आहे, रूपांतरणाचे महत्त्व काय आहे, हे रूपांतरण केव्हा व कसे घडून येते, त्याचे प्रकार किती व कोणते यासारख्या मुद्द्यांचा विचार आपल्याला येथून पुढील भागांमध्ये करायचा आहे.

प्रथमतः आपण ‘आंतरात्मिक’ रूपांतरण, ‘आध्यात्मिक’ रूपांतरण आणि ‘अतिमानसिक’ रूपांतरण यांचा क्रमशः विचार करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या ‘प्रकृती’च्या रूपांतरणाचा म्हणजे ‘मन’, ‘प्राण’ आणि ‘शरीर’ यांच्या रूपांतरणाचा विचार करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – १९६

आपल्या दृष्टीने ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) ज्यापासून आणि ज्यामध्ये या विश्वातील सर्वकाही आविष्कृत झाले आहे आणि (जरी हे आविष्करण सद्यस्थितीत अज्ञानगत असले तरीसुद्धा.) सर्व वस्तुंच्या आणि व्यक्तींच्या अंतरंगामध्ये आणि पाठीमागे असणारा ‘विश्वात्मा’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर.’

२) आपल्या अंतरंगामध्ये वसलेल्या स्वतःच्या अस्तित्वाचे ‘चैतन्य’ आणि त्याचा ‘स्वामी’ म्हणजे ‘ईश्वर’, की ज्याची आपण सेवा केली पाहिजे आणि आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला आपण शिकले पाहिजे, जेणेकरून आपण ‘अज्ञाना’मधून ‘प्रकाशा’कडे उन्नत होऊ शकू.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान व शक्ती आहे आणि त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या ‘प्रकाशा’कडे आपण उन्नत झाले पाहिजे आणि आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये आपण त्याची वास्तविकता अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सामान्य प्रकृतीमध्ये आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ म्हणजे काय हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणूकाही एक पडदाच विणतात की ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गभीर (deeper) चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि जी ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल त्या ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे

‘ईश्वरा’बद्दलच्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे. चेतना खुली होण्यातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच, ‘ईश्वरा’च्या सत्याचा साक्षात्कार होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – १९५

उत्तरार्ध

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी मनुष्यत्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मनोमय जीव, अन्य शक्तीच्या साहाय्याविना, स्वत:च्या शक्तीद्वारे स्वतःचे अतिमानसिक चैतन्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. मानवी धारकपात्राचे (receptacle) दैवीकरण केवळ ‘दिव्य प्रकृती’च्या अवतरणामुळेच होऊ शकते.

कारण आपल्या मन, प्राण आणि शरीर या गोष्टी त्यांच्या स्वत:च्या मर्यादांनी बांधल्या गेलेल्या असतात आणि त्या कितीही उन्नत झाल्या किंवा कितीही विस्तृत झाल्या तरीही त्या त्यांच्या प्राकृतिक सीमा ओलांडून वर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सीमांच्या पलीकडे त्या विस्तारित देखील होऊ शकत नाहीत. परंतु असे असूनसुद्धा, मनोमय मनुष्य स्वतःच्या पलीकडे असणाऱ्या अतिमानसिक ‘प्रकाश’, ‘सत्य’ आणि ‘शक्ती’ यांच्याप्रत उन्मुख होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्यामध्ये कार्य करावे आणि मन जे करू शकणार नाही ते त्यांनी करावे यासाठी तो त्यांना आवाहन करू शकतो. मन जरी स्वप्रयत्नाने, मनाच्या अतीत जे आहे ते होऊ शकत नसले तरी, अतिमानस अवतरित होऊन, मनाचे स्वत:च्या द्रव्यामध्ये रूपांतरण घडवू शकते.

मनुष्याने आपल्या विवेकशील सहमतीने आणि जागरूक समर्पणाने, अतिमानसिक ‘शक्ती’ला जर तिच्या स्वतःच्या गहन व सूक्ष्म अंतदृष्टीनुसार आणि लवचीक अंतःशक्तीनुसार कार्य करण्यास मुभा दिली तर, ती अतिमानसिक ‘शक्ती’, संथपणाने किंवा वेगाने, आपल्या सद्यकालीन अर्ध-परिपूर्ण प्रकृतीचे दिव्य ‘रूपांतरण’ घडवून आणेल.

या अवतरणामध्ये, या कार्यामध्ये धोका होण्याची आणि आपत्तीजनक पतन होण्याची शक्यता असते. अवतरित होणाऱ्या शक्तीचा जर मानवी मनाने किंवा प्राणिक इच्छेने ताबा घेतला आणि स्वतःच्या संकुचित व चुकीच्या कल्पनांनी किंवा सदोष व अहंकारी आवेगांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, (आणि हे काही प्रमाणात अटळसुद्धा असते;) तर जोपर्यंत कनिष्ठ मर्त्य प्रकृती ही महत्तर अशा अमर्त्य प्रकृतीच्या मार्गापैकी थोडाफार भाग तरी आत्मसात करत नाही, तोपर्यंत धडपडणे, किंवा विचलित होणे, कठीण आणि वरकरणी पाहता, दुर्लंघ्य वाटणारे अडथळे येणे, आघात होणे, दुःखभोग सहन करावे लागणे यांपासून सुटका नसते; एवढेच नव्हे तर संपूर्ण पतन होणे किंवा मृत्युमुखी पडणे याचीदेखील शक्यता असते. जेव्हा मन, प्राण आणि शरीर ‘ईश्वरा’प्रत जाणीवपूर्वक समर्पित व्हायला शिकतात, तेव्हाच फक्त ‘योगमार्ग’ सोपा, सरळ, जलद आणि सुरक्षित बनू शकतो.

आणि हे समर्पण आणि उन्मुखता ही फक्त ‘ईश्वरा’प्रतच असली पाहिजे, ती अन्य कोणाप्रत असता कामा नये. कारण आपले अंधकारमय मन आणि आपल्यामधील अशुद्ध प्राणशक्ती या गोष्टी, अ-दैवी आणि विरोधी शक्तींना समर्पित होण्याची शक्यता असते. एवढेच काय, पण चुकून त्या विरोधी शक्तींनाच ते ‘दैवी शक्ती’ समजण्याचीदेखील शक्यता असते. अन्य कोणतीच चूक याच्या इतकी घातक असू शकणार नाही. त्यामुळे आपले समर्पण हे अंध असता कामा नये, तसेच ते कोणत्याही प्रभावाप्रत किंवा सर्वच प्रभावांप्रत जडसुस्त निष्क्रियतेने शरणागती पत्करत आहे असेही असता कामा नये; तर ते समर्पण प्रामाणिक, सचेत, दक्ष आणि त्या एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्चाप्रति एकनिष्ठ असले पाहिजे.

कितीही कठीण असले तरीही, ईश्वराप्रत आणि ‘दिव्य माते’प्रत आत्म-समर्पण, हेच आपले एकमात्र प्रभावशाली साधन असले पाहिजे आणि तेच आपले एकमेव कायमसाठीचे आश्रयस्थान असले पाहिजे. दिव्य मातेप्रति आत्मसमर्पण याचा अर्थ असा की, आपली प्रकृती तिच्या हातामधील एक साधन झाले पाहिजे, आणि आपला आत्मा हा त्या दिव्य मातेच्या कुशीमधील बालक झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 170-171)

साधना, योग आणि रूपांतरण – १९४

‘अतिमानस योग’ (supramental Yoga) म्हणजे एकाच वेळी, ‘ईश्वरा’प्रत आरोहण (ascent) असते आणि ‘ईश्वरा’चे मूर्त प्रकृतीमध्ये अवतरण (descent) देखील असते. आत्मा, मन, प्राण आणि शरीर यांच्या एककेंद्री समुच्चयाच्या ऊर्ध्वमुख अभीप्सेद्वारेच (aspiration) आरोहण साध्य होऊ शकते. आणि समग्र अस्तित्वाने त्या अनंत आणि शाश्वत ‘ईश्वरा’प्रत आवाहन केले तर त्याद्वारेच अवतरण घडून येऊ शकते. जर हे आवाहन व ही अभीप्सा असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टी उदयाला आल्या, त्या सातत्याने वृद्धिंगत होत राहिल्या आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीचा ताबा घेतला, तर आणि तरच अतिमानसिक उन्नयन आणि रूपांतरण शक्य होते.

आवाहन आणि अभीप्सा या फक्त प्राथमिक अटी आहेत, त्या बरोबरीने आणि त्यांच्या प्रभावशाली तीव्रतेमुळे सर्व अस्तित्वामध्येच ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता (opening) आणि संपूर्ण समर्पण उदित होणे आवश्यक असते. मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर असणारी व पाठीमागे असणारी आणि मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणारी एक महान दिव्य ‘चेतना’ असते. ती महान दिव्य चेतना, प्रकृतीला तिच्या सर्व भागांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणत्याही मर्यादेविना ग्रहण करता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे ‘उन्मुखता’! या ग्रहणशीलतेमध्ये धारण करण्याची अक्षमता असता कामा नये, किंवा मूलद्रव्यांतरणाच्या तणावामुळे (transmuting stress) शरीर किंवा मज्जातंतू, प्राण किंवा मन, किंवा संपूर्ण व्यवस्थेतील कोणती एखादी गोष्ट कोलमडूनही पडता कामा नये. (म्हणून त्यासाठी) ईश्वरी ‘शक्ती’चे सदोदित बलशाली असणारे आणि अधिकाधिक आग्रही होत जाणारे कार्य धारण करण्यासाठी सतत चढतीवाढती असणारी क्षमता, आणि अपार ग्रहणशीलता असणे आवश्यक असते. अशी ग्रहणशीलता नसेल तर कोणतेच महान आणि चिरस्थायी असे कोणतेही कार्य घडणे शक्य होणार नाही; आणि अशा वेळी ती ‘योगसाधना’ कोलमडून बंद पडेल किंवा जडतायुक्त अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होईल किंवा त्या प्रक्रियेमध्येच काहीतरी विनाशक अटकाव किंवा सुस्ती येऊन ती बंद पडेल अशी शक्यता असते; या प्रक्रियेमध्ये अपयश येऊ नये असे जर वाटत असेल तर योगसाधना निरपवाद आणि समग्र असणेच आवश्यक असते.

परंतु कोणत्याही मानवी प्रणालीमध्ये ही अनंत ग्रहणशीलता आणि अमोघ क्षमता नसते, म्हणून ‘ईश्वरी शक्ती’ जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अवतरित होते तेव्हा, ती त्या व्यक्तीची (ग्रहण)क्षमता वृद्धिंगत करत नेते. ईश्वरी ‘शक्ती’ वरून त्या व्यक्तीमध्ये प्रविष्ट होताना, व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कार्य करण्यासाठी ‘सामर्थ्य’ निर्माण करते. ते सामर्थ्य आणि ती ग्रहणक्षमता जेव्हा त्या ईश्वरी शक्तीद्वारे समतुल्य केली जाते तेव्हाच, अतिमानसिक ‘योग’ यशस्वी होण्याची शक्यता असते. आपण ‘जेव्हा आपले अस्तित्व हळूहळू चढत्यावाढत्या समर्पणाद्वारे ईश्वरा’च्या हाती सोपवीत जातो तेव्हाच ही गोष्ट शक्य होते. तेथे एक समग्र आणि अखंडित अशी सहमती आणि कार्यासाठी जी गोष्ट करणेच आवश्यक आहे ती गोष्ट ‘ईश्वरी शक्ती’ला करू देण्याची धैर्ययुक्त इच्छाशक्ती असणेच आवश्यक असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 169-170)

साधना, योग आणि रूपांतरण – १९३

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०९

वरून होणाऱ्या अवतरणाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्या कार्याबाबत, स्वतःवर संपूर्णपणे विसंबून राहता कामा नये, ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. येथे ‘सद्गुरू’च्या मार्गदर्शनावर अवलंबून राहिले पाहिजे. जे जे काही घडते ते ते सारे त्यांच्या विवेकावर, मध्यस्थीवर आणि त्यांच्या निर्णयावर सोपविले पाहिजे.

कारण बरेचदा असे घडते की, या अवतरणामुळे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्ती उत्तेजित होतात, उद्दीपित होतात आणि उच्चतर शक्तींमध्ये मिसळू पाहतात आणि त्यांना स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:कडे वळवू पाहतात. बरेचदा तर असेही घडते की, परमेश्वर किंवा दिव्य मातेचे (मायावी) रूप घेऊन, एक किंवा अनेक अ-दैवी शक्ती प्रकट होतात आणि साधकाकडून सेवेची आणि शरणागतीची मागणी करतात. साधकाने जर त्यास संमती दिली तर मग अत्यंत विघातक परिणाम घडून येतात.

खरोखरच, साधक केवळ ‘ईश्वरी’ कार्यालाच सहमती देत असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाला शरण जात असेल किंवा समर्पित होत असेल तर मग सारेकाही सुरळीत चालत राहते. ही सहमती देणे आणि सर्व अहंकारी शक्तींना किंवा अहंकाराला चुचकारणाऱ्या शक्तींना नकार देणे या गोष्टी साधनामार्गावरील संपूर्ण वाटचालीमध्ये संरक्षक कवचाप्रमाणे कार्य करतात. पण ‘प्रकृती’चे मार्ग हे मायाजालांनी भरलेले असतात, अहंकाराचे अगणित कपटवेश असतात; ‘राक्षसी माया’, ‘काळोखाच्या शक्तीं’ची भ्रांती, असाधारणरित्या कुशल असते. येथे तर्कबुद्धीचे मार्गदर्शन पुरे पडत नाही, बरेचदा त्यातून विश्वासघात होतो. आणि कोणत्याही आकर्षक, प्रलोभनकारी हाकेनुसार वागायला प्राणिक इच्छा तर आपल्यासोबत सदैव तयारच असते. आणि म्हणूनच आम्ही ज्याला ‘समर्पण’ असे संबोधतो, त्यावर ‘पूर्णयोगा’मध्ये आम्ही इतका अधिक भर देत असतो.

हृदयचक्र पूर्णपणे खुले झाले असेल आणि जर अंतरात्मा नेहमीच नियंत्रण ठेवत असेल तर, मग काही प्रश्नच उद्भवत नाही, मग सारेकाही सुरक्षित असते. परंतु कोणत्याही क्षणी, एखाद्या कनिष्ठ आवेगामुळे अंतरात्मा झाकोळला जाऊ शकतो. काही अगदी थोडेच जण या धोक्यांपासून दूर राहू शकतात आणि ही तीच माणसं असतात की, ज्यांना ‘समर्पण’ अगदी सहजतेने साध्य होते. या अतिशय कठीण प्रयासांमध्ये, जो ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावलेला आहे किंवा जो ‘ईश्वरा’चे प्रतिनिधित्व करतो अशा व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक आणि अनिवार्य ठरते.

‘योगाची केंद्रवर्ती प्रक्रिया’ याविषयी मला नेमके काय म्हणायचे आहे याची पुरेशी स्पष्ट कल्पना येण्यासाठी तुम्हाला या लिखाणाची मदत होईल. येथे मी काहीसे विस्ताराने लिहिले आहे पण, अर्थातच, मी येथे फक्त मूलभूत गोष्टीच समाविष्ट करू शकलो आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 329-330)