(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

पहिली कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, सर्वत्र पूर्ण समता राखणे आणि अस्वस्थ चिंताजनक विचारांना किंवा निराशेला तुमच्यामध्ये प्रवेश न करू देणे. एन्फ्लुएंझाच्या या तीव्र हल्ल्यानंतर, अशक्तपणा येणे किंवा बरे होण्याच्या प्रगतीमध्ये चढउतार असणे हे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही काय केले पाहिजे, तर शांत आणि विश्वासाने राहिले पाहिजे, कोणतीही काळजी करता कामा नये किंवा अस्वस्थ होता कामा नये. अगदी पूर्णपणे शांत राहिले पाहिजे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेण्यास तयार असले पाहिजे. चिंता करण्यासारखे काही नाही; विश्रांती घ्या म्हणजे आरोग्य आणि सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 587)

व्यक्ती निश्चितपणे आजारपणावर आतून कार्य करू शकते आणि तो आजार बरा करू शकते. फक्त एवढेच की, हे नेहमीच सोपे असते असे नाही. कारण जडभौतिकामध्ये खूप प्रतिरोध असतो, तो जडत्वाचा विरोध असतो. येथे अथक असे प्रयत्नसातत्य आवश्यक असते. प्रथमतः व्यक्तीला त्यात कदाचित सपशेल अपयश येईल किंवा आजाराची लक्षणे वाढतील; पण हळूहळू शरीरावरील किंवा एखाद्या विशिष्ट आजारावरील नियंत्रण दृढ होत जाईल. त्यातही, आजारपणाचा कधीतरी झालेला हल्ला असतो, तो आंतरिक साधनांनी बरा करणे तुलनेने अधिक सोपे असते; पण भविष्यातही त्या आजारापासून शरीर सुरक्षित ठेवणे हे अधिक अवघड असते.

दीर्घकालीन आजार असेल, तर तो बरा करण्यास अधिकच कठीण असतो, शरीराच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या तक्रारींपेक्षा, असे जुनाट आजार शरीरातून पूर्णपणे नाहीसे होण्यास अधिक नाखूष असतात. जोवर शरीरावरील नियंत्रण हे सदोष असते, तोपर्यंत आंतरिक शक्तीच्या वापरामध्ये या सर्व व इतर अपूर्णता आणि अडचणी राहणारच. आंतरिक कार्याच्या आधारे, जरी तुम्ही आजारपण वाढू देण्यापासून रोखू शकलात, तरी पुष्कळ झाले; जोपर्यंत तुम्ही तो आजार पूर्ण बरा करण्याच्या क्षमतेचे होत नाही तोपर्यंत, ‘अभ्यासा’ने तुम्हाला ती आंतरिक शक्ती अधिक बळकट करत नेली पाहिजे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जोपर्यंत ती आंतरिक शक्ती संपूर्णतया तिथे कार्यरत नसेल तोपर्यंत, भौतिक उपचारांची मदत घेणे सोडता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579-580)

श्रीअरविंद एका साधकाला पत्रात लिहितात की, शक्तीच्या साहाय्याने तुम्हाला बरे व्हायचे असेल तर, त्यातील मुख्य अडथळा म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्राणिक हालचाली. तुमच्या स्वतःच्या कल्पना, दावे, अग्रक्रम यावर अहंयुक्त भर – तुमच्या स्वतःच्या नीतिपरायणतेबद्दलची तुमची प्रौढी आणि दुसऱ्या बाजूला इतरांचा दुष्टपणा, तक्रारी, भांडणे, वादविवाद, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांविषयीचा द्वेष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया – ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या यकृतावर, पोटावर व नसांवर परिणाम झाला आहे.

जर तुम्ही या साऱ्या गोष्टी सोडून द्याल आणि शांतपणे जगाल, इतरांबरोबर शांतिपूर्ण रीतीने जगाल, स्वतःविषयी आणि इतरांविषयी कमी विचार करत आणि ईश्वराचा जास्त विचार करत जगाल तर, गोष्टी अधिक सोप्या होतील आणि तुमची तब्येत सुधारण्यास मदत करतील. आजारपणाला सामोरे जाताना, मनाची शांतचित्तता देखील आवश्यक आहे. कारण मनाची चलबिचल शक्तीचे कार्य थांबविते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579)

आजारपणाचे हल्ले हे कनिष्ठ प्रकृतीचे किंवा विरोधी शक्तींचे हल्ले असतात, ते प्रकृतीमधील एखाद्या उघड्या भागाचा किंवा प्रकृतीकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा किंवा कोणत्यातरी दुर्बलतेचा फायदा घेऊ पाहातात – इतर सगळ्या बाहेरून आत येणाऱ्या गोष्टींप्रमाणेच हे हल्लेही बाहेरून होतात आणि ते परतवूनच लावावे लागतात. जर व्यक्तीला त्यांच्या येण्याची संवेदना होऊ शकली आणि ते शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच व्यक्तीने त्यांना बाहेर फेकून द्यायची सवय लावून घेतली असेल आणि सामर्थ्य प्राप्त करून घेतले असेल तर, अशी व्यक्ती आजारपणापासून मुक्त राहू शकते.

कधी हा हल्ला आतून उद्भवल्यासारखाही जाणवतो, त्याचा अर्थ एवढाच की, त्याची जाणीव तुम्हाला तो अवचेतनेमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी झालेली नव्हती; एकदा का तो अवचेतनेपर्यंत गेला की, त्याने स्वतःसोबत जी शक्ती आणली होती, ती शक्ती आज ना उद्या तेथून उद्भवतेच आणि तुमच्या शारीर प्रणालीवर आक्रमण करतेच. त्या आजाराने आत प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला त्याची जाणीव झाली; याचे कारण असे की, तो आजार अवचेतनाद्वारे न उद्भवता, त्याने थेटपणे आत प्रवेश केला होता, कारण तो तुमच्या बाहेर असताना तुम्ही त्याला ओळखू शकला नव्हतात.

बऱ्याचदा आजारपण असेच येते, समोरून, किंवा बऱ्याचदा बाजूने, अगदी जाणवेल असे थेटपणे, आपल्या संरक्षणाच्या मुख्य चिलखतामधून म्हणजे आपल्या सूक्ष्म प्राणिक आवरणाला भेदून ते आजारपण आत प्रवेश करते; परंतु ते जडभौतिक शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच या सूक्ष्म प्राणिक आवरणामध्येच त्याला थोपविता येणे शक्य असते. अशा वेळी तुम्हाला त्याचा काहीसा परिणाम जाणवू शकतो, म्हणजे उदा. तापाची कणकण किंवा थंडी वाजून आल्यासारखे होऊ शकते, परंतु, तरीही अशा वेळी त्या आजाराचे पूर्ण आक्रमण होत नाही. जर ते आजारपण आधीच रोखता आले किंवा व्यक्तीच्या प्राणिक आवरणानेच त्याला प्रतिकार केला आणि ते आवरण स्वतः सुदृढ, दमदार, अखंड, क्षतिहीन राहिले तर आजारपण येत नाही ; हल्ल्याचा कोणताही भौतिक परिणाम होऊ शकत नाही किंवा हल्ल्याचा मागमूसही ते शिल्लक ठेवत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 553-554)

निरोगी आयुष्य पुन्हा प्राप्त करून घेणे – अशा प्रकारच्या स्वयंसूचना म्हणजे मानसिक रूपांवरील खरीखुरी श्रद्धा होय. त्याचा परिणाम अबोध मनावर आणि अवचेतन मनावर देखील होतो. अबोध मनामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती कार्यरत होतात, त्याच्या गूढ शक्ती, ज्यांचे शरीरावर चांगला परिणाम होतील असे विचार, अशा इच्छा निर्माण करतात किंवा जागृत शक्तीदेखील उदयास आणतात. अवचेतनेमध्ये स्वयंसूचनांचा परिणाम होतो आणि आरोग्याच्या पुन:प्राप्तीला रोखणाऱ्या आजारपणाच्या आणि मृत्युच्या (प्रकट वा अप्रकट) सूचनांना त्या अटकाव करतात किंवा त्यांना शांत करतात. मन, प्राण आणि शारीर चेतनेमधील विरोधी सूचनांशी दोन हात करण्यासाठी सुद्धा अशा स्वयंसूचनांची मदत होते. हे सारे जेव्हा पूर्णपणाने केले जाते किंवा समग्रतेने केले जाते तेव्हा लक्षणीय परिणाम दिसून येतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31:559)

आजारपणाची भावना ही सुरुवातीला फक्त एक सूचना या स्वरूपाची असते; तुमच्या शारीर जाणिवेने तिचा स्वीकार केल्यामुळे ती वास्तविकता बनते. मनात उठणाऱ्या चुकीच्या सूचनेसारखीच ही गोष्ट असते. जर मनाने तिचा स्वीकार केला तर, मनावर मळभ येते आणि ते गोंधळून जाते आणि प्रसन्नता व सुसंवाद परत लाभावा म्हणून त्याला झगडावे लागते. तीच गोष्ट शारीरिक जाणीव आणि आजारपणालाही लागू पडते.

तुम्ही आजारपणाची सूचना स्वीकारता कामा नये; एवढेच नव्हे तर, तिला तुमच्या शारीरिक मनामधून नकार दिला पाहिजे आणि ती सूचना धुडकावून देण्यास शारीरिक जाणिवेला मदत केली पाहिजे. आवश्यकता असेल तर, ”मी पूर्णपणे निरोगी राहीन, मी स्वस्थ, सुरक्षितच आहे आणि सुरक्षितच राहीन,” अशी प्रति-सूचना करा. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजारपणाची सूचना आणि त्या सूचनेमुळे येणारे आजारपण, फेकून देण्यासाठी श्रीमाताजींच्या शक्तीचा धावा करा.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 555)

“आजारपणाची सूचना’ या शब्दांमधून मला केवळ विचार वा शब्दच अभिप्रेत नाहीत. जेव्हा संमोहनकार, “झोपा” असे म्हणतो, तेव्हा ती सूचना असते; परंतु जेव्हा तो काहीही बोलत नाही तर, तुम्ही झोपावे म्हणून तो त्याची मौन इच्छा संक्रमित करतो, तेव्हा तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते किंवा तुमच्या चेहऱ्यावर हातांच्या तो ज्या काही हालचाली करतो, तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते.

जेव्हा एखादी शक्ती तुमच्यावर आघात करते किंवा आजारपणाचे एखादे स्पंदन उमटते तेव्हा त्यातून शरीराला एक प्रकारची सूचना मिळते. एक प्रकारचे स्पंदन, जणू एक लाटच शरीरात घुसते आणि शरीराला तापाची आठवण होते किंवा मग त्याला तापाची जाणीव होऊ लागते अणि मग ते खोकायला लगते, शिंकायला लागते किंवा त्याला थंडी वाजू लागते तेव्हा ”मला बरे वाटत नाहीये, मला अशक्त वाटतंय, मला ताप येणार आहे,” अशा तऱ्हेच्या सूचना मनाला मिळतात.
*

डेंग्यू किंवा एन्फ्लुएंझा होणार अशी वातावरणात एक सर्वसाधारण सूचना असते. या सूचनांमुळे विरोधी शक्तींना तशा प्रकारची लक्षणे घडवून आणणे शक्य होते आणि त्यातून आजाराच्या तक्रारी पसरतात. व्यक्तीने जर अशा सूचना आणि ती लक्षणे या दोन्हींना धुडकावून लावले तर, या गोष्टी प्रत्यक्षात उतरणार नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 556-557)

आजारपणातून एकतर, एकप्रकारची अपूर्णता येते किंवा अशक्तपणा येतो नाहीतर मग, शारीरिक प्रकृती विरोधी स्पर्शांसाठी खुली होते. तसेच आजारपण हे बरेचदा कनिष्ठ प्राण किंवा शारीरिक मन किंवा इतरत्र कोठेतरी कोणत्यातरी अंधकाराशी किंवा विसंवादाशीसुद्धा संबंधित असते.

एखादी व्यक्ती जर श्रद्धेच्या जोरावर किंवा योग-सामर्थ्याच्या आधारे किंवा दिव्य शक्तीच्या प्रवाहाद्वारे, आजारापासून पूर्णपणे सुटका करून घेऊ शकत असेल, तर ते खूपच चांगले. पण बरेचदा व्यक्तीची समग्र प्रकृती खुली नसल्यामुळे किंवा ती त्या शक्तीला पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकत नसल्यामुळे, अशा रीतीने आजाराचा पूर्णतः नायनाट करणे, बरेचदा शक्य होत नाही.

मनामध्ये श्रद्धा असू शकते आणि मन प्रतिसादही देते; मात्र कनिष्ठ प्राण किंवा शरीर त्याचे अनुसरण करत नाहीत. किंवा मन आणि प्राण तयार असतील तर, शरीरच प्रतिसाद देत नाही किंवा ते अंशतःच प्रतिसाद देते, असेही होऊ शकते. कारण एखादा विशिष्ट आजार निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रतिसाद देण्याची त्याला सवय जडलेली असते अणि सवय ही प्रकृतीच्या जडभौतिक भागामधील सर्वाधिक दुराग्रही शक्ती असते. अशा परिस्थितीमध्ये, भौतिक उपायांवर विसंबणे चालू शकते – अर्थात मुख्य उपाय म्हणून नाही, तर त्या शक्तीच्या कार्यासाठी एक प्रकारचे भौतिक साहाय्य किंवा मदत म्हणून! खूप कडक आणि जालीम उपायांची मदत घेऊ नये तर, जे शरीराला हानीकारक न होता, उपायकारक होतील अशाच उपायांची मदत घ्यावी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 580)

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून)

शरीर हे काही वस्त्रासारखे नाही; किंवा आजारी शरीर हे देखील फाटक्या वस्त्राप्रमाणे नाही. शरीर जरी दुर्बल किंवा आजारी पडले तरी ते स्वतःला परत पुनरुज्जीवित करू शकते, त्याची प्राणिक शक्ती ते परत मिळवू शकते, हे असे हजारो लोकांच्या बाबतीत घडत असते. पण कापडामध्ये मात्र पुनरुज्जीवन करणारी जीवनशक्ती नसते. व्यक्ती जेव्हा पंचावन्न किंवा साठ वर्षे वयाच्या पलीकडे जाते तेव्हा हे पुनरुज्जीवन अवघड होऊन बसते; परंतु अगदी तेव्हासुद्धा आरोग्य आणि शक्ती कायम राखता येते किंवा शरीर सुस्थितीत राखण्यासाठी ते पुन्हा होते तसे होऊ शकते.

तुम्हाला आंतरिक अस्तित्व या शब्दांनी नेमके काय म्हणावयाचे आहे ते मला उमगले नाही. जर तुम्हाला ‘विकास’ या शब्दांनी साधनेचा विकास अभिप्रेत असेल तर, त्यासाठी आरोग्याची पुन्हा प्राप्ती आणि सामर्थ्य आवश्यक आहे. मन आणि प्राणाप्रमाणेच शरीर हे पण साधनेसाठी आवश्यक असे साधन आहे आणि होता होईल तितके ते सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंतरिक अवस्थेच्या तुलनेत त्याला काही फारसे महत्त्व नाही असे समजून, त्याची हेळसांड करणे, हा काही या (पूर्ण)योगाचा नियम नाही.

(CWSA 31 : 558)

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल.

हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील.

तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)