भारताचे पुनरुत्थान – ०६

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २० सप्टेंबर १९०७

श्रीयुत बाळ गंगाधर टिळक यांनी जातिव्यवस्थेवर एक निश्चित स्वरूपाचे भाष्य केल्याचे ‘द बेंगाली’ या कलकत्त्यामधील एका वर्तमानपत्राने नोंदविले आहे. “सामाजिक विषमतेची आज प्रचलित असणारी संकल्पना ही समाजामध्ये प्रचंड हानी घडवून आणत आहे,’’ असे प्रतिपादन दख्खन प्रांतातील या राष्ट्रीय विचारसरणी असलेल्या नेत्याने केले आहे. हे विधान श्रीयुत टिळक यांच्यासारख्या तळमळीच्या हिंदू आणि अतिशय प्रामाणिक राष्ट्रप्रेमीच्या दृष्टीने अगदी सहज स्वाभाविक असे आहे. मूळ जातिव्यवस्थेचे अवमूल्यन होऊन त्यातून तयार झालेल्या भ्रष्ट कल्पना; जात, अभिमान आणि उद्धटपणा यांच्या मिथ्या पायावर आधारित असलेला मानसिक दृष्टिकोन; जन्मावर आधारित असणारी दैवदत्त श्रेष्ठत्वाची कल्पना, एक अलवचीक आणि असहिष्णु विषमता या गोष्टी हिंदुधर्माच्या मूळ तत्त्वाशी, म्हणजे जो हिंदुधर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये अविचल आणि अविभक्त असणारे ‘ईश्वरत्व’ पाहतो त्याच्या त्या तत्त्वाशी, त्याच्या सर्वोच्च शिकवणुकीशी मिळत्याजुळत्या नाहीत. त्या ‘ईश्वरी एकते’ची राष्ट्रामध्ये प्रचिती घेण्याची उत्कट आकांक्षा बाळगणे म्हणजे राष्ट्रीय विचारसरणी (Nationalism)!

ही अशी एकता असते की, जिच्यामध्ये सर्व घटक-व्यक्ती, वरकरणी पाहता राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक घटक म्हणून त्यांची कार्ये, कितीही वैविध्यपूर्ण आणि असमान दिसत असली तरीसुद्धा, त्या सर्व घटक-व्यक्ती वस्तुतः आणि मूलतः एक व एकसमानच असतात. भारत जगापुढे राष्ट्रीय विचारसरणीची जी आदर्श संकल्पना मांडणार आहे त्या आदर्श संकल्पनेमध्ये, दोन माणसांमध्ये, दोन जातींमध्ये, दोन वर्गांमध्ये एक प्रकारची मूलभूत समता असेल. श्रीयुत टिळक यांनी निर्देश केल्याप्रमाणे, राष्ट्र म्हणजे जणू विराट पुरुष असून, सर्व जीव हे जरी विभिन्न असले तरी, ते त्या विराट पुरुषाचे समान आणि संघटित घटक असतील. आपल्या देशाच्या धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा हा आदर्श आपल्या प्रत्येक देशबांधवाच्या घराघरांत पोहोचविणे हे भारतीय राष्ट्रप्रेमीचे कार्य असेल आणि आपल्या धर्माची ती आग्रही शिकवण असेल.

आम्हाला हुकूमशाही (autocracy) अमान्य आहे कारण हुकूमशाही म्हणजे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये उपरोक्त मूलभूत समतेलाच नकार देण्यासारखे आहे. आम्ही जातिव्यवस्थेच्या झालेल्या आधुनिक विपर्यासाला आक्षेप घेण्याचे कारणही हेच आहे की, त्यामुळे त्या मूलभूत समतेलाच समाजजीवनामध्ये हरताळ फासला जातो. आम्ही जेव्हा राष्ट्राची एका लोकशाही राजकीय एकतेमध्ये पुनर्व्यवस्था लावण्याचा आग्रह धरत आहोत तेव्हा आम्हाला याची जाण आहे की, पुनर्व्यवस्थेचे तेच तत्त्व सामाजिकदृष्ट्याही अपरिहार्यपणे जोर धरेल आणि तो जोर धरला गेलाच पाहिजे; आमचे विरोधक कल्पना करतात त्याप्रमाणे आम्ही त्याचे क्षेत्र फक्त राजकीय प्रांतापुरतेच मर्यादित करू इच्छितो असे गृहीत धरले तर, आमचे सारे प्रयत्न निष्फळ ठरतील; कारण एकदा का ते तत्त्व राजकारणामध्ये प्रत्यक्षात उतरले तर त्याने समाजामध्येसुद्धा अपरिहार्यपणे स्वतःचे जोरकस प्रतिपादन केलेच पाहिजे. कोणत्याही प्रकारची मक्तेदारी ही, मग ती वंशावर आधारित असो वा अनुवंशिकतेवर आधारित असो, ती राष्ट्रप्रेमींच्या भविष्यकालीन योजनेचा म्हणजे, ज्याच्या आगमनासाठी ते आज धडपडत आहेत, संघर्ष करत आहेत त्या योजनेचा आणि त्यांच्या वर्तमान स्वप्नाचा भाग असूच शकणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 679-680)

भारताचे पुनरुत्थान – ०५

वंदे मातरम् हा मंत्र जन-मानसात दुमदुमू लागला होता. नव्हे, आता हा मंत्र म्हणजे स्वातंत्र्याकांक्षी देशभक्तांच्या अस्मितेचा मानबिंदू ठरला होता. त्याच सुमारास ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकाचा क्षितिजावर उदय झाला आणि त्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या प्राध्यापक श्री. अरविंद घोष यांच्या जहाल लेखनामुळे, वंदे मातरम् हा मंत्रोच्चार भारतीयांच्या हृदयातील मातृभूमीच्या प्रेमाला आवाहन करणारा ठरला.

‘बंदे मातरम्’ हे कलकत्त्याहून प्रकाशित होणारे दैनिक होते. हे दैनिक म्हणजे संपूर्ण स्वराज्याची संकल्पना साकार करू पाहणाऱ्या भारताच्या राजकीय जनजागृती-कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होता. अल्पावधीतच हे वृत्तपत्र भारताच्या राजकीय चळवळीचे मुखपत्र बनले. त्यातील लेखांमुळे प्राध्यापक अरविंद घोष प्रथमच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले.

वंगभंगाच्या पार्श्वभूमीवर श्री. बिपिनचंद्र पाल यांनी ‘बंदे मातरम्’ हे दैनिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याचा पहिला अंक दि. ०६ ऑगस्ट १९०६ रोजी प्रकाशित झाला. श्री. अरविंद घोषदेखील या दैनिकाच्या कार्यामध्ये सहभागी झाले. लेखक, संपादक, सल्लागार या नात्याने श्री. अरविंद या नियतकालिकाच्या कामकाजात सक्रिय सहभागी होते.

‘बंदे मातरम्’मधून देशप्रेमाचा आणि परकीय सत्तेच्या गुलामीविरूद्धचा संदेश दिला जात असे पण त्याची शब्दयोजनाच अशी असे की, त्यावर कोणताही कायदेशीर आक्षेप घेणे ब्रिटिश सरकारला शक्य होत नसे. वास्तविक बिटिश सरकार श्री. अरविंद घोष यांना अटक करू इच्छित होते परंतु सरकारला त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आला नाही. यामुळे एक गोष्ट मात्र घडली की, आजवर पडद्याआड राहून कार्यरत असणारे अरविंद घोष एकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आले. आणि तेथूनच पुढे ‘स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी’ या नात्याने त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

‘बंदे मातरम्’ने देशासमोर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि निष्क्रिय प्रतिकार ही चतुःसूत्री ठेवली. निष्क्रिय प्रतिकाराचा सिद्धान्त मांडणारी ‘द डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स’ नावाची श्री. अरविंद लिखित लेखमाला ‘बंदे मातरम्’मधून प्रकाशित करण्यात आली.

या नियतकालिकाची आर्थिक बाजू नीट सांभाळता यावी या दृष्टीने श्री. अरविंद यांच्या सूचनेनुसार, ‘बंदे मातरम् कंपनी’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र पुढे अलिपूर बाँबकेसमध्ये त्यांना अटक झाल्यावर, त्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘बंदे मातरम्’चे प्रकाशन थांबले.

“श्रीअरविंदांच्या लेखणीची धाडसी वृत्ती, ज्वलंत विचारसरणी, सुस्पष्ट कल्पना, शुद्ध आणि शक्तिशाली शब्दरचना, जळजळीत वक्रोक्ती आणि निखळ विनोदबुद्धी यांची बरोबरी देशातील कोणत्याही भारतीय किंवा अँग्लो-इंडियन दैनिकाला करता आली नाही,” असे उद्गार श्री. बिपिनचंद्र पाल यांनी काढले होते.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

भारताचे पुनरुत्थान – ०४

(भारत मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे सध्या १५० वे जयंतीवर्ष सुरू आहे. मुळात बंगाली भाषेत असलेल्या या गीताचा पूर्वाश्रमीच्या श्री. अरविंद घोष यांनी इंग्रजीमध्ये गद्यानुवाद केला आहे. त्याचा मराठी भावानुवाद आज प्रस्तुत करत आहोत….)

हे माते, मी तुला वंदन करत आहे.
जलसमृद्ध आणि धनधान्यसमृद्ध असणाऱ्या हे माते,
दक्षिणवाऱ्यांमुळे तू शीतलतनू झाली आहेस;
सुगीच्या पिकांनी घनगर्द झालेल्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
चंद्रप्रकाशाच्या वैभवामध्ये तुझ्या रात्री न्हाऊन निघाल्या आहेत,
विविध फुलांनी बहरलेले वृक्षरूपी सुंदर वस्त्र
तुझ्या भूमीने परिधान केले आहे,
तुझे हास्य मंजुळ आहे आणि तुझी वाणी मधुर आहे,
परमानंदप्रदायिनी, वरदायिनी असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.

सप्त कोटी मुखांमधून उठणाऱ्या गर्जनांनी
आणि सप्त कोटी प्रजाजनांच्या दोन्ही हातांमध्ये उगारलेल्या शस्त्रांमुळे
तू रुद्रभीषण दिसत आहेस, तेव्हा हे माते,
तू दुर्बल आहेस असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोण बरे करेल?
अपरिमित शक्ती धारण करणाऱ्या रक्षणकर्त्या मातेसमोर,
आणि शत्रूंच्या पलटणी पळवून लावणाऱ्या मातेसमोर
मी नतमस्तक आहे. हे माते, मी तुला वंदन करत आहे.

तूच ज्ञान आहेस आणि तूच आमचा स्वधर्म आहेस,
तूच आमच्या हृदयांमध्ये निवास करत आहेस.
तूच आमचा आत्मा आहेस आणि आमच्या देहामधील प्राणही तूच आहेस.
आमच्या बाहुंमधील शक्तिसामर्थ्य तूच आहेस,
आमच्या हृदयामधील प्रेम आणि श्रद्धादेखील तूच आहेस,
आम्ही सर्व मंदिरांमध्ये तुझ्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतो.
कारण तू युद्ध-शस्त्रे धारण केलेली दशभुजा दुर्गा आहेस,
आणि कमलपुष्पांमध्ये विहरणारी सौंदर्यदेवतादेखील तूच आहेस.
परावाणीरूप असणाऱ्या, वेदप्रदायिनी देवते,
मी तुला वंदन करत आहे.

हे ऐश्वर्यदेवते,
विशुद्ध व अनुपम जलप्रवाहांनी आणि
फुलाफळांनी समृद्ध असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
श्यामलवर्णी, ऋजुस्वभावी, सुहास्यवदन असणाऱ्या,
आभूषणं परिधान केलेल्या, शृंगाराने विनटलेल्या,
वैभवधारिणी हे माते,
वैविध्यसंपन्न हे माते, मी तुला वंदन करत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 05 : 467-468)

भारताचे पुनरुत्थान – ०३

‘बंदे मातरम्’ या नियतकालिकामधून
कलकत्ता : दि. १९ फेब्रुवारी १९०८

भारतामध्ये दोन महान मंत्र आहेत, त्यातील एक मंत्र म्हणजे ‘वंदे मातरम्’! हा मंत्र म्हणजे आपल्या मातृभुमीविषयी जागृत झालेल्या प्रेमाची सामूहिक आणि सार्वत्रिक गर्जना आहे. आणखी एक अधिक गुप्त आणि गूढ मंत्रदेखील आहे, पण तो अजूनपर्यंत उघड झालेला नाही. यापूर्वीही एकदा विंध्य पर्वतरांगांमधील संन्याशांनी ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगाला दिला होता. परंतु आपल्याच स्वकीयांनी विश्वासघात करून तो गमावला होता. कारण तेव्हा आपले राष्ट्र पुनरुत्थानासाठी परिपक्व झाले नव्हते आणि अकाली झालेली जागृती राष्ट्राला वेगाने अधोगतीकडे घेऊन गेली असती, म्हणून आपण तो मंत्र गमावून बसलो.

परंतु इ. स. १८९७ च्या प्रचंड उलथापालथीमध्ये संन्याशांनी पुन्हा एकदा ती गर्जना ऐकली आणि भारताचे पुनरुत्थान व्हावे ही ‘ईश्वरी’ आज्ञा आहे याची त्यांना जेव्हा जाणीव झाली, तेव्हा पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगासमोर प्रकट करण्यात आला. त्याचा प्रतिध्वनी लोकांच्या अंतःकरणांमध्ये निनादत राहिला आणि जेव्हा काही मोजक्या महान हृदयांमध्ये तो निनाद शांततेमध्ये परिपक्व होत गेला तेव्हा संपूर्ण राष्ट्र त्या मंत्राच्या प्रकटीकरणाविषयी जागृत झाले.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 877)

भारताचे पुनरुत्थान – ०२

१६ एप्रिल १९०७ (दै. बंदे मातरम्) – कलकत्ता

महान आणि प्राचीन भारताच्या गतकालीन गतवैभवाबद्दल अनेक जणं शोक व्यक्त करतात आणि प्राचीन काळातील ऋषी, विचार व सभ्यतेचे प्रेरक निर्माणकर्ते हे जणूकाही आमच्या काळातील वीरयुगाचा एक चमत्कार होते आणि सद्यकालीन क्लेशकारक वातावरणामध्ये आणि अधःपतित माणसांमध्ये अशा लोकांनी पुन्हा जन्मच घेऊ नये, असे म्हणताना आढळतात. परंतु (असे म्हणणे) हा अपराध आहे, त्रिवार अपराध आहे.

आपली भारत भूमी ही शाश्वत भूमी आहे, आपली प्रजा चिरंतन आहे, आपला धर्म सनातन आहे; ज्याचे सामर्थ्य, ज्याची महानता, ज्याचे पावित्र्य हे झाकोळले जाऊ शकेल पण ते कधीच, अगदी एका क्षणभरासाठीसुद्धा पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही. वीरपुरूष, ऋषी, संत हे आपल्या भारत भूमीची नैसर्गिक फलसंपदा आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये असे एकही युग नव्हते की जेव्हा वीरपुरूष, ऋषी, संत-सत्पुरूष जन्माला आले नव्हते. ज्यामधून नवीन भारत उदयास येत आहे असा, ‘वंदे मातरम्’ हा संजीवक मंत्र ज्यांनी (श्री. बंकिमचंद्र चटर्जी यांनी) आपल्याला दिला, त्यांचे नाव उत्तरकालीन युगातील ऋषींच्या नावामध्ये समाविष्ट केले पाहिजे याची जाणीव, अखेरीस का होईना पण आता आपल्याला झाली आहे.

ऋषी आणि संत यांच्यामध्ये फरक असतो. ऋषींचे जीवन कदाचित त्यांच्या श्रेष्ठ पावित्र्यामुळे किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या आदर्श सौंदर्यामुळे ठळकपणे नजरेत भरणार नाही. ते स्वतः काय होते यामुळे नव्हे तर, त्यांनी जे काही अभिव्यक्त केले होते यामुळे ते महान ठरू शकतात. आपल्या राष्ट्राला आणि अखिल मानवतेला एक महान आणि चैतन्यदायी संदेश देण्याची आवश्यकता होती आणि हा संदेश शब्दरूपात साकार करण्यासाठी ‘ईश्वरा’ने त्यांच्या (बंकिमचंद्रांच्या) मुखाची निवड केली आहे. एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा दूरदृष्टीचे प्रकटीकरण होण्याची आवश्यकता होती आणि त्या ‘सर्वशक्तिमान ईश्वरा’ने सर्वप्रथम त्यांची दृष्टी उघडली आहे. त्यांना जी दृष्टी प्रदान करण्यात आली होती, त्यांना जो संदेश प्राप्त झाला होता, तो त्यांनी त्यांच्यामध्ये असलेल्या सर्वसामर्थ्यानिशी, अंतःस्फूर्तीच्या एका परमोच्च क्षणी शब्दांमध्ये अभिव्यक्त करून, संपूर्ण जगासमोर घोषित केला होता. माणसांच्या आंतरतम प्रकृतीला हेलावण्यासाठी, त्यांची मने स्वच्छ करण्यासाठी, त्यांच्या अंत:करणाचा ठाव घेण्यासाठी आणि एरवी, माणसांच्या सामान्य क्षणांमध्ये जे करणे त्यांना अशक्य ठरले असते त्या कृती करण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्या संदेशाचा केवळ उच्चार करणेच पुरेसे होते. त्या शब्दांमध्ये मंत्राचे सामर्थ्य होते, त्या मंत्रवत शब्दांच्या प्रकटीकरणासाठी त्यांचा जन्म झाला होता आणि त्या मंत्राचे ते द्रष्टे होते.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 637)

भारताचे पुनरुत्थान – ०१

नमस्कार वाचकहो,

जग एका नव्या भारताचा उदय होताना पाहत आहे. हा उदय केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे तर अखिल पृथ्वीच्या आणि मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु भारताला त्याचे नियत कार्य करता यावे यासाठी भारताने प्रथम स्वतःचा पुनर्शेाध घेतला पाहिजे. भारताने स्वतःच्या भव्योदात्त आत्म्यामध्ये खोलवर बुडी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या अक्षय ज्ञानस्रोतामधून पुन्हा एकदा सामर्थ्य प्राप्त करून घेतले पाहिजे. तसे केले तरच भारत स्वतःला आणि या जगाला पुनरुज्जीवित करू शकेल.

ब्रिटिश काळामध्येदेखील नेमकी हीच आवश्यकता निर्माण झाली होती. त्या काळी, इ. स. १९०६ ते १९०८ च्या दरम्यान श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम्’ या वृत्तपत्रातून जे लेखन केले त्याद्वारे, संपूर्ण भारतवर्षामध्ये ‘स्वराज्या’बद्दल एक नवचैतन्य निर्माण झाले. भारतीयांची अस्मिता जागृत करणारे, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागविणारे ते लिखाण आजही तितकेच परिणामकारक आहे.

‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ, बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ’ असे म्हटले जाते. तेव्हा आपल्या दिव्य वारशाचे स्मरण करून, पुन्हा एकदा तेच राष्ट्रप्रेम जागविण्याची आवश्यकता आहे, तोच सुवर्णकाळ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होण्याची आवश्यकता आहे. कारण, आज खरोखरच जग अनेक गोष्टींसाठी मोठ्या अपेक्षेने, आशेने भारताकडे पाहत आहे हे आपल्याला पदोपदी दिसून येत आहे. अशा वेळी जगाला देण्यासारखे नेमके आपल्याकडे काय आहे, याचा पुनर्शोध आधी आपण घेतला पाहिजे, म्हणजे मग भारत विश्व-गुरु होण्याच्या दृष्टीने पावलं टाकू शकेल.

हे केवळ स्मरण-रंजन नाही, तर आपल्यामध्ये राष्ट्रप्रेम जागविणारे हे शक्तिवर्धक द्रव्य (टॉनिक) आहे, या भूमिकेतून  ‘भारताचे पुनरुत्थान’ या मालिकेकडे पाहिल्यास खरोखरच राष्ट्रासाठी काही कार्य करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये जागी होईल असा विश्वास वाटतो.

या मालिकेमध्ये सुरुवातीला आपण, ‘वंदेमातरम्’ हा मंत्र व या मंत्राचे उद्गाते ऋषी श्री. बंकिमचंद्र चटर्जी यांच्याविषयी श्री. अरविंद घोष यांनी काढलेले गौरवोद्गार समजावून घेऊ; नंतर ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकाचा अल्प-परिचय करून घेऊ व त्यानंतर त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेले श्री. अरविंद घोष लिखित काही अग्रलेख विचारात घेऊ. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी श्री. अरविंद घोष यांनी लिहिलेले हे अग्रलेख आजही किती विचार-प्रवर्तक आहेत, हे जाणून मन थक्क होते.

धन्यवाद.
डॉ. केतकी मोडक
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

श्रीअरविंद बडोद्यामध्ये प्राध्यापक होते तेव्हा श्री. के. एम. तथा कन्हैयालाल मुन्शी हे त्यांचे विद्यार्थी होते. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना, मुन्शी यांनी श्रीअरविंदांना प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

 

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पवर्तराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक ‘सचेतन माता’ आहे असा भाव ठेवून तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा….

 

पुढील काळात याच कन्हैयालाल मुन्शी यांनी राष्ट्रभावनेतून ‘भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

 

‘भारत  – एक दर्शन’ ही मालिका येथे समाप्त होत आहे.

 

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे, आणि हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत.

 

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.

 

आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे.

 

– श्रीअरविंद [CWSA 01 : 413]

 

*

 

भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. भारत हा जगत्गुरू आहे. जगाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.

 

भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 13 : 353]

भारत – एक दर्शन ३१

भारत हा एकच असा देश आहे की, जेथे आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य चालू शकते आणि ते तसे चाललेच पाहिजे. आणि त्यासाठी सुयोग्य काळ आता येथे आला आहे.

…ज्या भारताकडे एकमेवाद्वितीय असा आध्यात्मिक वारसा आहे, त्या भारतासाठी – आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य प्रस्थापित होणे – ही एकमेव शक्य अशी मुक्ती असेल.

*

भारत हा आधुनिक मानवजातीच्या सर्व समस्यांचे प्रतिनिधित्व करणारा देश झाला आहे. भारत हाच पुनरुत्थानाची भूमी ठरेल – तो अधिक उन्नत आणि अधिक सत्य अशा जीवनाच्या पुनरुत्थानाची भूमी बनेल.

– श्रीमाताजी [CWM 13 : 370, 368]

भारत – एक दर्शन ३०

(अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश…)

विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांचा अगोदरच अंदाज बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा (सनातन धर्म, हिंदु धर्म) हा एकच धर्म आहे.

‘ईश्वरा’चे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ‘ईश्वरा’च्या सन्निध जाण्यासाठी मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.

‘ईश्वर’ हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ‘ईश्वरा’तच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ‘ईश्वरा’शिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हा असा एकच धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ याच सत्यावर भर देतो.

हा असा एकच धर्म आहे की जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करतो असे नाही तर, त्या सत्याची आपल्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आपल्याला सक्षम करतो.

हा असा एकच धर्म आहे की जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, (म्हणजे) जग ही ‘वासुदेवा’ची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.

हा असा एकमेव धर्म आहे की ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. या धर्माने आपल्यामधून मृत्युची वास्तविकताच सर्वथा पुसून टाकली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 11-12]