जीवन जगण्याचे शास्त्र – ३६

साधकासमोर ‘कर्माधिपती’ (Master of the work) स्वतःला अचानक प्रकट करत नाही. त्याची ‘शक्ती’ नेहमीच पडद्याआडून कार्य करत असते, आणि आपण जेव्हा कार्य-कर्ते असल्याचा अहंकार सोडून देतो तेव्हाच तो कर्माधिपती आविष्कृत होतो. आणि हा अहंकार-त्याग जितका अधिकाधिक परिपूर्ण होत जातो तेवढ्या प्रमाणात त्या कर्माधिपतीचे प्रत्यक्ष कार्य वाढीस लागते. जेव्हा त्याच्या ‘ईश्वरी शक्ती’प्रति असलेले आपले समर्पण हे निरपवाद, निःशेष होईल तेव्हाच त्याच्या असीम उपस्थितीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 243)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३५

सदासर्वदा ‘ईश्वरी शक्ती’च्या संपर्कात राहा आणि तिला तिचे कार्य करू द्या, ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. आवश्यकता असेल तेव्हा ती शक्ती तुमच्यातील कनिष्ठ ऊर्जांचा ताबा घेईल आणि त्यांचे शुद्धिकरण करेल. इतर वेळी ती तुमच्यामधून त्या कनिष्ठ ऊर्जा काढून टाकेल आणि त्या जागी ती स्वतःला स्थापित करेल.

मात्र तुम्ही जर तुमच्या मनाला प्राधान्य दिलेत आणि काय केले पाहिजे किंवा काय नाही याचे (मानसिक निकषांच्या आधारे) चर्वितचर्वण करत बसलात आणि त्याआधारे निर्णय घेतलात, तर तुम्ही तुमचा ‘ईश्वरी शक्ती’शी असलेला संपर्क गमावून बसाल. आणि मग (ईश्वरी शक्तीच्या ऐवजी) त्या कनिष्ठ ऊर्जा कृतिप्रवण होतील आणि मग साऱ्याच गोष्टी गोंधळाच्या होऊन बसतील आणि त्यांना चुकीचे वळण लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३४

श्रीमाताजींचे नित्य स्मरण केल्यामुळे व्यक्तीची पूर्ण उन्मुखतेच्या, खुलेपणाच्या (opening) दृष्टीने तयारी होते. हृदय खुले होण्याने श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि ऊर्ध्वस्थित असलेल्या त्यांच्या शक्तिप्रत उन्मुख झाल्याने, उच्चतर चेतनेचे सामर्थ्य देहामध्ये खाली उतरते आणि तेथे राहून ते, (व्यक्तीची) संपूर्ण प्रकृती बदलण्याचे कार्य करते.
*
श्रीमाताजींची प्रार्थना करणे, त्यांचा धावा करणे या गोष्टी मनाच्या क्रिया आहेत; तर उन्मुखता ही चेतनेची एक अशी स्थिती आहे की, जी चेतनेची इतर सर्व गतिविधींपासून मुक्तता करून, तिला श्रीमाताजींकडे अभिमुख ठेवते. अशी चेतना ईश्वराकडून जे काही येईल केवळ त्याचीच आस बाळगून असते आणि ते ग्रहण करण्यास ती सक्षम असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 167), (CWSA 29 : 105)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३३

उन्मुख असणे, खुले असणे (To be open) याचा अर्थ असा की, श्रीमाताजींचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे अशा रितीने तुम्ही श्रीमाताजींकडे वळलेले असणे.

मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि त्याने जर स्वतःमध्ये ‘प्रकाश’ व ‘सत्य’ आणण्यासाठी, श्रीमाताजींना कार्य करू देण्यास नकार दिला तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

प्राण जर त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती, जी खरी प्रेरणा व खरे भावावेग घेऊन येत असते, त्या गोष्टींना जर त्याने स्वतःमध्ये प्रवेश करू दिला नाही तर, ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा याचा अर्थ होतो.

शरीर जर स्वतःच्या इच्छा, सवयी व जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ व ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने मुभा दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया खुले, उन्मुख होता येणे शक्य नसते, परंतु (फक्त मनामध्येच नव्हे तर) तुमच्या प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता (central opening) असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा व संकल्पशक्ती असली पाहिजे, उर्वरित सर्व गोष्टी (श्रीमाताजींच्या शक्तीद्वारे) चढत्यावाढत्या क्रमाने केल्या जातील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३२

माझे प्रेम सततच तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला जर ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच आहे की, तुम्ही ते स्वीकारण्यास सक्षम नाही. तुमची ग्रहणशीलता (receptivity) कमी पडत आहे, ती तुम्ही वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वत:ला खुले (open) केले पाहिजे. व्यक्ती जेव्हा आत्मदान करते तेव्हाच ती स्वत:ला खुली करू शकते. तुम्ही नक्कीच कळत वा नकळतपणे, ईश्वरी प्रेम आणि शक्ती तुमच्याकडे खेचू पाहत आहात. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही हिशोब न मांडता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:स अर्पण करा म्हणजे मग तुम्ही ग्रहणक्षम होऊ शकाल.
*
अगदी या आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा अशी पुष्कळ माणसं आहेत की जी, वैयक्तिक कारणांसाठी, अगदी सर्व तऱ्हेच्या वैयक्तिक कारणांसाठी (योगसाधनादी) सर्व गोष्टी करत असतात. काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही जण दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काही जणांना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात, योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट अशी की, ईश्वराप्रति आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि ‘त्याची’ जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी व सातत्यानिशी घडवेल. आणि हे खरोखरच सत्य असते, पण असे करणारे फार जण आढळत नाहीत. खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचे धोकेही नसतात. पण इतर प्रेरणा मात्र नेहमीच संमिश्र असतात; अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे भरकटवत राहतात. कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 148), (CWM 07 : 190)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३१

सर्वसाधारणपणे माणसं ज्याला प्रेम असे संबोधतात, ते प्रेम प्राणिक भावना असणारे प्रेम असते; ते प्रेम हे (खरंतर) प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, एक प्रकारच्या अभिलाषेची ती उपजत प्रेरणा असते, तो मालकी भावनेचा आणि एकाधिकाराचा भावावेग असतो. योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीदेखील भेसळ होऊ देता कामा नये. ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे असे प्रेम असता कामा नये. (कारण) ते दिव्य प्रेम नसते.

ईश्वराबद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान (self-giving) असते, त्यामध्ये कोणतीही मागणी नसते. ते शरणभावाने आणि समर्पणाने परिपूर्ण असते. ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही. मत्सर, अभिमान वा राग अशा प्रक्षोभक भावना त्याच्या ठिकाणी आढळत नाहीत, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात.

ईश्वराभिमुख झालेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून ‘दिव्य माता’ खुद्द स्वत:लाच देऊ करते, अगदी मुक्तपणे! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते. दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना परिपूर्णत्व (perfection) आणि परिपूर्तीच्या (fulfillment) दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या कवेमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने तुमच्या अगदी जडभौतिक अंगापर्यंत तुमचा ताबा घ्यावा, अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. येथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!

व्यक्तीने जर खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि ती जर तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असणार नाही. आणि व्यक्तीने जर खरोखरच अशी अभीप्सा बाळगली तर, ती जसजशी अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतशी निश्चितपणे तिला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा-वासना यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग प्रेम ग्रहण करण्याची, धारण करण्याची तुमची जेवढी क्षमता आहे, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे, असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३०

साधक : अभीप्सेचा अग्नी कधीही विझू नये यासाठी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : व्यक्ती जेव्हा तिच्या सर्व अडीअडचणी, तिच्या इच्छावासना, तिच्या सर्व अपूर्णता यांचे त्या अग्नीमध्ये हवन करत राहते तेव्हा त्यामुळे, तो अग्नी तेवत राहतो. अभीप्सेचा हा अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून सकाळ-संध्याकाळ मला अंतःकरणपूर्वक प्रार्थना करा आणि त्या अग्निमधील समिधा म्हणून त्या सर्व गोष्टी मला अर्पण करत जा.

साधक : अभीप्सारूपी या अग्नीची तीव्रता वाढीस लागावी म्हणून मला एकांतवासात जावे असे वाटत आहे. मी एकांतवासात जाऊ का?

श्रीमाताजी : दैनंदिन जीवनाच्या धुमश्चक्रीमध्येच हा अग्नी प्रज्वलित होत राहिला पाहिजे जेणेकरून, तो तुमच्या सर्व गतिविधी सुयोग्य करू शकेल.

साधक : मी माझ्या सर्व गतिविधी तुम्हाला अर्पण करत आहे आणि “माझा अभीप्सा-अग्नी प्रज्वलित राहू दे,’’ अशी प्रार्थना मी तुम्हाला करत आहे.

श्रीमाताजी : जोपर्यंत तुम्ही अभीप्सारूपी ज्योत तेवत ठेवण्याची आस बाळगत आहात तोपर्यंत ती मालवू नये याची काळजी मी घेईन.

साधक : मी त्या ज्योतीवर एकाग्रता करण्याचा खूप प्रयत्न केला, पण, ती ज्योत प्रज्वलित करण्याइतपत माझी अभीप्सा उत्कट नाही.

श्रीमाताजी : अभीप्सेचा अग्नी प्रज्वलित करणे हे तुमचे काम नाही. मी तुम्हाला म्हटले त्याप्रमाणे, तो अग्नी नेहमी मी प्रज्वलित करत असते. तो ग्रहण करण्यासाठी तुम्ही फक्त स्वतःला उन्मुख केले पाहिजे आणि तो अग्नी सद्भावनेने सांभाळला पाहिजे.

श्रीमाताजी (CWM 17 : 126)

जीवन जगण्याचे शास्त्र – २९

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारे विद्यमान असतो; पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जिवाच्या अहंकाराद्वारे कार्य करत असतो. योगामध्ये ईश्वर हाच साधक आणि तोच साधनाही असतो; त्याचीच शक्ती ही तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि आनंद यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करत असते आणि जेव्हा तो आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा त्या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये झिरपवल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते.

परंतु जोपर्यंत साधकाची कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा (aspiration), नकार (rejection) आणि समर्पण (surrender) अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 06)

जीवन जगण्याचे शास्त्र – २८

तुम्ही जे कोणते कर्म कराल ते शक्य तेवढे परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा. मनुष्याच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश्वराची ही सर्वोत्तम सेवा असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 306)

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे. प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी ‘उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्राप्त करून देते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

जीवन जगण्याचे शास्त्र – २७

प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या अभीप्सारूपी संकल्पाची भेट (ईश्वराला) देऊ शकता. “हे प्रभो, सारे काही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे” अशा शब्दांतच ती अभीप्सा शब्दबद्ध होत नाही तर, “जी सर्वोत्तम गोष्ट आहे ती मला शक्य तितक्या चांगल्या रितीने करता येऊ दे,” अशा शब्दात ती अभीप्सा अगदी सहजस्वाभाविक रितीने अभिव्यक्त होते.

सर्वोत्तम गोष्ट कोणती आणि ती कशी करायची हे तुम्हाला प्रत्येक क्षणाला माहीत असतेच असे नाही. परंतु सर्वोत्तम शक्य गोष्ट करण्याच्या दृष्टीने, तुम्ही तुमचा संकल्प ईश्वराच्या हाती सोपवू शकता. त्याचे आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील.

ही गोष्ट चेतनेसहित (with consciousness), प्रामाणिकपणाने आणि चिकाटीने करा. तसे केलेत तर एकेका पल्ल्यामध्ये तुम्ही अफाट प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळून येईल. तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या संकल्पाच्या पूर्ण ताकदीनिशी अगदी अंतःकरणपूर्वक, तळमळीने केल्या पाहिजेत. प्रत्येक क्षणी जे सर्वोत्तम शक्य आहे, तेच केले पाहिजे. इतर काय करतात हा तुमच्या चिंतेचा विषय असता कामा नये. “तो ‘क्ष’ हे असे करत नाही, तर तो तसे करतो,” “तो ‘य’ असे करतो, पण त्याने तसे करता कामा नये,” हे असे कधीही म्हणू नका. कारण ती गोष्ट तुमच्याशी निगडित नाही.

तुम्हाला या पृथ्वीवर एका विशिष्ट उद्दिष्टानिशी एक देह देऊन पाठविण्यात आले आहे. तो शक्य तेवढा सचेत बनविणे, तो ईश्वराचे सर्वाधिक परिपूर्ण आणि सर्वाधिक सचेत साधन बनविणे या हेतुने तुम्हाला देह देण्यात आला आहे. ईश्वराने तुम्हाला मानसिक, प्राणिक, शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रमाणात काही द्रव्यं देऊ केली आहेत. तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, ती द्रव्यं तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असतात. तसेच तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, तिला साजेशी अशीच परिस्थिती तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असते. आणि म्हणून “माझे जीवन अगदी असह्य आहे, जगातील सर्वात दुःखी जीवन माझ्या वाट्याला आले आहे,” असे जे कोणी म्हणतात, ते मूढ असतात. प्रत्येकाला त्याच्या विकासासाठी यथायोग्य असे जीवन देण्यात आलेले असते, त्याच्या संपूर्ण विकसनासाठी जे अनुभव त्याला उपयुक्त ठरतात, तेच अनुभव त्याला प्रदान करण्यात आलेले असतात आणि त्याच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या त्याच्या संपूर्ण साक्षात्कारासाठी साहाय्यकारी ठरतील अशाच असतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 117-118)