(उत्तरार्ध)

आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित होऊ दिले पाहिजे आणि मग तुम्हाला असे आढळेल की तिथे सुसंवादी, प्रकाशमान, सूर्यप्रकाशित हास्याचा जणू झरा वाहत आहे आणि त्याच्यापुढे कोणत्याही सावटाला किंवा दुःखवेदनेला थाराच उरत नाही. वास्तविक, अगदी कितीही मोठ्या अडचणी, कितीही मोठी दुःखं असू देत किंवा कितीही भयंकर शारीरिक वेदना असू देत, तुम्ही जर त्यांच्याकडे तेथून, त्या दृष्टिकोनातून पाहू शकलात, तर तुम्हाला त्या अडचणीची, त्या दुःखाची, त्या वेदनेची असत्यता दिसून येईल आणि तिथे अन्य काही नाही, तर केवळ एक हर्षभरित आणि प्रकाशमय स्पंदन असल्याचे आढळून येईल.

खरेतर, अडचणींचे निराकरण करण्याचा, दुःखाचा परिहार करण्याचा आणि वेदना नाहीशी करण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. यातील पहिल्या दोन गोष्टी (अडचणींचे निराकरण, दुःखाचा परिहार) या तुलनेने सोप्या आहेत. पण शारीरिक वेदना नाहीशी करणे ही गोष्ट काहीशी अधिक कठीण आहे. कारण देह आणि त्याच्या जाणिवा या अत्यंत खऱ्या व मूर्त असतात असे मानण्याची आपल्याला सवय लागलेली असते. परंतु आपला देह हा एक द्रव आहे; तो घडणसुलभ (plastic) आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि तो वर्धनशील आहे असे समजण्याची आपल्याला सवय नसते. कारण ते आपण शिकलेलो नसतो इतकेच. सर्व अंधकार, सर्व अडीअडचणी, सर्व ताणतणाव, सर्व विसंवाद नाहीसे करणारे हे जे प्रकाशमान हास्य असते, आडकाठी निर्माण करणाऱ्या, शोक आणि विलाप करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निरास करणारे, हे जे प्रकाशमान हास्य असते ते हास्य शरीरामध्ये उतरविण्यास आपण शिकलेलो नसतो.

आणि हा सूर्य, दिव्य हास्याचा हा सूर्य, प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असतो. तो त्या सर्व गोष्टींमागील सत्य असतो. हा आंतरिक सूर्य कसा पाहायचा, तो कसा अनुभवायचा आणि तो कसा जगायचा हे आपण शिकलेच पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 10 : 156)

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला जीवन समग्रतेने पाहता येईल. म्हणजे व्यक्तीला फक्त सद्यकालीन जीवनच समग्रतेने पाहता आले पाहिजे असे नव्हे तर, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्या समग्रतेमध्ये ते पाहता आले पाहिजे. म्हणजे जीवन पूर्वी कसे होते, ते आत्ता कसे आहे आणि ते कसे असेल या सर्वच गोष्टी व्यक्तीला नजरेच्या एका टप्प्यात पाहता आल्या पाहिजेत. कारण प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग असतो.

कोणतीही गोष्ट वर्ज्य करता येत नाही, कोणतीही गोष्ट वर्ज्य करता कामा नये, तर प्रत्येक गोष्ट उर्वरित सर्व गोष्टींशी पूर्णपणे सुमेळ राखत, तिच्या योग्य स्थानी ठेवता आली पाहिजे. तसे करता आले तर, कर्मठ मनाला आज ज्या गोष्टी इतक्या ‘वाईट‌’, इतक्या ‘निंद्य‌’, इतक्या ‘अस्वीकारार्ह’ वाटतात, त्याच गोष्टी दिव्य जीवनामध्ये पूर्णतया आनंददायी आणि स्वातंत्र्याचा, मुक्ततेचा अनुभव देणाऱ्या ठरतील.

आणि मग, अनंतत्वाने जीवन जगत असताना, परमेश्वर‌ त्याकडे पाहून जो अपार आनंद घेत असतो ते परमेश्वरा‌चे अद्भुत हास्य जाणून घेण्यापासून, समजून घेण्यापासून, ते अनुभवण्यापासून किंवा ते जगण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. हा आनंद, हे अद्भुत हास्य प्रत्येक सावट, प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःखभोग नाहीसा करते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 10 : 155-156)

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि ती कोणत्याही क्षमतेपेक्षा अधिक मूलभूत महत्त्वाची व अधिक परिणामकारक असते.

आंतरिक हाक, आंतरिक अनुभूती येण्यासाठी आणि आंतरिक उपस्थितीची जाणीव होण्यासाठी बहिर्मुख न राहता, चेतना अंतरंगामध्ये वळविणे हीदेखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 55)

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला आवश्यक गुण आहे विनम्रता!

*

खरी आणि प्रामाणिक विनम्रता हे आपले संरक्षक-कवच असते. अहंकार नाहीसा होणे आवश्यकच असते आणि तो नष्ट करण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे विनम्रता.

*

विनम्रता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सर्वोत्तम संरक्षक-कवचाप्रमाणे असतात. त्यांच्याविना प्रत्येक पावलावर धोका असतो; आणि (साधकामध्ये) या गोष्टी असतील तर विजय निश्चित असतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 153)

आपल्या ‘मी’ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये खरी विनम्रता सामावलेली असते.
*
विनम्र असणे म्हणजे, ईश्वरा‌विना आपल्याला काहीच कळत नाही, आपण कोणीच नाही आणि त्याविना आपण काहीही करू शकत नाही हे मन, प्राण आणि शरीर यांनी कधीही न विसरणे. ईश्वरा‌विना आपण अक्षम आहोत, आपण म्हणजे जणू अज्ञान व गोंधळ आाहोत; आपण कोणीच नाही हे आपल्या मन, प्राण आणि शरीर यांनी कधीही न विसरणे म्हणजे विनम्र असणे. केवळ ईश्वर हाच सत्य असतो. तोच जीवन, शक्ती, प्रेम आणि आनंद असतो.

आणि म्हणून, मन, प्राण व शरीर यांनी एकदाच आणि कायमसाठी हे शिकले पाहिजे, अनुभवले पाहिजे की, ईश्वराला समजून घेण्यास आणि त्याचे मूल्यमापन करण्यास ते (मन, प्राण आणि शरीर) सर्वथा अक्षम आहेत; ईश्वराच्या केवळ सारतत्त्वाला जाणून घेण्यात नव्हे तर, त्याला त्याच्या कृतीमध्ये आणि आविष्करणामध्ये जाणून घेण्यातही ते अक्षम आहेत, (याची त्यांना जाणीव असणे) हीच खरी विनम्रता होय. या विनम्रतेसोबत अविचलता आणि शांती येते. सर्व विरोधी हल्ल्यांपासून संरक्षण करणारे खात्रीशीर चिलखत हेच असते.

खरंच, शत्रू नेहमी मनुष्यामधील गर्वाचे दारच ठोठावत राहतो, कारण हे गर्वाचे दारच शत्रुला आत शिरकाव करण्याची संधी देते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 152-153)

 

तुमच्यापैकी बहुतेक जण तुमच्या व्यक्तित्वाच्या पृष्ठस्तरावर जीवन जगत असता आणि त्यामुळे तुमच्यावर बाह्य प्रभावांचा सहज परिणाम होतो. तुम्ही जणू तुमच्या स्वतःच्या शरीराबाहेर प्रक्षेपित (projected) होऊन, जीवन जगत असता आणि तशाच तऱ्हेने प्रक्षेपित झालेला दुसरा कोणी त्रासदायक माणूस तुम्हाला भेटला की तुम्ही अस्वस्थ होता. हा सगळा त्रास उद्भवतो कारण तुम्हाला दोन पावलं मागे घेण्याची, अंतरंगात वळण्याची (stepping back) सवय नसते.

तुम्ही नेहमी स्वतःमध्ये, स्वतःच्या आतमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही अंतरंगामध्ये खोलवर जाण्यास शिकले पाहिजे. अंतरंगामध्ये प्रवेश करा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित व्हाल. तुम्ही बाह्य जगामध्ये वावरत असणाऱ्या वरकरणी शक्तींच्या आहारी जाऊ नका. अगदी जेव्हा तुम्ही काहीतरी करण्याच्या घाईगडबडीत असता तेव्हासुद्धा क्षणभर अंतरंगात वळा आणि मग तुमचे तेच काम किती लवकर आणि किती चांगल्या रितीने करता येते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्यावर जर कोणी रागावले तर, त्याच्या त्या रागाच्या स्पंदनांचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका; केवळ अंतरंगामध्ये वळा म्हणजे मग त्या व्यक्तीच्या रागाला कोणताही आधार न मिळाल्यामुळे किंवा कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे, तिचा राग मावळून जाईल. कायम शांती बाळगा, तिचा भंग करणाऱ्या साऱ्या प्रलोभनकारी आवेगांचा प्रतिकार करा.

अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ नका. अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय एक शब्ददेखील बोलू नका. अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय घाईगडबडीने कोणतीच कृती करू नका.

सामान्य जगाशी संबंधित असणारे सारेकाही अस्थायी आणि क्षणभंगुर असते आणि त्यामुळे त्यामध्ये अस्वस्थ होण्यासारखे काहीच नसते. जे टिकाऊ आहे, जे शाश्वत आहे, जे अमर्त्य आणि अनंत आहे तेच खरेतर प्राप्त करण्यायोग्य असते, तेच विजय प्राप्त करून घेण्यायोग्य आणि तेच हस्तगत करण्यायोग्य असते. ते म्हणजे ‘दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम, दिव्य जीवन’ आहे. तेच परम शांती, परिपूर्ण हर्ष आणि संपूर्ण आविष्करण‌ यांसहित या पृथ्वीवरील सर्व-प्रभुत्व‌सुद्धा आहे; ते शिखरस्थानी आहे. जेव्हा तुम्हाला वस्तुंच्या सापेक्षतेची जाणीव होते तेव्हा काहीही घडले तरी, तुम्ही दोन पावलं मागे होऊन, अंतरंगात डोकावून बघू शकता; तुम्ही अविचल राहून, दिव्य शक्ती‌ची आळवणी करू शकता आणि तिच्या प्रतिसादाची वाट पाहू शकता. तेव्हा नक्की काय केले पाहिजे ते तुम्हाला नेमकेपणाने उमगेल.

म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही अगदी शांतचित्त असल्याशिवाय तुम्हाला दिव्य शक्तीच्या प्रतिसादाचे आकलन होणार नाही. आंतरिक शांतीचा अभ्यास करा, किमान थोडीतरी सुरुवात करा आणि जोवर ती सवय तुमच्या अंगवळणी पडत नाही तोवर तुमचा सराव चालूच ठेवा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 160)

(उत्तरार्ध)

तुम्ही ज्यावेळी एकाएकी आपसूकपणे ध्यानात शिरता तेव्हा ते इतके स्वाभाविक असते की ते टाळताच येत नाही, असे ध्यान हे सर्वोत्तम ध्यान असते. अशा वेळी तुम्हाला कोणता पर्यायच नसतो, एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. ध्यानामध्ये अशी तुमची पकड घेतली जाण्यासाठी तुम्ही अरण्यामध्ये एकांतवासात असणे गरजेचे नसते. जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा तुम्हाला खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ईश्वरी कृपा तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि त्यामुळे आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. बाह्य परिस्थिती कशीही असली तरीदेखील, त्या शाश्वत‌, अनंत अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या परमेश्वराला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

(पूर्वार्ध)

बरेचदा असे आढळते की, ध्यानधारणादी करण्यासाठी जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या पशुपक्ष्यांशी, झाडांशी मैत्री होते. म्हणजे केवळ एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची आणि परमसत्याशी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते, असे अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला अन्य काहीच करण्यासारखे नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित योगयुक्त राहणे सोपे असेलही पण मला काही ते तितकेसे पटत नाही. कारण व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढते. (आणि त्यात गुंतून पडू शकते.) मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींना ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते; ईश्वरी कृपे‌ने जी बाह्य परिस्थिती प्रदान केली आहे त्या परिस्थितीमध्ये राहूनच जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील शाश्वत अस्तित्वा‌सोबत एकांतात राहण्याचा प्रयत्न करत असते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा पर्याय आकर्षक असला तरी, तो त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते आणि त्या मानसिकतेपोटी ते म्हणत असतात, ”झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे आणि बोलण्याची किंवा काहीतरी करण्याची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल नाही?” या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

(उत्तरार्ध)

स्वत:बद्दल विचार करत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, स्वत:साठी काय चांगले आहे व काय वाईट, कोणत्या गोष्टीला मुरड घालायची आणि कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, यासारखे विचार सतत करत बसणे या गोष्टी किती थकविणाऱ्या आहेत; किती कंटाळवाण्या, रटाळ, किती अळणी आहेत या! त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाशासमोर, परम प्रेमासमोर, स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारेकाही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचे संचालन करू शकतो (अशा परमेश्वरासमोर) स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत. ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही? कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती तसे करायचे विसरून जाते, आणि मग जुन्याच सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून बसलेली असते. ती कानात कुजबुजते की, “बघ हं! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.’’ आणि तुम्ही एवढे मूढ असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही फक्त स्वत:कडे लक्ष द्यायला लागता आणि मग सगळेच बिघडून जाते. मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि ‘चिंता करू नका,’ ही गोष्ट त्यांना पुन्हा शिकवावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 256-257)

(पूर्वार्ध)

‘सुजाण व्हा’ असे सांगण्यासाठी सर्वसाधारणपणे जी कारणे सुचविली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात, असे मला नेहमी वाटत आले आहे. उदाहरणार्थ, “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” …परंतु यामुळे चेतना अधिकाधिक शुष्क बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदनेला घाबरत असते.

(म्हणून तसे सांगण्याऐवजी) असे सांगितले गेले पाहिजे की, चेतनेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायाविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात. अशी स्थिती अभीप्सेद्वारे आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, तर व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. या अवस्थेमध्ये स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वरावर सोपविलेले असते. (परमेश्वरावर सारे काही सोपविले असल्यामुळे) स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, (परमेश्वराखेरीज अन्य कशाचाही विशेषत:) स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक अवर्णनीय आनंद असतो.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 256)