पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे करून पाहण्याची क्षमता, स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहण्याची, स्वतःचा शोध घेण्याची क्षमता; ही अशी क्षमता आहे की, ज्यामुळे मनुष्य स्वतः ईश्वर-स्वरूप होऊ शकतो.

परंतु वरकरणी दृश्यामध्ये, बाह्य देखाव्यामध्येच दंग होऊन राहणाऱ्या मनुष्याला या असामान्य क्षमतेची जाणीव नसते. बहुतांश व्यक्तींचे जीवन जन्म, बालपण, शिक्षण, तारुण्य, नोकरी-व्यवसाय, लग्न, मुलेबाळे, थोडीफार समाजसेवा, लोकसंपर्क, सणसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रम, मनोरंजन, राजकारणाच्या गप्पा, थोडी मौजमजा, पर्यटन, वृद्धापकाळ, आजारपण, मृत्यू या चाकोरीतूनच जात असते. जीवनाचे रहाटगाडगे अविरत चालू राहते आणि या चक्रावर व्यक्ती अविरतपणे फिरत राहते.

कधीतरी ईश्वरी कृपेमुळे व्यक्तीची या रहाटगाडग्याच्या पलीकडे दृष्टी वळते. आपल्या जगण्याचा, या जीवनाचा अर्थ काय याचा विचार मनाला स्पर्श करू लागतो. हे विश्व कोणी निर्माण केले, खरंच ईश्वर आहे का, असेल तर तो मला भेटू शकेल का, त्याला भेटण्याचा मार्ग कोणता हे व यासारखे अनेक प्रश्न व्यक्तीला पडू लागतात. तेव्हा व्यक्ती या प्रश्नांचा शोध घेऊ लागते. वाचन, श्रवण, विचारविनिमय या माध्यमातून व्यक्ती ती उत्तरे शोधायचा प्रयत्न करते. आणि मग कधीतरी बाह्य रूपांच्या पलीकडे जात, व्यक्तीची दृष्टी अंतरंगामध्ये वळू लागते तेव्हा परमेश्वराचे अपार वैभव तिच्या नजरेस पडू लागते.

यातील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपणही करू या का? चला तर मग, समजावून घेऊ या उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘अंतरीचा शोध’ या मालिकेतून. या मालिकेचे वाचक स्वागत करतील ही आशा आहे.

संपादक, अभीप्सा मराठी मासिक