(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित सावित्रीया महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती. हुता यांनी सांगितलेली एक आठवण…)

२८ जून १९६८ रोजी श्रीमाताजींनी सावित्रीमधील काही काव्यपंक्तींचे वाचन केले आणि त्याचे विवरण केले; मी ते ध्वनिमुद्रित करून घेतले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवून घेतले आणि मला ध्यान करण्यास सांगितले. मी डोळे मिटते न मिटते तोच, एक असीम शांती माझ्यामध्ये अवतरली आणि माझ्या सर्वांगाला तिने जणू लपेटून घेतले.

काही वेळाने श्रीमाताजींनी डोळे उघडले आणि माझ्याकडे हसून पाहत त्या म्हणाल्या, “तुला मातृमंदिर परिसराच्या मध्यभागी असलेले ते वडाचे झाड माहीत आहे ना? तिथे तू त्या झाडाखाली बसली आहेस आणि त्या झाडाच्या फांद्यांवरून खाली आलेल्या फुलांच्या माळा सर्वत्र तुझ्या आजूबाजूला हलत-डुलत आहेत, असे आत्ता मला ध्यानात दिसले. वरून तुझ्यावर फुलांचा वर्षावसुद्धा होत होता. आणि तू अगदी शांत होतीस.

श्रीमाताजींचा तो दृष्टान्त मी चित्रामध्ये उतरविला. त्यांनी चित्रामध्ये मला काही किरकोळ फेरफार करायला सांगितले आणि त्यानुसार मी ते बदल केले. माझ्या चित्रामध्ये मी काही खारी, एक हरीण आणि ससासुद्धा काढलेला होता, ते सारे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते चित्र पाहून त्या आनंदित झाल्या होत्या. काही काळ चित्त एकाग्र करून नंतर, त्यांनी एका कागदावर पुढील शब्द लिहिले आंतरिक जीवन.श्रीमाताजींनी आंतरिक जीवनाविषयी लिहिले होते की, “व्यक्तीने एकदा आंतरिक जीवनाचे माधुर्य अनुभवले की नंतर मग तिचे इतर कशानेच समाधान होणार नाही.

हिंदू परंपरेमध्ये वडाच्या झाडाला ज्ञानवृक्षअसे म्हणतात. श्रीमाताजींनी या वृक्षाला ऐक्यअसे नाव दिले. या वृक्षाभोवती संगमरवरी आसनं असावीत आणि लोकांनी तिथे बसून शांतपणे ध्यान करावे, अशी इच्छा श्रीमाताजींनी व्यक्त केली होती. आज आपल्याला तेथे तशी व्यवस्था पाहायला मिळते.

आधारित (The spirit of Auroville 79-81)

श्रीमाताजी : मागे एकदा मी तुमच्याशी, मला माहीत असलेल्या एका गूढवाद्याविषयी बोलले होते. तो स्वतःच्या पद्धतीने हुशार मनुष्य होता. लोक त्याच्याकडे येत असत आणि त्याला विचारत असत, “प्रथम आम्हाला हे सांगा की, हे विश्व अस्तित्वात का आहे?”

तो उत्तर देत असे, “त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे?”

त्यावर लोक म्हणत असत, “पण हे विश्व आत्ता जसे आहे, ते तसेच का आहे?”

त्याचे उत्तर ठरलेले असे. तो म्हणत असे की, “आहे हे असे आहे, त्याने तुम्हाला काय फरक पडतो ?”

मग त्यावर लोकं म्हणत असत, “आम्हाला तरी हे काही समाधानकारक वाटत नाही.

(हा किस्सा सांगून झाल्यावर श्रीमाताजी पुढे म्हणतात) …तर ज्यांना हे विश्व समाधानकारक वाटत नाही, त्यांना मी असे म्हणेन की, ”गोष्टी जशा आहेत तशाच आहेत. तुम्ही करण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी तुम्ही काम करायला सुरूवात करा. ते समाधानकारक वाटावे, ते चांगले व्हावे यासाठीचा मार्ग तुम्ही शोधून काढा. येथे काहीतरी काम करण्यासारखे आहे. काम करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की, ते किती रोचक आहे. तुम्ही ज्या द्रव्याने बनला आहात त्या, एका द्रव्याच्या छोट्या समुच्चयाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. अंतरंगामध्ये प्रवेश करा आणि गुरूकिल्ली शोधून काढा. तुम्हाला केवळ अंतरंगामध्ये आत खोलवर जायचे आहे.ते तुमच्या फारच आवाक्याबाहेरचे आहे, ते तुमच्यापेक्षा खूपच विशाल आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुमच्या छोट्याशा व्यक्तित्वाच्या अंतरंगात प्रवेश करा म्हणजे मग, सर्व द्वारे खुली करणारी एक गुरु किल्ली तुम्हाला आतमध्ये सापडेल.”

श्रीमाताजी (CWM 05 : 39-40)

श्री अरविंद एक आठवण सांगत आहेत…

वीस वर्षांपूर्वी नेव्हिनसन (१९०७ साली झालेल्या सुरत काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले एक ब्रिटिश पत्रकार) यांनी घाबरून जाऊन माझ्याविषयी एक विधान केले होते, “भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष – कधीही न हसणारा माणूस.” त्यांनी त्यामध्ये एका वाक्याची भर घालायला हवी होती, “जो नेहमी हास्यविनोद करत असतो.” पण माझा हा पैलू त्यांना माहीत नव्हता कारण मी त्यांच्याबरोबर वावरताना नेहमीच गंभीर असे किंवा कदाचित तेव्हा माझी विनोदबुद्धी पुरेशी विकसित झाली नसेल.

श्रीअरविंद (CWSA 35 : 51)

*

(अमल किरण हे श्रीअरविंदांचे एक ज्येष्ठ अनुयायी होते. अमल यांची जडणघडण पाश्चात्त्य पद्धतीच्या शिक्षणाद्वारे झाली होती आणि त्यामुळे त्यांना पडणारे सर्व प्रश्न हे एक तर तात्त्विक असत नाहीतर साहित्यविषयक असत. अमल किरण येथे श्रीअरविंद यांच्याशी संबंधित एक प्रसंग कथन करत आहेत.)

एके दिवशी मी श्रीमाताजींना सांगितले की, “श्री अरविंद लिखित दिव्य जीवन हा ग्रंथ पुरेसा तार्किक नाहीये. त्या आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागल्या. आणि मला म्हणाल्या, “असे म्हणणारे तुम्ही पहिलेच गृहस्थ आहात.”

पुढे पहिल्या दर्शनाच्या वेळी मी जेव्हा श्रीअरविंदाच्या समोर उभा होतो तेव्हा माताजींनी तो प्रसंग श्रीअरविंदांना सांगितला. त्या म्हणाल्या, “अमल किरण काय म्हणत आहेत ते ऐकलेत का?” माझे म्हणणे मी श्रीअरविंदांसमोर मांडले. ते ऐकल्यावर श्रीअरविंद यांनी अस्फुट स्मित केले आणि संमतीदर्शक मान हलवली. ती त्यांची पद्धतच होती. ते फारसे बोलत नसत किंवा फारसे व्यक्तही होत

नसत.

आधारित (Light and laughter by Amal Kiran : 14)

*

मुलं लहान असताना त्यांच्या मनामध्ये हे जग सुंदर करण्याची एक स्वाभाविक प्रेरणा असते, ऊर्मी असते. मात्र, बरेचदा मोठी माणसं त्यांना जीवनाचा जो कटू अनुभव आलेला असतो, त्या आधारे मुलांच्या या आदर्शवादी स्वप्नांवर पाणी फिरवतात. पण तसे केल्याने मुलं अशी आदर्शवादी स्वप्नं पाहणेच सोडून देण्याची शक्यता असते. उलट, लहानपणीच्या स्वप्नांना रुजू दिले तर पुढे मोठेपणी ती स्वप्नं कदाचित वास्तवात उतरू शकतात, असा श्रीमाताजींच्या म्हणण्याचा आशय आहे. आणि याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या स्वतःच्या बाबतीतलेच आहे. त्या काय सांगतात ते पाहू, “मी अशा अनेक व्यक्तींच्या संपर्कात आले होते की ज्यांच्यामध्ये जे सखोल व सत्यतर आहे अशाविषयी एक उत्कट आंतरिक आस होती, एक तळमळ होती, परंतु जीवन जगण्यासाठी म्हणून जी धडपड करावी लागते त्यामुळे ते अगदी जखडले गेले होते आणि त्यांचा सगळा वेळ व ऊर्जा त्यामध्येच खर्च होत असे आणि त्यामुळेच ते आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकत नसत. तेव्हा मी खूपच लहान होते. मी तेव्हा नेहमी माझ्या मनाशी म्हणत असे की, जर मला तशी संधी मिळाली तर मी एक लहानसे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. भलेही ते जग अगदी छोटे असेल, परंतु त्या  जगातील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या व यांसारख्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी दिवसभर गुंतून पडावे लागणार नाही. भौतिक जीवनाच्या गरजांची सारी पूर्तता झाल्यानंतर तरी व्यक्ती अगदी सहजस्वाभाविकपणे तिच्या सर्व ऊर्जा आंतरिक साक्षात्काराकडे आणि दिव्य जीवनाच्या दिशेने वळवू शकते का, हे मला पाहायचे होते. माझ्या जीवनाच्या मध्यावर, मला तशी साधनं देण्यात आली आणि मग मला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळाली. ”

श्रीमाताजींना मिळालेली ही संधी म्हणजे श्रीअरविंद आश्रमाच्या निर्मितीची संधी! या आश्रमातील साधकांना स्वतःच्या भौतिक गरजांबाबत, सुखसुविधांबाबत कोणतीही काळजी करावी लागत नाही आणि ते त्यांचा वेळ ईश्वरोपासना, आत्मसाक्षात्कार आणि श्रीअरविंद- कार्य यासाठी देऊ शकतात, हे आपल्याला माहीत आहे.

  • आधारित (CWM 08 : 160-161)

कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा रीतीने पुष्कळ लोकांचे आजार त्यांनी बरे केले होते, त्यामुळे डॉक्टर कूए विख्यात झाले होते.

त्यासंबंधी श्रीमाताजींनी एक किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, माझ्याकडे एक स्त्री येत असे, तिचे केस प्रचंड प्रमाणात गळत असत. आता लवकरच तिला टक्कल पडेल अशी तिची स्थिती झाली होती. त्याच सुमारास कोणीतरी तिला डॉ. कूए यांच्या उपचारप्रणालीची माहिती दिली. तिने तो प्रयोग करायला सुरुवात केली. केस विंचरताना, ती स्वतःच्या मनाशी असा विचार करत असे की, “माझे केस गळणार नाहीत.” पहिल्या एक दोन वेळेला त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण तिने तो प्रयोग नेटाने चालू ठेवला. प्रत्येक वेळी केस विंचरण्यापूर्वी ती निश्चयपूर्वक “मी माझे केस आता विंचरणार आहे पण ते गळणार नाहीत.” असा विचार करत असे. आणि खरोखरच महिन्याभरात तिचे केस गळणे थांबले. नंतर तिने असा विचार करायला सुरुवात केली की, “आता माझे केस वाढत आहेत.” आणि ती त्यामध्ये कमालीची यशस्वी झाली ; खरोखरच मी तिचे वाढलेले केस पाहिले.

मात्र यातील मेख एवढीच की, अशा प्रकारची विचार-रचना करत असताना, तुमच्या मनाच्या दुसऱ्या भागाने असे म्हणता कामा नये की, “मी तसा विचार करत आहे खरा, पण त्याचा काही उपयोग होईल की नाही कोण जाणे?” तुम्ही जर असा निराशावादी विचार केलात तर अशा विचारांनी तुम्ही तुमचे काम स्वतःच वाया घालविता.

श्रीमाताजी पुढे म्हणतात, लोक चुकीच्या पद्धतीने विचार करण्यात त्यांचा वेळ व्यर्थ घालवतात. त्यांची मानसिक क्रिया ही सर्वसामान्यतः अर्धी निराशावादी आणि अर्धी विघातक असते. त्यांनी जे काही केले आहे त्याचे कसे भयानक त्रासदायक परिणाम घडून येतील आणि कोणकोणत्या वाईट गोष्टी घडू शकतील अशा प्रकारची कल्पना करण्यामध्ये ते त्यांचा बहुतांशी वेळ घालवितात. पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा सकारात्मक उपयोग केला असता तर साहजिकच त्यांना त्याचे चांगले परिणाम अनुभवास आले असते.

  • श्रीमाताजी (CWM 07 : 04-05)

माझा एक मित्र होता, त्याला रात्रीच्या वेळी झोपेत स्वतःच्या प्राणिक देहामधून बाहेर जायची सवय होती. त्याने मला एकदा तक्रारवजा सुरात सांगितले की अशा वेळी त्याला नेहमीच एका ढाण्या वाघाशी सामना करावा लागत असे आणि त्यामुळे मग त्याची ती सारी रात्र बेचैनीत जात असे. मी त्याला त्याची सगळी भीती काढून टाकायला सांगितली. आणि “सरळ त्या श्वापदाकडे चालत जा आणि त्याच्या चेहऱ्याकडे एकटक रोखून बघत राहा,” असे सांगितले, अर्थातच “आवश्यकता पडली तर मदतीसाठी धावा कर”, असेही सांगितले. त्याने तसे केले आणि अहो आश्चर्य! त्या वाघाचे रूपांतर अचानक एका अगदी किरकोळ अशा मांजरामध्ये झाले.

एखाद्या प्राणिक अस्तित्वाच्या डोळ्यांमध्ये डोळे मिसळून निर्भयपणे एकटक पाहत राहण्याचा काय जादुई परिणाम घडून येतो, त्याची तुम्हाला कल्पना नाहीये. अगदी या पृथ्वीवर, प्राणिक शक्तींचा अवतार असे ज्यांना म्हणता येईल, ज्याला आपण सहसा प्राणी असे म्हणतो, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने हाताळाल तर, तुम्हाला अगदी सहजी प्रभुत्व मिळण्याची खात्री बाळगता येईल. तुम्ही तीळमात्रही न डगमगता, न घाबरता जर प्रत्यक्ष एखाद्या वाघाच्या डोळ्याला डोळा भिडवून थेटपणे पाहू शकलात तर, तो वाघसुद्धा तुमच्यापासून पळ काढेल. यत्किंचितही न घाबरता जर तुम्ही सापानी रोखलेल्या नजरेला नजर भिडवू शकलात तर, तो साप तुम्हाला कधीच चावू शकणार नाही. पण जर का पाय लटलट कापत असतील आणि केवळ नजर एकटक खिळलेली असेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमच्यामध्ये अजिबात अस्वस्थता असता कामा नये. तुम्हाला भीती वाटावी म्हणून, तो आपला फणा उभारून, तुम्हाला आकर्षित करत राहतो तेव्हा, तुम्ही अगदी शांत आणि एकाग्र असले पाहिजे.

मानवाच्या डोळ्यांमध्ये असलेल्या प्रकाशाविषयी प्राणी सतर्क असतात आणि हा प्रकाश जर माणसं योग्य रीतीने प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये टाकू शकली तर, प्राण्यांना तो प्रकाश सहन करणे अशक्य होते. माणसांच्या नजरेमध्ये एक शक्ती सामावलेली असते; माणसाची नजर जर स्थिर आणि निर्भय असेल तर, त्या शक्तीमुळे प्राणी निष्प्रभ होतात. सारांशरूपाने सांगावयाचे तर, दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या अशा की, कधीही, अगदी कधीही घाबरता कामा नये आणि तुमची ताकद शंभर पटीने अधिक वाढावी म्हणून सर्व परिस्थितीमध्ये योग्य त्या मदतीसाठी ईश्वराचा धावा केला पाहिजे.

  • श्रीमाताजी (CWM 03:166)

मांजरीचे एक छोटेसे पिल्लू होते. मांजरीने त्याला तोंडात धरलेले होते. पण अचानक त्या पिल्लाने तिच्या तोंडातून बाहेर उडी मारली आणि ते पिल्लू विंचवाबरोबर खेळू लागले. पिल्लाने त्या विंचवाबरोबर खेळण्याला मांजरीचा विरोध होता; पण त्याने तिचे काही ऐकले नाही. आणि मग विंचवाने त्याच्या स्वभावाप्रमाणे मांजरीच्या त्या पिल्लाला दंश केला. ते किंचाळले, ओरडू लागले.

ते धावतपळत आईकडे आले आणि त्याने तिला त्या विंचवाविषयी सर्वकाही सांगितले.

तेव्हा मांजरीने विचारले, ”मग तू मला सोडून का पळालास?”

विरोधी शक्ती या विंचवाप्रमाणे असतात. त्या खरोखरच अनिष्ट असतात. मात्र तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीत किंवा त्यांचे ऐकले नाहीत तर, त्या विरोधी शक्तींचा नाश करता येणे शक्य असते. विरोधी शक्ती जेव्हा चुकीच्या सूचना देतात तेव्हा माणसांनी सातत्याने त्यांना नकार दिला पाहिजे. नाहीतर मग या विरोधी शक्ती सर्वच गोष्टींचा विनाश घडवून आणतील…

राग, तिटकारा, अगणित इच्छावासना आणि त्यासारख्या अनेक वायफळ गोष्टींच्या माध्यमातून, या विरोधी शक्ती माणसांच्या मेंदूपर्यंत कशा जाऊन पोहोचतात ते मला माहीत आहे. सर्वप्रथम, राग पायांना पकडतो, मग हळूहळू तो वर नाभीपर्यंत जाऊन पोहोचतो, तेथून हृदयापर्यंत आणि सरतेशेवटी मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यातून माणसांचे अतोनात नुकसान होते. एकदा का राग मेंदूपर्यंत गेला की मग, माणसाला स्वत:वर ताबा ठेवणे कठीण होऊन बसते. म्हणून तो आत येण्यापासूनच त्याला अडवले पाहिजे. म्हणजे मग त्यावर मात करणे सोपे होते.

– श्रीमाताजी
(Mother you said so : 11.01.63)

इच्छापूर्तीपेक्षा इच्छेवर विजय मिळविण्यामध्ये अधिक आनंद आहे असे बुद्धाने म्हटले आहे. हा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो, कारण तो अनुभव खरोखरच रोचक असतो.

कोणा एका स्त्रीला पॅरीसमध्ये मॅसिनेटच्या ऑपेराच्या पहिल्या प्रयोगाला बोलाविण्यात आले होते. बहधा मॅसिनेटच्या…हो बहुधा, आता मला नक्की आठवत नाही की तो कोणाचा ऑपेरा होता. त्याचा विषय उत्तम होता, प्रयोगही उत्तम होता, संगीतही ठीकठाक होते. कलाक्षेत्राच्या मंत्रिमहोदयांना सरकारी नाट्यगृहात जेथे नेहमी जागा राखीव ठेवलेली असते त्याठिकाणी त्या स्त्रीला प्रथमच निमंत्रित करण्यात आले होते. हे जे मंत्रिमहोदय होते ते अगदी साधेसुधे गृहस्थ होते, ते गावाकडून आलेले होते, त्यांनी पॅरिसमध्ये फार काळ वास्तव्य केलेले नव्हते, ते मंत्रिमंडळातसुद्धा नवीनच होते, तेव्हा नवनवीन गोष्टी पाहण्या-अनुभवण्यामध्ये त्यांना खरोखर बालसुलभ आनंद मिळत असे. ते अगदी सौजन्यशील गृहस्थ होते आणि त्यांनीच त्या स्त्रीला त्या प्रयोगाला निमंत्रित केलेले असल्यामुळे त्यांनी तिला पहिल्या रांगेतील खुर्ची देऊ केली आणि ते स्वत: मागील खुर्चीवर वसले. पण ते अतिशय खट्टू झाले कारण तेथून त्यांना पुढचे काहीच दृश्य दिसत नव्हते. ते पुढे झुकून, पण तिला कळणार नाही अशा बेताने, समोरील दृश्य पाहण्याचा यथाशक्य प्रयत्न करीत होते. त्या स्त्रीच्या हे लक्षात आले.

वास्तविक, ती पण त्या ऑपेरामध्ये रममाण झाली होती, तिलाही तो ऑपेरा आवडला होता, तिला तो प्रयोग खरंतर खूप आवडला होता पण त्या मंत्रिमहोदयांना तो प्रयोग नीट दिसत नसल्यामुळे ते किती खट्टू झाले आहेत हेही तिला समजत होते. तेव्हा तिने अगदी सहजतेने, तिची खुर्ची मागे घेतली, ती जणू दुसऱ्याच कशाचा तरी विचार करीत आहे असे भासवून थोडीशी मागे रेलली आणि ती अशा रीतीने मागे सरकली की, त्यामुळे त्या मंत्रिमहोदयांना पुढे चाललेला सारा प्रयोग दिसू लागला.

जेव्हा ती अशा रीतीने मागे सरकली आणि समोरील दृश्य पाहण्याची सर्व इच्छा तिने सोडून दिली तेव्हा वस्तूंच्या आसक्तीतून मुक्त झाल्यामुळे, एक प्रकारच्या शांतीने, एका आंतरिक आनंदाच्या जाणिवेने तिचे हृदय भरून गेले; स्वत:चेच समाधान पाहण्यापेक्षा, कोणासाठी काहीतरी केल्याच्या भावनेने ती समाधानी झाली. तिने तो ऑपेरा पाहिला-ऐकला असता तर तिला जो आनंद मिळाला असता त्यापेक्षा, अनंतपटीने अधिक आनंद तिला त्या संध्याकाळी गवसला. हा खराखुरा अनुभव आहे, पुस्तकात वाचलेली एखादी गोष्ट नाही. ती स्त्री त्या काळात बुद्धाच्या शिकवणुकीचा अभ्यास करीत होती आणि तिने हा जो प्रयोग करून पाहिला तो त्या शिकवणीशी मिळताजुळता होता.

आणि हा अनुभव इतका सघन होता, इतका खराखुरा होता… दोन क्षणांनंतर तर तो ऑपेराचा प्रयोग, ते संगीत, ते अभिनेते, ते दृश्य, ती चित्रं सारे सारे तिच्या लेखी अगदी गौण बनून गेले, अगदीच बिनमहत्त्वाचे बनून गेले. त्याच्या तुलनेत स्वत:मधील कोणत्यातरी गोष्टीवर प्रभुत्व मिळविल्यामुळे आणि नि:स्वार्थपणाने केलेल्या कृतीमुळे तिच्या मनामध्ये एक अतुलनीय शांती, आनंद भरून राहिला. अत्यंत आनंदादायी असा तो अनुभव होता. अर्थात, हा काही व्यक्तिगत, खाजगी अनुभव नाही. जो जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला त्याला हा असाच अनुभव येईल.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 37-38)

ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ या ग्रंथामधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे घडले त्याविषयी श्रीमाताजींनी सांगितले की, “या संध्याकाळी दिव्य अस्तित्व, अगदी सघन, मूर्त स्वरूपात तुमच्यामध्ये उपस्थित होते. मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता; या विश्वापेक्षा मी विशाल झाले होते. मी एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्णदरवाज्यासमोर उभी होते, ह्या दरवाजाने विश्वाला ईश्वरापासून अलग केले होते. मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले, “वेळ आली आहे.” माझ्या दोन्ही हातांनी मी एक भला मोठा सुवर्ण हातोडा उचलला आणि जोरात त्या दरवाजावर मारला आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडेतुकडे झाले. तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश, त्याची शक्ती, त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला.”

ध्यान संपल्यानंतर परत जेव्हा दिवे लागले तेव्हा बसलेले सगळे उठले आणि उठून रोजच्याप्रमाणे जाऊ लागले, जणू काही घडलेच नव्हते… श्रीमाताजी म्हणतात, “या शक्तीच्या अवतरणाची जाणीव फक्त पाच जणांनाच झाली होती, त्यावेळी त्यातील दोघं जण आश्रमात होते आणि तिघे जण बाहेर होते.”

…यानंतर दोन महिन्यांनी श्रीमाताजींनी एक संदेश दिला :

“हे ईश्वरा, तू संकल्प केलास आणि मी तो कृतीत उतरविला.
ह्या पृथ्वीवर एक नूतन प्रकाश फाकला आहे;
एक नूतन विश्व जन्माला आले आहे.
ज्या गोष्टींचे वचन देण्यात आले होते त्यांची परिपूर्ती झाली आहे.”

– आधार : (Beyond Man by Georges Van Vrekhem : 317-318)

पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये श्रीमाताजी पाँँडिचेरी येथे राहात होत्या, तेव्हाची गोष्ट त्या कथन करत आहेत.. “मी तेव्हा ड्युप्लेक्स स्ट्रीटवर राहत असे आणि समोरच्या बाजूला गेस्ट हाऊसमध्ये श्रीअरविंदांची खोली होती. श्रीअरविंदांच्या खोलीकडे तोंड करून, सकाळच्या वेळी, मी ध्यानाला बसत असे. अशीच एकदा मी माझ्या खोलीत बसून ध्यान करत होते, पण माझे डोळे मिटलेले नव्हते.

माझ्या खोलीत काली प्रवेश करत असलेली मला दिसली, तेव्हा मी तिला विचारले, “तुला काय हवे आहे?”

ती अगदी रौद्ररूपात नृत्य करत होती. ती मला म्हणाली, “मी पॅरिस घेतले आहे; आणि आता लवकरच पॅरिसचा विनाश होईल.”

तेव्हा आमच्यापर्यंत युद्धाच्या बातम्या पोहोचत नसत. मी तेव्हा ध्यानातच, अगदी शांतपणे, पण खंबीरपणे तिला म्हटले, ”नाही, पॅरिस घेता येणार नाही, पॅरिस वाचेल.” तेव्हा तिने वेडीवाकडी तोंडं केली पण ती निघून गेली.

आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तार मिळाली; त्यात लिहिले होते, जर्मन सैन्य पॅरिसच्या दिशेने कूच करत होते, पण पॅरिसचे रक्षण करण्यास तेथे कोणीच नव्हते, काही किलोमीटर ते पुढे गेले असते तर, आख्खे पॅरिस त्यांना हस्तगत करता आले असते. परंतु रस्ते मोकळे आहेत हे पाहिल्यावर तसेच, सैन्याला विरोध करण्यासाठी कोणीच नाही हे लक्षात आल्यावर, त्यांची अशी खात्रीच पटली की, काहीतरी घातपात दिसतो आहे, काहीतरी व्यूहरचनेचा हा भाग दिसतोय…असे वाटून त्यांनी पाठ फिरवली आणि आल्या पावली जर्मन सैन्य चालू पडले. आणि जेव्हा फ्रेंच सैन्याच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्या सैन्याचा पाठलाग केला आणि मग निर्णायक लढाई झाली. त्यांना रोखण्यात आले होते.

हो, निश्चितच, हा त्याचाच परिणाम होता….कारण, जर त्यांना ह्याप्रकारे रोखले गेले नसते तर, भलतेच काहीतरी विपरित घडले असते..”

– श्रीमाताजी

(CWM 06 : 68-69)