(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित ‘सावित्री‘ या महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती. हुता यांनी सांगितलेली एक आठवण…)
२८ जून १९६८ रोजी श्रीमाताजींनी सावित्रीमधील काही काव्यपंक्तींचे वाचन केले आणि त्याचे विवरण केले; मी ते ध्वनिमुद्रित करून घेतले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवून घेतले आणि मला ध्यान करण्यास सांगितले. मी डोळे मिटते न मिटते तोच, एक असीम शांती माझ्यामध्ये अवतरली आणि माझ्या सर्वांगाला तिने जणू लपेटून घेतले.
काही वेळाने श्रीमाताजींनी डोळे उघडले आणि माझ्याकडे हसून पाहत त्या म्हणाल्या, “तुला मातृमंदिर परिसराच्या मध्यभागी असलेले ते वडाचे झाड माहीत आहे ना? तिथे तू त्या झाडाखाली बसली आहेस आणि त्या झाडाच्या फांद्यांवरून खाली आलेल्या फुलांच्या माळा सर्वत्र तुझ्या आजूबाजूला हलत-डुलत आहेत, असे आत्ता मला ध्यानात दिसले. वरून तुझ्यावर फुलांचा वर्षावसुद्धा होत होता. आणि तू अगदी शांत होतीस.“
श्रीमाताजींचा तो दृष्टान्त मी चित्रामध्ये उतरविला. त्यांनी चित्रामध्ये मला काही किरकोळ फेरफार करायला सांगितले आणि त्यानुसार मी ते बदल केले. माझ्या चित्रामध्ये मी काही खारी, एक हरीण आणि ससासुद्धा काढलेला होता, ते सारे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते चित्र पाहून त्या आनंदित झाल्या होत्या. काही काळ चित्त एकाग्र करून नंतर, त्यांनी एका कागदावर पुढील शब्द लिहिले ‘आंतरिक जीवन.‘ श्रीमाताजींनी आंतरिक जीवनाविषयी लिहिले होते की, “व्यक्तीने एकदा आंतरिक जीवनाचे माधुर्य अनुभवले की नंतर मग तिचे इतर कशानेच समाधान होणार नाही.“
हिंदू परंपरेमध्ये वडाच्या झाडाला ‘ज्ञानवृक्ष‘ असे म्हणतात. श्रीमाताजींनी या वृक्षाला ‘ऐक्य‘ असे नाव दिले. या वृक्षाभोवती संगमरवरी आसनं असावीत आणि लोकांनी तिथे बसून शांतपणे ध्यान करावे, अशी इच्छा श्रीमाताजींनी व्यक्त केली होती. आज आपल्याला तेथे तशी व्यवस्था पाहायला मिळते.
– आधारित (The spirit of Auroville 79-81)






