‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३२

व्यक्तीने स्वतःमध्ये असलेले सर्वकाही ईश्वराला निवेदित करणे, व्यक्ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सर्व ईश्वराला अर्पण करणे; स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी इत्यादी यांचा आग्रह न धरणे, उलट त्यांची जागा सर्वत्र, ईश्वरी ‘सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या संकल्पाद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेऊ देणे म्हणजे समर्पण.

*

ईश्वराप्रत स्वत:ला सोपवून देणे म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सारे ‘ईश्वरा’ला देऊ करणे; आपले स्वत:चे असे काहीही नाही, असा दृष्टिकोन बाळगणे; अन्य कोणत्याही नव्हे, तर केवळ ‘ईश्वरी’ इच्छेच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे आणि जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते. आम्ही ही गोष्ट कधीच लपविलेली नाही. समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, कार्य पूर्ती होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67 & 75-76)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३१

नकार
(श्रीअरविंदांनी साधकांना लिहिलेल्या पत्रांमधून…)

मी ज्या योग्य स्पंदनांविषयी म्हाणालो ती स्पंदने एकतर अंतरात्म्याकडून किंवा वर असणाऱ्या आध्यात्मिक प्रांतामधून आलेली असतात अथवा अंतरात्म्याच्या किंवा आध्यात्मिक प्रभावाने मनामध्ये किंवा प्राणामध्ये (vital) आकाराला येतात. एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगेल आणि जे त्याज्य आहे त्यास शक्य असेल तितका नकार देईल, तर तेव्हा आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव अधिकाधिक कार्य करेल, अधिकाधिक खरा सद्सदविवेक आणेल, योग्य स्पंदनांची निर्मिती करेल, त्यांना प्रोत्साहन देईल, त्यांना आधार देईल आणि चुकीची स्पंदने शोधून, त्यांना हतोत्साहित करेल आणि ती वगळेल. श्रीमाताजी आणि मी हीच पद्धत सर्वांना सांगत असतो.

*

इच्छांचा विलय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, हे मला समजले नाही. इच्छांना व्यक्तित्वातून बाहेर काढून टाकणे, नकार देणे, हे या योगाचे एक तत्त्व आहे. जी गोष्ट मनामधून नाकारण्यात येते ती बरेचदा प्राणामध्ये जाते, प्राणाने नाकारलेली गोष्ट ही शारीरिक स्तरावर जाऊन पोहोचते आणि शरीराने नाकारलेली गोष्ट ही अवचेतनामध्ये (subconscient) जाते, हे खरे आहे. अवचेतनातून हद्दपार केलेली गोष्ट ही तरीही वातावरणातील चेतनेमध्ये रेंगाळत राहण्याची शक्यता असते – तेथे तिचा व्यक्तीवर कोणताही ताबा नसतो आणि त्यामुळे ती समूळ काढून टाकणे शक्य असते.

*

प्रत्येक गोष्ट बाहेरून, म्हणजे वैश्विक प्रकृतीमधून येत असते, हे सर्वज्ञात वास्तव आहे. परंतु येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे असे कोणतेही बंधन व्यक्तीवर असत नाही, व्यक्ती ती गोष्ट स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते. भूतकाळामध्ये स्वीकाराची एक चिवट सवय जडलेली असेल तर, एकदम नकार द्यायला जमेल असे नाही, पण जर नकार देण्यामध्ये स्थिरपणे सातत्य राखले तर सरतेशेवटी व्यक्ती त्यात यशस्वी होईल. तुम्ही काय केले पाहिजे तर, कनिष्ठ अनुभवांना नकार दिला पाहिजे आणि आपले लक्ष एकमेव आवश्यक गोष्टीवर, म्हणजे… ‘प्रकाश’, ‘स्थिरता’, ‘शांती’, ‘भक्ती’ यांवर केंद्रित केले पाहिजे, त्याबाबत स्थिर अभीप्सा बाळगली पाहिजे. तुम्ही कनिष्ठ प्राणिक अनुभवांमध्ये रुची घेता आणि त्यांचे निरीक्षण करत राहता, त्यांच्याविषयी विचार करत राहता म्हणून त्या गोष्टी तुमचा ताबा घेतात आणि त्यामुळेच ईश्वराशी असलेला ‘संपर्क’ सुटतो आणि गोंधळ निर्माण होतो. तुम्ही या आधीही अशा प्रकारचे बरेच अनुभव घेतलेले आहेत आणि आता जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना दृढपणे नकार देण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 64-65)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३०

…येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते.

‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.

…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.

– श्रीमाताजी

(CWM 08 : 40-41)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २९

(अभीप्सा, नकार आणि समर्पण या त्रयीला पूर्णयोगामध्ये योगसूत्राचे स्थान आहे.)

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

योगामध्येदेखील ईश्वर हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने ‘आधारा’वर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत साधकाच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिविधींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांना नकार, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, दुर्बोधता, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांना नकार, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपणाजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक वृत्तींचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २७

सर्वसाधारणपणे आजवरचा योग हा आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही – अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य जाणवते, पण त्यांना मस्तकाच्याही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याच प्रमाणे सामान्य योगामध्ये व्यक्तीला ब्रह्मरंध्राप्रत होणार्याह जागृत आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनी) आरोहणाची संवेदना असते; (या ब्रह्मरंधामध्ये प्रकृती ब्रह्म- चेतनेशी युक्त होते.) मात्र त्यांना ‘अवतरणा’चा (descent) अनुभव येत नाही. काही जणांना अशा गोष्टी अनुभवासही आल्या असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, हे मला माहीत नाही. मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणार्याा) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता – अतिचेतनेमध्ये (Superconscient) ‘निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट असे, जागृत चेतनेमध्ये अतिचेतन ‘उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नसे, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

*

’चित्’ (Chit) म्हणजे विशुद्ध चेतना – सत् चित् आनंद यामध्ये असते तशी. तर ’चित्त’ (Chitta) म्हणजे मानसिक-प्राणिक-शारीरिक चेतना यांचे संमिश्रण असलेले द्रव्य आहे; त्यातून विचार, भावना, संवेदना, आवेग इ. वृत्ती निर्माण होतात. पातंजल योगानुसार, या वृत्तीच पूर्णतः शांत करायच्या असतात, ज्यामुळे चेतना निश्चल होऊन, समाधीमध्ये प्रविष्ट होऊ शकेल. ‘चित्तवृत्तीनिरोधा’चे या (पूर्ण)योगात मात्र निराळे कार्य आहे. सामान्य चेतनेच्या वृत्ती येथे निश्चल करायच्या असतात आणि त्या निश्चलतेमध्ये उच्चतर चेतना आणि तिच्या शक्ती खाली उतरवायच्या असतात; जेणेकरून ही चेतना आणि तिच्या शक्ती प्रकृतीमध्ये रूपांतर घडवतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 377-378 and 438)

*

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २६

पूर्णयोगामध्ये समग्र जीवन हे, अगदी बारीकसारीक तपशिलासहित रूपांतरित करायचे असते, ते दिव्यत्वामध्ये परिवर्तित करायचे असते.

इथे कोणतीच गोष्ट निरर्थक नसते आणि कोणतीच गोष्ट क्षुल्लक नसते. “जेव्हा मी ध्यानधारणा करत असेन, जेव्हा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असेन किंवा (आध्यात्मिक) चर्चा ऐकत असेन तेव्हा मी प्रकाशाभिमुख अशा उन्मीलित स्थितीत राहीन आणि प्रकाशाप्रत आवाहन करेन; पण जेव्हा मी फिरायला बाहेर पडेन किंवा मी जेव्हा मित्रांना भेटेन तेव्हा मात्र हे सारे विसरून गेलो तरी चालेल,” असे तुम्ही म्हणू शकत नाही. जर तुम्ही अशा तऱ्हेचाच दृष्टिकोन ठेवलात तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही तसेच अरूपांतरित राहाल आणि मग तुम्ही ईश्वराशी खरेखुरे एकत्व कधीच साधू शकणार नाही. फार फार तर तुम्हाला उच्चतर जीवनाची थोडीफार झलक पाहायला मिळेल. परंतु तुम्ही नेहमीच ईश्वरापासून विभक्त राहाल.

तुमच्या ध्यानावस्थेत किंवा तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला काही अनुभव आले किंवा काही साक्षात्कार झाले तरीही तुमचे शरीर आणि तुमचे बाह्य जीवन मात्र तसेच अपरिवर्तित राहिलेले असेल. शरीर आणि बाह्य जीवन यांची अजिबात दखल न घेणारे असे आंतरिक प्रदीपन (illumination) हे फारसे उपयोगाचे नाही, कारण असे आंतरिक प्रदीपन जगाला ते जसे आहे तसेच सोडून देते. आजवर हे असेच घडत आले आहे. ज्यांना अगदी महान आणि शक्तिशाली साक्षात्कार झाला होता त्यांनीदेखील, आंतरिक शांतीमध्ये आणि स्थिरतेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या जगापासून स्वतःला विलग केले होते; या जगाला आहे त्या परिस्थितीत सोडून दिले होते, त्यामुळे, दुःखकष्ट, मूर्खपणा, मृत्यू आणि अज्ञान यांवर कोणताही परिणाम न होता, त्या गोष्टी तशाच कायम राहिल्या; त्यांचे या भौतिक जगतावरील सार्वभौमत्व तसेच अबाधित राहिले. जे अशा तऱ्हेने या जगापासून विलग झाले होते त्यांच्यासाठी, या गडबडगोंधळापासून सुटका करून घेणे, अडचणींकडे पाठ फिरविणे आणि अन्यत्र एखादी आनंदी अवस्था शोधणे हे, सुखकर असू शकेल; पण ते या जगाला आणि जीवनाला आहे तशाच असुधारित आणि अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात; आणि त्यांच्या स्वतःच्या बाह्य चेतनेलादेखील ते अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात, आणि त्यांचे शरीरदेखील जसे होते तसेच, पुनरुज्जीवित न झालेल्या अवस्थेत ते सोडून जातात. परंतु जेव्हा या भौतिक जगात त्यांना परत यावे लागेल तेव्हा ते अगदी सामान्य माणसापेक्षादेखील सामान्य असू शकतात; कारण त्यांनी भौतिक वस्तुमात्रांवरील त्यांचे प्रभुत्व गमावलेले असते आणि त्यामुळे, त्यांचा जीवनव्यवहार विसंगत होण्याची तसेच येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येक शक्तीच्या दयेवर अवलंबून असण्याची शक्यता असते.

ज्यांचा हाच आदर्श आहे, त्यांच्यासाठी तो चांगला असू शकेल. परंतु हा आपला योग नाही. कारण आपल्याला या विश्वावर दिव्य विजय प्राप्त करून घ्यायचा आहे; या विश्वातील सर्व घडामोडी, गतीविधींवर विजय मिळवायचा आहे आणि इथेच त्या ‘ईश्वरा’चा साक्षात्कार घडवायचा आहे. परंतु ‘ईश्वरा’ने येथे राज्य करावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यापाशी जे काही आहे, आपण जे काही आहोत, आपण येथे जे काही करत असतो ते सारे ईश्वरार्पण केले पाहिजे. एखादी गोष्ट कमी महत्त्वाची आहे किंवा ‘बाह्य जीवन आणि त्याच्या आवश्यकता या दिव्य जीवनाचा भाग असू शकत नाहीत,’ असा विचार आपण करून चालणार नाही. आपण जर असा विचार केला तर आपण आजवर जेथे आहोत तेथेच राहू आणि मग या बाह्य जगतावर आपण कधीच विजय मिळवू शकणार नाही, चिरस्थायी असे आपण काहीही केलेले नसेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 24-25)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २५

प्रश्न : ध्यान करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही का? आणि जितके अधिक तास एखादी व्यक्ती ध्यान करेल, तेवढ्या प्रमाणात तिची प्रगती अधिक होईल, हे खरे नाही का ?

श्रीमाताजी : ध्यानामध्ये व्यतीत केलेले तास हा काही आध्यात्मिक प्रगतीचा पुरावा होऊ शकत नाही. मात्र ध्यान करण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करावा लागत नसेल तर ती तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची खूण असते. तेव्हा अशा अवस्थेत, खरंतर तुम्हाला ध्यान थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; ध्यान थांबविणे अवघड असते; ईश्वरासंबंधीचे विचार थांबविणे अवघड असते; सामान्य चेतनेमध्ये उतरणे अवघड असते. असे असेल तेव्हा तुम्ही प्रगतीची खात्री बाळगू शकता. जेव्हा ईश्वरावर एकाग्रता करणे ही तुमच्यासाठी जीवनावश्यक गोष्ट झाली असेल, जर तुम्ही त्याविना जगू शकत नाही, तुम्ही कशामध्येही गुंतलेले असाल तरीही जर ती अवस्था रात्रंदिन सातत्याने टिकून राहत असेल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती केली आहे, असे होईल. तुम्ही ध्यान करत असाल किंवा इकडेतिकडे फिरत असाल, काही करत असाल, काही काम करत असाल, तर तेव्हा तुम्हाला आवश्यकता असते ती चेतनेची! ईश्वराची सातत्याने जाणीव असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे.

प्रश्न : पण ध्यानाला बसणे ही एक अपरिहार्य साधना नाही का? आणि त्यातून ईश्वराशी अधिक उत्कट आणि सघन ऐक्य प्राप्त होत नाही का?

श्रीमाताजी : तसे होऊ शकते. परंतु आपण काही साधनेसाठी साधना करत नाही. तर, आपण जे काही करत असू, सदा सर्व काळ, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक क्षणी ईश्वरावर एकाग्र असणे ही गोष्ट साध्य करण्यासाठी आपली धडपड आहे. इथे आश्रमात (श्रीअरविंद आश्रम) असे काही जण आहेत की ज्यांना ध्यान करायला सांगण्यात आले आहे. पण असेही काही जण आहेत की ज्यांना ध्यान करण्यास अजिबात सांगण्यात आलेले नाही. परंतु ते प्रगती करत नाहीयेत असा विचार करता कामा नये. तेही साधनाच करत आहेत पण ती वेगळ्या स्वरूपाची साधना आहे. कर्म करणे, भक्तिभावाने कर्म करणे आणि आंतरिक निवेदन (conscecration) करणे ही देखील एक प्रकारची आध्यात्मिक साधनाच आहे. केवळ ध्यानाच्या वेळीच नव्हे तर सर्व परिस्थितीमध्ये, जीवनातील प्रत्येक क्रियाकलापांमध्ये ईश्वराशी नित्य तादात्म पावून राहणे हे अंतिम ध्येय आहे.

असे काही जण आहेत की, जे ध्यानाला बसले असताना, त्यांना जी स्थिती अतिशय छान, आनंदी वाटते अशा स्थितीत ते जातात. ते त्यामध्ये आत्मसंतुष्ट होऊन राहतात आणि जगाला विसरतात. पण जर का ते विचलित झाले तर, ते अगदी रागारागाने आणि अस्वस्थ होऊन त्यातून बाहेर पडतात कारण त्यांच्या ध्यानामध्ये कोणीतरी बाधा आणलेली असते. ही काही आध्यात्मिक प्रगतीची किंवा साधनेची खूण नव्हे. काही जण असेही असतात की, जे ध्यान करणे म्हणजे ईश्वराचे ऋण चुकते करणे आहे असे समजतात. आठवड्यातून एकदा चर्चला गेलो की आपले ईश्वराविषयी जे कर्तव्य होते ते आपण पार पाडले असे समजणाऱ्या माणसांसारखी ही माणसं असतात.

तुम्हाला ध्यानात शिरण्यासाठी जर प्रयत्न करावे लागत असतील तर आध्यात्मिक जीवन जगण्यापासून अजून तुम्ही खूप दूर आहात. परंतु जर का तुम्हाला ध्यानातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील तर मग तुमचे ध्यान हे तुम्ही आध्यात्मिक जीवन जगत असल्याचे द्योतक आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19-21)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २४

योगामध्ये सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला बरेचदा ईश्वराचे विस्मरण होण्याचा संभव असतो. परंतु सातत्यपूर्ण अभीप्सेने तुम्ही तुमचे स्मरण वाढविता आणि विस्मरण नाहीसे करून टाकता. पण एक कठोर शिस्त किंवा कर्तव्य या भावनेने ही गोष्ट घडता कामा नये तर ती प्रेम आणि आनंदाची (एक सहज) क्रिया असली पाहिजे. आणि मग लवकरच अशी एक अवस्था येईल की, तुम्हाला एका क्षणासाठी जरी ईश्वराचे अस्तित्व जाणवले नाही, तर मग तुम्ही काहीही करत असलात तरी तुम्हाला एकदम एकाकी, उदास, दुःखीकष्टी वाटायला लागते.

ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल आणि तरीही तुम्ही अगदी सुखी आहात असे जर का तुम्हाला आढळले तर, तुमच्या अस्तित्वातील ते अंग ईश्वराला समर्पित झालेले नाही, हे तुम्ही जाणले पाहिजे. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाची कोणतीच निकड भासत नाही अशा सामान्य मानवतेचा हा मार्ग झाला. परंतु दिव्य जीवनाच्या साधकाच्या बाबतीत मात्र ही गोष्ट काहीशी निराळी असते. जेव्हा तुमचे ईश्वराशी संपूर्णतया एकत्व झालेले असते तेव्हा, ईश्वर तुमच्यापासून क्षणभर जरी दूर झाला, तर तुम्ही अगदी मृतवत होता. कारण तो ईश्वरच आता तुमच्या जीवनाचे जीवन असतो, तोच तुमचे समग्र अस्तित्व असतो, तोच तुमचा एकमेव आणि संपूर्ण आधार असतो. जर ईश्वर नसेल तर मग काही शिल्लकच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 26-27)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २३

आमचा योग हा रूपांतरणाचा योग आहे; हे रूपांतरण म्हणजे संपूर्ण चेतनेचे रूपांतर आहे; तसेच ते संपूर्ण प्रकृतीचे, तिच्या मस्तकापासून ते पायापर्यंत, तिच्या अगदी गुप्त आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य बहिर्वर्ती हालचालींपर्यंतच्या प्रत्येक भागाचे रूपांतर आहे. हा बदल काही केवळ नैतिक नाही किंवा ते धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी संयमदेखील नव्हे, उदात्तीकरण नाही किंवा, जीवनाचे व प्राणिक प्रवृत्तींचे दमनही आम्हाला अभिप्रेत नाही; किंवा ते काही गौरवीकरण नाही, अथवा कठोर असे नियंत्रणदेखील नाही; किंवा भौतिक अस्तित्वालाच नकार देणेही, अभिप्रेत नाही. अल्पतेकडून अधिकतेकडे, कनिष्ठाकडून उच्चतेकडे, पृष्ठवर्ती जाणिवेकडून सखोल चेतनेप्रत होणारा बदल आम्हाला अभिप्रेत आहे. सर्वाधिक महान, सर्वोच्च, सखोलतम असे संभाव्यकोटीतील रूपांतर आम्हाला अभिप्रेत आहे. तसेच समग्र अस्तित्वाचे त्याच्या साधनसामग्रीनिशी संपूर्ण परिवर्तन आणि क्रांती अभिप्रेत आहे; प्रत्येक तपशीलाचे अस्तित्वाच्या आजवर प्रत्यक्षीभूत न झालेल्या दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर होणे, हे आम्हाला अभिप्रेत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 371)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २२

केवळ अतिमानव बनण्याच्या कल्पनेने या योगाकडे वळणे ही प्राणिक अहंकाराची कृती ठरेल आणि त्यामुळे या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ ठरेल. जी माणसे त्यांच्या सर्व क्रियाकलापांसमोर हे उद्दिष्ट ठेवतात त्यांना अपरिहार्यपणे आध्यात्मिक आणि अन्य दु:खं सहन करावी लागतात. विभक्तकारी अहंकाराचे दिव्य चेतनेमध्ये विलयन करून, त्या द्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रथम प्रवेश करणे (त्या अनुषंगाने, म्हणजे असे करत असताना, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या व्यक्तिगत ‘स्व’चा शोध लागतो; हा ‘स्व’ म्हणजे मर्यादित, निरर्थक आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर, तो ईश्वराचा अंश असतो.) आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी म्हणून अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या योगाचे ध्येय आहे. बाकी सर्व गोष्टी या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या योगाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 21)