(पूर्वार्ध)

व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जर ईश्वरा‌चे अस्तित्व नसते तर, व्यक्तीला ईश्वरा‌ची जाणीव कधीच होऊ शकली नसती; ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. पण याच गोष्टीकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, ‘तुमच्या अंतरंगामध्ये ईश्वर‌ आहे तसेच तुमचे वास्तव्य ईश्वरा‌मध्ये आहे,’ याचे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, तसे जाणवते, जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा साक्षात्काराच्या दिशेने दार किंचितसे उघडले गेलेले असते, किलकिले झालेले असते.

नंतर कधीतरी जर व्यक्तीमध्ये अभीप्सा निर्माण झाली, ईश्वरा‌ला जाणून घेण्याची आणि ईश्वर‌च होण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, ते किंचितसे उघडलेले दार, व्यक्तीचा त्यातून आतमध्ये प्रवेश होण्याइतके उघडले जाते आणि एकदा आत प्रवेश झाला की मग, व्यक्तीला आपण कोण आहोत याची जाणीव होते.

अगदी नेमकी हीच गोष्ट श्रीअरविंद सांगत आहेत की, सत्‌‍, चित, आनंद यांच्यापासून विभक्त झाल्यामुळेच, व्यक्तीला स्वत:च्या मूळ रूपाचे विस्मरण झाले आहे. तिला ‘स्व’चे विस्मरण झाले आहे. व्यक्तीला वाटते की, मी अमुक कोणीतरी आहे, म्हणजे असे की, मी मुलगी आहे, मुलगा आहे, मी पुरुष आहे, स्त्री आहे, कुत्रा आहे, घोडा आहे किंवा मी म्हणजे एखादा दगड, समुद्र, सूर्य आहे इत्यादी. ‘मी स्वत: ईश्वर आहे,’ असा विचार करण्याचे सोडून, इतर सर्व गोष्टी म्हणजे मी आहे, असा व्यक्ती विचार करत असते. व्यक्तीने खरोखरच, आपण तो एकमेवाद्वितीय ईश्वर‌ आहोत याची जाणीव जर कायम ठेवली असती तर, मग अशा व्यक्तीच्या दृष्टीने विश्वाचे वेगळे असे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते. विश्वाचे अस्तित्व असण्यासाठी विभक्तीकरणाची ही घटना अटळच आहे असे दिसते, अन्यथा ईश्वर‌ (मूळ रूपात) जसा होता तसाच (अव्यक्त) नेहमी राहिला असता. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 07 : 236-237)

 

साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे?

श्रीमाताजी : ईश्वरा‌चा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती या पृथ्वीवर आलेली असते, हेच पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य आहे. हे प्रयोजन नसेल तर भौतिक अस्तित्व म्हणजे एक अप-रूप, विकारित रूप (monstrosity) ठरेल.

जर हे परमोच्च प्रयोजन नसते, म्हणजे ईश्वरा‌चा पुनर्शोध घेणे, ईश्वर‌च होणे, ईश्वरा‌ला आविष्कृत करणे आणि या भौतिक जीवनात देखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे, हे जर पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन नसते तर, आत्ता हे जीवन जसे आहे तसे ते विकारित रूप ठरेल.

साहजिकच आहे की, माणसं जितकी जास्त अजाण असतात तितके आत्ता मी जे सांगितले ते त्यांना समजणे कठीण जाते. कारण अशी माणसं (जीवनाकडे, स्वत:कडे) वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. ती यांत्रिकपणे, सवयीनुसार जीवन जगत असतात; म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या पद्धतीबद्दल माणसं जागरूक नसतात किंवा त्याकडे ती अलग होऊन वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. पण जसजशी त्यांची चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे, सद्यस्थितीतील जीवन हे किती भयावह नरक आहे, हे त्यांना जाणवू लागते.

आणि जेव्हा हे जीवन कोणत्या दिशेने चालले आहे याची त्यांना जाणीव होते तेव्हाच मग ते त्याचा स्वीकार करतात, त्यांना जीवनाचे प्रयोजन समजते. मगाशी मी जीवनाचे जे प्रयोजन सांगितले आहे तेच जीवनाला स्वीकारार्ह बनवते. ते जर जीवनाचे प्रयोजन नसेल तर, जीवन हे खरोखरच एक भयंकर आपत्ती ठरेल.

– श्रीमाताजी (CWM 08 : 119-120)

 

ही जी सृष्टी आहे ती काही ईश्वरा‌ला परक्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून निर्माण केली गेली नाहीये. तर त्या ईश्वरा‌ने स्वतःमधूनच या सृष्टीची निर्मिती केली आहे. जणू काही तो स्वतःच स्वतःकडे पाहत असावा अशा पद्धतीने म्हणजे, तो स्वतः काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याने स्वतःला वस्तुरूपात आणले आहे. एकाग्रतेच्या आंतरिक अक्रिय अवस्थेमध्ये राहण्याऐवजी, म्हणजे जेथे सारेच अप्रकट असते अशा अवस्थेमध्ये राहण्याऐवजी, त्याने ‘स्वतःला पाहण्यासाठी‌’ स्वतःलाच स्वतःबाहेर प्रक्षेपित केले आहे. जणू काही स्वतःच्या अंतरंगामध्ये काय काय दडलेले आहे ते तो पाहू इच्छित असावा. म्हणजे स्वतःच्या अंतरंगामध्ये दडलेल्या संभाव्यतांची अनंतता पाहण्याची त्याला इच्छा असावी (आणि म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण केली आहे.)

– श्रीमाताजी (CWM 05 : 373-374)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तुझ्या दिव्य कायद्या‌चे आणि तुझ्या वैभवा‌च्या भव्यतेचे वर्णन शब्दांत कसे व्यक्त करता येईल? तुझ्या चेतने‌च्या परिपूर्णत्वाचे आणि तुझ्या प्रेमा‌च्या अनंत आनंदाचे वर्णन कोणत्या शब्दात करता येईल? तुझ्या शब्दातीत शांती‌चे वर्णन आम्ही शब्दांत कसे काय करू शकणार? तुझ्या निश्चल-नीरवते‌चे महिमान आणि तुझ्या सर्वशक्तिमान सत्या‌चे ऐश्वर्य अभिव्यक्त करू शकतील असे कोणते शब्द आहेत?

आविष्कृत झालेले हे समग्र विश्वसुद्धा तुझी‌ किमया आणि तुझ्या वैभवाचे वर्णन करण्यासाठी अपुरे आहे आणि काळाच्या शाश्वततेमध्ये, तेच तुझे वैभव शाश्वतरित्या, अधिकात अधिक आणि उत्तमोत्तम रितीने अभिव्यक्त करावे असा प्रयत्न ते विश्व करत आहे.

– श्रीमाताजी (CWM 01 : 306)