ईश्वराचे साधन होण्यासाठी…

 

(ईश्वराचे माध्यम झाल्याचा अनुभव कसा असतो, ते श्रीमाताजींनी विशद केले. त्यानंतर साधक आणि त्यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला आहे… )

साधक : या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही त्यासाठी अभीप्सा बाळगली पाहिजे. ती अवस्था प्राप्त व्हावी असे तुम्हाला वाटले पाहिजे. त्यासाठी तुम्ही अधिकाधिक निःस्वार्थी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःला विसरणे किंवा इतरांशी अधिक भलेपणाने वागणे म्हणजे नि:स्वार्थी होणे, असा अर्थ येथे मला अभिप्रेत नाही. तर तुम्ही एक व्यक्ती आहात, एक स्वतंत्र अस्तित्व आहात, इतरांपासून वेगळे, स्वतंत्र असे तुमचे काही अस्तित्व आहे, ही तुमच्यामधली जाणीव हळू हळू कमी होत गेली पाहिजे.

आणि या पेक्षाही एक अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरिक ज्योत, जिला दिव्य प्रकाशाची आवश्यकता जाणवत आहे अशी अभीप्सा! ज्यामुळे तुम्ही एक प्रकारच्या प्रकाशमान उत्साहाने भारले जाता. तेव्हा आत्मदान करावे, केवळ ईश्वरामध्येच जीवन जगावे, त्यामध्ये विलीन व्हावे अशी एक आत्यंतिक ओढ तुम्हाला जाणवू लागते आणि त्या क्षणी तुम्हाला तुमच्या अभीप्सेचा अनुभव येतो. पण तो क्षण मात्र अगदी पूर्णपणे प्रामाणिक आणि शक्य तितका समग्र असला पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टींची आवश्यकता केवळ डोक्यालाच नव्हे, तर शरीरातल्या सर्व पेशींनादेखील जाणवली पाहिजे. चेतनेला समग्रपणे ही आत्यंतिक ओढ जाणवली पाहिजे.

ही गोष्ट सुरुवातीला अगदी क्षणभर जाणवते, मग क्षीण होते आणि नाहीशी होते. अशा गोष्टी दीर्घ काळ टिकवून ठेवता येत नाहीत. परंतु मग असे होते की, काही क्षणांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी किंवा कालांतराने, अचानकपणे तुम्हाला याच्या बरोबर उलट असा अनुभव येतो. म्हणजे तुम्हाला आरोहण (ascent) जाणवण्याऐवजी आणि आत्ता सांगितले त्याप्रमाणे सर्व गोष्टींची जाणीव होण्याऐवजी तुम्हाला अवतरणाची (Descent) जाणीव होते, म्हणजे ईश्वरी शक्तीकडून प्रतिसाद मिळत आहे, याची तुम्हाला जाणीव होते. अशा वेळी अन्य काहीही शिल्लक राहत नाही, तर फक्त तो प्रतिसादच शिल्लक राहतो. केवळ दिव्य विचार, दिव्य संकल्प, दिव्य ऊर्जा, दिव्य कृती शिल्लक राहते. इतर काहीही शिल्लक राहत नाही. एवढेच नव्हे तर, तिथे तुमचे स्वतंत्र अस्तित्वसुद्धा शिल्लक राहिलेले नसते. म्हणजे, तो तुमच्या अभीप्सेला मिळालेला प्रतिसाद असतो.

कधीकधी ही गोष्ट अगदी त्वरित घडून येऊ शकते. हे अगदीच दुर्मिळ असते, पण असे घडू शकते. तुम्हाला जर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडताना जाणवल्या तर ती अगदी परिपूर्ण अवस्था असते. सहसा आरोहण आणि अवरोहण या क्रिया एका आड एक अशा पद्धतीने घडून येतात. मात्र कधीकधी त्या इतक्या एका पाठोपाठ घडतात की, कालांतराने त्या दोन्ही क्रिया एकमेकींमध्ये मिसळून गेल्यासारख्या होतात आणि मग त्यामध्ये भेद शिल्लक राहत नाही.

– श्रीमाताजी (CWM 05 : 56-57)

श्रीमाताजी