विभक्तीकरण अटळ…
(पूर्वार्ध)
व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जर ईश्वराचे अस्तित्व नसते तर, व्यक्तीला ईश्वराची जाणीव कधीच होऊ शकली नसती; ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. पण याच गोष्टीकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, ‘तुमच्या अंतरंगामध्ये ईश्वर आहे तसेच तुमचे वास्तव्य ईश्वरामध्ये आहे,’ याचे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, तसे जाणवते, जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा साक्षात्काराच्या दिशेने दार किंचितसे उघडले गेलेले असते, किलकिले झालेले असते.
नंतर कधीतरी जर व्यक्तीमध्ये अभीप्सा निर्माण झाली, ईश्वराला जाणून घेण्याची आणि ईश्वरच होण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, ते किंचितसे उघडलेले दार, व्यक्तीचा त्यातून आतमध्ये प्रवेश होण्याइतके उघडले जाते आणि एकदा आत प्रवेश झाला की मग, व्यक्तीला आपण कोण आहोत याची जाणीव होते.
अगदी नेमकी हीच गोष्ट श्रीअरविंद सांगत आहेत की, सत्, चित, आनंद यांच्यापासून विभक्त झाल्यामुळेच, व्यक्तीला स्वत:च्या मूळ रूपाचे विस्मरण झाले आहे. तिला ‘स्व’चे विस्मरण झाले आहे. व्यक्तीला वाटते की, मी अमुक कोणीतरी आहे, म्हणजे असे की, मी मुलगी आहे, मुलगा आहे, मी पुरुष आहे, स्त्री आहे, कुत्रा आहे, घोडा आहे किंवा मी म्हणजे एखादा दगड, समुद्र, सूर्य आहे इत्यादी. ‘मी स्वत: ईश्वर आहे,’ असा विचार करण्याचे सोडून, इतर सर्व गोष्टी म्हणजे मी आहे, असा व्यक्ती विचार करत असते. व्यक्तीने खरोखरच, आपण तो एकमेवाद्वितीय ईश्वर आहोत याची जाणीव जर कायम ठेवली असती तर, मग अशा व्यक्तीच्या दृष्टीने विश्वाचे वेगळे असे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते. विश्वाचे अस्तित्व असण्यासाठी विभक्तीकरणाची ही घटना अटळच आहे असे दिसते, अन्यथा ईश्वर (मूळ रूपात) जसा होता तसाच (अव्यक्त) नेहमी राहिला असता. (उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 07 : 236-237)
- विभक्तीकरण अटळ… - July 6, 2026
- सृष्टीचे ध्येय - July 5, 2026
- पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन - July 4, 2026






