तारुण्य आणि वार्धक्य

 

तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि विकसित होण्याच्या तिच्या क्षमतेवर अवलंबून असते. प्रगती करणे म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमता तिने सातत्याने अधिकाधिक परिपूर्ण करत नेणे आणि विकसित होत जाणे म्हणजे स्वतःच्या क्षमता व स्वतःचे सामर्थ्य सतत वाढवत नेणे.

व्यक्तीचे वय वाढले आहे म्हणजे ती आता वृद्ध झाली आहे असे समजणे चुकीची आहे. व्यक्ती जर अक्षम झाली असेल किंवा ती प्रगती करण्यास आणि विकसित होण्यास नकार देत असेल तरच ती वृद्ध होते. वीस वर्षांची म्हातारी माणसं आणि सत्तर वर्षांची काही तरुण माणसं मला माहीत आहेत. जीवनात आता आपण स्थिरस्थावर व्हावे आणि तरुणवयात केलेल्या कष्टांची फळे चाखावीत असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; करण्यासारखे जे काही होते ते आता करून झाले आहे आणि जे काही साध्य करायचे होते ते आता साध्य झाले आहे, असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; थोडक्यात म्हणजे, व्यक्ती परिपूर्णत्वाच्या मार्गावर वाटचाल करण्याचे किंवा प्रगती करण्याचे ज्या क्षणी थांबविते त्या क्षणीच तिची परागती आणि तिचे वार्धक्य निश्चित झालेले असते.

व्यक्तीला जर खरी पद्धत गवसली असेल आणि तिच्या शरीराला योग्य रितीने प्रशिक्षित करण्यात आले असेल तर, शरीराची प्रगती करत राहण्यास किंवा शरीराच्या सामर्थ्यामध्ये वाढ करत नेण्यास कोणतीच सीमा नसते, हे व्यक्ती स्वतःच्या शरीराला शिकवू शकते. आपण इथे (श्रीअरविंद आश्रमात) ज्या गोष्टींवर प्रयोग करू इच्छितो त्यांपैकी हा एक प्रयोग आहे. आपल्याला वार्धक्याबद्दलच्या प्रचलित असणाऱ्या सर्व प्रकारच्या सामूहिक समजुती मोडीत काढायच्या आहेत आणि मानवी क्षमता कल्पनातीत प्रमाणात विस्तारता येतात, याचा आदर्श जगापुढे ठेवायचा आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 257)

श्रीमाताजी