जीवन जगण्याचे शास्त्र – २६
जीवन जगण्याचे शास्त्र – २६
पूर्णयोगाचा मार्ग खूप दीर्घ आहे. स्वतःमधील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल असते. हा मनाचा आणि हृदयाचा भाव असतो, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड असते.
कर्मफलावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे या मार्गावरील दुसरे पाऊल असते. आपल्यामध्ये अनुभवास येणारी ‘ईश्वरी उपस्थिती, दिव्य चेतना आणि दिव्य सामर्थ्य’ हे त्यागाचे खरे, अपरिहार्य, अतिशय इष्ट असे फळ असते. ही एक गोष्ट आवश्यक असते. हे फळ मिळाले की, अन्य सर्व गोष्टींची त्याला जोड मिळेलच. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील (desire-soul), वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर असते; आणि ते फारच अवघड असते.
केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वराचे साधन झाल्याच्या अहं जाणिवेचे देखील उच्चाटन हे या मार्गावरील तिसरे पाऊल असते. हे रूपांतरण सर्वाधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतरण पूर्ण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही म्हणजेच अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकून दिले जात नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.
क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच, साधकाला ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराची शक्ती आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी शक्तीच्या संकल्पाव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा त्याग करतो.
– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 247-248)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







