प्रार्थना आणि स्तोत्र
अमृतवर्षा २५
उद्दिष्ट जरी समान असले तरी, विविध साधकांच्या वृत्तीप्रवृत्ती विभिन्न असतात आणि त्यामुळे प्रत्येकाचे मार्गदेखील भिन्नभिन्न असतात. प्रार्थना आणि स्तोत्र या गोष्टी हा सुद्धा ‘ईश्वरा’च्या साक्षात्काराचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु तो मार्ग प्रत्येकालाच भावतो असे नाही. जो साधक ज्ञानमार्गाचा अवलंब करतो तो ध्यान व एकाग्रतेचा अभ्यास करतो. कर्ममार्गी व्यक्तीसाठी कार्याचे समर्पण हा उत्तम मार्ग असतो.
प्रार्थना आणि स्तोत्र हे भक्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे. मात्र ते सर्वोच्च आहे असे नाही. शुद्ध प्रेम ही भक्तीची सर्वोच्च परिपूर्णता आहे. अशा प्रेमाला, प्रार्थना आणि स्तोत्र या माध्यमातून ईश्वरा’चा खरा आत्मा लाभू शकतो आणि त्यानंतर प्रार्थना आणि मंत्रादींच्या पलीकडे जात, हे शुद्ध प्रेम ‘ईश्वरा’च्या आत्म-भुक्तिमध्ये (self-enjoyment) विरघळून जाते. आणि असे असूनसुद्धा, प्रार्थना व स्तोत्राविना ज्याचे चालू शकते असा भक्तियोगी विरळाच आढळेल. जेव्हा कोणत्याही प्रक्रियांची आणि साधनेची आवश्यकता उरलेली नसते अशावेळीदेखील हृदयातून प्रार्थना आणि स्तोत्र स्फुटित होतात. फक्त एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की, (योग) मार्ग हा व्यक्तीनिरपेक्ष मार्ग असत नाही; त्यामुळे एखाद्याचा मार्ग हाच दुसऱ्याचा मार्ग असेल असे नाही.
बऱ्याच भक्तिमार्गी लोकांची अशी समजूत असते की, जो प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी करत नाही, त्या गोष्टींमध्ये ज्याला आनंद लाभत नाही, तो माणूस आध्यात्मिक (सत्य धर्माचे पालन करणारा) नसतो. परंतु असे समजणे हे भ्रांतीचे आणि संकुचितपणाचे लक्षण आहे. (गौतम) बुद्ध हे कधीही प्रार्थना व स्तोत्र या गोष्टींमध्ये रममाण झाले नाहीत पण म्हणून ते आध्यात्मिक नव्हते असे कोण म्हणेल बरे? प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी भक्तिसाधनेसाठी विकसित झालेल्या आहेत.
– श्रीअरविंद [Writings in bengali : 186]
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026





