प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद
कृतज्ञता – १९
(धम्मपदातील एका वचनाबद्दल श्रीमाताजी भाष्य करीत आहेत…)
मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो असा की, हे जग बदलावे म्हणून जर द्वेषभावनेला प्रेमभावनेने प्रत्युत्तर द्यायचे असेल तर, प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद द्यावा हे अधिक जास्त स्वाभाविक नाही का?
हे जीवन, कृती आणि माणसांची हृदये जशी आहेत तशीच विचारात घेतली तर, ‘ईश्वरी कृपा’ या विश्वावर ‘प्रेमा’चा जो अपरिमित वर्षाव करते त्या प्रेमाला प्रत्युत्तर म्हणून मिळणारा सर्व द्वेष, तिरस्कार तसेच अलिप्तता पाहून आश्चर्यचकित होण्याचा व्यक्तीला नक्कीच अधिकार आहे; कारण या विश्वाला ईश्वरी आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून हे अपरिमित ईश्वरी ‘प्रेम’ प्रत्येक क्षणाला कार्य करत असते आणि तरीसुद्धा त्याला मानवी हृदयामध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळतो.
परंतु लोकांना दुष्ट, अपंग, ज्यांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेले असते अशांविषयी, अपयशी व्यक्तींविषयी, अपयशाविषयी कणव असते – वास्तविक हे एक प्रकारे त्या दुष्टतेला आणि अपयशाला दिलेले प्रोत्साहनच असते. समस्येच्या या पैलूचा व्यक्तीने थोडा अधिक विचार केला तर कदाचित द्वेषाला प्रेमाने प्रतिसाद देण्याच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज कमी भासेल. कारण मानवी हृदयामध्ये ज्या ईश्वरी प्रेमाचा वर्षाव केला जात असतो त्या प्रेमाला, जर त्याने, जे समजून घेऊ शकते आणि जे दाद देऊ शकते अशा प्रेमाच्या उत्स्फूर्त कृतज्ञतेनिशी आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी प्रतिसाद दिला तर, विश्वामध्ये गोष्टी त्वरेने बदलू शकतील.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 187)
- चैत्य पुरुष म्हणजे काय? - September 14, 2026
- तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व - September 13, 2026
- दिव्य अस्तित्वाचा शोध - September 11, 2026






