शांती आणि सद्भावना यांचे प्रक्षेपण
सद्भावना – ११
प्रत्येक व्यक्ती तिच्याभोवती स्पंदनांनी बनलेले असे एक वातावरण वागवत असते; ही स्पंदने त्या व्यक्तीच्या चारित्र्यातून, तिच्या विचारसरणीतून, तिच्या मनःस्थितीतून, तिच्या भावनांच्या, तिच्या कृती करण्याच्या पद्धतीतून निर्माण होत असतात. प्रत्येकाचे असणारे असे हे वातावरण, संपर्काच्या द्वारे, परस्परांवर क्रिया-प्रतिक्रिया करत असते; ही स्पंदने संसर्गजन्य असतात; म्हणजे असे की, आपण ज्या व्यक्तीला भेटतो त्या व्यक्तीची स्पंदने आपण अगदी सहजगत्या स्वीकारतो, विशेषतः त्या व्यक्तीची स्पंदने शक्तिशाली असतील तर! यावरून एक गोष्ट सहज लक्षात येईल की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये आणि स्वतःभोवती शांती आणि सद्भावना वागवीत असेल तर, ती व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्त्वातील आंशिक का होईना पण शांती आणि सद्भावना यांचे एक प्रकारे प्रक्षेपणच इतरांवर करेल, आणि त्याऐवजी ती व्यक्ती जर तिरस्कार, चिडचिड आणि रागराग या गोष्टी वागवत असेल तर, (तिच्या संपर्कात आलेल्या) इतर व्यक्तींमध्ये देखील तशाच प्रवृत्ती जागृत होतील. याच्या आधारे अनेक घटनांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे, अर्थात, हे काही एकमेव स्पष्टीकरण नाही.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 32)
- चैत्य पुरुष म्हणजे काय? - September 14, 2026
- तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व - September 13, 2026
- दिव्य अस्तित्वाचा शोध - September 11, 2026







