अमर्त्यत्वाचा शोध ०७
मृत्युनंतर काही कालावधी असा असतो की जेव्हा जीवात्मा प्राणिक जगतामधून (vital world) जातो आणि तेथे काही काळ राहतो. या संक्रमणाचा केवळ पहिला भागच काहीसा भयंकर वा वेदनादायी, यातनामय असू शकतो. देहामध्ये असताना त्याच्या ज्या प्राणिक वासना आणि सहजप्रवृत्ती होत्या, त्यातील शिल्लक राहिलेल्या गोष्टींवर, विशिष्ट अशा परिस्थितीत, उरलेल्या काळात तो काम करतो.
ज्या क्षणी तो या साऱ्याने थकून जातो आणि याही पलीकडे जाण्याची त्याची तयारी होते, त्या क्षणी लगेचच त्याचा प्राणमय कोष गळून पडतो. त्यानंतर, मानसिक अवशेषांपासून (mental survivals) सुटका करून घेण्यासाठी जो थोडा कालावधी लागतो, त्या कालावधीनंतर चैत्य जगतात (psychic world) विश्रांत अवस्थेत जाण्यासाठी जीवात्मा निघून जातो आणि पृथ्वीवरील पुढील जन्म येईपर्यंत तो तेथे राहतो.
एखादी व्यक्ती तिच्या सदिच्छेद्वारे किंवा जर तिला गूढ मार्गाचे ज्ञान असेल तर त्या माध्यमातून त्या जीवात्म्याला साहाय्य करू शकते.
त्याच्याविषयी शोक करून किंवा त्याच्यामध्ये मनाने गुंतून राहून किंवा ज्यामुळे तो खाली, या भूलोकाजवळ खेचला जाईल अशी कोणतीही गोष्ट करून आपण त्याला बांधून ठेवू नये किंवा विश्रांतीस्थळाकडे होणारा त्याचा प्रवास लांबवू नये.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529-530)
- आपल्याला काय संपादन करायचे आहे? - July 26, 2026
- आपले कार्य काय? - July 25, 2026
- विचार-कणिका - July 24, 2026





