समर्पणातील प्राणिक अडथळ्यांचे स्वरूप
समर्पण – ४५
(श्रीअरविंद एका साधकाला लिहिलेल्या पत्रात समर्पणामध्ये येणाऱ्या प्राणिक अडथळ्यांचे स्वरूप स्पष्ट करत आहेत.)
तुमच्या प्रतिक्रियेचे जे वर्णन तुम्ही केलेत त्यावर उत्तर देताना, ती ‘प्राणिक मागणी’ (Vital demand) आहे असे मी म्हटले होते. कारण शुद्ध आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक आत्मदानामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नसतात; त्यामध्ये तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे, नैराश्य किंवा आशाभंग नसतो, “मी ईश्वरासाठी साधना करून काय उपयोग झाला?” असे म्हणणे नसते, राग नसतो, बंड नसते, अभिमान नसतो किंवा सारे काही सोडून निघून जाण्याची इच्छाही नसते – तर एक प्रगाढ विश्वास असतो आणि परिस्थिती कशीही असली तरी सर्व परिस्थितीमध्ये ईश्वराला बिलगून राहण्याची एक चिकाटी असते. तुमच्यामध्ये या गोष्टी असाव्यात असे मला अपेक्षित आहे; हा एकच असा पाया आहे की ज्याच्या आधारावर व्यक्ती सर्व प्रकारच्या त्रासांपासून आणि प्रतिक्रियांपासून मुक्त राहू शकते आणि स्थिरपणाने प्रगत होऊ शकते.
*
प्राणाला जेव्हा त्याची स्वतःची प्रकृती दाखवून दिली जाते आणि त्यात बदल करावा असे सांगितले जाते, तेव्हा प्राणाची पहिली प्रतिक्रिया बंड करण्याचीच असते.
*
ज्या ज्या वेळी प्राणिक भेसळ पृष्ठभागावर येईल त्या प्रत्येक वेळी तुम्ही तिला नकार दिला पाहिजे. जर तुम्ही या नकाराबाबत दृढ राहिलात तर, त्यामुळे त्या प्राणिक भेसळीची ताकद कमी कमी होत जाईल आणि अंततः नाहीशी होईल. …ती भेसळ म्हणजे जुन्या क्रियांचे हट्टीपणाने पण अतार्किकतेने आणि यांत्रिकतेने टिकून राहणे असते. खरे तर अशाच पद्धतीने या गोष्टी टिकून राहण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही त्यांना नव्याने खतपाणी दिले नाहीत तर या गोष्टी निघून जाणेच क्रमप्राप्त असते.
– श्रीअरविंद
(SABCL 23 : 601 – 602)
- आपल्याला काय संपादन करायचे आहे? - July 26, 2026
- आपले कार्य काय? - July 25, 2026
- विचार-कणिका - July 24, 2026





