(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आबालवृद्ध, शाळेचे विद्यार्थी रोज नियमितपणे आश्रमाच्या मैदानावर जातात आणि शारीरिक शिक्षण घेतात. त्याचा संदर्भ येथे आहे.)

विद्यार्थी : मैदानावर रोज खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर आम्ही एक मिनिटभर एकाग्र होऊन शांत बसतो. त्यावेळी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही जी कृती करणार आहात ती कृती प्रथम ईश्वरार्पण करा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला आत्मनिवेदित भावाने (spirit of consecration) करता येईल. नंतर, “ईश्वराची सेवा करण्यासाठी आम्ही अधिकाधिक सुपात्र असे साधन व्हावे यासाठी, आमच्यामध्ये प्रगतीची इच्छा वाढीस लागू दे,” अशी प्रार्थना तुम्ही ईश्वराकडे करा. खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःला ईश्वराप्रत शांतपणे अर्पित करू शकता. आणि खेळून झाल्यावर निश्चल-नीरवपणे ईश्वराप्रत कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. म्हणजे, मनामध्ये नुसते शब्दोच्चारण होत आहे पण त्यामध्ये भाव नाहीत अशी ती कृती असता कामा नये. ती कृती अगदी अंत:करणपूर्वक झाली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 354-355)

(श्रीमाताजी येथे ‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद-आश्रमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन आबालवृद्ध सर्वांनाच उपयुक्त ठरू शकेल.)

आपण इथे एका नूतन चेतनेच्या (अतिमानासिक चेतनेच्या) बहरासाठी आणि एका नवीन जीवनासाठी स्वतःला घडविण्यासाठी आलो आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे, जे जे कोणी शिकू इच्छितात त्या सर्वांना सांगत आहे की, नेहमी अधिकाधिक आणि उत्तमात उत्तम असे शिकत राहा. म्हणजे एक दिवस तुम्ही त्या नूतन शक्तीप्रत स्वतःला खुले करण्यास सक्षम व्हाल आणि त्याद्वारे ती नूतन शक्ती या जडभौतिक स्तरावर आविष्कृत होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यासाठी हा शारीरिक शिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला त्याचा विसर पडता कामा नये.

तुम्ही येथे का आहात याचे खरे कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती अशी की, आपल्याला शक्य तितके परिपूर्ण साधन व्हायचे आहे; ईश्वरी इच्छा या जगामध्ये अभिव्यक्त करण्याचे साधन आपल्याला व्हायचे आहे आणि साधनं जर परिपूर्ण व्हायची असतील तर त्यांची जोपासना केली पाहिजे; ती शिक्षित, प्रशिक्षित केली पाहिजेत; ती विकसित केली पाहिजेत. ती साधनं पडीक किंवा खडकाळ जमिनीसारखी ठेवता कामा नयेत. हिऱ्याला पैलू पाडल्यानंतरच त्याचे सौंदर्य खुलून दिसते. तुमच्याबाबतीतही अगदी तसेच आहे.

अतिमानसिक चेतनेच्या आविष्करणासाठी तुमचे शरीर हे एक परिपूर्ण साधन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याची जोपासना केली पाहिजे. ते पीळदार बनविले पाहिजे, त्याच्यावर संस्करण केले पाहिजे; त्याच्यामध्ये ज्या उणिवा, कमतरता आहेत त्या भरून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आधीपासूनच ज्या क्षमता आहेत त्या परिपूर्ण करत नेल्या पाहिजेत.

– श्रीमाताजी (CWM 12 : 72-73)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ (naughty) आहोत याची जाणीव झाल्यामुळे खजील होऊन, मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते, कारण भीती म्हणजे चेतनेचा ऱ्हास असतो.

• श्रीमाताजी (CWM 12 : 362)

लहान मुलांना भीती का वाटते? कारण ती दुर्बल असतात. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मोठ्या माणसांपेक्षा शारीरिकदृष्ट्या ती दुर्बल असतात आणि सहसा ती प्राणिक व मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत असतात. दुर्बलतेच्या भावनेतून भीती उद्भवते. तथापि, भीतीपासून सुटका करून घेण्याचा एक मार्ग असतो.

ईश्वरी कृपेवर श्रद्धा ठेवणे आणि सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये तिने तुमचे संरक्षण करावे म्हणून तुम्ही तिच्यावर विसंबून असणे हा तो मार्ग होय. तुमच्या आत्म्याशी म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी असणारा संपर्क तुम्ही वाढवत नेलात तर आणि तुम्ही जो विचार कराल, तुम्ही जे काही बोलाल, तुम्ही जे काही कराल त्या सर्व गोष्टी म्हणजे अंतरंगात असणाऱ्या सत्याची अभिव्यक्ती ठरली पाहिजे असा प्रयत्न जर तुम्ही नेहमीच करत राहिलात तर, तुम्ही जसजसे मोठे होत जाल तसतसे तुम्ही या भीतीमधून बाहेर पडाल.

तुम्ही जेव्हा त्या सत्यामध्येच जाणीवपूर्वक निवास करू लागाल तेव्हा तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागातून (शरीराने, प्राणाने किंवा मनाने) तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. कारण तेव्हा तुम्ही या जगाचे संचालन करणाऱ्या वैश्विक सत्याशीच एकात्म पावलेले असाल.

श्रीमाताजी (CWM 12 : 125)

कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे मूल काहीही करत असले तरी त्याला पुरेशी झोप मिळालीच पाहिजे. वयानुसार झोपेचे तास कमीअधिक होतील. बाळ पाळण्यात असताना, ते जितका वेळ जागे असते त्याच्यापेक्षा अधिक वेळ त्याने झोपले पाहिजे. जसजसे ते मूल मोठे होत जाईल तसतसे त्याच्या झोपेचे प्रमाण कमीकमी होत जाईल. परंतु मुलाची वाढ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याने किमान आठ तास तरी झोपलेच पाहिजे. जिथे शांतता आहे आणि जिथे खेळती हवा आहे अशा जागी त्याने झोपले पाहिजे.

लहान मुलांना विनाकारण उशिरापर्यंत जागे राहायला लावता कामा नये. मज्जातंतूंना विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने मध्यरात्रीपूर्वीचे तास हे सर्वात उत्तम असतात. एवढेच काय पण ज्यांना मज्जागत संतुलन (nervous balance) कायम ठेवायचे आहे त्यांनी दिवसासुद्धा थोडी विश्रांती घेणे आवश्यक असते. मुलं लहान असतात तेव्हाच त्यांना स्नायूंना आणि मज्जातंतूंना आराम कसा द्यायचा याची कला शिकविली पाहिजे.

पण बरेच पालक असेही असतात की, जे मुलांना कोणती ना कोणती तरी कृती करण्यास भाग पाडत असतात. जेव्हा मूल शांत असते तेव्हा पालकांना असे वाटते की, जणू ते आजारी आहे. मुलांना आराम करू न देता किंवा त्यांना थोडीही विश्रांती घेऊ न देता, कामामध्ये गुंतवून ठेवण्याची वाईट खोडसुद्धा काही पालकांना असते. …आपल्या कुटुंबाला मदत करण्याचे जर मुलाने स्वतःहून ठरविले असेल आणि काम करण्याची त्याला आवड असेल तरच त्याला तशा प्रकारचे काम करू दिले पाहिजे. मात्र त्यामध्ये एक खबरदारी घेतली गेली पाहिजे. आणि ती अशी की, त्याच्या शरीराचे कार्य व्यवस्थितपपणे चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीचे तास त्यामुळे कमी होता कामा नयेत.

* श्रीमाताजी (CWM 12 : 15-16)

शरीर आरोग्यपूर्ण ठेवण्यसाठी आणि सामर्थ्य संपादन करण्यासाठी आपण अन्नग्रहण करतो; आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही, हे व्यक्तीला अगदी लहानपणापासूनच माहीत असले पाहिजे. लहान मुलांना त्यांच्या प्रकृतीस मानवेल असे अन्न दिले पाहिजे. अन्न आरोग्यदायी असेल याची खात्री केली पाहिजे आणि स्वच्छतेची खबरदारी घेऊन ते तयार केलेले असावे. तसेच ते रुचकर असूनही अतिशय साधे, सात्त्विक असले पाहिजे. मुलांचे वय आणि त्यांच्या रोजच्या कृती पाहून, त्यानुसार आणि त्या प्रमाणात आहाराची निवड केली पाहिजे. मुलांच्या शरीराच्या प्रत्येक घटकाच्या संतुलित वाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पोषक द्रव्यांचा समावेश त्यांच्या आहारात केला पाहिजे.

मुलं निरोगी राहण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा पुरविण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी आहार द्यायचा असल्यामुळे, आहाराबाबत त्यांच्यावर सक्ती करता कामा नये किंवा त्या अन्नाचा उपयोग शिक्षा म्हणूनही कधी करता कामा नये. “तू नीट वागला नाहीस त्यामुळे तुला आता मी हा खाऊ देणार नाही,” असे मुलांना कधीही म्हणू नये. ही पालकांची सवय अतिशय घातक असते. असे जर तुम्ही त्याला सांगितलेत तर, शरीर योग्य रितीने कार्यरत राहावे म्हणून अन्न आवश्यक नसून, ते मुख्यत: त्याचे लाड पुरविण्यासाठी त्याला दिले जाते, अशी त्याची समजूत होण्याची शक्यता असते आणि त्याच्या चेतनेमध्ये तीच धारणा पक्की होण्याची शक्यता असते.

• श्रीमाताजी (CWM 12 : 14)

बालकाची वाढ स्वाभाविकपणे होत राहते; ते स्वतःच्या वाढीची काळजी करत बसत नाही.
*
बालकाच्या साध्यासुध्या विश्वासामध्ये महान शक्ती सामावलेली असते.
*
विश्वास, बालकसदृश विश्वास असणे ही पूर्णयोगामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे. बालकाच्या ठिकाणी अशी एक साधीसरळ भावना असते की, जे जे काही आवश्यक आहे, गरजेचे आहे ते त्याला मिळेलच. त्याबाबतीत त्याच्या मनात कोणतीही शंका नसते. एखाद्या बालकाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा त्याला ही खात्री असते की, ती गोष्ट त्याला नक्की मिळेल. अशा प्रकारचा, बालकसदृश साधासरळ विश्वास किंवा भरवसा ही पूर्णयोगामधील सर्वात महत्त्वाची अट आहे.
*
एखादे बालक जेव्हा स्वाभाविक (normal) स्थितीमध्ये जीवन जगत असते तेव्हा त्याच्या सर्व गरजा पुरविल्या जातील असा त्याला एक दृढ विश्वास असतो. हा विश्वास आयुष्यभर तसाच अविचल टिकून राहिला पाहिजे. बालकाची त्याच्या स्वतःच्या गरजांविषयीची जी कल्पना असते ती मर्यादित, अजाणतेपणाची आणि अगदी वरवरची असते; ती कल्पना हळूहळू अधिक विशाल, अधिक सखोल आणि अधिक खऱ्या संकल्पनेने युक्त झाली पाहिजे. तसे झाले म्हणजे त्याच्या कल्पनेची परिणती एका परिपूर्ण संकल्पनेमध्ये होते. परमप्रज्ञेची (supreme wisdom) गरजेविषयी असणारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण संकल्पना. आपल्या खऱ्या गरजा या केवळ ईश्वरालाच माहीत असतात, हे आपल्या लक्षात येईपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वरावरच विसंबून राहायचे ही अवस्था येईपर्यंत ही परिणती होत राहिली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124-125)