अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्या मनुष्यामध्ये स्वामित्व-भावना नसते. म्हणजे वस्तू जेव्हा त्याच्यापाशी येतील तेव्हा तो त्यांचा उपयोग करेल, पण तेव्हासुद्धा त्याला ही जाण असेल की, त्या (माझ्या मालकीच्या नसून) त्या परमेश्वराच्या मालकीच्या आहेत आणि म्हणूनच, अगदी त्या त्याच्यापासून दूर झाल्या तरीही त्याबद्दल तो खंत बाळगणार नाही. ज्या ईश्वराने त्याला त्या वस्तू दिल्या होत्या, त्यांचा इतरांना उपभोग घेता यावा म्हणून त्याच ईश्वराने त्या त्याच्याकडून काढून घेतल्या, ही गोष्ट त्याला अगदी सहजस्वाभाविक वाटते. अशा मनुष्याला वस्तुंचा वापर करत असताना आणि त्यांचा अभाव असतानाही सारखाच हर्ष अनुभवास येतो.
जेव्हा त्या वस्तू तुमच्यापाशी असतात तेव्हा ईश्वरी कृपेची देणगी म्हणून तुम्ही त्या स्वीकारता आणि जेव्हा त्या तुम्हाला सोडून जातात किंवा जेव्हा त्या तुमच्याकडून काढून घेण्यात येतात, तेव्हा तुम्ही अपरिग्रहाचा (destitution) हर्ष अनुभवत जीवन जगता. स्वामित्व-भावनेमुळेच तुम्ही गोष्टींना चिकटून राहता, ती भावनाच तुम्हाला गुलाम बनविते. तसे नसते तर या येणाऱ्या-जाणाऱ्या गोष्टींच्या निरंतर घडामोडींमध्येही तुम्ही नेहमीच हर्षभरित जीवन जगू शकला असतात. त्या गोष्टी त्यांच्यासोबत (कृतार्थतेचा आनंद आणि निर्लिप्ततेचा आनंद) दोन्हीही घेऊन येतात म्हणजे, जेव्हा त्या गोष्टी तुमच्यापाशी असतात तेव्हा तुम्ही ‘कृतार्थतेचा आनंद’ अनुभवू शकता आणि जेव्हा तुमच्यापाशी त्या नसतात तेव्हा तुम्ही ‘निर्लिप्ततेचा आनंद’ अनुभवू शकता. (दोन्हीवेळी तुम्ही आनंदच अनुभवू शकता.)
सत्यामध्ये जीवन जगणे; शाश्वताशी, खऱ्याखुऱ्या जीवनाशी सायुज्य पावून जीवन जगणे; जो प्रकाश कधीच मावळत नाही अशा प्रकाशात जीवन जगणे म्हणजे आनदं! मुक्त असणे खऱ्या स्वातंत्र्यासहित मुक्त असणे, ईश्वरी संकल्पाशी असलेल्या अविचल, नित्य ऐक्याचे स्वातंत्र्य अनुभवणे म्हणजे आनंद!
…जेव्हा स्वतःच्या मालकीचे असे तुमच्याजवळ काहीच नसते तेव्हा तुम्ही विश्वाएवढे विशाल होऊ शकता.
– श्रीमाताजी (CWM 03 : 253-254)
- शिक्षण आणि संस्कृती - June 9, 2026
- शिक्षणाचे ध्येय - June 8, 2026
- ईश्वराचे साधन होण्यासाठी प्रार्थना - June 7, 2026





