अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ०९
(उत्तरार्ध)
स्वत:बद्दल विचार करत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, स्वत:साठी काय चांगले आहे व काय वाईट, कोणत्या गोष्टीला मुरड घालायची आणि कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, यासारखे विचार सतत करत बसणे या गोष्टी किती थकविणाऱ्या आहेत; किती कंटाळवाण्या, रटाळ, किती अळणी आहेत या! त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाशासमोर, परम प्रेमासमोर, स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारेकाही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचे संचालन करू शकतो (अशा परमेश्वरासमोर) स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत. ही आदर्श स्थिती आहे.
पण मग हे असे का केले जात नाही? कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती तसे करायचे विसरून जाते, आणि मग जुन्याच सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून बसलेली असते. ती कानात कुजबुजते की, “बघ हं! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.’’ आणि तुम्ही एवढे मूढ असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही फक्त स्वत:कडे लक्ष द्यायला लागता आणि मग सगळेच बिघडून जाते. मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि ‘चिंता करू नका,’ ही गोष्ट त्यांना पुन्हा शिकवावी लागते.
– श्रीमाताजी (CWM 03 : 256-257)
- कंटाळ्यावरील उपाय - June 27, 2026
- एक अक्षय्य ऊर्जास्रोत – भाग ०२ - June 26, 2026
- एक अनोखा ऊर्जास्रोत - June 25, 2026






