पूर्णयोगाचे अधिष्ठान – २२

साधनेच्या सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणे अपरिहार्यच असते. सुरूवातीच्या काळात असे म्हणत असताना, अगदी थोड्या कालावधीसाठी असे मला म्हणायचे नाही; हे लक्षात घ्या. अर्थातच समर्पणसुद्धा आवश्यकच असते, पण समर्पण ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही. मनाच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि मन त्यांना चिकटून बसते. मानवी प्राण समर्पित होण्यास विरोध करतो, कारण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तो ज्याला ‘समर्पण’ असे संबोधत असतो ते म्हणजे एक प्रकारचे साशंकपणे केलेले आत्मदान असते आणि त्यासोबत एक मागणीदेखील असते. जडभौतिक चेतना ही जणू काही एखाद्या दगडासारखी असते आणि ती चेतना ज्याला ‘समर्पण’ असे संबोधते ते समर्पण म्हणजे बरेचदा जडत्व असते. समर्पण कसे करायचे हे केवळ चैत्य अस्तित्वालाच (psychic) माहीत असते आणि प्रारंभी हे चैत्य अस्तित्व सहसा बरेचसे झाकलेले असते. जेव्हा साधक चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होतो तेव्हा ते संपूर्ण अस्तित्वाचे एकाएकी आणि खरेखुरे समर्पण घडवून आणू शकते, कारण उर्वरित भागांच्या अडचणी त्वरेने सोडविल्या जातात आणि त्या नाहीशा होतात. परंतु तोपर्यंत प्रयत्न हे अपरिहार्यच असतात.

अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये ‘दिव्य शक्ती‌’ (जल) प्रपाताप्रमाणे वरून खाली अवतरित होत नाही आणि त्या शक्तीकडून जोपर्यंत साधना हाती घेतली जात नाही, आणि व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर विसंबून न राहता, ती शक्ती जोपर्यंत स्वतःच अधिकाधिक साधना घडवून आणत नाही तोपर्यंत आणि अगदी तेव्हासुद्धा, म्हणजे ‘ईश्वरी शक्ती’कडून मन, इच्छा, प्राण आणि शरीर यांचा पूर्णपणे ताबा घेतला जात नाही तोपर्यंत तरी, अगदी प्रयत्न नाही तरी किमान, अभीप्सा आणि सतकर्ता या गोष्टी आवश्यकच असतात.

दुसऱ्या बाजूला असे काही लोक असतात की, जे संपूर्ण समर्पणाविषयीच्या एका खऱ्याखुऱ्या आणि कृतिशील इच्छेने आरंभ करतात. ज्या व्यक्तींवर चैत्य अस्तित्वाची किंवा सुस्पष्ट, प्रबुद्ध मानसिक इच्छेची सत्ता चालते त्यांनी ‘समर्पण हा साधनेचा नियम आहे’, ही गोष्ट एकदा का स्वीकारली की मग, ते त्याबाबतीत कोणताही उणे-अधिकपणा खपवून घेत नाहीत आणि अस्तित्वाच्या इतर घटकांनीदेखील चैत्य अस्तित्वाने दाखविलेल्या दिशेचेच अनुसरण केले पाहिजे, असा आग्रह ते धरतात. इथेसुद्धा प्रयत्न असतातच पण ते इतके सिद्ध आणि उत्स्फूर्त असतात आणि त्यांना त्यांच्या पाठीशी असणाऱ्या महत्तर शक्तीची इतकी ठाम जाणीव असते की, त्या साधकाला आपण काही सायास करत आहोत, प्रयत्न करत आहोत असे मुळी जाणवतच नाही.

उलट दुसऱ्या एखाद्या उदाहरणामध्ये, व्यक्तीला स्वतःच्या स्वतंत्र गतिविधी सोडून द्यायच्या नसतात आणि जेथे मन किंवा प्राण स्व-इच्छा टिकवून ठेवू इच्छित असतात अशा उदाहरणांबाबत पृष्ठवर्ती साधन आणि त्या साधनाच्या पाठीशी किंवा वर असणारे दिव्यत्व यांच्यामधील भिंत ढासळेपर्यंत संघर्ष आणि प्रयत्न क्रमप्राप्तच असतात. या बाबतीत निरपवादपणे सर्वांनाच लागू पडेल असा एकच एक नियम सांगता येणे अवघड आहे. मानवी प्रकृतीमध्ये इतकी प्रचंड विविधता आहे की, कोणत्याही एकाच परिणामकारक नियमामध्ये सारी मानवी प्रकृती बसविता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 83-84)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २१

व्यक्ती ईश्वराप्रति जर विश्वासाने आणि खात्रीपूर्वक स्वत:स अर्पण करेल तर ईश्वराकडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल. तिची आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, (आंतरिक व बाह्य चेतना यामधील तसेच कनिष्ठ चेतना व उच्चतर चेतना यामधील) पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मार्पण जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य व मार्गदर्शन मिळत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क व त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची लुडबुड कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. तेव्हा मग त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता उरणार नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 69)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २०

(आपण समर्पण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि आंतरिक समर्पण हा साधनेचा गाभा कसा असतो, हे अगोदरच्या दोन भागात समजावून घेतले. आता या भागात पूर्णयोगाचा मार्ग व इतर योग यातील फरक स्पष्ट केला आहे.)

समर्पण हाच साधनेचा एकमेव मार्ग आहे आणि अन्य कोणत्या मार्गाने साधना करताच येऊ शकत नाही, असे म्हणण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. व्यक्तीने ईश्वराप्रति पोहोचावे यासाठी अनेकानेक मार्ग उपलब्ध आहेत. मात्र मला ज्ञात असलेली ही अशी एकमेव साधना आहे की जिच्यामध्ये, प्रकृतीची तयारी होण्यापूर्वीच, ईश्वराकडून साधना हाती घेतली जाणे, ही गोष्ट एक संवेद्य (sensible) वास्तविकता बनते. इतर साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती आणि तिचे साहाय्य हे वेळोवेळी जाणवू शकते पण बहुतांश वेळा, म्हणजे जोवर सर्व सिद्धता होत नाही तोपर्यंत ते साहाय्य पडद्याआडूनच मिळत राहते. मात्र काही साधनापद्धतींमध्ये सारे काही तपस्येद्वारेच करावे लागते. त्यामध्ये ईश्वरी कृती ग्राह्य मानली जात नाही. बहुतेक सर्व पद्धतींमध्ये या दोन्हींचे मिश्रण असते, तपस्या अंतिमतः ईश्वराच्या थेट साहाय्यासाठी आणि हस्तक्षेपासाठी आवाहन करते. ‘ईश्वरच सारे काही करत असतो‌’ ही संकल्पना आणि त्याची अनुभूती या गोष्टी समर्पणावर आधारित योगमार्गांमध्येच आढळतात.

मार्ग कोणताही अनुसरला, तरी एक गोष्ट करणे आवश्यकच असते आणि ती गोष्ट म्हणजे एकनिष्ठ असणे आणि लक्षपूर्तीपर्यंत वाटचाल करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 71)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १९

(आपण मागच्या भागात आंतरिक व बाह्य समर्पण यातील फरक थोडक्यात समजावून घेतला. आज आता आंतरिक समर्पणाविषयी अधिक जाणून घेऊ या.)

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत.

”मला दुसरेतिसरे काहीही नको, केवळ ईश्वरच हवा, असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते… मी ईश्वराला संपूर्णपणे समर्पित होऊ इच्छितो आणि ती माझ्या आत्म्याचीच मागणी असल्याने, इतर काहीही नको, तर फक्त तोच हवा. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी त्याव्यतिरिक्त इतर काहीही मागणार नाही. ज्यामुळे, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग ते कार्य गुप्त असेल अथवा उघड असेल, ते पडद्याआडून असेल किंवा प्रकट असेल, ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. सर्व गोष्टी, मी म्हणतो त्या पद्धतीनेच आणि तेव्हाच घडायला हव्यात असा आग्रह मी धरणार नाही. त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे. मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. त्याची इच्छा प्रमाण मानेन, त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन. कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहीन आणि हा मार्ग कधीही सोडणार नाही. माझे मन शांत होऊ दे व त्या ईश्वराकडे वळू दे आणि त्याने माझे मन त्याच्या प्रकाशाप्रत खुले करू देत; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे, त्याने त्या प्राणाला त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत खुले करू देत. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच आहे. काहीही झाले तरी, मी ही अभीप्सा आणि आत्मदान दृढ ठेवीन आणि ते घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.”

व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण या गोष्टी एकदम एकाच वेळी परिपूर्ण होणे शक्य नसते; मानसिक व प्राणिक गतिविधी त्यांच्या आड येत राहतात. पण व्यक्ती जर वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये वृद्धिंगत होत राहतील. उर्वरित गोष्टी या (ईश्वरी मार्गदर्शनाचे) आज्ञापालन करण्याचा भाग असतात; ईश्वरी मार्गदर्शन जेव्हा स्वतःला आविष्कृत करू लागते तेव्हा, व्यक्तीने स्वतःच्या मानसिक किंवा प्राणिक गतिविधींना त्यामध्ये लुडबूड करू न देता त्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 70-71)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १८

(श्रीअरविंद लिखित पत्रांमधून)

व्यक्तीला जर ‘ईश्वर’ हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धिकरण प्रक्रियासुद्धा ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्या व्यक्तीला देऊ करावेत, ही जी तुमची ‘योगा‌’विषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी मागील पत्रात तसे लिहिले होते. असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते. पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असला पाहिजे, भरवसा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) तिची समर्पणाची इच्छा असली पाहिजे. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून न राहता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत असते. यामध्ये व्यक्तीची सर्व श्रद्धा व विश्वास ईश्वरावरच असणे आणि तिने उत्तरोत्तर आत्मसमर्पण करत राहणे अभिप्रेत असते.

खरंतर, हेच साधनेचे मूलसूत्र आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे… पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येतो असे नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो. मी मन आणि प्राण यांच्या ‘आंतरिक समर्पणा‌’बद्दल सांगितले होते.

अर्थातच ‘बाह्य समर्पण‌’देखील (outer surrender) असते. व्यक्ती जर ईश्वराकडून थेट मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याच्या योग्यतेला पोहोचली असेल तर मग, त्या मार्गदर्शनाचे पालन करणे अन्यथा चैत्य पुरूषाच्या किंवा गुरूच्या माध्यमातून व्यक्तीला जे मार्गदर्शन लाभत असेल, त्याचे पालन करणे आणि ज्या ज्या गोष्टी आत्म्याच्या विरोधात किंवा साधनेच्या दृष्टीने आवश्ययक असणाऱ्या गोष्टींच्या विरोधात असतील अशा सर्व गोष्टी सोडून देणे, अर्पण करणे या साऱ्या गोष्टींचा समावेश बाह्य समर्पणामध्ये होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 70)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १७

स्वतःला ईश्वराच्या हाती सोपवणे म्हणजे समर्पण. व्यक्तीने तिचे सर्व-स्व ईश्वरास अर्पण करणे; कोणतीही गोष्ट स्वत:ची आहे असे न समजणे; अन्य कोणाच्याही नव्हे तर, फक्त ‘ईश्वरी’ इच्छेचे अनुसरण करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हाच पूर्णयोगाच्या साधनेचा पहिला सिद्धांत आहे. मात्र जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते… समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तोच तर साधनेचा खरा सिद्धांत आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, (रूपांतरणाचे) कार्य पूर्ण होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने करत राहिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67,75-76)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६

साधकाची योगमार्गावर जी वाटचाल चालू असते त्या वाटचालीमध्ये अशी एक अवस्था येते की, ज्या अवस्थेमध्ये साधक त्याच्या अंतरंगामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्य शक्तीविषयी सचेत असतो किंवा किमानपक्षी, तो त्या कार्याच्या परिणामाविषयी तरी नक्कीच सचेत असतो. (आणि अशा रितीने सचेत झाल्यामुळे) तो आता तिच्या अवतरणामध्ये किंवा तिच्या कार्यामध्ये, स्वतःच्या मानसिक गतिविधींमुळे किंवा स्वतःच्या प्राणिक अस्वस्थतेमुळे किंवा शारीरिक जडतेमुळे व तमोमयतेमुळे अडथळे निर्माण करत नाही. यालाच ‘ईश्वराप्रति खुले असणे’ (openness to the Divine) असे म्हणतात.

ईश्वराप्रति खुले होण्याचा समर्पण (Surrender) हा सवोत्तम मार्ग आहे. पण साधकामध्ये जोपर्यंत समर्पण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत, अभीप्सा आणि अविचलतेच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे खुलेपण येऊ शकते.

स्वतःकडे असलेले सर्वकाही ईश्वराच्या स्वाधीन करणे; तसेच स्वतःकडे जे आहे ते सर्व आणि एवढेच नव्हे तर, स्वत:ला सुद्धा ईश्वराप्रति अर्पण करणे म्हणजे ‘समर्पण’. समर्पण करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह धरता कामा नये तर, त्या प्रत्येकाची जागा दिव्य सत्याच्या ज्ञानाने, संकल्पाने आणि कार्याने घ्यावी यासाठी, त्या दिव्य सत्याला मोकळीक देणे म्हणजे ‘समर्पण’.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४

पूर्वार्ध

एकीकडे तुम्ही असे म्हणत असाल की, मी स्वतःला ‘श्रीमाताजीं’प्रति खुले ठेवले आहे आणि त्याच वेळी तुम्ही समर्पण मात्र हातचे राखून ठेवत असाल तर, तुमच्या त्या म्हणण्याला फारसा आध्यात्मिक अर्थ नाही. जे पूर्णयोगाची साधना करतात त्यांनी आत्मदान करावे किंवा समर्पण करावे असे अभिप्रेत असते. कारण, व्यक्तीच्या अशा प्रकारच्या प्रगमनशील (progressive) समर्पणाखेरीज, ध्येयाच्या जवळपास पोहोचणे देखील अशक्यप्राय असते.

स्वतःला खुले ठेवणे म्हणजे तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी श्रीमाताजींच्या ‘शक्ती’स आवाहन करणे. पण तुम्ही जर त्या शक्तीला समर्पित झाला नाहीत तर, त्याचा परिणाम असा होतो की, एकतर तुम्ही तुमच्यामध्ये त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देत नाही किंवा तुम्हाला ते कार्य ज्या पद्धतीने व्हावे असे वाटते त्या पद्धतीने होणार असेल तरच, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देता. म्हणजेच, त्या शक्तीला तुम्ही तिच्या पद्धतीने म्हणजे दिव्य सत्याच्या पद्धतीने कार्य करू देत नाही.

अशा प्रकारच्या अटी घालणे हे सहसा कोणत्यातरी विरोधी शक्तीकडून केले जाते किंवा मनाच्या किंवा प्राणाच्या एखाद्या अहंभावात्मक घटकाकडून केले जाते. त्याला ईश्वरी ‘कृपा’ किंवा ‘शक्ती’ हवी असते पण ती त्याला स्वतःच्या हेतुसाठी वापरायची असते; त्याला ईश्वरी उद्दिष्टासाठी जीवन जगण्याची इच्छा नसते. त्याला ईश्वराकडून जे जे मिळविणे शक्य असते ते सर्व हवे असते पण तो स्वतःला मात्र ईश्वराप्रति अर्पण करू इच्छित नसतो. उलटपक्षी, सत्-अस्तित्व (true being), आत्मा हा ईश्वराभिमुख होतो आणि त्याला ईश्वराप्रति समर्पण करण्याची केवळ इच्छाच असते असे नाही तर, तो आनंदाने समर्पण करण्यासाठी तत्पर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 140-141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १३

श्रीमाताजींप्रति स्वत:ला उन्मुख, खुले ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि श्रीमाताजींच्या शक्तीव्यतिरिक्त इतर सर्व प्रभावांना नकार द्या आणि त्या शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करू द्या; हा पूर्णयोगाचा नियम आहे.

*

श्रीमाताजींसमोर आंतरात्मिकरित्या उन्मुख, खुले राहिल्याने, कार्यासाठी किंवा साधनेसाठी जे काही आवश्यक असते ते सर्व क्रमश: विकसित होत जाते. साधनेच्या महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)