नैराश्यापासून सुटका – ३२

(प्रत्येक व्यक्ती नकळतपणे वातावरणामध्ये स्वत:च्या मनोरचना पाठवत असते. त्या मनोरचनांचे विश्व कसे असते याचे वर्णन कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्याचा हा उत्तरार्ध…)

आपण स्वतः विचार करत असताना, स्वतःकडे पाहणे आणि (मनोरचना प्रत्यक्षात कशा येतात यासंबंधी) घटना पाहणे, स्वतःला आविष्कृत करू पाहणाऱ्या या छोट्याछोट्या जिवंत आकृत्यांचे वातावरणामध्ये सातत्याने जे प्रक्षेपण चालू असते, त्याबाबत जागरूक होणे ही प्रबुद्धतेची (wisdom) सुरूवात असते. आपण आपल्यामध्येच जे मानसिक वातावरण बाळगत असतो त्यामधून या मनोरचना बाहेर पडत असतात.

एकदा आपण त्यांच्याकडे पाहू शकलो, त्यांचे निरीक्षण करू लागलो की मग आपल्याला त्यांचे वर्गीकरण करता येते. तसे करता आले की मग, आपल्या उच्चतर संकल्पाशी किंवा आपल्या अभीप्सेशी मिळत्याजुळत्या नसणाऱ्या मनोरचनांना आपण बाजूला सारू शकतो आणि आपल्या प्रगतीसाठी व सुरळीत विकसनासाठी आपल्याला ज्या साहाय्यक होतील केवळ अशाच मनोरचनांना आविष्कृत होण्याच्या मार्गावर प्रगत होण्यासाठी आपण मुभा देऊ शकतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 387)

नैराश्यापासून सुटका – ३१

आपण सदासर्वकाळ मनोमय प्रतिमा, मनोरचना (formation) निर्माण करत असतो. आपल्याही नकळतपणे आपण अशा प्रकारच्या प्रतिमा वातावरणामध्ये पाठवत असतो. मग त्या प्रतिमा, त्या मनोरचना वातावरणात इतस्तत: फिरत राहतात. त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्या मनोरचनांना त्यांचे सहचर भेटतात, कधीकधी त्या एकत्रित येतात आणि आनंदाने एकत्र राहू लागतात. कधीकधी त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात; तर कधी त्यांच्यामध्ये लढायासुद्धा होतात. कारण बऱ्याचदा या मानसिक प्रतिमांमध्ये इच्छेचा एक लहानसा घटक मिसळलेला असतो आणि तो स्वतःला प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग, प्रत्येकजणच तशा मनोरचना वातावरणात पाठविण्याचा प्रयत्न करत राहतो, जेणेकरून ती मनोरचना कृती करू शकेल आणि मग त्या व्यक्तीला हव्या त्यानुसार गोष्टी घडून येऊ शकतील. पण प्रत्येकजणच अशा रितीने वागत असल्याने त्यातून सर्वसाधारणपणे एक गोंधळ निर्माण होतो.

वातावरणातील या सर्व मनोरचना पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असेल तर, आपल्याला अगदी आश्चर्यकारक गोष्टी दिसून येतील. युद्धभूमी, मनोलहरी, छोट्या छोट्या मनोमय अस्तित्वांच्या झुंडी जिथे दाटीवाटीने राहत आहेत अशी आश्रयस्थानं, अशा अनेक गोष्टी तिथे तुम्हाला दिसतील. ही मनोमय अस्तित्वं सारखी बाहेर हवेमध्ये फेकली जात असतात आणि ती अस्तित्वं सतत मूर्त रूपात येण्याचा प्रयत्न करत असतात.

या सर्व मनोरचनांमध्ये एक समान प्रवृत्ती आढळून येते आणि ती म्हणजे त्यांना मूर्त रूप धारण करण्याची इच्छा असते, त्यांना शारीरिक रूपामध्ये प्रत्यक्षात येण्याची इच्छा असते आणि या मनोरचना अगणित असल्याने – या सर्व मनोरचना येथे पृथ्वीवर आविष्कृत व्हायच्या असतील तर त्यासाठी येथील जागा अपुरी पडेल इतकी त्यांची संख्या प्रचंड असते – या मनोरचना ढकलाढकली करतात, ढोपरांनी एकमेकांना ढोसतात, त्यांच्याशी सहमत नसलेल्या मनोरचनांना त्या मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात किंवा कधीकधी तर त्या रचना आपापली सैन्यदलंसुद्धा स्थापन करतात आणि चाल करून येतात. काळ आणि अवकाश या दोन्ही ठिकाणी त्या स्वतःसाठी जागा मिळवू पाहतात. या मनोरचनांची संख्या पाहता त्याच्या तुलनेत येथे उपलब्ध असणारी जागा अगदीच अल्पशी असते आणि म्हणून, व्यक्तिशः हे असे होत राहते.

लोकांना हे काही माहीत नसते आणि तरीही लोकं अशा मनोरचना तयार करत राहतात, बहुधा प्रत्येकजणच अशा रचना तयार करत असतो. आणि ते सातत्याने एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर आदळत राहतात, ते कधी आशावादी असतात, ते कधी इच्छावासना बाळगतात, कधी त्यांचा अपेक्षाभंग होतो, तर कधी ते आनंदी असतात, कधी ते हताश होतात, कारण त्यांचे या मनोरचनांवर कोणतेच नियंत्रण नसते किंवा प्रभुत्व नसते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 386-387)

नैराश्यापासून सुटका – ३०

(साधकांनी पत्राच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना श्रीअरविंद पत्रोत्तरे देत असत. परंतु कधीकधी या कामाचा व्याप इतका वाढत असे की, त्यांना स्वतः पत्र लिहिणे अवघड होत असे, अशा वेळी ते आपल्या निकटवर्तीयाला पत्राचा मजकूर तोंडी सांगत असत आणि त्या बरहुकूम तो, संबंधित पत्रलेखकाला पत्रोत्तर पाठवीत असे. येथेही श्रीअरविंद तोंडी मजकूर सांगत असावेत, असे दिसते.)

नाउमेद होणे ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यामध्ये साधकाने कधीही अडकून पडता कामा नये, असे त्याला सांगा. प्रगती अगदी वेगवान आणि सुकरतेने होत असेल किंवा प्रगतीचा वेग मंद असेल किंवा प्रगती खुंटलेली असेल, तरीही व्यक्तीने नेहमीच स्थिरपणाने वाटचाल करत राहिले पाहिजे. व्यक्ती नेहमीच योग्य वेळी तिच्या ध्येयाप्रत जाऊन पोहोचते. अडीअडचणी आणि अंधकाराचे कालावधी टाळता येण्यासारखे नसतात; त्यांना स्थिरचित्ताने आणि धैर्याने सामोरे जात, त्यांच्या पार जायचे असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 182)

नैराश्यापासून सुटका – २९

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमामध्ये कायमच्या वास्तव्यास येऊ इच्छिणाऱ्या पण परिस्थितीमुळे तसे करणे शक्य होत नसलेल्या एका साधकाला श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…)

तुमच्यावर निराशेचे, निरुत्साहाचे मळभ कधीही येऊ देऊ नका आणि ‘ईश्वरी कृपे‌’बाबत कधीही अविश्वास बाळगू नका. बाह्यत: कितीही अडचणी असू देत किंवा तुमच्या स्वत:मध्येसुद्धा कोणत्याही दुर्बलता असू देत पण, तुम्ही जर दृढ श्रद्धा आणि अभीप्सा बाळगलीत तर, ती अदृश्य ‘शक्ती‌’ तुम्हाला त्या साऱ्यामधून पार करेल आणि परत येथे (आश्रमात) घेऊन येईल.

तुम्ही विरोधामुळे आणि अडचणींमुळे अगदी खचून गेलात, जरी तुम्ही डळमळीत झालात, तुम्हाला जरी मार्ग खुंटल्यासारखा वाटला तरीसुद्धा तुमची अभीप्सा (मात्र सदोदित) जागती ठेवा. कधी तुमची श्रद्धा झाकोळल्यासारखी झाली तर, अशा वेळी नेहमीच मनाने आणि अंतःकरणातून आमच्याकडे वळा; म्हणजे ते झाकोळलेपण दूर केले जाईल. …पण मार्गावर दृढपणे वाटचाल करत राहा. मग गोष्टी स्वतःहून उलगडत जातील आणि सरतेशेवटी परिस्थिती आंतरिक चैतन्याला शरण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 101)

नैराश्यापासून सुटका – २८

(एका साधकाला ‘सत्या’ची हाक आलेली आहे. त्या मार्गावर वाटचाल करताना त्याची वृत्ती कशी असली पाहिजे हे श्रीअरविंद त्या साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत.)

मनामध्ये शंकाकुशंका आल्या किंवा नैराश्य आले तर असे म्हणावे की, ”ईश्वर माझा पाठीराखा आहे, मला अपयश कसे बरे येईल?” तुम्ही पुरेसे शुद्ध नाही किंवा पात्र नाही अशा सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, “मी अमृतपुत्र आहे आणि स्वत: ईश्वराने माझी निवड केली आहे. मी स्वत:शी व ईश्वराशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे आणि मी तसा प्रामाणिक राहिलो तर विजय निश्चित आहे; अगदी मी पडलो, धडपडलो तरी मी निश्चितपणे पुन्हा उभा राहीन.”

या उच्चतर ध्येयाकडे (सत्याच्या हाकेकडे) पाठ फिरवून, कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करू पाहणाऱ्या सर्व उर्मींना उत्तर द्या की, “माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे ज्यामुळे समाधान होऊ शकेल असे हे सर्वात महान ध्येय आहे, एकमेव ‘सत्य’ आहे; दिव्यत्वाच्या दिशेने चाललेल्या या वाटचालीमध्ये मला कोणत्याही कसोट्यांना आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने त्या ध्येयापर्यंत पोहोचेनच.”

‘दिव्य प्रकाश आणि दिव्य हाक यांच्याप्रत निष्ठा‌’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 99)

नैराश्यापासून सुटका – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

ईश्वर जर अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या मार्गासाठी हाक दिलेली आहे (आणि ती हाक आलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे), तर मग या सगळ्या पाठीमागे निश्चितपणे ‘ईश्वरी मार्गदर्शन‌’ असले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही त्यांमधून पार व्हाल आणि या मार्गावर खात्रीपूर्वक येऊन पोहोचाल, अशी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे. आणि ती तर्क व सामान्य जाणीव (common sense) यांच्याशी मिळतीजुळती देखील असेल.

तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही अशा सूचना देणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका; किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या अधीर, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. पुष्कळ अडचणी असल्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता दिसत नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच ईश्वराने आत्तापर्यंत त्याचे अस्तित्व तुम्हाला जाणवू दिले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा समजुतीवर मुळीच विश्वास ठेवू नका. ज्यांनी ज्यांनी आपले मन अतिशय महान व अवघड अशा एखाद्या ध्येयावर केंद्रित केलेले असते, त्यांची अशी भूमिका असते की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन. मग भले कितीही अडचणी आल्या तरी, मी यशस्वी होईनच होईन.” अशीच तुमची भूमिका असू दे.

ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या मनुष्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट असते, ती अशी की, “ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर तो अस्तित्वात आहे तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये मला कधीही अपयश येऊच शकणार नाही. मला जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, तोपर्यंत कितीही दुःख वा संकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद (CWSA 29 : 94)

नैराश्यापासून सुटका – २६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.

*

सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती‌’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती‌’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.

अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)

नैराश्यापासून सुटका – २५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

नैराश्यामुळे स्वत:ला निराश होऊ द्यायचे नाही, तर त्यापासून चार पावले मागे होऊन, त्याच्या कारणाचा शोध घ्यायचा आणि ते कारण दूर करायचे, हा ‘योगा’मधील एक नियम आहे. बरेचदा ते कारण तुमच्या स्वतःमध्येच असते. कदाचित कोठेतरी एखादा प्राणिक दोष असतो, एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये व्यक्ती गुंतून पडते किंवा एखादी किरकोळ इच्छा तिच्या अंगलट येते. कधीकधी इच्छेची पूर्ती केल्यामुळे तर कधी ती पूर्ण न केल्यामुळे असे घडून येते.

योगामध्ये बरेचदा असे होते की, एखादी इच्छा-वासना अपूर्ण राहिल्यामुळे जेवढे अधःपतन होते, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधःपतन तिच्या उपभोगामुळे किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीला डोक्यावर चढवून ठेवल्यामुळे होते. तर मग तुम्ही काय केले पाहिजे? इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा त्रास आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (Psychic being) होत नाही; कारण ईश्वराशी असलेल्या त्याच्या सख्यत्वावर तो सुस्थिरपणे उभा असतो आणि त्याच्या खऱ्या अस्तित्वाच्या दृष्टीने या छोट्याछोट्या गोष्टींकडे, त्या परक्या असल्याप्रमाणे तो पाहत असतो. पण इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा जास्त परिणाम बाह्यवर्ती प्राण व मन यांच्यावर होत असतो. तेव्हा बाह्यवर्ती प्राणिक व मानसिक जीवनात फारसे न राहता, तुम्ही अधिकाधिक सखोलपणे अंतरंगामध्ये राहून जीवन जगले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 189)

नैराश्यापासून सुटका – २४

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

जीवन निरर्थक झाले आहे अशा प्रकारची भावना, या प्रकारची खिन्नता तुम्ही दूर केलीच पाहिजे. जीवनात यश मिळू दे, नाहीतर अडचणी येऊ देत पण, जोपर्यंत जीवन हे ‘ईश्वराभिमुख’ असते तोपर्यंत जीवनाला काही ना काही अर्थ असतो. तुम्हाला संरक्षण पुरविले जाईल पण तुम्ही निराशा दूर केलीच पाहिजे; तसे केल्यामुळे तुम्ही शक्ती व साहाय्य स्वीकारू शकाल आणि ते उपयोगात आणू शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 188)

नैराश्यापासून सुटका – २३

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमची ही अडचण अविश्वास आणि अवज्ञेतूनच आलेली दिसते. कारण अविश्वास आणि अवज्ञा (distrust and disobedience) या गोष्टी मिथ्यत्वासारख्याच असतात. (त्या स्वतःही मिथ्या असतात आणि मिथ्या कल्पना व आवेगांवर आधारित असतात.) त्या ‘ईश्वरी शक्ती‌’च्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतात. त्या गोष्टी व्यक्तीला ईश्वरी शक्तीची जाणीव होऊ देत नाहीत; तसेच ईश्वरी शक्तीचे व्यक्तीमध्ये जे कार्य चालू असते ते पूर्ण करण्यामध्ये त्या गोष्टी आडकाठी आणतात आणि त्यांच्यामुळे (तुम्हाला लाभलेली) ईश्वरी संरक्षणा‌ची शक्ती क्षीण होते.

फक्त आंतरिक एकाग्रतेच्या वेळीच नव्हे तर, तुमच्या बाह्य कृती आणि जीवनव्यवहार यांमध्येही तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही जर तसे केलेत आणि सारेकाही श्रीमाताजींच्या मार्गदर्शनानुसार केलेत तर, अडचणी कमी कमी होत चालल्या आहेत किंवा त्या अधिक सहजतेने सुटत चालल्या आहेत आणि गोष्टी अधिक सुरळीत होत चालल्या आहेत, असे तुम्हाला आढळून येईल.

तुम्ही एकाग्रचित्त होण्याच्या वेळी जे काही करता तेच तुम्ही तुमच्या कर्मामध्ये आणि कृतींमध्येही केले पाहिजे. श्रीमाताजींप्रति खुले व्हा, तुमच्या सर्व कृती त्यांच्या मार्गदर्शनानुसार करा; शांती, साहाय्यक शक्ती‌, संरक्षण लाभावे यासाठी त्यांना आवाहन करा आणि त्यांना तुमच्यामध्ये कार्य करता यावे म्हणून सर्व चुकीच्या प्रभावांना नकार द्या. (अन्यथा) हे प्रभाव चुकीच्या, निष्काळजी किंवा चेतनारहित गतीविधींद्वारे मार्गामध्ये अडथळा ठरू शकतात. या तत्त्वाचे अनुसरण करा म्हणजे मग तुमचे समग्र अस्तित्व एकसंध होईल आणि मग ते शांती व आश्रयदायी ‘शक्ती‌’ आणि ‘प्रकाश’ यांच्या एकछत्री अंमलाखाली येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 143)