भारताचे पुनरुत्थान – ०३

भारताचे पुनरुत्थान – ०३

‘बंदे मातरम्’ या नियतकालिकामधून
कलकत्ता : दि. १९ फेब्रुवारी १९०८

भारतामध्ये दोन महान मंत्र आहेत, त्यातील एक मंत्र म्हणजे ‘वंदे मातरम्’! हा मंत्र म्हणजे आपल्या मातृभुमीविषयी जागृत झालेल्या प्रेमाची सामूहिक आणि सार्वत्रिक गर्जना आहे. आणखी एक अधिक गुप्त आणि गूढ मंत्रदेखील आहे, पण तो अजूनपर्यंत उघड झालेला नाही. यापूर्वीही एकदा विंध्य पर्वतरांगांमधील संन्याशांनी ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगाला दिला होता. परंतु आपल्याच स्वकीयांनी विश्वासघात करून तो गमावला होता. कारण तेव्हा आपले राष्ट्र पुनरुत्थानासाठी परिपक्व झाले नव्हते आणि अकाली झालेली जागृती राष्ट्राला वेगाने अधोगतीकडे घेऊन गेली असती, म्हणून आपण तो मंत्र गमावून बसलो.

परंतु इ. स. १८९७ च्या प्रचंड उलथापालथीमध्ये संन्याशांनी पुन्हा एकदा ती गर्जना ऐकली आणि भारताचे पुनरुत्थान व्हावे ही ‘ईश्वरी’ आज्ञा आहे याची त्यांना जेव्हा जाणीव झाली, तेव्हा पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगासमोर प्रकट करण्यात आला. त्याचा प्रतिध्वनी लोकांच्या अंतःकरणांमध्ये निनादत राहिला आणि जेव्हा काही मोजक्या महान हृदयांमध्ये तो निनाद शांततेमध्ये परिपक्व होत गेला तेव्हा संपूर्ण राष्ट्र त्या मंत्राच्या प्रकटीकरणाविषयी जागृत झाले.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 877)

श्रीअरविंद