साधना, योग आणि रूपांतरण – ३०८

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे शारीरिकदृष्ट्या व प्राणिकदृष्ट्या कसे व का अवघड असते ते कालच्या भागात आपण पाहिले.)

मानसिकदृष्ट्या तर ही गोष्ट अधिकच वाईट असते. मानवी मन हे सर्व बाजूंनी उघड्या असणाऱ्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणासारखे असते. तेथे सर्व बाजूंनी गोष्टी आत येत असतात, जात असतात, एकमेकींवर आदळत असतात आणि त्यातील काही गोष्टी तेथेच स्थिरस्थावर होतात आणि त्या काही नेहमीचांगल्या असतातच असे नाही. आणि अशा या अनेकविध गोष्टींवर नियंत्रण प्रस्थापित करणे हे सर्वात कठीण असते.

तुमच्या मनामध्ये प्रवेश करणाऱ्या विचारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी काय म्हणत आहे ते तुमच्या लक्षात येईल. किती काळजीपूर्वक राहावे लागते हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे, डोळे टक्क उघडे ठेवून, तुम्हाला सतर्क राहावे लागते आणि तुमच्या अभीप्सेशी सुसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या आणि विसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या याविषयी तुम्हाला पूर्णपणे सुस्पष्टपणे जाण असावी लागते. कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तींचा त्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश होऊ नये यासाठी, तुम्हाला एखाद्या पोलिसाप्रमाणे प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून राहावे लागते.

आणि हे विसरू नका की, तुम्ही अगदी कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तरीही या सर्व अडचणींचा शेवट एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात होणार नाहीये. व्यक्ती जेव्हा हे प्रयत्न करायला सुरुवात करते तेव्हा तिच्यामध्ये अविचल अशी सहनशीलता, चिकाटी (patience) असणे आवश्यक असते. व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, “हे करण्यासाठी मला पन्नास वर्षे लागली, शंभर वर्ष लागली किंवा कितीही वर्षे लागली तरी चालेल, पण मला जे साध्य करायचे आहे ते मी साध्य करेनच.”

एकदा का तुम्ही असा निर्धार केलात आणि तुम्ही निर्धारित केलेले उद्दिष्ट हे सतत व अथक परिश्रम घेण्यायोग्य आहे याची तुम्हाला जाणीव झाली असेल तर मग तुम्ही (रूपांतरणाच्या या प्रक्रियेस) आरंभ करू शकता.

अन्यथा, कालांतराने तुम्ही निराश होऊन जाल, तुमचा उत्साहभंग होईल. मग तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हणाल, “बापरे! हे खूपच अवघड आहे. मी (अमुक एक गोष्ट करण्याचा) प्रयत्न करतो आणि ती पुन्हा ‘होत्याची नव्हती’ होते, मग मी पुन्हा प्रयत्न करतो, परत तसेच होते. मी पुन्हा एकवार (मनाचा हिय्या करून) प्रयत्न करतो आणि परत तसेच होत्याचे नव्हते होते. काय करावे? मी माझ्या उद्दिष्टापर्यंत कधी जाऊन पोहोचणार?” (आणि म्हणूनच) व्यक्तीकडे प्रचंड सहनशीलता, चिकाटी असली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

श्रीमाताजी