साधना, योग आणि रूपांतरण – २७४

शरीराचे रूपांतरण

व्यक्तिगत अडचणीप्रमाणेच जडभौतिक पृथ्वी-प्रकृतीमध्येही (physical earth-nature) एक सर्वसाधारण अडचण असते. जडभौतिक प्रकृती ही संथ, सुस्त आणि परिवर्तनासाठी अनिच्छुक असते. ढिम्म राहणे आणि अल्पशा प्रगतीसाठी दीर्घ काळ लावणे ही तिची प्रवृत्ती असते. अतिशय दृढ मानसिक किंवा प्राणिक किंवा आंतरात्मिक संकल्पालासुद्धा या जडतेवर मात करणे अतिशय अवघड जाते. वरून सातत्याने चेतना, शक्ती आणि प्रकाश खाली उतरवीत राहिल्यानेच या जडतेवर मात करता येणे शक्य असते. त्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीकडे सातत्यपूर्ण संकल्प व आस असणे आवश्यक असते. आणि शारीर-प्रकृतीने अतीव प्रतिकार केला तरी त्या प्रतिकारामुळे थकून जाणार नाही असा स्थिर आणि चिवट संकल्प असणे आवश्यक असते.

*

गहनतर शांती इत्यादीचा अभाव हे जडभौतिक नकाराचे मूळ स्वरूपच आहे आणि हा जडभौतिक नकारच जगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे अस्तित्व नाकारण्याचा समग्र पाया असतो. जडभौतिकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या सर्व गोष्टी चिवट, हटवादी असतात आणि त्यांच्यामध्ये जडत्व आणि नकाराची प्रचंड ताकद असते. त्या गोष्टी जर तशा नसत्या तर साधना अतिशय लवकर पूर्ण झाली असती. शारीर-प्रतिकाराच्या या स्वभावधर्माला तुम्हाला सामोरे जावेच लागते आणि तो प्रतिकार कितीही वेळा उफाळून आला तरी त्याच्यावर पुन्हा पुन्हा मात करावीच लागते. पृथ्वी-चेतनच्या रूपांतरणासाठी ही किंमत मोजावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359, 360)

साधना, योग आणि रूपांतरण – २७३

शरीराचे रूपांतरण

हट्टीपणा हा शारीर-मनाचा (physical mind) स्वभावधर्म असतो. एकाच गोष्टीची सातत्याने पुनरावृत्ती करत राहण्यामुळे ही शारीर-प्रकृती टिकून राहते. एवढेच की, त्या गोष्टीचे विविध रूपांद्वारे सातत्याने सादरीकरण, प्रस्तुती होत राहते. जेव्हा शारीर-प्रकृती कार्यरत असते तेव्हा, ही हटवादी पुनरावृत्ती हा तिच्या प्रकृतीचा एक भाग असतो, पण ती जेव्हा कार्यरत नसते तेव्हा ती सुस्त, जड असते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला शारीर-प्रकृतीच्या जुन्या वृत्तीप्रवृत्तींपासून सुटका करून घ्यायची असते तेव्हा त्या प्रवृत्ती अशा प्रकारच्या हटवादी पुनरावृत्तीने प्रतिकार करतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी व्यक्तीने नकार देण्याच्या बाबतीत खूप चिकाटी बाळगली पाहिजे.

सर्व प्रकारच्या ‘प्रकृती’ प्रमाणे शारीर-‘प्रकृती’चेही व्यक्तिगत आणि वैश्विक असे दोन पैलू असतात. व्यक्तीमध्ये सर्व गोष्टी वैश्विक प्रकृतीकडून येतात. परंतु व्यक्तिगत शारीर-प्रकृती त्यांच्यापैकी काही गोष्टींचेच जतन करते व इतर गोष्टी नाकारते आणि ती ज्या गोष्टी जतन करून ठेवते त्यांना ती वैयक्तिक रूप देते… परंतु व्यक्तीला जेव्हा त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची असते तेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये (साचलेले) जे काही असते ते आधी सभोवतालच्या ‘प्रकृती’ मध्ये फेकून देते. आणि तेथून मग वैश्विक ‘प्रकृती’ त्या गोष्टी परत आत आणण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्या जागी तिच्या स्वतःच्या अशा काही नवीन किंवा तत्सम गोष्टी आणते. व्यक्तीला या आक्रमणास सातत्याने थोपवून धरावे लागते, नकार द्यावा लागतो. सतत दिलेल्या नकारामुळे, सरतेशेवटी पुनरावृत्तीची शक्ती क्षीण होते आणि मग व्यक्ती मुक्त होते आणि उच्चतर चेतना व तिच्या गतिप्रवृत्ती शारीरिक अस्तित्वामध्ये उतरवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 361)

साधना, योग आणि रूपांतरण – २७२

शरीराचे रूपांतरण

व्यक्तीला जेव्हा भौतिक जीवनामध्ये काही परिवर्तन करण्याची इच्छा असते, म्हणजे तिला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करायचा असो किंवा स्वतःच्या अवयवांच्या कार्यपद्धतीमध्ये किंवा सवयींमध्ये बदल करायचा असो, व्यक्तीकडे अविचल अशी चिकाटी असणे आवश्यक असते. अमुक एखादी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा ज्या उत्कटतेने केली होती त्याच तीव्रतेने तीच गोष्ट शंभर वेळा पुन्हा पुन्हा सुरू करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि ती गोष्ट यापूर्वी तुम्ही जणू कधी केलेलीच नव्हती अशा प्रकारे ती पुन्हा पुन्हा करत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. जी माणसं लवकर अस्वस्थ, विचलित होतात त्यांना हे जमत नाही. परंतु तुम्हाला जर हे करता आले नाही तर तुम्ही योगसाधना करू शकणार नाही. किमान ‘पूर्णयोग’ तर नाहीच नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन करता येणार नाही.

व्यक्तीला स्वतःच्या शरीरामध्ये परिवर्तन करायचे असेल तर तीच तीच गोष्ट लाखो वेळा करता आली पाहिजे, कारण शरीर हे सवयी आणि नित्यक्रमाच्या (routine) कृतींनी बनलेले असते आणि हा नित्यक्रम नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी अनेक वर्षे चिकाटी बाळगावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 07 : 104)

साधना, योग आणि रूपांतरण – २७१

शरीराचे रूपांतरण

शारीर-चेतना (physical consciousness) ही नेहमीच तिच्या अज्ञानासहित येत असते. आणि ही चेतना मूढ आणि अंधकारयुक्त असते. म्हणजे ज्यांचे विचारी मन सुबुद्ध असते किंवा किमान थोडेतरी बुद्धिमान असते अशा व्यक्तींमध्येदेखील ही चेतना अशीच असते. वरून येणाऱ्या ‘दिव्य प्रकाशा’द्वारेच ती चेतना प्रकाशित होऊ शकते. अधिकाधिक प्रमाणात हा प्रकाश घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शांती’मध्ये आणि ‘दिव्य शक्ती’ मध्येच तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये (अभीप्सेचा) अग्नी तेवत ठेवणे अवघड असते. या शारीर चेतनेला सातत्याने नित्यक्रमाचे (routine) पालन करणे सोपे असते पण तिला नित्य सक्रिय प्रयत्नांचे जतन करणे तितके सोपे नसते. असे असले तरीदेखील, कालांतराने तिची या गोष्टीसाठीसुद्धा तयारी करून घेता येते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 369, 369)

साधना, योग आणि रूपांतरण – २७०

शरीराचे रूपांतरण

अविचलतापूर्वक चिकाटी बाळगा आणि कशामुळेही नाउमेद होऊ नका. आत्ता जरी (तुमच्यामध्ये) अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी सातत्याने टिकून राहत नसल्या तरी तशा त्या टिकून राहणे अपेक्षित आहे. जेव्हा शारीर-चेतना (physical consciousness) आणि तिच्यामधील अडथळ्यांवर कार्य चालू असते तेव्हा सुरुवातीला नेहमीच हे असे होत असते. तुम्ही जर चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी तुमच्यामध्ये – जोपर्यंत शांती आणि आनंदाचा पाया तयार होत नाही तोपर्यंत – वारंवार येऊ लागतील आणि त्या अधिक काळासाठी टिकून राहू शकतील. आणि पृष्ठभागावर ज्या कोणत्या अडचणी, अडथळे येतील ते आता आतपर्यंत जाऊ शकणार नाहीत किंवा तुमचा (शांती आणि आनंदाचा) हा पाया डळमळीत करू शकणार नाहीत किंवा त्यास त्या एखाद्या क्षणाचा अपवाद वगळता, झाकोळूनदेखील टाकू शकणार नाहीत.

मनोवस्थेमध्ये (mood) सातत्याने बदल होत राहणे हीसुद्धा सार्वत्रिक आढळणारी गोष्ट आहे. कारण शारीर-चेतनेप्रमाणेच सध्या शारीर-प्राणावरसुद्धा (physical-vital) कार्य चालू आहे आणि ही अस्थिरता हा शारीर-प्राणाच्या प्रकृतीचा एक गुणधर्म आहे. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. जेव्हा हा पाया अधिक भरभक्कम होईल तेवढ्या प्रमाणात ती अस्थिरता क्षीण होत जाईल आणि प्राण अधिक स्थायी व समतोल होत जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370-371)

साधना, योग आणि रूपांतरण – २६९

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही स्वतःला पूर्णपणे बाह्यवर्ती शारीर-चेतनेमध्ये (physical consciousness) ठेवले आहे. आणि फक्त बाह्यवर्ती गोष्टी तेवढ्याच खऱ्या असतात आणि आध्यात्मिक व आंतरिक सर्व गोष्टी खऱ्या नसतात असे म्हणत, आणि आपण अपात्र आहोत या सबबीखाली स्वतःला खुले करण्यास ती शारीर-चेतना नकार देत आहे. तुम्ही जर तिचे म्हणणे मनावर घेऊ लागलात तर ती नेहमीच असे करत असते. परंतु अपात्रतेची ही सबब खरी नाही आणि दुसरी सबब देखील खरी नाही. जेव्हा तुम्ही आंतरिक, आध्यात्मिक चेतनेला खुले होता तेव्हा बाह्यवर्ती किंवा शारीरिक चेतनेसाररखीच आंतरिक, आध्यात्मिक चेतना हीदेखील तुमच्यासाठी संपूर्णपणे वास्तव आणि खरी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370)

साधना, योग आणि रूपांतरण – २६८

(कालपर्यंत आपण मनाचे आणि प्राणाचे रूपांतरण समजावून घेतले. आजपासून आता शरीराच्या रूपांतरणाबद्दलचे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचार जाणून घेऊ या.)

शरीराचे रूपांतरण

तुम्हाला प्राणिक इच्छावासनांपासून मुक्त होण्यामध्ये खूप अडचण जाणवत आहे कारण आता साधना थेटपणे जडभौतिक, शारीरिक स्तरावर (physical plane) सुरू झाली आहे. येथे एखादी सवय जडली असेल किंवा एखादी गोष्ट सवयीची झाली असेल तर तिची ताकद खूप जास्त असते.

जेव्हा साधना मानसिक किंवा प्राणिक स्तरावर चालू असते तेव्हा प्राणिक इच्छावासनांवर नियंत्रण मिळविणे किंवा त्यामध्ये परिवर्तन घडविणे अधिक सोपे असते कारण शरीराच्या तुलनेत मन आणि प्राण हे अधिक घडणसुलभ (plastic) असतात.

परंतु दुसऱ्या बाजूने असेही म्हणता येते की, जडभौतिकाच्या, शरीराच्या स्तरावर जर एखादी गोष्ट निश्चितपणे प्राप्त झाली असेल तर ती सिद्धी केवळ मानसिक किंवा केवळ प्राणिक स्तरावरील सिद्धीपेक्षा अधिक टिकाऊ आणि संपूर्ण असते.

*

शरीर आणि अवचेतनेमध्ये (subconscient) जेव्हा कार्य चालू असते तेव्हा ते कार्य मनामध्ये आणि प्राणामध्ये चालू असलेल्या कार्यापेक्षा नेहमीच अधिक संथ असते. कारण जडभौतिक द्रव्याकडून होणारा प्रतिकार हा नेहमीच अधिक जड, आणि निर्बुद्ध आणि कमी समायोजनक्षम (adaptable) असतो. परंतु जणूकाही त्याची भरपाई म्हणून, या संथ प्रक्रियेद्वारे व्यक्तीमध्ये जे कार्य केले जाते ते सरतेशेवटी अधिक संपूर्ण, अधिक सघन आणि अधिक टिकाऊ असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 365, 365-366)

साधना, योग आणि रूपांतरण – २६७

प्राणाचे रूपांतरण

कृती ‘ईश्वरा’र्पण करणे आणि ते करताना त्यामध्ये जी प्राणिक अडचण उद्भवते त्याविषयी सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, ही अडचण टाळणे शक्य नसते. तुम्हाला त्यामधून जावेच लागेल आणि त्यावर विजय मिळवावा लागेल. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रयत्न करू लागता त्याक्षणी, या परिवर्तनाला विरोध करण्यासाठी, प्राण त्याच्या सर्व अस्वस्थ अपूर्णतांसह उभा ठाकतो. असे असले तरी, त्या अडचणीची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा ती अडचण कमी करण्यासाठी तीन उपाय तुम्ही करू शकता –

१) या प्राणिक-शारीरिक स्तरापासून तुम्ही स्वतःला अलिप्त करा. ‘तो स्तर म्हणजे तुम्ही नाही’ या भूमिकेतून तुम्ही त्याचे निरीक्षण करा, त्याला नकार द्या. त्याच्या मागण्यांना, त्याच्या भावावेगांना संमती देण्यास नकार द्या, परंतु जो नकार द्याल तो साक्षी ‘पुरुष’ या भूमिकेतून शांतपणे द्या की ज्याच्या नकाराचा अंतिमतः विजय होणेच आवश्यक आहे. तुम्ही जर आधीपासूनच निर्व्यक्तिक, निर्गुण ‘आत्म्या’मध्ये (impersonal Self) अधिकाधिक राहायला शिकला असाल तर, स्वत:ला अलिप्त करणे तुम्हाला कठीण जाण्याचे काहीच कारण नाही.

२) जेव्हा तुम्ही या निर्व्यक्तिकतेमध्ये नसाल, तेव्हाही तुमची मानसिक इच्छाशक्ती आणि तिची संमती किंवा नकार देण्याची शक्ती उपयोगात आणा. हे करताना कोणताही वेदनादायी संघर्ष नको तर अगदी त्याच पद्धतीने, शांतपणे, इच्छावासनांच्या मागण्यांना नकार द्या. जोपर्यंत अनुमती किंवा संमती न मिळाल्यामुळे या मागण्यांची पुन्हा पुन्हा डोकं वर काढण्याची शक्ती शमत नाही आणि ती शक्ती अधिकाधिक क्षीण होत नाही आणि बाहेर पडत नाही, तोपर्यंत मानसिक इच्छाशक्तीचा उपयोग करत राहा.

३) तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या किंवा तुमच्या हृदयांतरी असणाऱ्या ‘ईश्वरा’विषयी तुम्ही जर सजग झालात तर तेथूनच, त्याच्या साहाय्यासाठी त्याला आवाहन करा, स्वयमेव त्या प्राणामध्येच परिवर्तन व्हावे म्हणून प्रकाशाला आणि शक्तीला आवाहन करा. आणि जोपर्यंत तो प्राण स्वतःहून या परिवर्तनासाठी प्रार्थना करायला शिकत नाही तोपर्यंत त्या प्राणाला आग्रहपूर्वक सांगत राहा.

शेवटी, ‘ईश्वरा’बद्दल असलेल्या तुमच्या अभीप्सेच्या प्रामाणिकतेद्वारे आणि तुमच्या समर्पणामुळे, तुमच्या हृदयामध्ये गुप्त असलेला ‘चैत्य पुरुष’ (psychic being) तुम्ही जागृत करू शकलात तर त्यामुळे तो अग्रभागी येईल आणि कायम तेथेच राहील. आणि, तो मन, प्राण आणि शारीरिक चेतनेच्या सर्व गतिविधींवर प्रभाव टाकेल आणि तत्क्षणी तुमच्या अडचणी अगदी कमी होऊन जातील. त्यानंतरसुद्धा रूपांतरणाचे कार्य करावेच लागणार आहे, परंतु त्या क्षणानंतर मात्र ते कार्य तितकेसे कठीण आणि कष्टदायक असणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113-114)