साधना, योग आणि रूपांतरण – २६६

प्राणाचे रूपांतरण

संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )

साधना, योग आणि रूपांतरण – २६५

प्राणाचे रूपांतरण

प्राणाला जबरदस्तीने काही करायला भाग पाडणे शक्य असले तरी तसे करणे सोपे नसते. सातत्याने अत्यंत मनःपूर्वकतेने प्राणाला पटवून सांगणे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे अधिक सोपे असते. परंतु असे करण्याच्या या मानसिक पद्धतीमध्ये, प्राण हा बरेचदा स्वतःच्या कोणत्यातरी फायद्यासाठी आध्यात्मिक आदर्शाला स्वतःहून जोडून घेतो, हे खरे आहे. प्राणाने स्वतःच स्वतःसमोर अनावृत (expose) व्हावे यासाठी, प्राणामध्ये प्रकाश सदोदित खाली उतरवत राहणे हा एक परिणामकारक मार्ग असतो. असे केल्यामुळे स्वतःमध्ये काय चुकीचे आहे हे पाहण्यासाठी तो प्रवृत्त होतो आणि सरतेशेवटी आपल्यामध्ये परिवर्तन घडावे यासाठी तो प्रामाणिकपणे इच्छा बाळगू लागतो.

प्राणिक प्रकृतीमध्ये हा प्रकाश एकतर अंतरंगामधून, चैत्य अस्तित्वाकडून आणता येतो नाहीतर तो वरून, मनाच्या माध्यमातून उतरविता येतो. मनाच्या ऊर्ध्वस्थित असणारा प्रकाश आणि शक्ती अवतरित व्हावी म्हणून त्यांस आवाहन करणे ही पूर्णयोगाच्या अनेकविध पद्धतींपैकी एक प्रमुख पद्धती आहे. परंतु कोणताही मार्ग अवलंबला तरीदेखील तो नेहमीच चिकाटीने आणि धीरयुक्त आध्यात्मिक परिश्रमाने अमलात आणावा लागतो.

प्राणामध्ये अकस्मात परिवर्तन घडविता येऊ शकते पण अशा अकस्मात झालेल्या परिवर्तनानंतरसुद्धा त्याच्या परिणामकारकतेसाठी, त्यावर काम करावे लागते, त्यावर परिश्रम घ्यावे लागतात, ते परिवर्तन प्राणाच्या प्रत्येक भागावर अंमलात आणावे लागते. जोपर्यंत त्याचा परिणाम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ते करावे लागते आणि त्यासाठी बरेचदा दीर्घ काळ लागतो. शारीरिक चेतनेबाबत सांगायचे तर, दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतरच तिच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य असते. हां, एखाद्या विशिष्ट घटकामध्ये त्वरेने परिवर्तन करता येऊ शकते पण समग्र परिवर्तन घडविण्यासाठी दीर्घकाळ आणि चिकाटीने परिश्रम करावे लागतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 110-111)

साधना, योग आणि रूपांतरण – २६४

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रथमतः तुमच्या प्राणिक अस्तित्वामधील दोषांपासून निर्धारपूर्वक, चिकाटीने सुटका करून घेतली पाहिजे. भलेही मग ते करणे कितीही अवघड असो किंवा त्याला कितीही वेळ लागो, सदासर्वकाळ ‘ईश्वरा’च्या साहाय्यासाठी आवाहन करत राहा आणि स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक होण्यासाठी नेहमी प्रवृत्त करा.

पात्र-अपात्रतेच्या बाबतीत (सांगायचे झाले तर) पूर्णयोगासाठी कोणतीच व्यक्ती पूर्णपणे सुपात्र असते असे म्हणता येणार नाही. अभीप्सा, अभ्यास, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांद्वारे व्यक्तीने स्वतःला सुपात्र बनविणे अभिप्रेत असते. तुमच्यामधील आंतरात्मिक भागाला आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनाची आस होती; मात्र तुमच्या प्राणामुळे त्यामध्ये नेहमीच आडकाठी निर्माण होत आली आहे. तुमच्या प्राणामध्ये एक प्रामाणिक इच्छा प्रस्थापित करा; वैयक्तिक इच्छावासना, मागण्या, स्वार्थीपणा आणि मिथ्यत्व या गोष्टींची सरमिसळ तुमच्या साधनेमध्ये होऊ देऊ नका. असे केलेत तरच तुमच्यामधील प्राण हा साधनेसाठी सुपात्र होईल. तुम्ही यशस्वी होऊ इच्छित असाल तर ते प्रयत्न नेहमीच अधिकाधिक विशुद्ध, अधिक स्थिर आणि चिकाटीपूर्ण झाले पाहिजेत.

तुम्ही जर प्रामाणिकपणे साधना करत राहिलात तर, आवश्यक असलेले साहाय्य तुम्हाला लाभेल. तुमच्या कर्माबाबत तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगलात तर स्वयमेव त्यातूनच तुम्हाला साहाय्य मिळेल. ‘ईश्वरा’साठी ‘ईश्वरा’र्पण भावाने कर्म करणे, त्यामध्ये फळाची कोणतीही मागणी नसणे, त्यामध्ये कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छावासना मिसळलेल्या नसणे, कोणताही दुराग्रह आणि उद्धटपणा नसणे, तुमच्या सहकाऱ्यांसोबत वादविवाद न करणे, तुम्ही करत असलेले कर्म हे तुमचे स्वतःचे नाही तर ते श्रीमाताजींचे कार्य आहे, हे लक्षात ठेवणे आणि कर्म करत असताना, त्याच्या पाठीशी त्यांची शक्ती कार्यरत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कर्माबाबत योग्य दृष्टिकोन बाळगणे होय. तुम्ही जर असे करू शकलात तर तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन होईल आणि तुमची प्रगती होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 108-109)

साधना, योग आणि रूपांतरण – २६३

प्राणाचे रूपांतरण

बाह्यवर्ती प्राणाच्या शुद्धीकरणासाठी बाह्य शिस्तीची आवश्यकता असते, हे खरे आहे. अन्यथा तो अस्वस्थ आणि लहरी, कल्पनाविलासात रमणारा असा राहतो आणि तो त्याच्या स्वतःच्या भावावेगांचा गुलाम बनून राहतो. आणि त्यामुळे, अविचल आणि स्थायी अशी उच्चतर चेतना तेथे दृढपणे टिकून राहावी यासाठी तेथे कोणताही पाया बांधता येत नाही.

*

नियंत्रणामध्ये राहून किंवा योग्यायोग्यतेचे जे मापदंड आहेत त्यानुसार कृती करणे आणि जीवन जगणे म्हणजे, प्राणाला किंवा शरीराला त्यांना वाटेल तसे वागण्यास मुभा न देणे आणि सत्यविरहित किंवा व्यवस्थाविरहित स्वैरकल्पनांनुसार मनाला सैरावैरा भटकण्यास संमती न देणे, हा शिस्तीचा, अनुशासनाचा अर्थ आहे. ज्यांचे आज्ञापालन करणे आवश्यक आहे त्यांचे आज्ञापालन करणे याचाही समावेश शिस्तीमध्ये होतो.

*

योग्य रीतीने उपयोग केला तर प्राण चांगला असतो. तो कृती करण्यासाठी आवश्यक असणारे साधन असतो. परंतु सर्वसाधारणपणे तो त्याच्या कनिष्ठ कृतीमध्ये अहंकार आणि इच्छावासना यांचे साधन बनतो आणि म्हणूनच त्याच्यामध्ये लिप्त होता कामा नये, तर उलट त्याला कठोर शिस्तीमध्ये ठेवले पाहिजे.

*

तुमच्या प्राणिक वृत्तीप्रवृत्ती आणि त्याच्या रचना यांच्याबाबत सावधगिरी बाळगा, (कारण) जेव्हा तुम्ही त्यांना मुभा देता तेव्हा तुम्ही एका घातक अशा उताराला लागलेले असता.

*

प्राणिक सवयी या अचानकपणे आणि निर्णायकपणे थांबविणे हा या सवयींबाबत सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग असतो, हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 31 : 107, 107), (CWSA 31 : 108, 108, 108)

साधना, योग आणि रूपांतरण – २६२

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये जर निष्काळजीपणा असेल तर येथून पुढे तुम्ही तुमच्या सर्व कृतींमध्ये सचेत (conscious) होण्यास शिकलेच पाहिजे. तसे केलेत तर मग प्राणिक वृत्तीप्रवृत्ती तुम्हाला फसवू शकणार नाहीत किंवा कोणते फसवे रूप घेऊन तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. या प्राणिक वृत्तीप्रवृत्तींचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्या जशा आहेत तशा त्या तुम्हाला पाहता याव्यात यासाठी, तुम्ही अगदी पूर्णपणे प्रामाणिक असले पाहिजे.

तुम्ही एकदा जर चैत्य पुरुष (psychic being) खुला करू शकलात आणि तो तसाच खुला ठेवू शकलात तर, तुमच्या अंतरंगामधूनच तुम्हाला प्रत्येक पावलागणिक वास्तविक सत्य काय आहे हे दाखविणारा बोध सातत्याने मिळत राहील आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून तो तुमचे रक्षण करत राहील. तुम्ही जर सतत आस बाळगलीत आणि शांती वृद्धिंगत होण्यास आणि ‘दिव्य शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव दिलात तर अशी उन्मुखता, असे खुलेपण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 105)

साधना, योग आणि रूपांतरण – २६१

प्राणाचे रूपांतरण

प्राणाचे शुद्धीकरण ही सहसा यशस्वी साधनेसाठी आवश्यक असणारी अट आहे असे मानले जाते. प्राणाचे शुद्धीकरण झालेले नसतानाही व्यक्तीला काही अनुभव येऊ शकतात पण चिरस्थायी साक्षात्कारासाठी, प्राणिक गतिविधींपासून पूर्णपणे अलिप्तता असणे हे तरी किमान आवश्यक असते.

*

‘क्ष’ ने जे जाळे पसरले होते त्या जाळ्यात तुम्ही अडकलात ही गोष्ट खरोखरच आश्चर्यकारक वाटावी अशी आहे. ती मिथ्या, नाटकी आणि स्वप्नाळू प्राणाची वृत्ती असते, ती तर्कबुद्धीला झाकोळून टाकते आणि साध्यासरळ सत्यावरही पडदा पडल्यासारखे होते व सामान्य व्यवहारबुद्धीही (common sense) चालेनाशी होते.

तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, मिथ्यत्वाबरोबर प्राण जी तडजोड करत आहे (मग भलेही तो त्याच्या समर्थनासाठी कोणतीही कारणे का देईनात) ती त्यामधून काढून टाकली पाहिजे. आणि साधे सरळ प्रामाणिक आंतरात्मिक सत्य कोरून ठेवण्याची सवय त्या प्राणाला लावली पाहिजे म्हणजे मग त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास कोणालाच वाव मिळणार नाही. तुमच्या प्राणामधील जो भाग अशा प्रकारच्या तडजोडी करत आहे त्या भागावर हा धडा पक्का कोरून ठेवता आला तर, (तुमच्या हातून घडलेल्या) या चुकीच्या गोष्टीमधूनही निश्चितपणे काहीतरी चांगले निष्पन्न होईल. “येथून पुढे मिथ्यत्वाला आतमध्ये प्रवेश नाही,” ही श्रीमाताजींची सूचना तुमच्या प्राणिक अस्तित्वाच्या दरवाजावर चिकटवून ठेवा. आणि ती सूचना काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे ना, हे पाहण्यासाठी दरवाजावर एक पहारेकरी नेमा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 107), (CWSA 31 : 104-105)

साधना, योग आणि रूपांतरण – २६०

प्राणाचे रूपांतरण

साधनेसाठी लागणारा अविचल आणि समतोल पाया म्हणजे अशी एक अवस्था असते की जिच्यामध्ये अनुभवाच्या अपेक्षेने उंचबळून येणेही नसते किंवा निष्क्रिय किंवा अर्ध-निष्क्रिय अशी निराश स्थिती देखील नसते. या दोन्हीमध्ये साधक हेलकावे खात नसतो. तर तो प्रगती करत असला किंवा तो अडचणीमध्ये असला तरीही, या कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीशी नेहमीच एक अविचल चेतना असते आणि ती विश्वासाने व श्रद्धेने ‘ईश्वरा’कडे वळलेली असते.
*
अविचलता म्हणजे तामसिकता नव्हे. अविचलतेमध्ये (इच्छावासना, शोक, आसक्ती आणि तत्सम इतर प्रतिक्रिया) या प्रकृतीच्या सामान्य राजसिक वृत्तीप्रवृत्ती निश्चल झालेल्या असतात. शांती अवतरित होण्यासाठी ही गोष्ट अत्यावश्यक असते. यालाच आपण ‘अविचल प्राण’ (quiet vital) असे म्हणू शकतो. अविचल मन आणि अविचल प्राणामध्ये खरी आध्यात्मिक चेतना अगदी सहजतेने येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 114-115), (CWSA 31 : 115)

साधना, योग आणि रूपांतरण – २५९

प्राणाचे रूपांतरण

पृथ्वी-चेतनेला परिवर्तन नको असते आणि त्यामुळे वरून जे काही अवतरित होते त्यास ती नकार देते. आत्तापर्यंत ती नेहमीच हे असे करत आली आहे. ज्यांनी योगाचे आचरण करण्यास सुरुवात केली आहे ते जर स्वतःस उन्मुख करतील आणि त्यांच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यास राजी होतील तरच पृथ्वी-चेतनेमधील ही अनिच्छा नाहीशा होऊ शकेल.

या परिवर्तनामध्ये कोणती गोष्ट आड येते? तर, प्राणिक अहंकार आणि त्याचे अज्ञान आणि त्याच्या अज्ञानाचा त्याला असणारा अभिमान ही गोष्ट आड येते. परिवर्तनाच्या कोणत्याही आवाहनास विरोध व प्रतिकार करणारी शारीरिक चेतना आणि तिचे जडत्व, आणि तिचा आळशीपणा, की ज्याची कोणतेही कष्ट घेण्याची तयारी नसते या गोष्टीसुद्धा परिवर्तनाच्या आड येतात. शारीर-चेतनेला त्याच त्याच जुन्या गतिविधी पुन्हा पुन्हा करत राहणे सोयीस्कर वाटते. ती जास्तीत जास्त काय करते तर, तिच्यासाठी कधीतरी कोणीतरी, कोणत्यातरी प्रकारे सर्वकाही करेल अशी ती अपेक्षा करत असते.

आणि म्हणूनच पहिली आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे तुमच्यापाशी योग्य असा आंतरिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि नंतर, स्वतःचे रूपांतरण करण्याची इच्छा असणे, आणि कनिष्ठ प्रकृतीचा तामसिक चिवटपणा व अहंकार यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन आणि त्याला नकार देण्यामधील सतर्कता या गोष्टी आवश्यक असतात. अंतिमतः, तुमचे व्यक्तित्व, त्याचा प्रत्येक भाग हा सदोदित श्रीमाताजींप्रत खुला असला पाहिजे; जेणेकरून रूपांतरणाच्या प्रकियेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 222)

साधना, योग आणि रूपांतरण – २५८

प्राणाचे रूपांतरण

साधकांना ज्या शंका येतात त्या खऱ्या मनाकडून येण्याऐवजी बरेचदा प्राणामधून उदय पावतात. जेव्हा प्राण चुकीच्या मार्गाने जातो किंवा तो संकटग्रस्त किंवा निराशाग्रस्त असतो, अशा वेळी शंकाकुशंका यायला लागतात आणि त्या त्याच रूपात, त्याच शब्दांमध्ये पुन्हापुन्हा व्यक्त होत राहतात. मनाला ती गोष्ट स्पष्ट पुराव्याच्या आधारे किंवा बौद्धिक उत्तराने कितीही पटलेली असली तरीदेखील या शंका येत राहतात. मला तसे नेहमीच आढळून आले आहे. (प्राण जरी स्वतःचे समर्थन करण्यासाठी तर्कबुद्धीचा वापर करत असला तरीसुद्धा) प्राण हा अतार्किक, अविवेकी असतो. आणि तो तर्कबुद्धीनुसार नव्हे तर, स्वतःच्या भावभावनांनुसार एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो किंवा ठेवत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 103)

साधना, योग आणि रूपांतरण – २५७

प्राणाचे रूपांतरण

एक रणनीती म्हणून प्राणाची उत्क्रांतीमधील सुरुवातच मुळी तर्कबुद्धीच्या आज्ञापालनाने नव्हे तर, भावावेगांना बळी पडण्यातून होते. प्राणाला, ज्या रणनीतीच्या परिघामध्ये त्याच्या इच्छावासना समाविष्ट होतील अशा युक्त्याप्रयुक्त्या असतील फक्त ती रणनीतीच त्याला समजते. त्याला ज्ञानाची आणि प्रज्ञेची वाणी आवडत नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, मनुष्याची स्वतःच्या कृतींचे तर्कबुद्धीच्या साहाय्याने समर्थन करण्याची आवश्यकता वाढीस लागली आहे आणि त्यामुळे प्राणिक मनाने खास स्वतःची अशी एक रणनीती तयार केली आहे. स्वतःच्या भावभावना आणि आवेगांचे ज्याद्वारे समर्थन होईल अशा कारणांचा शोध घेण्यासाठी प्राणिक मन (vital mind) त्याची बुद्धी कामास लावते; हीच असते त्याची ती रणनीती.

या खेळामध्ये तर्कबुद्धी विजयी होणार हे जिथे अगदी स्पष्ट असते तेव्हा, प्राण कानच बंद करून घेण्याच्या त्याच्या मूळ सवयीकडे वळतो आणि तो त्याच्या स्वतःच्या मार्गाने जाऊ लागतो. या हल्ल्यामध्ये, तो आपण अपात्र असल्याची सबब पुढे करतो. तो म्हणतो, “तुम्ही माझ्या भावावेगांबाबत संतुष्ट नाही आणि मी तर काही ते बदलू शकत नाही, त्यामुळे मी अपात्र आहे हे दिसून येत आहे तर मी आता निघून जावे हे बरे,” त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्याने अंगीकारलेली ही रणनीती असते.

परंतु या रणनीतीलाही कोणी जर बिनतोड उत्तर दिले तर, प्राणाचा आवेग स्वयमेवच त्या उत्तराला तोंड देण्यास पुरेसा (सक्षम) असतो, कारण तो वैश्विक ‘प्रकृती’कडून आलेला असल्यामुळे सशक्त असतो. त्याच्यावर जो हल्ला झालेला असतो, तो परतवून लावण्यासाठी जुन्या अंध अतार्किक सहजप्रवृत्तीचे तो थोड्या काळासाठी का होईना पण पालन करतो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 103)