ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ११५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला अजून जरी सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका. कोणतेही काम करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे आणि त्याला ते अर्पण करणे आणि ते संपल्यावर (‘ईश्वरा’प्रति) कृतज्ञता व्यक्त करणे हे (तुमच्या) सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा काम करत असताना मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवावे.

…लोकं काम करताना जेव्हा सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते स्मरण त्यांच्या मनाच्या मागे असते. किंवा त्यांच्यामध्ये एकाच वेळी दोन विचारांची किंवा दोन चेतनांची एक क्षमता हळूहळू निर्माण झालेली असते. त्यापैकी एक चेतना पृष्ठभागी राहून कर्म करत असते आणि दुसरी चेतना साक्षी असते व स्मरण ठेवत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग राहिलेला होता. अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआप घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्यासरळ सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही.

कर्म करण्यासाठी महत्तर ‘शक्ती’ला आवाहन करत, अभीप्सा बाळगणे आणि आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की, जिच्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही लोकांना जरी त्यासाठी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयत्नांनीच करण्यापेक्षा, (आपल्या) अंतःस्थित असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’द्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे हे साधनेचे महान रहस्य आहे.

मनाद्वारे केलेले प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही. मात्र, तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या मनाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तसे करणे अध्यात्मामध्ये निपुण असणाऱ्यांना शक्य असते, पण इतरांना मात्र फार कष्टदायक ठरते.

…धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्येच आवश्यक असतात. बलवंतांसाठी सामर्थ्य हे ठीक आहे परंतु अभीप्सा आणि तिला ‘ईश्वरी कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे सर्वस्वी दंतकथा (myths) आहेत, असे नाही; तर या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 214-215)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago