ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ९६

‘ईश्वरा’चा वैयक्तिक साक्षात्कार हा कधी ‘साकार’ असू शकतो तर कधी तो ‘निराकार’ असू शकतो. ‘निराकार’ साक्षात्कारात, चैतन्यमय ‘दिव्य पुरुषा’ ची ‘उपस्थिती’ सर्वत्र अनुभवास येते. तर ‘साकार’ साक्षात्कारामध्ये, उपासना ज्याला समर्पित केली जाते ‘त्या’च्या प्रतिमेनिशी तो साक्षात्कार होत असतो. भक्तासाठी किंवा साधकासाठी ‘ईश्वर’ नेहमीच स्वतःला सगुणसाकार रूपात आविष्कृत करू शकतो. तुम्ही ज्या रूपामध्ये त्याची उपासना करता किंवा ज्या रूपामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न करता त्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडते किंवा तुमच्या आराधनेचे उद्दिष्ट असलेल्या ‘दिव्य व्यक्तिमत्त्वा’ला सुयोग्य असणाऱ्या अशा एखाद्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडू शकते.

‘ईश्वर’ कसा आविष्कृत होईल हे अनेकविध गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यामध्ये इतकी विविधता असल्यामुळे कोणत्याही एकाच नियमामध्ये ते बसविता येत नाही. कधीकधी हृदयामध्ये तर कधी अन्य एखाद्या चक्रामध्ये साकार रूपातील ईश्वराचे दर्शन होऊ शकते, कधीकधी ईश्वर वर राहून तेथून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, अशा प्रकारे दर्शन घडू शकते. तर कधीकधी ‘ईश्वरा’चे दर्शन बाहेरच्या बाजूस, म्हणजे तुमच्या समोर जणू एखादी देहधारी व्यक्ती असावी तशा रूपात घडू शकते.

त्याचा फायदा असा की त्यामुळे तुमचा त्याच्याशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होतो आणि तुम्हाला त्याचे नित्य मार्गदर्शन लाभू शकते. किंवा तुम्हाला जर अंतरंगामध्ये त्याचे दर्शन झाले किंवा त्याचा अनुभव आला तर, तुम्हाला त्याच्या नित्य ‘उपस्थिती’चा अगदी सशक्त आणि सघन साक्षात्कार होतो. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या आराधनेच्या आणि उपासनेच्या विशुद्धतेची पक्की खात्री असली पाहिजे. कारण देहधारी नातेसंबंधाच्या प्रकाराचा एक तोटाही असतो. तो असा की, इतर ‘शक्ती’ त्या रूपाचे सोंग घेऊ शकतात आणि त्याच्या आवाजाची, त्याच्या मार्गदर्शनाची नक्कल करू शकतात आणि जर त्याला रचलेल्या प्रतिमेची जोड दिली गेली (की जी खरी नसते,) तर त्याला अधिकच बळ मिळते. अनेक जणांची यामुळे दिशाभूल झालेली आहे. असे होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये अभिमान, प्रौढी आणि इच्छावासना प्रबळ होती. त्यामुळे त्यांच्यापासून अतिशय सूक्ष्म असा आंतरात्मिक अनुभव हिरावून घेण्यात आला, तो अनुभव मनोमय नव्हता. अशा वेळी एका क्षणात (तुम्हाला दिसलेल्या) श्रीमाताजींच्या प्रकाशाला या दिशाभूलीचे किंवा त्रुटींचे वळण लागू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 135-136)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

11 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago