ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ९६

‘ईश्वरा’चा वैयक्तिक साक्षात्कार हा कधी ‘साकार’ असू शकतो तर कधी तो ‘निराकार’ असू शकतो. ‘निराकार’ साक्षात्कारात, चैतन्यमय ‘दिव्य पुरुषा’ ची ‘उपस्थिती’ सर्वत्र अनुभवास येते. तर ‘साकार’ साक्षात्कारामध्ये, उपासना ज्याला समर्पित केली जाते ‘त्या’च्या प्रतिमेनिशी तो साक्षात्कार होत असतो. भक्तासाठी किंवा साधकासाठी ‘ईश्वर’ नेहमीच स्वतःला सगुणसाकार रूपात आविष्कृत करू शकतो. तुम्ही ज्या रूपामध्ये त्याची उपासना करता किंवा ज्या रूपामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न करता त्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडते किंवा तुमच्या आराधनेचे उद्दिष्ट असलेल्या ‘दिव्य व्यक्तिमत्त्वा’ला सुयोग्य असणाऱ्या अशा एखाद्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडू शकते.

‘ईश्वर’ कसा आविष्कृत होईल हे अनेकविध गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यामध्ये इतकी विविधता असल्यामुळे कोणत्याही एकाच नियमामध्ये ते बसविता येत नाही. कधीकधी हृदयामध्ये तर कधी अन्य एखाद्या चक्रामध्ये साकार रूपातील ईश्वराचे दर्शन होऊ शकते, कधीकधी ईश्वर वर राहून तेथून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, अशा प्रकारे दर्शन घडू शकते. तर कधीकधी ‘ईश्वरा’चे दर्शन बाहेरच्या बाजूस, म्हणजे तुमच्या समोर जणू एखादी देहधारी व्यक्ती असावी तशा रूपात घडू शकते.

त्याचा फायदा असा की त्यामुळे तुमचा त्याच्याशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होतो आणि तुम्हाला त्याचे नित्य मार्गदर्शन लाभू शकते. किंवा तुम्हाला जर अंतरंगामध्ये त्याचे दर्शन झाले किंवा त्याचा अनुभव आला तर, तुम्हाला त्याच्या नित्य ‘उपस्थिती’चा अगदी सशक्त आणि सघन साक्षात्कार होतो. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या आराधनेच्या आणि उपासनेच्या विशुद्धतेची पक्की खात्री असली पाहिजे. कारण देहधारी नातेसंबंधाच्या प्रकाराचा एक तोटाही असतो. तो असा की, इतर ‘शक्ती’ त्या रूपाचे सोंग घेऊ शकतात आणि त्याच्या आवाजाची, त्याच्या मार्गदर्शनाची नक्कल करू शकतात आणि जर त्याला रचलेल्या प्रतिमेची जोड दिली गेली (की जी खरी नसते,) तर त्याला अधिकच बळ मिळते. अनेक जणांची यामुळे दिशाभूल झालेली आहे. असे होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये अभिमान, प्रौढी आणि इच्छावासना प्रबळ होती. त्यामुळे त्यांच्यापासून अतिशय सूक्ष्म असा आंतरात्मिक अनुभव हिरावून घेण्यात आला, तो अनुभव मनोमय नव्हता. अशा वेळी एका क्षणात (तुम्हाला दिसलेल्या) श्रीमाताजींच्या प्रकाशाला या दिशाभूलीचे किंवा त्रुटींचे वळण लागू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 135-136)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago