साधना, योग आणि रूपांतरण – ९३
“व्यक्तीने नेहमी तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे.”
म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, तुम्हाला आलेल्या अनुभवाचे स्वरूप कोणतेही असले, त्याचे सामर्थ्य किंवा त्याची अद्भुतता कितीही असली तरी, त्या अनुभवाचा तुमच्यावर वरचष्मा असता कामा नये. म्हणजे त्यामुळे तुमचा तोल ढळता कामा नये आणि तुमच्या योग्य आणि स्थिरशांत दृष्टिकोनाबरोबर असलेला तुमचा संपर्कही ढळता कामा नये. म्हणजे, त्याने तुमच्या समग्र अस्तित्वाचे नियंत्रण करता कामा नये. इतके तुम्ही त्याच्या आधीन होता कामा नये.
म्हणजे असे की, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक बलवान असलेल्या एखाद्या शक्तीच्या किंवा चेतनेच्या संपर्कात येता तेव्हा, या चेतनेचे किंवा त्या शक्तीचे तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व चालवू देण्याऐवजी, तुम्ही स्वतःला नेहमी याची आठवण करून दिली पाहिजे की, शेकडो-हजारो अनुभवांमधील हा केवळ एक अनुभव आहे आणि परिणामी, त्याचे स्वरूप परिपूर्ण नाही, तर ते सापेक्ष आहे. (त्यामुळे) आलेला अनुभव कितीही सुंदर असला तरी, तुम्हाला त्याहूनही सुंदर असे अनुभव येऊ शकतात आणि आलेही पाहिजेत. तो अनुभव कितीही अपवादात्मक असेना का, त्याहूनही अधिक उत्कृष्ट अनुभव असतात. तुम्हाला आलेला तो अनुभव कितीही उच्च असेना का, तुम्ही भविष्यामध्ये नेहमीच त्याहून अधिक उच्चतर अनुभवाप्रत पोहोचू शकता. आणि अशा प्रकारे, त्याचा अहंकार होऊ न देता, तो अनुभव म्हणजे विकसनाच्या साखळीतील एक अनुभव आहे, या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि एक निरामय शारीरिक संतुलन कायम ठेवू शकता. आणि त्यामुळे सामान्य जीवनाबरोबर असलेली सापेक्षतेची जाणीवही तुम्ही गमावत नाही. तुम्ही अशा प्रकारे वागलात, तर मग कोणताही धोका असत नाही. हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत असते त्याला तसे करणे नेहमीच अगदी सोपे वाटते, परंतु हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत नसते त्याला ते काहीसे अवघड वाटू शकते. हे करण्याचा एक मार्ग आहे.
ईश्वरी कृपा म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. त्या कृपेप्रति संपूर्ण आत्मदान ही जी संकल्पना आहे ती कधीही विस्मरणात जाता कामा नये. तुम्ही जेव्हा स्वतःला ईश्वराप्रति देऊ करता, तुम्ही जेव्हा समर्पित होता; सर्वातीत, सर्व निर्मितीच्या अतीत असणाऱ्या त्या ईश्वराच्या हाती जेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्णपणे सोपविता, आणि त्या अनुभवापासून काही वैयक्तिक लाभ मिळवू पाहण्याऐवजी, तुम्ही ईश्वरी कृपेला तो अनुभव अर्पण करता आणि तो अनुभव हा ईश्वराकडून आलेला आहे आणि त्याचे फल तुम्ही त्यालाच परत केले पाहिजे हे जाणता तेव्हा, तुम्ही बऱ्यापैकी सुरक्षित असता.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कोणतीही महत्त्वाकांक्षा नको, प्रौढी नको, किंवा अभिमानदेखील नको. तुमच्यापाशी प्रामाणिक आत्मदान, प्रामाणिक विनम्रता असेल तर तुम्ही सर्व संकटांपासून सुरक्षित असता. “व्यक्तीने तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे” असे मी जेव्हा म्हणते तेव्हा मला हा अर्थ अभिप्रेत असतो.
– श्रीमाताजी (CWM 08 : 277-278)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025