साधना, योग आणि रूपांतरण – ९१
(अनुभव आणि साक्षात्कार या दोन्हीमध्ये काय फरक आहे असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा असे दिसते तेव्हा श्रीअरविंद यांनी त्यास दिलेले हे उत्तर…)
योगमार्गामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे अनुभव, अनुभूती (experiences) आणि साक्षात्कार (realizations) हे दोन प्रकार असतात. ‘ईश्वरा’चे मूलभूत सत्य, ‘उच्चतर’ किंवा ‘दिव्य प्रकृती’, जगत-चेतना आणि तिच्या विविध शक्तींची लीला, स्वतःचा आत्मा व खरी प्रकृती आणि वस्तुमात्रांची आंतरिक प्रकृती या गोष्टी चेतनेमध्ये ग्रहण करणे आणि त्यांची तेथे प्रस्थापना करणे म्हणजे साक्षात्कार! जोपर्यंत या सर्व गोष्टी तुमच्या आंतरिक जीवनाचा आणि अस्तित्वाचा एक भाग बनत नाहीत तोपर्यंत या सर्व गोष्टींची शक्ती तुमच्यामध्ये वृद्धिंगत होत राहते. उदाहरणार्थ, ‘ईश्वरी उपस्थिती’चा साक्षात्कार, उच्चतर ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘आनंद’ यांचे चेतनेमध्ये अवरोहण (descent) आणि अधिवसन (settling), त्यांचे चेतनेमध्ये चालणारे कार्य, ईश्वरी किंवा आध्यात्मिक प्रेमाचा साक्षात्कार, स्वतःच्या चैत्य पुरुषाचे होणारे प्रत्यक्षबोधन (perception), स्वतःच्या खऱ्या मनोमय पुरुषाचा, खऱ्या प्राणमय पुरुषाचा, खऱ्या अन्नमय पुरुषाचा शोध, अधिमानसिक किंवा अतिमानसिक चेतनेचा साक्षात्कार, या सर्व गोष्टींचे आपल्याशी असलेले जे नाते आहे त्याची आपल्या सद्यस्थितीतील गौण प्रकृतीला होणारी सुस्पष्ट जाणीव आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन व्हावे म्हणून त्यावर चाललेले त्यांचे कार्य. (अर्थातच ही यादी अजून कितीही वाढविता येण्यासारखी आहे.)
या गोष्टी जेव्हा वीजेप्रमाणे क्षणभर चमकून जातात, झपाट्याने येतात आणि निघून जातात किंवा अवचित पावसाची सर येऊन जावी तशा येऊन जातात तेव्हा या गोष्टींना बरेचदा ‘अनुभव’ असे संबोधले जाते. जेव्हा या गोष्टी अतिशय सकारात्मक असतात किंवा वारंवार घडतात किंवा सातत्याने घडतात किंवा त्या स्वाभाविक बनलेल्या असतात तेव्हाच त्यांचा ‘पूर्ण साक्षात्कार’ झाला, असे म्हटले जाते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 38)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…