ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ६१

(साधनेमध्ये काही कालखंड प्रगतीचे तर काही कालखंड नीरसपणे जात आहेत अशी तक्रार एका साधकाने केलेले दिसते. त्याला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही ज्या चढ-उतारांविषयी तक्रार करत आहात, त्याचे कारण असे की, चेतनेचे स्वरूपच तशा प्रकारचे असते; म्हणजे, काही काळ जागे राहिल्यानंतर थोडी निद्रेची गरज भासते. बरेचदा सुरुवातीला सजग अवस्था थोड्या वेळासाठी असते आणि निद्रा दीर्घ असते; नंतर दोन्हीचा कालावधी समसमान होतो आणि त्यानंतर निद्रेचा कालावधी कमी-कमी होत जातो.

या चढ-उतारांचे आणखी एक कारण असे असते की, जेव्हा तुम्ही ग्रहण करत असता तेव्हा, ते आत्मसात करण्यासाठी तुमच्या प्रकृतीला स्वतःला बंदिस्त करून घेण्याची गरज जाणवते. कदाचित तुमची प्रकृती खूप जास्त ग्रहण करू शकते परंतु जेव्हा तो अनुभव येणं सुरू असते तेव्हा त्याबरोबर जे येत असते, ते प्रकृती योग्य रीतीने पचवू शकत नाही आणि म्हणून ते आत्मसात करण्यासाठी ती स्वतःला बंदिस्त करून घेते.

रूपांतरणाच्या कालावधीमध्ये आणखी एक निमित्त कारण ठरते. ते असे की, तुमच्या प्रकृतीमधला एक भाग परिवर्तित झालेला असतो आणि तुम्हाला बराच काळ असेच वाटत राहते की झालेला बदल हा संपूर्ण आणि चिरस्थायी आहे. परंतु तो बदल नाहीसा झालेला आढळताच तुम्ही निराश होता आणि मग त्या पाठोपाठ, चेतनेचे निम्न स्तरावर पतन होण्याचा कालावधी येतो. हे असे घडते कारण आता चेतनेचा दुसरा एखादा भाग परिवर्तन व्हावे म्हणून अग्रभागी आलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ, पूर्वतयारीचा व पडद्यामागे चालू असणाऱ्या कामाचा कालावधी सुरू होतो आणि तो कालावधी तुम्हाला अंधकाराचा किंवा त्याहूनही वाईट असा वाटू लागतो.

साधकाच्या उत्सुकतेला आणि अधीरतेला या गोष्टी हुरहूर लावतात, कधी निराश करतात तर कधी व्याकुळ करतात. परंतु तुम्ही जर त्या अविचलपणे स्वीकारल्या आणि त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा किंवा योग्य दृष्टिकोन कसा अंगीकारायचा हे जर तुम्हाला ज्ञात असेल तर, या अंधकाराच्या कालावधींनादेखील तुम्ही सचेत साधनेचा एक भाग बनवू शकता. आणि म्हणूनच वैदिक ऋषींनी या चढ-उतारांचे वर्णन “रात्र आणि दिवस दोघेही आळीपाळीने दिव्य शिशुला स्तनपान करवितात,” असे केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 59)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago