ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ५९

साधक : जपाबद्दलची माझी जुनीच प्रतिक्रिया पुन्हा एकदा उफाळून आली आहे, त्याबद्दल मला वाईट वाटत आहे. नामजपाचे परिणाम दिसून यावेत म्हणून कदाचित माझे मन त्याचा अतिरेक करत असावे.

श्रीअरविंद : व्यक्तीने जपाचा अर्थ समजून घेतला, आणि त्या अर्थानिशी नामजप केला, तसेच त्या नामजपामधून ज्या ‘देवते’चा बोध होतो त्याविषयीचे एक आकर्षण, तिचे सौंदर्य, तिची शक्ती किंवा तिचे स्वरूप मनामध्ये साठवून जर नामजप केला आणि या गोष्टी चेतनेमध्ये उतरविल्या तर नामजप यशस्वी होतो. हा नामजपाचा मानसिक मार्ग झाला. किंवा जर तो नामजप हृदयामधून उदित होत असेल किंवा तो नामजप ज्यामुळे चैतन्यमय होईल अशी भक्तीची भावना किंवा तशी विशिष्ट जाणीव जर व्यक्तीमध्ये निनादत राहिली तर मग तो नामजप यशस्वी होतो, हा नामजपाचा भावनिक मार्ग आहे.

जप हा सहसा वरील दोनपैकी कोणत्या तरी एका परिस्थितीमध्ये यशस्वी होतो. जप यशस्वी होण्यासाठी त्याला मनाचा किंवा प्राणाचा आधार द्यावा लागतो किंवा त्याचे पोषण करावे लागते. परंतु जर जपामुळे मन रूक्ष होत असेल आणि प्राण अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये या आधाराचा किंवा पोषणाचा अभाव असतो हे निश्चित समजावे.

अर्थात आणखी एक तिसरा मार्गसुद्धा असतो. आणि तो म्हणजे त्या नामाच्या किंवा मंत्राच्या शक्तीवरच विश्वास ठेवायचा. परंतु जोवर ती शक्ती व्यक्तीच्या आंतरिक अस्तित्वावर त्या जपाच्या स्पंदनांचा प्रभाव उमटवीत नाही तोवर व्यक्तीने नामजप चालूच ठेवणे आवश्यक असते; असा प्रभाव पडल्यावर, मग कधीतरी अवचित एखाद्या क्षणी व्यक्ती ईश्वरी ‘अस्तित्वा’प्रत किंवा त्याच्या ‘स्पर्शा’प्रत खुली होते. परंतु हे घडून यावे म्हणून जर अट्टहास किंवा संघर्ष केला जात असेल तर, ज्या प्रभावाला मनाच्या अविचल ग्रहणशीलतेची आवश्यकता असते त्यामध्ये बाधा निर्माण होते. आणि म्हणूनच मनावर अधिक ताण न देता किंवा अतिरिक्त प्रयत्न न करता, मनाच्या अविचलतेवर अधिक भर देण्यास मी सांगत होतो. ग्रहणशीलतेची आवश्यक परिस्थिती मनामध्ये आणि अंतरात्म्यामध्ये विकसित व्हावी म्हणून त्यांना अवधी देणे आवश्यक असते. व्यक्तीला काव्याची किंवा संगीताची जशी स्फूर्ती प्राप्त होते त्याप्रमाणेच ही ग्रहणशीलतादेखील अगदी स्वाभाविक असते.

…सर्व ऊर्जा जपावर किंवा ध्यानावर खर्च करणे ही गोष्ट ताण निर्माण करणारी असते; व्यक्तीला वरून येणाऱ्या अनुभूतींचा अव्याहत प्रवाह जेव्हा अनुभवास येत असतो अशा काही कालावधींचा अपवाद वगळला तर, ज्यांचा यशस्वी ध्यानधारणेचा अभ्यास आहे त्यांनासुद्धा ही गोष्ट काहीशी अवघड वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 328-329)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago