ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ५७

(कालच्या भागामध्ये आपण मन निश्चल-नीरव करण्याच्या विविध पद्धती समजावून घेतल्या. विचारांना अनुमती न देणे, विचारांकडे साक्षी पुरुषाप्रमाणे अलिप्तपणे पाहणे आणि मनात येणाऱ्या विचारांना ते आत प्रवेश करण्यापूर्वीच अडविणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करूनही, जर मन निश्चल-नीरव झाले नाही तर काय करावे, असा प्रश्न येथे साधकाने विचारला असावा असे दिसते. त्यास श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

यापैकी कोणतीच गोष्ट घडली नाही तर अशा वेळी (विचारांना) नकार देण्याची सातत्यपूर्ण सवय ही आवश्यक ठरते. येथे तुम्ही त्या विचारांशी दोन हात करता कामा नयेत किंवा त्यांच्याशी संघर्षही करता कामा नये. फक्त एक अविचल आत्म-विलगीकरण (self-separation) आणि विचारांना नकार देत राहणे आवश्यक असते. सुरुवातीला लगेच यश येते असे नाही, पण तुम्ही त्या विचारांना अनुमती देणे सातत्याने रोखून ठेवलेत, तर अखेरीस विचारांचे हे यंत्रवत गरगर फिरणे कमीकमी होत जाईल आणि नंतर ते बंद होईल. तेव्हा मग तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आंतरिक अविचलता (quietude) किंवा निश्चल-नीरवता (silence) प्राप्त होईल.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता, योगिक प्रक्रियांचे परिणाम हे त्वरित दिसून येत नाहीत आणि म्हणून, परिणाम दिसून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही या प्रक्रिया अगदी धीराने अवलंबल्या पाहिजेत. व्यक्तीची बाह्य प्रकृती (मन, प्राण आणि शरीर) खूप विरोध करत असेल तर, हे परिणाम दिसून येण्यास कधीकधी बराच कालावधी लागू शकतो.

जोपर्यंत तुम्हाला उच्चतर ‘आत्म्या’ची चेतना गवसलेली नाही किंवा तिचा अनुभवच जर तुम्हाला आलेला नाही, तर तुम्ही तुमचे मन त्या उच्चतर आत्म्यावर कसे काय स्थिर करू शकता? तुम्ही ‘आत्म्या’च्या संकल्पनेवरच लक्ष एकाग्र करू शकता किंवा मग तुम्ही ‘ईश्वरा’च्या किंवा ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू शकता किंवा त्यांच्या मूर्तीवर, चित्रावर किंवा भक्तीच्या भावनेवर लक्ष एकाग्र करू शकता; ‘ईश्वरा’ने किंवा ‘दिव्य माते’ने तुमच्या हृदयात प्रविष्ट व्हावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला तुम्ही आवाहन करू शकता किंवा तुमच्या शरीर, हृदय आणि मनामध्ये ‘दिव्य शक्ती’ने कार्य करावे म्हणून, तसेच तुमची चेतना मुक्त करून, तुम्हाला तिने आत्म-साक्षात्कार प्रदान करावा म्हणून, तुम्ही ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करू शकता.

तुम्ही जर ‘आत्म्या’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू इच्छित असाल तर ती संकल्पना मन आणि त्याचे विचार, प्राण आणि त्याची भावभावना, शरीर आणि त्याच्या कृती यांपासून काहीशी भिन्न असलीच पाहिजे; या सर्वापासून अलिप्त असली पाहिजे, ‘आत्मा’ म्हणजे एक ‘अस्तित्व’ किंवा ‘चेतना’ आहे अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजेत. म्हणजे आजवर मन, प्राण, शरीर यांच्या गतिविधींमध्ये मुक्तपणे समाविष्ट असूनही त्यांच्यापासून अलिप्त असणारा ‘आत्मा’ अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 303-304)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

8 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago